कर्नाटकात विद्यालयामध्ये गणवेषात हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन आणि इराणमध्ये हिजाब, बुर्का न घालण्याच्या स्वातंत्र्याचे भारतात समर्थन, अशा परस्परविरोधी गोष्टी उदारमतवादी विचारवंत मांडताना दिसतात. इस्लामी देश आणि लोकशाही असलेला देश असे भिन्नत्व असल्याने हे परस्परविरोधी समर्थन भारतात केले जात आहे की, त्यामागे आणखीही काही भूमिका आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
आपण एखादी गोष्ट निवडतो तेव्हा फक्त ‘आपले निवड करण्याचे स्वातंत्र्य’ ही एकच बाब त्यामागे असते का? कपडे कोणते घालावेत, याची निवड करताना आपल्याला वाटेल तसे निवडण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच इतर अनेक बंधने आपण पाळतो. प्रसंग, काळ, वेळ, हेतू, सामाजिक संकेत या सर्व बाबी विचारात घेत त्यातून जे योग्य वाटेल ते आपण निवडतो. खास करून घराबाहेर पडताना. घरात, चार भिंतीच्या आत आपण काय घालावे, काय घालू नये याची निवड करताना आपण आपले निवडस्वातंत्र्य पूर्णत: वापरतो. चारचौघांत जायचे असते तेव्हा, जिथे जायचे आहे ते स्थान कोणते आहे, तो प्रसंग काय आहे, वेळकाळ काय आहे यासह इतर अनेक गोष्टींचा विचार करतो. लग्नाला जाताना जसे कपडे आपण घालतो, तसे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटायला जाताना घालत नाही. पोहायला जातानाचे कपडे पाहायला जाताना घालत नाही. पाय मोकळे करायला जातानाचे कपडे ऑफिसमध्ये घालून जात नाही. आपले निवड करण्याचे स्वातंत्र्य अमर्याद नाही, याचे भान आपल्याला असते व ते आपण ठेवतो.
प्रत्येक सापेक्ष गोष्टीचे अस्तित्व, तिच्या विरुद्ध गोष्टीमुळे असते. बंधनाशिवाय स्वातंत्र्य असूच शकत नाही. म्हणून कुठल्याही स्वातंत्र्याचा अमर्याद वापर अयोग्य आहे. मग ते व्यक्तिस्वातंत्र्य असो किंवा निर्णयस्वातंत्र्य. मुळात स्वातंत्र्य हा अधिकार, हक्क नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. ‘मला वाट्टेल तसं वागेन’ हे स्वातंत्र्य नव्हे. ‘मला जसं वागणं योग्य आहे, तसं वागेन’ म्हणजे स्वातंत्र्य.
मुस्लीम स्त्रीने मशिदीत जाताना जसा वेष कुराणला अपेक्षित आहे, तसाच तो घालणे योग्य आहे. मशिदीत बिकिनी घालून जाणे, हे स्त्रीचे निर्णयस्वातंत्र्य म्हणून योग्य नव्हे. जिथे ईश्वराची उपासना, प्रार्थना करायची त्याजागी जाताना वेषही त्या पंथानुरूप असावा. स्विमिंगपूलमध्ये बुर्का घालून पोहणे योग्य नाही. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. बुर्का घालणे इस्लामी प्रथेप्रमाणे अनिवार्य आहे व तो सोडून पोहताना स्विमिंग ड्रेस घालावा लागतो यासाठी पोहणेच सोडून दे असे जलतरणपटू मुस्लीम महिलेला सांगणे अयोग्य व चुकीचे आहे.
मंदिर, चर्च, मशीद ही प्रार्थनास्थळे आहेत, पर्यटनस्थळे नाहीत. त्यामुळे तिथे जाताना उचित पेहराव असावा. मशीद वगळता इतर दोन्ही ठिकाणी या अपेक्षेचे, व्यक्तिस्वातंत्र्य व निर्णयस्वातंत्र्य या नावाखाली सर्रास उल्लंघन केले जाते. या सांस्कृतिक संकेतांचे उल्लंघन करणे, वरवर पटणार्या गोष्टींसाठी संस्कृतीविषयी नकारात्मक भावना भारतीयांमध्ये निर्माण करणे हे साम्यवादी हेतू स्पष्ट दिसतात. ‘प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन’ यांची संख्या जगभरात कमी होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. साम्यवादी व इस्लामपंथीय यासाठी हातात हात घालून कार्य करतात. ‘अंगभूत फुटीरतावाद’ या व अशा अनेक समान धाग्यांमुळे हे जाळे जगभर विणले जात आहे. विचारधारा म्हणून असलेला साम्यवाद आता एक पंथ (कल्ट) बनला आहे. सातत्याने अविचारी कृत्ये करणार्या इस्लामला विचारांची बैठक देण्याचे काम साम्यवाद जगभर आणि भारतातही करत आला आहे. त्यामुळे, कृतीत अंतर्विरोध दिसत असला तरीही हेतूमध्ये तो नाही हे लक्षांत घेणे आवश्यक आहे. कारण, दोन्ही गोष्टींचे समर्थन भारतीय विचारवंतांकडूनच भारतात केले जात आहे. ‘झुंडशाहीने नियमांना नाकारणे’ हे कर्नाटकातील हिजाबसमर्थनाचे कारण आहे. तर, ’निर्णयस्वातंत्र्याचा हट्टाग्रह’ इराणी हिजाबविरोधाचे समर्थन भारतात करण्यामागचे कारण आहे. बहुतांश इस्लामी स्त्रिया हिजाब व बुर्का पांथिक बंधन म्हणून घालतात. या पांथिक बंधनालाच ‘इस्लामी महिलांचे निर्णयस्वातंत्र्य’ म्हणून प्रस्थापित केले जात आहे. असे करण्याचा प्रशस्त राजमार्ग म्हणजे इराणमधील हिजाब न घालण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन. वरवर या परस्पर विरोधी गोष्टी वाटतात, पण त्या साम्यवादी हेतूने प्रेरित आहेत.
व्यवस्थेवरील विश्वास उडणे, आपल्याच संस्कृतीची लाज वाटणे, कुटुंब व्यवस्था मोडकळणे, समाज म्हणून एकत्र येण्याऐवजी व्यक्ती महत्त्वाची ठरणे या गोष्टींकडे बारकाईने पाहिल्यास अनेक गोष्टींवर असलेला ‘साम्यवादी बुर्का’ दूर होईल यात शंका नाही.