रविवार, ७ मे, २०२३

विचारांचा विचार करायला लावणारी कथा ‘द केरला स्टोरी’

दुपारी ‘द केरला स्टोरी’ पाहायला गेलो, अजूनही त्याचा त्रास जात नाही. हा चित्रपट म्हणजे अनेक प्रश्‍न स्वत:लाच विचारायला लावणारा त्रासदायक छळवाद आहे. मुलींनी ज्या वयाच्या ज्या टप्प्यावर हा चित्रपट पाहिला पाहिजे, त्या वयात त्यांना तो पाहता येणार नाही, असे प्रमाणपत्र चित्रपटाला मिळाले आहे. त्यापेक्षा जास्त किळसवाणी हिंसा व बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झाली आहेत, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्‍या सेन्सर बोर्डच्या गावी नसावे. 

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे फार कमी चित्रपट सिद्ध करतात. हा त्यापैकीच एक आहे. एरव्ही आपण पाहतोय तो चित्रपट आहे याची जाणीव प्रत्येक फ्रेममधून करून देणारे अनेक चित्रपट येतात आणि जातात. ‘द केरळा स्टोरी’ पाहताना संपूर्ण चित्रपटभर मला स्वत:लाच सांगावे लागत होते की, ‘हा चित्रपट आहे’. चार मुलींवर बेतलेली ही कथा, खरे तर चार विचारधारांचे प्रवाह आहेत. त्यातल्या दोन हिंदू आहेत, एक ख्रिश्‍चन आहे आणि एक मुस्लीम. हिंदूमधील एक साम्यवादी आहे. हिंदुत्व, साम्यवाद, ख्रिश्‍चनिटी आणि इस्लाम यांच्यावर लहान लहान गोष्टींमधून होणारे भाष्य फार महत्त्वाचे आहे. जे संवाद आहेत, त्यापेक्षाही जिथे फक्त कॅमेरा सरकताना काही दृश्ये बोलतात ते ऐकणे, समजणे फार आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, नर्सिंग कॉलेजमध्ये शालिनी उन्निकृष्णन प्रवेश करते तेव्हा तिथल्या भिंतींवरून कॅमेरा सहज पुढे सरकतो. तिची थांबलेली नजरही कॅमेरा टिपतो. त्यानंतर काही वेळाने प्राध्यापिकेचे स्वागतपर भाषण आहे, त्यातल्या शब्दांचा खरा अर्थ सांगण्याचे काम भिंतीवरून फिरलेला कॅमेरा आधीच करतो. हे दिग्दर्शकाचे कौशल्य. सिरियात जाण्याआधी ज्या भागातून ती दोघे जातात, तिथे असलेले होर्डिंग खूप काही सांगून जातात. 

जेवायला गेल्यानंतर मुस्लीम मुलगी, ख्रिश्‍चन मुलगी, साम्यवादी मुलगी व हिंदू मुलगी याचे वागणे, बसणे, जेवणाआधी प्रार्थना करणे व त्यावरचा संवाद प्रत्येकीची लहानपणापासून तयार झालेली भूमिका सांगून जातो. नृत्य करायला तिघी जातात, मुस्लीम मुलगी तिथेच बसून राहते. साधे दृश्य आहे, पण खूप काही सांगून जाते. 

सांगण्यासारखे, छळवाद करण्यासारखे, स्वत:लाच प्रश्‍न विचारून घेण्यासारखे खूप काही आहे. डोक्यातून एक गोष्ट काढून टाकून या चित्रपटाकडे पाहणे आवश्यक आहे. हा चित्रपट इस्लामविरोधी नाही, तर दहशतवादाविरोधात आहे. इस्लाम उलगडून सांगणारा आहे. जगभर एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या इस्लामी व साम्यवादी विचारधारा, भारतात मात्र हातात हात घालून एकमेकांची पाठराखण करत फिरतात, हे सांगणारा चित्रपट आहे. केवळ हिंदूंनीच नव्हे तर मुसलमानांनीही हा चित्रपट अवश्य पाहावा. संपूर्ण जग इस्लाममय झाले तर काय होईल, याचा अंदाज येईल. (‘लिप्स्टिक लावली तर हात कापण्याची शिक्षा इस्लाममध्ये हे भारतात कुणीच सांगितलं नाही’, हा संवादही खूप काही सांगून जातो.) सांस्कृतिक विस्तारवादाचे दहशतवादी स्वरूप लक्षात येईल. पंथाने आपण मुसलमान, ख्रिश्‍चन असलो तरी धर्माने हिंदू राहणे किती हितावह आहे, याचा अंदाज येईल. साम्यवादाच्या भारावलेपणातून बाहेर न पडलेल्यांना आपण काय गमावले आहे, याचा अंदाज येईल. जसा हा चित्रपट इस्लामविरोधी नाही, तसाच तो केरळविरोधातही नाही. या चित्रपटाचा विरोध आयसिस या दहशतवादी संघटनेला आहे. भारतभरातील मुसलमानांनी ठरवायचे आहे की, आयसिसविरोधात चित्रपट म्हणजे इस्लामविरोधात चित्रपट असे आहे का? केरळमध्ये घडणारी घटना आहे, म्हणजे केरळविरोधात आहे का? 

इस्लामी सांस्कतिक विस्तारवाद व साम्यवाद यांनी हातात हात घालून कुटुंब, संस्कृती, श्रद्धा व धर्म संपवाण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. आपली तान्हुली मुलगी परत आणून द्या म्हणून टाहो फोडणार्‍या मातेपासून सुरू होणारा चित्रपट, आपल्याला सोडून गेलेल्या मुलीच्या जीवनाची वाताहत झालेली पाहून दु:खी होणार्‍या तिच्याच आईपाशी थांबतो. तीन मुलींच्या व्यथेसोबतच ही दोन आईंचीही व्यथा आहे. 

अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत निखळत चाललेल्या कुटुंबातील आई या घटकाच्या वेदना सूक्ष्मपणे सांगणे मला हेलावून गेले. आजी, आई व नात यांचे संबंध, आपली मुलगी इस्लाम स्वीकारून निकाह करतेय हे कळाल्यावर, जावयासकट मुलीलाही स्वीकारण्याची तयारी दाखवणारी आई, मुलीला यायचेच नाही हे कळाल्यावर व्याकुळ झालेली आई, मुलीच्या न येण्याचे कारण कळाल्यावर हातातून मोबाइल गळून पडलेली आई, मुलीने संपर्क केला म्हणून तिला भेटायला डबा घेऊन जाणारी आई आणि शेवटी फोनवर मुलीला ‘आई झाल्यावर कसं वाटतं?’, असं विचारणारी आई. हा एक सलग अनुबंध आहे, जो विस्कटून गेलेल्या कुटुंबाचे धागे सोडवत जातो. 

त्या आईचे दु:ख बहुधा मला आणखी अनेक दिवस छळत राहणार आहे. प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी हा चित्रपट पाहावा. हा केवळ चित्रपट नाही, हा विचार आहे जो प्रत्येकाने करावा.