बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

सत्ता ते सत्तार व्हाया संजय...

होय नाही, होय नाही असे करता करता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकनाथ शिंदेंना संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना घेणे इतके आवश्यक होते का? एका संजयने उद्धव ठाकरेंची शिवसेना बुडवली आणि आता दुसरा संजय एकनाथांच्या शिवसेनेचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही.

या मंत्रिमंडळाचा विस्तार आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अगतिकतेचा विस्तार आहे, हेच कळत नाही. अब्दुल सत्तार यांच्यावर टोकाची टीका करणारे भाजपचे कार्यकर्ते अक्षरश: तोंडावर आपटले. चित्रा वाघ यांच्यासह अनेकांनी संजय राठोड यांच्याविरुद्ध रान पेटवले आणि उद्धव ठाकरेंनी ज्यांना काढून टाकले, त्यांनाच मंत्रिपद मिळावे हा भाजपच्याच अगतिकतेचा विस्तार आहे. भाजपला खाली खेचणारे पहिल्या पाचात कसे? पाच टक्के कमिशनसाठी निधीच कंत्राटदारांना दान देणारे मंत्रिमंडळात कसे?

केवळ, आलेले पुन्हा उद्धव गटात जातील या भीतीपोटी वाट्टेल ते समीकरण स्वीकारणे हे राजकारण नव्हे. मग, उद्धव ठाकरे काय वाईट होते? युती टिकवण्यासाठी ज्या नाकदुर्‍या नितिश कुमार यांच्या बिहारात काढल्या त्याच सध्या महाराष्ट्रात काढल्या जात आहेत. भाजप आणि शिंदे गटासाठी हे अत्यंत घातक राजकारण आहे. राठोड आपल्यासह आणखी चार पाच जणांना घेऊन गेले असते, तर एवढं काय नुकसान झालं असतं? जे नुकसान झालं असतं त्या पेक्षाही अधिक नुकसान राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याने होणार आहे.
 
या पहिल्या फळीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप बाद झाला आहे. सर्वांत जास्त घातक गोष्ट म्हणजे ‘जे आले आहेत, ते जातील’ याची भीती. ही भीती भाजपची प्रतिमा धुळीस मिळवेल. शिंदे गटासाठीही अत्यंत वाईट अवस्था आहे. भाजपवाले ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांनाच पद देऊन भूषवणे हे भाजपच्या पुढील वाटचालीसाठी योग्य होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी सत्तार, राठोड यांना स्थान देण्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. ज्यांच्याविरुद्ध रान पेटवले त्यांचीच ओवाळणी करणे याचे समर्थन भाजप कुठल्या तोंडाने करणार आहे?

विस्तारापेक्षाही पुढचा कारभार करणे फारच कठीण आहे. यापुढे ज्याच्यावर भाजप आरोप करत आहे, तो पुढे जाऊन भाजपमध्ये आल्यावर पवित्र होईल, याची खात्रीच पटत चालली आहे. अक्षरश: संजय राऊत व अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले तरी त्यात काही नवल वाटणार नाही. संख्याबळ हेच सर्व ठरवत असेल तर भाजपने तत्त्वांच्या बाता मारणे बंद करावे. पदरी पाडून घेऊन पवित्र करण्याचे धंदे बंद करावेत.

चित्रस्रोत : आंतरजाल

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

या ईड्येच्या नादात....

सीबीआय, ईडी यासारख्या व्यवस्थांचा वापर, गैरवापर होत नाही किंवा यापुढे होणार नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण, या सबबीआड भ्रष्टाचारी व्यक्तींना लपू द्यायचं का? हा खरा प्रश्न आहे, ज्याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करणे आवश्यक आहे.
२०१४पासून ईडी (अंमलबजावणी/सक्तवसुली संचालनालय)च्या वाढत्या कारवाया पाहता हे पाऊल भ्रष्टाचाराविरुद्ध आहे की, विरोधकांविरुद्ध आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे पत्राचाळीतल्या लोकांना बेघर व्हावे लागणे आणि अर्पिता मुखर्जीच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडणे या बाबीही दुर्लक्षून चालणार नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आपण सरकारी जमीन लुटणार्‍यांना आणि भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण तर देत नाही, याचा विचार होणे आवश्यक आहे. 

दहशतवाद आणि भ्रष्टाचार याविरुद्ध केंद्र सरकारने उचललेली पावले खरोखरच कौतुकास्पद आहेत. पण, त्यामागचा हेतू शेवटपर्यंत शुद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. भाजपने ईडीचा वापर ‘विरोधकांविरुद्धचे संहारक हत्यार’ असा केल्यास तो भाजपचा राजकीय पराभव ठरेल. 

तृणमूल काँग्रेसचे पार्थ चटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या फ्लॅटमधून ईडीने कोट्यवधींची रोकड जप्त केल्यानंतर, त्यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ममतांनी त्यासाठी सहा दिवस घेतले. हा एवढा मोठा घोटाळा ममतादीदींना माहीत नसेल, असे होणे शक्यच नाही. वेळीच कारवाई करण्याची हिंमत त्यांना झाली नाही. आताही भाच्याला अभय देण्याच्या बदल्यात पार्थ यांचा ‘अभिमन्यू’ तर केला नसेल? इथेच एक महत्त्वाची गोम आहे, जी भाजपसाठी खूप घातक आहे. ‘राजकीय सेटलमेंट’ करण्यासाठी ईडीच्या कारवाईचा वापर केल्यास, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा दावा खोटा ठरेल व विश्वासार्हता कमी होईल.  ‘मनी लॉन्ड्रींग’ विरोधातील कायद्याचा वापर, भ्रष्ट नेत्यांना स्वच्छ करून पक्षात सामील करून घेण्याची ‘लॉन्ड्री’ करणेही असेच घातक ठरेल. हे ‘पदरी पाडून घेऊन पवित्र करणे’ विरोधी पक्षांप्रमाणेच भ्रष्ट नेत्यांना अभय व संरक्षण देणारे ठरेल. 

भाजपनेच पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते, आज भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत आहेत. भ्रष्टाचारी व्यक्ती राजकीय पक्षाचा वापर करून घेत असतो. विरोधी असलेला कुठलाही पक्ष काय किंवा सत्तेत असलेला पक्ष काय, त्याच्यासाठी फक्त भ्रष्टाचार लपवण्यासाठी कवच असतो. पक्ष बळकट होण्यासाठी असल्यांना जवळ करणे पक्षासाठीच धोक्याचे ठरते. त्याही पुढे जाऊन स्वपक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांवरही कारवाई करण्याचे धाडस सत्ताधारी भाजपने दाखवणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी, सत्ताधारी पक्षातील भ्रष्ट नेत्यांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करणे, त्याचा पाठपुरावा करणेही तितकेच आवश्यक आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची चौकशी, पत्रा चाळप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी व अटक, पार्थ चटर्जी व अर्पिता मुखर्जी यांना अटक या कारवाईविरोधात त्या त्या पक्षांची प्रतिक्रियाही विचित्र होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, पार्थ चटर्जी व अर्पिता मुखर्जी यांच्यावरील कारवाई ‘राजकीय सूड’ या सदरात घालून काँग्रेस व तृणमूल काँग्रेस मोकळी झाली. संजय राऊत यांच्या अटकेला ‘महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान’ या सदराखाली ढकलून उद्धव ठाकरे मोकळे झाले. 

काँग्रेसने व तृणमूल काँग्रेसने राजकीय सूड उगवला नाही? राज्ये बरखास्त करताना कायद्याचाच आधार काँग्रेसने घेतला होता. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांप्रमाणेच राजकीय हत्या केल्या. ही सूडबुद्धीच तर आहे. वाधवान या अमराठी व्यापार्‍याला लाभ मिळवून देण्यासाठी ६७२ मराठी कुटुंबे बेघर करणे हा ‘महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा’ अपमानच तर आहे. त्यामुळे, सूड व अस्मितेच्या अपमानाचे बोथट मुद्दे उपस्थित करणे गैरलागू होते. याचे आणखी एक मासलेवाईक उदाहरण म्हणजे स्मृती इराणी यांच्या मुलीचा उल्लेख आपणच मागवलेल्या आरटीआय अहवालात नसताना करणे. त्याऐवजी ‘इराणी कुटुंबीय यात गुंतले आहेत’, असा उल्लेख करणे जास्त उपयुक्त ठरले असते. आयरिश रॉड्रिग्ज यांनी तयार करून दिलेल्या भाजपविरोधी भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी मातीमोल करून टाकले. मेलेल्या व्यक्तीच्या नावे परवान्याचे नूतनीकरण कुणी केले, हा प्रश्न महत्त्वाचा होता. पण, त्याऐवजी  हातात, बगलेत दारूच्या बाटल्या घेतलेल्या स्मृती इराणींचे व्यंगचित्र शेअर करण्यापलीकडे काहीही रेखाटले गेले नाही. ‘तुम्ही आमच्या नेत्यांचे नाव खराब करत असाल तर आम्हीही तुमच्या नेत्यांचे नाव खराब करू’ या नेतृत्वप्रेमाच्या बाळबोध अट्टहासापायी हे राजकीयदृष्ट्या चुकीचे पाऊल विरोधी पक्ष उचलत आहेत. 

ही चुकीची पावले उचलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, काँग्रेससकट सर्व विरोधी पक्षांकडे फक्त नेतेच उरले आहेत, संघटना कधीचीच संपली आहे. अन्यथा, केवळ प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई या एकाच मुद्द्यावर देशभरात हलकल्लोळ माजवणे सहज शक्य होते. उलट, महागाईच्या झळा सोसूनही सरकारचे जनसमर्थन कमी झाले नाही. विरोधकांनी सगळा प्रकाशझोत केवळ आपल्या नेत्यांवरच ठेवला आहे, महागाईच्या मुद्द्यावर नाही. तो ठेवला असता तर नेत्यांवरील कारवाईला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. संजय राऊत यांची ओवाळणी माध्यमांनी, जणू काही ते राष्ट्रकार्य करण्यासाठी युद्धभूमीवरच चालले आहेत अशा थाटात चोवीस तास दाखवली नसती. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी लोकांच्या प्रश्नांना हात घालणे, ते प्रश्न देशव्यापी बनवणे आवश्यक असते, आपल्याच नेत्यांच्या आरत्या ओवाळणे नव्हे.

‘सीबीआयला कारवाई करण्यासाठी राज्यांनी परवानगी न दिल्यामुळे ते शस्त्र निकामी ठरले आणि त्यामुळे केंद्राने ईडी हे नवे हत्यार पाजळले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्याला धार चढवली.’ यातही फारसे तथ्य नाही. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी गोव्यात सीबीआयचे कार्यालय उघडायला विरोध केला होता. तेच काम इतर राज्यांनीही केले. पण, म्हणून ईडी सक्रिय झाली असे म्हणणे चुकीचे आहे. आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार याची प्रकरणे स्वतंत्रपणे हाताळणे खूपच गरजेचे होते. याआधी अनेक आर्थिक गुन्हेगार केवळ राज्य व केंद्र यांच्यातील असहकारामुळेच वाचले आहेत. आपली स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी राजकीय पक्ष स्वीकारणे, सोडणे व त्या त्या पक्षांनी त्यांना सत्ता व संख्यबळासाठी आश्रय देणे सुरूच आहे. आपण या ‘भ्रष्टाचार’ या मूळ मुद्द्याकडे लक्ष न देता भलतीकडेच भरकटत आहोत. 

वस्त्रहरण या मालवणी नाटकात विदुराची भूमिका साकारणारा बारक्या चकणे विडी ओढत उभा राहतो. युधिष्ठिराचे पात्र साकारणारा भाग्या भागावणे त्याचे पाय धरून कंटाळतो. प्रॉम्प्टरच्या सांगण्यावरून बारक्या भानावर येतो आणि म्हणतो, ‘माफ कर राजा. या इड्येच्या नादात तुला उठ म्हणायचंच विसरून गेलो.’ नाटक, त्यात आपली भूमिका याला अजिबात महत्त्व न देता तोंडातील ‘इडी’ला महत्त्व देणार्‍या बारक्या चकणेपेक्षा आपले राजकीय नेते, माध्यमे वेगळी नाहीत. 

राजकीय पक्षांना कात्रीत पकडण्यासाठी ईडी नसून ती आर्थिक गैरव्यवहार करणार्‍यांविरोधात आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. अन्यथा, राजकीय वस्त्रहरण करण्यापलीकडे या ईडीचा काडीइतकाही उपयोग होणार नाही! 

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

माणूस असेल मोठा, पण...


‘टिळक पुण्यतिथीनिमित्त हेडगेवारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून याल का?’ या कौस्तुभ कारखानीस यांनी विचारलेल्या प्रश्नाला लगेच हो म्हणून टाकलं. हवी तिथे (बहुतांश वेळा नको तिथे) माहिती पाजळायची जुनाट सवय काही केल्या जात नाही. कुणासमोर बोलायचं आहे, या प्रश्नाला ‘इयत्ता पहिली ते चौथी’ हे उत्तर ऐकल्यानंतर पायाखालून बरंच काही सरकून गेलं. चतुर माणसांनी कारखानिसांना नकार का दिला, याचा लख्ख प्रकाश टाळक्यात पडला. स्वत:चाच उजेड हवा तेव्हा न पडण्याची इतकी सवय झाली आहे की, टाळक्यात पडलेला प्रकाश सहन होईना. 

सोपं करून सांगण्याइतकं कठीण जगात दुसरं काहीच नसतं. याचा परवा अंदाज आणि आज अनुभव आला. हेडगेवारमधील टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्तम झाला. गावडेबाईंनी पुढाकार घेऊन मुलांच्यातील मूर्तिकला जोपासण्याचा केलेला प्रयत्न खूप आवडला. मुलांनी केलेला चिकणमातीचा गणपती खूप आवडला. केवळ हेडगेवार विद्यालयापुरते असे उपक्रम मर्यादित न राहता ते प्रत्येक शाळेने राबवणे आवश्यक आहे. अंगद गाडगीळ, सान्वी फोवकर आणि ऋत्विक गावकर या मुलांनी खूप चांगली भाषणे केली. इयत्ता दुसरीत असलेली सान्वी महाडेश्वर या मुलीचे पाठांतर आणि सभाधीटपणा प्रचंड आवडला. 

लोकमान्य टिळक यांचे कार्य, कर्तृत्व, विचार, वाद याबद्दल वाट्टेल तेवढे बोलण्याची क्षमता असली, तरीही ज्यांनी ते ऐकायचे आहे, ते त्यासाठी तयार आहेत का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. लोकमान्य व इतर सर्व मोठे लोक आपल्याला खरंच समजले आहेत की, ते जयंती आणि पुण्यतिथीपुरते मर्यादित आहेत, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. मोठ्या माणसांचं जाऊ द्या, स्वातंत्र्यदिन शुक्रवारी येणं आपल्याला आनंद देऊन जातं आणि रविवारी येणं नाही. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक यांचं महत्त्व आपल्या उरलं नाही की, आपल्याला ते समजतच नाही? लहान मुलांना ते समजणं कठीण आहे, पण शिकल्या सवरल्या माणसांनाही ते समजू नये याचं आश्चर्य वाटतं. त्याहीपेक्षा आपल्या आयुष्यात त्यांना स्थान नसणं, खूप विचित्र वाटतं. 

आपण या महापुरुषांची विभागणी करून घेतली आहे. टिळक पुण्यतिथीला त्यांच्याविषयी आंबेडकरांच्या मतांचा पुनरुच्चार करायचा, गांधी, नेहरू, फुले, शाहू महाराज यांचा उल्लेख करायचा. एकाच देव्हार्‍यातील आपल्याच दैवतांना एकमेकांविरुद्ध लढवून आपण नेमकं काय साध्य करत आहोत. दैवतांना फरक पडत नसेल कदाचित, पण आपला देव्हारा भंग होत चालला आहे. अभिमान आणि अस्मिता यांच्या झुंडशाहीत आपण गुंतत चाललो आहोत. ज्यांच्या नावे आपण भांडत आहोत, त्यांना प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात किती उतरवलं आहे, याचा विचार प्रत्येकाने करावा.

आपले आधीच तयार असलेले निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आपण महापुरुषांचा वापर करत आहोत. त्यांच्या विचारांशी, कार्याशी आपल्याला काहीच देणंघेणं नसतं. म्हणूनच त्यांची व्याप्ती जयंती आणि पुण्यतिथीपुरती आपण करून टाकली आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क/अधिकार आहे..’ हे केवळ दोनच दिवस आपल्याला आठवतं. बाकी जयंती आणि पुण्यतिथी यांचा संबंध तिथीशी तोडून टाकत, आपण तो तारखेशी जोडला आहे. यातून शिवाजी महाराजही सुटले नाहीत. 

‘नाही, माणूस असेल हो मोठा. पण, आमच्या हिशेबी त्यांच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर?’ हा पुलंच्या अंतू बर्व्याला पडलेला प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो.  मग, त्याचे उत्तर म्हणून प्रसंगोपात्त आठवण, हे सोपे उत्तर आपण शोधतो. त्यांचे फोटो, सुविचार व्हॉट्सअ‍ॅप वगैरेंवर शेअर करतो. प्रत्यक्षात त्यांच्या विचारांवर चालून पाहण्याचे धाडस करू इच्छित नाही. त्यांच्या प्रतिमेला हार घालणे, त्यांच्या चरणांशी बसणे एवढेच करतो. स्वत:ला त्यांच्या चरणात आणतो, त्यांना आपल्या आचरणात आणत नाही. त्यांचा एखादा विचार, एखादे कार्य आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वत: तो तपासून पाहिला पाहिजे. तेव्हा कुठे त्यांचे मोठेपणा किती मोठा व कठीण आहे, हे आपल्याला समजेल.