रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

सण, संस्कृती आणि विकृती



लहानपणी आमच्या नातलगांकडे जाण्याचा योग आला होता. दिवस जत्रांचे होते. त्या माउलीने साखरेचं पांढर्‍या रंगाचं खाजं खायला दिलं. बोलता बोलता सहज म्हणाली, ‘अरे खाजं खा. कुत्र्याच्या लेंडीसाराखं दिसतं नाही?’ खाजं पाहिल्यानंतर तिनं खाज्याचा जो संबंध कुत्र्याच्या सुकलेल्या विष्ठेशी जोडला होता, तिच्या मनात असलेला तो संबंध तिने मला, मी ते खाजं खाताना सांगितला. तिचा हेतू वाईट नव्हता, जागा आणि वेळ चुकली होती. तोंडात असलेला तुकडाही मी बाहेर फेकून आलो. त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी त्याप्रकारचं खाजं खाल्लं नाही.



’पुढील नऊ दिवसच स्त्री पूजनीय असेल, त्यानंतर पुन्हा छेडणीय, रेपणीय आणि अत्याचारणीय असेल.‘, 

‘ज्या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार सर्वाधिक आहेत, तिथे इथून पुढील नऊ दिवस तिची पूजा केली जाईल.‘

असे व यासारखे अनेक विचार मांडले जातात. वरकरणी या विचारांमध्ये काहीच चुकीचं नसतं. बलात्कार किंवा स्त्रीवर अत्याचार आपल्या देशात होतात, हे सत्य आहे आणि आपल्या देशात शक्तीची पूजाही होते, स्त्रीला देवीच्या रूपात पाहिले जाते, हेसुद्धा सत्यच आहे. त्यामुळे कुठलीच गोष्ट असत्य म्हणता येत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र जोडल्या जातात तेव्हा हेतूवर शंका घेण्यास निश्‍चितच वाव असतो.


स्त्रीवर अत्याचार होऊ नये, असा किंवा हिंदू (भारतीय???) पुरुषांचा दुतोंडीपणा दाखवण्याचा हेतू वरकरणी दिसतो. पण, मग त्याचा संबंध त्या सणाशी कसा आहे, याचा खुलासा केला जात नाही. नवरात्र हा शक्तीच्या जागराचा सण आहे. स्त्रीमधली स्वसंरक्षणाच्या शक्तीचा जागर या निमित्ताने करावा, स्त्री पूजनीय आहे हा विचार प्रकर्षाने मांडावा, असे का केले जात नाही? कारण त्यांना तसं करायचंच नसतं. सणाविषयी असलेली आदराची, अभिमानाची भावना हीन करणे हा त्यामागे हेतू असतो. नवरात्र सणाची संकल्पना आणि त्याला स्त्रीसशक्तीकरणाची भावना जोडल्यास बलात्कार कमी होतील. सामाजिक संदर्भ लावून समाजात बदल घडवण्याचे यशस्वी माध्यम म्हणून या सणांना वापरता येईल. स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषी वासनांध दृष्टिकोन बदलण्यासाठी या सणांचा वापर सहज करता येईल.


पण, या विचारवंतांना असं करायचंच नसतं.



आपली हिंदू (भारतीय????) संस्कृती कशी हीन आहे, कशी त्याज्य आहे, हे ठसवायचं असतं. नवरात्रीचं लव्हरात्री करायचं असतं. म्हणून हे सगळे सुटे सुटे विचार प्रसवले जातात. संस्कृती उच्च दर्जाची आहे, याचा अभिमान निर्माण झाला तर विकृतीला आळा बसणार नाही का? संस्कृतीचा कितीही उदोउदो केला म्हणून विकृती पूर्णपणे नष्ट होणार नाही. कुठलाच समाज विकृतीशिवाय असत नाही. पण, त्याची तीव्रता कमी करण्याचा, त्याचे दृश्य परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून संस्कृतीकडे पाहिले पाहिजे. संस्कृतीला विकृतीसोबत ठेवून आपण संस्कृतीला हीनत्व आणत असतो.


आपल्याला पंचपक्वान्न वाढताना कुणी संडासाचा उल्लेख केला तर जेवणावरची वासना उडते. कितीही चांगलं अन्न जेवा उद्या त्याची विष्ठाच होते, हा विचार दृढ होतो. अन्नापेक्षा विष्ठेवरच निष्ठा जडते. खाल्लेल्या अन्नाची विष्ठा होणं, हा प्रक्रियेचा भाग आहे. पण, तेवढंच होतं का हो? अन्नाचे पचन होऊन ऊर्जा निर्माण होत नाही का? आपला संबंध ऊर्जेशी असावा की, विष्ठेशी. अन्नही सत्य आहे आणि विष्ठाही सत्य आहे. एक सेवनीय आहे, दुसरी त्याज्य आहे. दोन्ही गोष्टींची एकत्र पंगत मांडणे अप्रस्तुत आणि अशोभनीय असते. त्यामुळे विष्ठेविषयी घृणा निर्माण होण्याऐवजी अन्नावरची वासना उडते. शरीराला लागणारी ऊर्जा निर्माण होत नाही. विकृती हे संस्कृतीचे उपफल (बायप्रॉडक्ट) आहे. समाज सदाचाराने चालावा हे संस्कृतीचे फल आहे. आपण कशावर घाला घालतोय, याचा विचार निश्चितच प्रत्येकाने करावा

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

घटनात्मक अधिकारांचा अतिरेक होतोय का?
-
एखादी घटना घडते तेव्हा ती फक्त त्या काळाच्या परिघात पाहिली की, त्याचे तात्पुरते परिणाम जाणवतात. त्याचे होणारे तात्कालिक परिणाम स्वीकारार्ह वाटतात आणि दूरगामी परिणाम फार भयानक असले तरी स्वीकारण्यावाचून अन्य पर्याय शिल्लक नसतो. घटना घडलेल्या काळापुरता आपण त्याचा विचार करतो, चर्चा करतो आणि सोडून देतो. कुठलीही घटना आपोआप आणि अकारण घडत नसते. त्यामागे असलेली शृंखला ती घटना ‘आपोआप’ घडण्यामागचे प्रयोजन स्पष्ट करते व त्यामागचे कारण भविष्यकालीन परिणामांची ओळख करून देते. त्यातून आपण बोध न घेता वावरू लागलो की, ‘बौद्धिक उलथापालथ’ होते. वर्तमानाचे भान आणि इतिहासाचे अवधान राहत नाही. भविष्याची कल्पना न केलेलीच बरी.

व्यक्तीला, व्यक्तिसमूहाला स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची जाणीव अलीकडच्या काळात बर्‍याच प्रमाणात होऊ लागली आहे. पण, ही जाणीव जबाबदारीशिवाय होणारी जाणीव आहे. ‘घटनेने दिलेले अधिकार’ यांची जाणीव राष्ट्र, धर्म आणि उपासना यांच्याप्रति असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेपेक्षा अधिक प्रखर झाली आहे. घटनात्मक अधिकार जेवढे लोकशाहीचे चारही स्तंभ ठोकून गाजवतात, तेवढी त्याची जबाबदारी हे स्तंभ स्वीकारत नाहीत.

जबाबदारीशिवाय असलेली अधिकारांची जाणीव अंधपणे मालकी गाजवते. ही मालकी गाजवण्यासाठी घटनात्मक अधिकारांचा शस्त्र म्हणून वापर होतो. बसमध्ये ‘लेडीज ओन्ली’ जागेवर बसलेल्या वृद्ध पुरुषाला एखादी तरुणी ज्या पद्धतीने व ज्या भाषेत त्याची ‘जागा’ दाखवते, तेव्हा याची प्रचिती येते. एकीकडे स्त्री - पुरुष समानतेचा अखंड उद्घोष करणार्‍या स्त्रियांना ‘लेडीज ओन्ली’ ची जागा खटकत नाही. तिथे आपल्याला अबला समजण्यात येत असल्याची, दुय्यम वागणूक दिली जात असल्याची जाणीव त्यांना होत नाही. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणार्‍या न्यायालयासही ही ‘अधिकची समानता’ अन्याय्य वाटत नाही.

हे स्त्री-पुरुष समानतेचे शस्त्र श्रद्धा, व्यवस्था यांच्याविरुद्ध बिनदिक्कत वापरले जाते. मुस्लिमपंथीयांमध्ये अत्तर लावून आणि अपूर्ण वस्त्रे परिधान करून महिलांना मशिदीत प्रवेश नाही. निर्गुण निराकार ईश्वराच्या सन्निध जाण्याची साधना करताना मोहात पाडणार्‍या गोष्टी मुस्लिमपंथीयांनी जाणूनबुजून दूर ठेवल्या असतील तर, केवळ स्त्री-पुरुष समानतेच्या हत्याराने त्यावर आघात करणे योग्य नाही. सगुण साकार असलेल्या ईश्‍वराच्या भक्तांनी केवळ शबरीमला येथील एका देवस्थानात नैष्ठिक ब्रह्मचर्यासाठी विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी केली असल्यास, त्या श्रद्धेवर स्त्री-पुरुष समानतेच्या शस्त्राने आघात करणेही अयोग्यच आहे.

आपण देवस्थानात जातोच कशासाठी? त्या देवाची भक्ती करण्यासाठी की, स्त्री-पुरुष समानतेचा घटनात्मक अधिकार बजावण्यासाठी? मुळात शबरीमला येथील देवस्थानात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रथा आहे. त्यामुळे कुमारिका आणि वृद्ध स्त्रिया यांना प्रवेश आहे. विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना प्रवेशाचा संबंध नैष्ठिक ब्रह्मचर्याशी आहे, स्त्रियांच्या मासिक पाळीशी नाही. ‘स्त्रीला अस्पृश्य मानले जाते’ हे ठसवण्यासाठी तो संबंध मुद्दाम लावला गेला. स्त्रीला दुय्यम स्थान देण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही कारण, सरसकट सर्व स्त्रियांच्या प्रवेशाला बंदी नाही. भारतात अनेक अशी देवळे आहेत जिथे पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. त्यामागेही काही कारणपरंपरा निश्‍चितच आहे. श्रद्धेमागची संकल्पनाच नष्ट करायची असते, तेव्हा घटनात्मक अधिकाराचे कायदेशीर शस्त्र सर्वांत फायदेशीर ठरते. विलोपन किंवा बौद्धिक उलथापालथ या सिद्धांताच्या प्रक्रियेअंतर्गत अत्यंत योजनाबद्ध रीतीने हे मुद्दाम केले जात आहे. श्रद्धेवर आघात होतो तेव्हा बचावात्मक किंवा आक्रमक प्रतिक्रिया उमटते. पण, हाच आघात कायदेशीर मार्गाने होतो तेव्हा बचावात्मक पवित्रा घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. कालांतराने श्रद्धा आणि त्यामागची संकल्पना नष्ट होते.

लोकशाहीमध्ये प्रशासन कुठल्याच गोष्टीसाठी जबाबदार नसते. जे जबाबदारच नसते, ते बेजबाबदारही होऊ शकत नाही. कारण, अधिकार आणि जबाबदारी यांची फारकत आपण केली आहे. आपण कर देतो म्हणून, खड्डे पडलेल्या रस्त्यांबद्दल ‘साबांखा’ ला तालांव देऊ शकत नाही. न्यायालयाचा अवमान झाला म्हणून न्यायालय दंड वसूल करू शकते. पण, खटला सुरूच न झाल्यामुळे कथित अपराधाकरिता, त्या अपराधासाठी असलेल्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा भोगत असलेल्यांवर अन्याय झाला म्हणून न्यायालयाकडून दंड वसूल करता येत नाही. म्हणूनच मानवी आसक्तीच्या ठिकाणापासून ते अनासक्तीच्या ठिकाणापर्यंत होत असलेला न्यायपालिकेचा संचार आणि ढवळाढवळ चिंताजनक आहे. आपल्या हिंदू धर्मात अधिकारामध्ये जबाबदारी अनुस्यूत असते. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल पत्नीविरुद्ध पतीच तक्रार दाखल करू शकतो, कारण तिच्या चारित्र्याबद्दल तो जबाबदार असतो. केवळ चारित्र्यच नव्हे तर तिचे पूर्ण संरक्षण, पालन पोषण यासाठीही तो जबाबदार असतो. जुन्या काळी स्त्री नवर्‍याला ‘मालक’ म्हणायची ते बहुधा यासाठीच. जबाबदारीसह प्राप्त झालेल्या अधिकाराला ‘धर्म’ म्हणतात. पतीधर्म, पत्नीधर्म, पुत्रधर्म हे शब्द जबाबदारीसह अधिकार दर्शवतात, केवळ कर्तव्य नव्हे.

राष्ट्र, धर्म आणि उपासना याविषयी हीनत्वाची भावना, न्यूनगंड किंवा अहंगंड निर्माण व्हावा यासाठी लोकशाहीचे चारही स्तंभ व्यवस्थित वापरले जात आहेत. त्यासाठी घटना आणि घटनात्मक अधिकारांचा वापर होतोय. आपल्या घटनात्मक तरतुदी आपल्याविरुद्धच वापरल्या जात आहेत. त्याला यशही येत आहे. आपल्या देशाची नकारात्मक प्रतिमा, देशाविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. ‘धर्म’ ही व्यापक संकल्पना, ‘पंथ’ या संकुचित संकल्पनेत घुसडली आहे. उपासनेसाठी आवश्यक श्रद्धा आणि प्रतीकांना अवनत दर्जा प्राप्त झाला आहे.

चिनी तत्त्ववेत्ता संग झे याच्या ‘विलोपन’ (बौद्धिक उलथापालथ) सिद्धांताप्रमाणे होत असलेल्या नैतिक अध:पतनाला दोनशे वर्षे झाली आहेत. वास्तविक या सिद्धांताप्रमाणे जे ‘नैतिक अध:पतन’ पन्नास साठ वर्षांत होणे अपेक्षित होते, त्यासाठी आपल्याकडे दोनशे वर्षे लागली. विचारवंतांच्या उण्यापुर्‍या सात पिढ्या यासाठी झटल्या. आर्यन इन्व्हेजन, सेक्युलरिजम असले भंपक सिद्धांत विचारवंतांनी रुजवले, वाढवले. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समानता यासारख्या गोष्टींना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले. समलैंगिक संबंधांना नैसर्गिक ठरवणे आम्हांला योग्य वाटत आहेत. शबरीमला, विवाहबाह्यसंबंध यांच्याबाबतीतला ‘निकाल’ आपल्याला स्वीकारार्ह वाटण्याइतपत आपले अध:पतन सात पिढ्यांनंतर निश्‍चितच झाले आहे. परिणामस्वरूप घडत जाणार्‍या पुढच्या पायर्‍या म्हणजे अस्थिरता, अराजक आणि सामान्यस्थिती म्हणजेच ‘विलोपन’. आपण त्याच दिशेने जात आहोत.

सोमवार, १८ जून, २०१८

आंबा पिकतो, रस गळतो...

-------
बातमीमधून काय अपेक्षित असतं? सत्य की सनसनाटीपणा? हा सनसनाटीपणा आणण्यासाठी ज्या बातम्या तोडून मोडून दाखवल्या जातात, त्यांनाच बहुधा ब्रेकिंग न्यूज म्हणण्याची पद्धत रूढ झाली असावी. यात सत्य कुणालाच नको असतं. न ती बातमी देणार्‍यांना, न ती ऐकणार्‍यांना, पाहणार्‍यांना. बातमी देणार्‍यांसाठी ’बातमी’ हे आपली राजकीय, आर्थिक गणिते सोडवण्याचे माध्यम असते. पाहणार्‍यांसाठी ’बातमी’ हा खुमखुमी शमवण्यासाठी मुद्दा. कारणं वेगवेगळी असली, तरी घटनेच्या देठापर्यंत पिकलेले बातमीचे आंबे प्रत्येकालाच हवेहवेसे असतात. आंबे पिकतच राहतात, रस गळतच राहतो. त्यासाठी चाललेला झिम्मा मात्र, ’बेंदुल्ली’सारखा आंब्याच्या झाडालाच पोखरून टाकतो.
-------------

’आंबा पिकतो, रस गळतो’, हे गाणं सध्या सगळीकडे आळवलं जात आहे. त्यानंतर आजतागायत सुरू असलेला झिम्मा तर अलौकिक आणि अवर्णनीय आहे. या आंब्याचा ’शेक’ सोशल मीडिया नावाच्या मिक्सरमधून काढण्यास प्रत्येकजण गुंग आहे. आपल्याला हवा तसाच ’मँगो शेक’ करण्यात आणि दुसर्‍यांच्या गळी उतरवण्यात गुंतलेले व गळी उतरवून घेणारे दोघेही आंब्याच्या झाडाप्रमाणे सत्वहीन आणि शुष्क होत चालले आहेत.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या भाषणाची बातमी सर्व वृत्तवाहिन्यांनी दाखवली. या सर्व वाहिन्यांच्या बातमीचे व्हिडिओ आणि या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ यांचा ताळेबंद मांडला, तुलना करून पाहिली तर वृत्तवाहिन्यांचं बातमी ’तयार’ करण्याचं कसब निश्‍चित जाणवतं.

जो मूळ व्हिडिओ उपलब्ध झाला आहे, त्यातील भाषणाचा, बातमीच्या संदर्भातील उतारा पुढीलप्रमाणे;
’मोहनराव शिवाजीराव मोहिते, मांडणा नावाचं गाव आहे, तिथले. बरेच दिवसांनी माझ्याकडे आले. बत्तीस वर्षांनंतर. बोलता बोलता त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. ऐकण्यासारखी आहे. त्यांना शेती फळ बागायतीची मशागत करायची भारी हौस. ते म्हणाले,
’मी धाराशिव जिल्ह्याकडे गेलतो (गेलो होतो), तिथे भूम तालुक्याजवळ वाशी तालुका आहे. मला कळलं की, तिथे एका शेतकर्‍याजवळ १०७- १०८ आंब्याच्या चांगल्या जाती आहेत. म्हटलं बघावं. तिथं गेलो. बोलता बोलता तो शेतकरी वाशी तालुक्यातला, मला म्हणाला, साहेब, सगळे आंबे चांगलेच आहेत. भगवंताची कृपा म्हणायची मला एके ठिकाणी आंब्याची एक कोय मिळाली. त्या कोयीचं रोपटं करून ते झाड वाढवलंय. ते आंब्याचं झाड माझ्याजवळ आहे. त्याची काय महती आहे ती सांगतो तुम्हाला. अहो! लग्न होऊन आठ आठ दहा दहा बारा बारा वर्षं झाल्यानंतरसुद्धा पोर होत नाही अशा स्त्री पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, निश्‍चित पोरं होतं. असं झाड आहे माझ्याकडे. गुरुजी, मी त्याच्याकडनं दोन आंबे आणून, दोन रोपं करून माझ्याही बागेत, माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणालाच माझ्या आईशिवाय कुणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आत्तापर्यंत १८०पेक्षा जास्त जणांना, पती पत्न्यांना  जोडप्यांना खायला दिले. ती पद्धत शिकवली, ती पथ्य सांगितली आणि दीडशेपेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होई. अपत्य नसेल अपत्य होईल. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे. (शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत) हा आम्रवृक्ष असाच आहे. जे राष्ट्रियत्वाच्याबाबतीत गांडाळ, नपुंसक, क्लीब असलेला हिंदू समाज त्याच्यावरती शिवाजी, संभाजी नावाचा जो महामृत्यूंजय मंत्र, महासंजिवनीमंत्र आहे. त्याचं प्राशन करा. १०१% हिंदू समाज शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रक्तगटाचा बनेल. आणि सत्य आहे माझं बोलणं. ’

सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांनी या हकिकतीचे मधूनच वार्तांकन टिपायला सुरुवात केली असेल, असे संभवत नाही. एका वृत्तवाहिनीची गल्लत होणे समजू शकते. यच्चयावत सर्व मराठी वृत्तवाहिन्यांना आणि त्यांच्या पत्रकारांना, भिडे आपल्या शेतकरी मित्राने सांगितलेली हकीकत आहेत की, आपलीच हकीकत सांगत आहेत, यातला फरक समजला नाही? अशी चूक होणे कसे संभवते? तेव्हाही नाही, जेव्हा एक वृत्तवाहिनी वगळता सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी ’गुरुजी, मी त्याच्याकडनं दोन आंबे आणून, दोन रोपं करून माझ्याही बागेत, माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणालाच माझ्या आईशिवाय कुणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आत्तापर्यंत १८०पेक्षा जास्त जणांना, पती पत्न्यांना  जोडप्यांना खायला दिले. ती पद्धत शिकवली, ती पथ्य सांगितली आणि दीडशेपेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होई. अपत्य नसेल अपत्य होईल. असा हा आंबा आहे. ’ हे वाक्य दाखवलं, तेव्हा दुसरी व्यक्ती काय बोलली, हे भिडे सांगत असतील, असा साधा संशयही वृत्तकथन करणार्‍यांना, संकलन करणार्‍यांना आणि संपादकांना आला नाही? सरसकट सर्व वृत्तवाहिन्यांनी आपल्या शेतातील आंबे खाऊन अपत्यप्राप्ती होते, (एका वृत्तवाहिनीने मुलगेच होतात, असे म्हटल्याचेही सांगितले) असा दावा भिडेंनी केल्याचे सांगितले. ही एकवाक्यता काय सूचित करते? त्याही पुढे जाऊन, त्या घटनेचा संदर्भ देत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवत म्हटलेली वाक्यं एकाही वाहिनीने दाखवली नाहीत. का?



जेव्हा एखादा वाद उद्भवतो, तेव्हा दोन्ही बाजू मांडण्याची पद्धत आहे. फक्त विरोधात असणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या. ज्या संस्थेने याचे आयोजन केले होते, त्या संस्थेच्या कुठल्याच पदाधिकार्‍यांची किंवा आयोजकांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली नाही.


प्रत्येकाने या बातमीचा फायदा आपापल्या पद्धतीने घेतला, की तो घेता यावा यासाठीच वाहिन्यांनी अशा पद्धतीने वार्तांकन केलं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ते या सर्व वृत्तवाहिन्यांनीच स्पष्ट करणे आवश्यक आहे. आपल्याला हवं तेवढंच, ज्याला साहेबाच्या भाषेत ’आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट’ असं म्हणतात, तसं बाजूला काढून वावटळी निर्माण केल्या जात आहेत. या वावटळींची वादळं होतात की, नाही यावर अनेक राजकीय आणि आर्थिक गणितं अवलंबून असतात.  या बातमीनंतर स्वत:च ’सँपल’ असणार्‍या राजकारण्यांकडून राजकीय प्रतिक्रिया आल्या, ’राज’कीय व्यंगचित्रं रेखाटली गेली, महिला राजकारण्यांना महिलांचा, मातृत्वाचा अपमान वाटला, सामाजिक संघटनांनी थेट तुकाराम महाराजांचे दाखले देत ’वारकरी’ आणि ’धारकरी’ यांच्यातला भेद दाखवून आपले कर धुवून घेतले, राष्ट्रीय वर्तमानपत्रांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या छापल्या, स्थानिक वर्तमानपत्रांनी निरतिशय आनंदाने डोळे मिटून घेत त्या तशाच छापल्या. चूक कुणाची? परिणाम काय? या सर्व प्रकरणात संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीला काही फरक पडत नसेलही. पण, जे विष पसरतंय ते राष्ट्रासाठी घातक आहे.

रोहित वेमुलाची आत्महत्या ही ’दलित रोहित वेमुलाची आत्महत्या’ असते. त्याच कारणासाठी त्याआधी, तीन तरुणींनी केलेली आत्महत्या, ’तीन तरुणींची आत्महत्या’ असते. निर्भीड, सत्यशोधक पत्रकारितेचा दावा करणारे पत्रकार, हिंदू मुस्लिम यांच्यात झालेली मारामारीची घटना ’दोन गटात झालेली मारामारी’ अशा बातमीत आटोपतात. हा दोष जसा या अपरिपक्व पत्रकारितेचा आहे, तसाच तो सोशल मीडियावर पांडित्य गाजवणार्‍या शूरवीरांचाही आहे.

मागे मनोहर पर्रीकर आजारी होते, तेव्हा ते जणू दिवंगतच झाले, असे गृहीत धरून अनेक फेसबूकवीर गतिमान झाले होते. त्यांच्या जातीवरून अत्यंत हिणकस टीका केली जात होती. गांधीजींचे चारित्र्यहनन करताना आपण एका प्रात:स्मरणीय महात्म्याचे चारित्र्यहनन करीत आहोत, नेहरूजींचे चारित्र्यहनन करत असताना आपण आपल्याच राष्ट्राच्या पंतप्रधानांचे चारित्र्यहनन करीत आहोत, याची जराही बूज राखली जात नाही. राजकीय पक्षाची मक्तेदारी घेऊन दुसर्‍या राजकीय पक्षाच्या व्यक्तींवर किती हीन पातळीवर जाऊन टीका करावी, याला काही धरबंधच उरला नाही. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना, जे अपशब्द सोशल मीडियावर वापरले जात आहेत, ते लिहिणार्‍यांच्या जर आईवडिलांनी वाचले, तर त्यांना आपल्याला अपत्यप्राप्ती झाल्याचे दु:ख होईल. तेही आंबे न खाता.


वैचारिक मतभेद, वाद असण्यास काहीच हरकत नाही. पण, त्याची हीन पातळी पाहिली की, वेदना होतात. ’आपलं ते खरं’ करण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतला जातो, तेव्हा त्रास होतो.
आंबा खाऊन पोरं होतात की नाही निश्‍चित माहीत नाही. पण, असल्या वांझोट्या वावटळी दिवसागणिक उठवून आपली पुढची पिढी नि:सत्व केली जात आहे, एवढं मात्र निश्‍चित!

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

भीमा - कोरेगाव लढाई : विजय कुणाचा?

भीमा - कोरेगावनजीक सणसवाडी दगडफेक आणि त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक हा घटनाक्रम होत असताना, वर्तमानपत्रातून, फेसबूक, व्हॉट्‌सअपसारख्या सोशल मीडियामधून अनेक गोष्टी मांडल्या गेल्या. अशावेळी त्याचे ऐतिहासिक संदर्भ समोर येणे आवश्यक असते.

भीमा - कोरेगाव लढाई झाल्याला दोनशे वर्ष होऊन गेली. सहा दिवसांपूर्वीची घटना घडली त्यावेळच्या बातम्यांचे मथळे, बातम्यांचे स्वरूप, चर्चा(भांडणे) यातून एकसारखे भीमा-कोरेगाव येथे झालेली दगडफेक असाच उल्लेख येत होता. वास्तविक दगडफेक, दंगल सणसवाडी येथे झाली होती. त्याला पार्श्‍वभूमी होती ती वढू येथे पंचायतीची परवानगी न घेता लावलेल्या फ्लेक्समुळे झालेल्या वादाची. जर, अत्याधुनिक संसाधने उपस्थित असताना स्थानाचा आणि घटनेचा चुकीचा उल्लेख होत असेल, तर दोनशे वर्षापूर्वी घडलेल्या घटनेबद्दल बोलायलाच नको.


-भीमा - कोरेगावची लढाई’ महार विरुद्ध पेशवा अशी होती.-
ही लढाई इंग्रज विरुद्ध मराठा साम्राज्य अशी होती. या लढाईची सुरुवात खूप आधीपासून झाली होती, पण ०५ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवडा आणि खडकी येथे झालेली लढाई ही अंत होण्याची सुरुवात होती. तेव्हापासून मराठा सैनिक स्मिथला हुलकावणी देत, फसवत रानोमाळ गनिमी कावा करत फसवत होते. या लढाईचा अंत दि. ०३ जून १८१८ रोजी पेशव्यांनी पत्करलेल्या शरणागतीने झाला. ही लढाई महार विरुद्ध पेशवा/ब्राह्मण, महार विरुद्ध मराठा(जात) अशी अजिबात नव्हती. त्यामुळे असे मत मांडणे चुकीचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कुणीही महार सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती याविषयी शंका घेणे चुकीचे आहे. ‘महार सैनिक मराठा साम्राज्याच्याविरुद्ध इंग्रजांच्या बाजूने लढले.’ असं म्हणण्याला जो जातीय देशद्रोहाचा वास येतो तो अत्यंत चुकीचा व समाजासाठी घातक आहे. ते ब्रिटिश सैन्यातील तुकडीत होते व त्यांना आज्ञा झाल्याबरोबर युद्धावर जाणे भाग होते. त्यामुळेच महार सैनिकांचे युद्ध पेशवाई संपवण्यासाठी होते व त्या कारणामुळे पेशवाई संपली, असल्या निष्कर्षांनी केवळ नकारात्मक व जातीय द्वेष वाढवणाऱ्या अस्मिता जागृत होण्यापलीकडे काहीच साध्य झाले नाही.

-२५ - २८ हजार पेशव्यांना ५०० महार सैनिकांनी कापून काढले.-

त्यावेळी मराठा साम्राज्याचा पेशवा एक होता. २५ ते २८ हजार पेशवे नव्हते. आता पेशवे म्हणजे ब्राह्मण या अर्थी जरी घ्यायचे तरी ते चुकीचे व दिशाभूल करणारे ठरते. मराठा साम्राज्याच्या सैन्यात मराठा, अरब आणि इतर मिश्र जातींचे सैनिक होते. लढणारे सर्वच्या सर्व ब्राह्मण नव्हते. भीमा नदीच्या पल्याड असलेले मराठा सैन्य आणि बाजीराव पेशवा दि. १ जानेवारी रोजी दक्षिणेला निघाले. कर्नल बरच्या साहाय्याला आलेल्या कॅप्टन स्टॉंटनच्या सैनिकांना कोरेगावातच गुंगवत ठेवण्यासाठी *(१) बापू गोखले, आप्पा देसाई आणि त्र्यंबकजी डेंगळे यांच्या आधिपत्याखाली अरब, गोसावी आणि इतर मिश्र अशा ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या पाठवल्या. *(२) यांनी स्टॉंटनच्या तुकडीला रात्री ९ वाजेपर्यंत पाणी आणि रसद मिळू दिली नाही. कॅप्टन चिशोम आणि कॅप्टन विंगेट यांना ठार केले. स्टॉंटनही जखमी झाला. मराठा सैन्य कुठल्या दिशेने जात आहे, हे कळू नये आणि ते आपल्या मागावर येऊ नये म्हणून इंग्रजांना कोरेगावातच थोपवून धरण्याची कामगिरी यशस्वी झाली होती. ज्या लढाईत इंग्रजांची नामुष्की झाली त्याच लढाईचा ’विजयस्तंभ’ उभारून त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. *(३) या विजयस्तंभावर लिहिलेल्या इंग्रजी आणि मराठी मजकुरातील फरक लक्षात घेण्यासारखा आहे. ८३४ कंपनी सैनिकांपैकी ५०० सैनिक बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटमधील दुसऱ्या बटालिअनमधील होते. यामध्ये बहुसंख्य शूर लढवय्ये महार सैनिक होते. पण, पूर्णच्या पूर्ण सैनिक महार नव्हते. दुर्दैवाने आज त्या सर्व शूरवीरांची नावे उपलब्ध नाहीत. पण, मृत झालेल्या ४९ सैनिकांच्या यादीत २७ महार सैनिक होते. याचाच अर्थ पूर्णच्या पूर्ण ५०० सैनिक महार नव्हते. त्यामुळे, ‘५०० महारांनी पेशवाई बुडवली’, अशा पद्धतीने जे सांगितले जाते त्याने समाजात जातीय द्वेष भडकवण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही.



-महारांनी पेशव्यांच्याविरुद्ध लढण्याला ’प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे.’ या पेशवाईतल्या आदेश आणि वागणूक जबाबदार-

मुळात ही लढाई पेशव्यांनी महारांना दिलेल्या हीन वागणुकीची परिणती आहे असे म्हटले जाते. जर महार सैनिकांनी पेशव्यांच्यावर स्वतंत्र हल्ला चढवला असता किंवा बंड पुकारलं असतं तर असं म्हणायला निश्‍चितच जागा होती. महारांची मोठी लढवय्यी पलटण पेशव्यांच्या सैन्यात होती. फक्त पेशव्यांच्या सैन्यातच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या काळापासून जातीने महार असलेल्या शूरवीरांचा मोठा देदीप्यमान इतिहास आहे. अनेकांनी विशेष पराक्रम गाजवला होता व त्यांना त्यानिमित्त अनेक गावेही ईनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे पेशव्यांना स्वत:जवळ असलेल्या लढवय्या महार सैनिकांना दुखावणे अजिबात परवडणारे नव्हते. असा हीन दर्जाचा आदेश काढणे ही, पेशव्यांच्यासाठी हाराकिरी ठरली असती. उत्तर पेशवाईतही असे कुठलेच संदर्भ सापडत नाहीत.

या विधानाला एका वादाचा संदर्भ आहे. न. चिं. केळकर यांचे पुत्र,  इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९३६साली केसरीमध्ये वाद बराच गाजला होता. दि. ५ जून १९३६ च्या केसरीमध्ये केळकरांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ‘पेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होता’ या आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले.

                                                                                               













 

 
                                                                                           
                              

( दि. ५ जून १९३६ च्या केसरीमध्ये केळकरांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले पत्र.)                                                                                       

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच केळकरांच्या पत्राला उत्तर देताना, ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली ऐकीव गोष्ट असून लिखित पुरावा नसल्याचे मान्य केले.
                                                                                                                                                                       
 



(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच केळकरांच्या पत्राला दिलेले उत्तर.)


पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. तर्कदृष्ट्या अलिखित नियम होता, असं धरून चालल्यास या माणुसकीशून्य नियमामुळे होत असलेला अन्याय छत्रपतींच्याही लक्षात आला नाही, असा अर्थ निघतो.

इंग्रजांनी तत्कालीन विचारवंतांना, समाजधुरिणांना हाताशी धरून ’फूट पाडा आणि राज्य करा’ या नीतीअंतर्गत अनेक गैरसमज पसरवले. आर्यन इन्व्हेजन ते जातीच्या उतरंडीमुळे प्रत्येक जातीतले मतभेद आणखी कसे वाढतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले. त्यासाठी विचारवंतांना असलेल्या अनेक  त्यानंतर पिढ्यानपिढ्या याच गैरसमजुतींना खरे मानू लागल्या. ब्रिटिशांनतरच्या राजकारण्यांनाही त्याच गैरसमजुतींना पोसले आणि वाढवले. कारण, त्यामुळेच त्यांची सत्तेत येण्याची आणि टिकून राहण्याची शक्यता त्यांना दिसत होती.
दलित, उच्च-नीच हे शब्द वापरणेच मुळात चुकीचे आहे. पण, नेमके तेच शब्द समाजधुरिणांकडून सातत्याने वापरले जातात. ज्यांना सवर्ण म्हटले जाते (असे म्हणणेही चुकीचे आहे), त्यांच्याकडूनही ज्यांना दलित म्हटले जाते, त्यांना माणुसकीशून्य वागणूक मिळाली हे सत्यच आहे. तिथे कुठेही दुमत नाही. आपल्याच समाजाचा भाग असलेल्यांना आपणच वाळीत टाकलं, एवढंच नव्हे तर माणुसकीलाही लाजवेल, अशा पद्धतीने वागणूक दिली. ज्याची भरपाई कशानेही जगाच्या अंतापर्यंत होणे शक्य नाही.

जेव्हा भारतीय राज्यघटना उपलब्ध आहे, शिक्षणाची समान संधी उपलब्ध आहे, तेव्हाही आपण इतिहासातला कोळसा वर्तमानात उगाळत बसलो, तर भविष्यकाळ कसा असेल, याची कल्पनाही न करणे चांगले.
एका समाजाला ’तुमच्यावर अन्याय झाला होता’, ’तुम्ही दलित होता’, ’तुम्ही मागास आहात’ असं सातत्याने बिंबवले जात असेल तर त्या समाजाचा विकास कधीच होणार नाही. त्याऐवजी आपल्या समाजामध्ये कोण कोणत्या व्यक्तींनी शौर्य गाजवले, कुणी शिक्षणात अग्रेसर राहिले, कोण शास्त्रज्ञ झाले, कोणी व्यवसाय उभारले, कुणी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, कोणी रणांगणावर शौर्य गाजवले या गोष्टी सातत्याने बिंबवल्या गेल्या पाहिजेत.

दलित, मागास अशी लेबलं लावून इतर समाजाविषयी द्वेष पसरवून केवळ राजकारण करता येतं. राजकारण करणार्‍यांनी दुसर्‍या समाजाविषयी द्वेष पसरवून, स्वत:च्याच समाजाला सातत्याने पीडित, मागास मानसिकतेत ढकलून समाजाचा फक्त वापर करून घेतला. कधीकाळी शूरवीर असलेल्या जमातीला हीनदीन आणि मागास करून टाकलं. आपल्यावर सतत कुणीतरी अन्याय करत आहे, ही पराभूत मानसिकता तयार केली. या पराभूत मानसिकतेचे परिणाम पिढ्यानपिढ्या राहतात. होणार्‍या दंगलीतून, जाळपोळीतून राजकारणी स्वत:ची पोळी व्यवस्थित भाजून घेतील. समाज जाईल चुलीत आणि आपण आपलीच डोकी फोडत बसू. ज्या संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा, ‘त्यांच्या प्रेताला अग्नी कुणी दिला?’ या वर नकारात्मक जातीय अस्मिता जागृत केली जात असेल, हीच जातीय नकारात्मक अस्मिता पोसत बसणार असू, तर आपण संभाजी महाराजांच्या बलिदानातून काहीच शिकलो नाही हेच समोर येते. औरंगजेबाने त्यांचा फक्त देहच छिन्नविच्छिन केला, आपण त्यांच्या देहाचे तुकडे कुणी गोळा केले, कुणी शिवले, यावरून जातीजातीत भांडू लागलो. आपल्यापेक्षा हीन जगात कुणी आहे? बाह्य आक्रमकांना आपला संपूर्ण पराभव करणे कधीच शक्य झाले नाही. आम्ही आमच्याचकडून पराजित झालो.

या लढाईत कोण जिंकलं? अजिबात स्तुत्य नसलं तरी सत्य आहे, भीमा कोरेगावच्या लढाईत दोनशे वर्षांनंतर ब्रिटिश जिंकले.



-संदर्भ-१ . आज लढाई करून मार्ग काढावा.’ ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले (गोखल्यांची कैफियत - रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१)
२.  अ. वेलिंगटन्स केंपेन्स इन इंडिया पृष्ठ १६४-१६५ ब. गॅझेटिअर ऑफ द बॉंबे प्रेसिडेन्सी १८८५ पृष्ठ २४४-२४७
      क. अ हिस्ट्री ऑफ मराठाज व्हॉल्यूम ३ - ग्रँड डफ (पृष्ठ ४३२-४३५)

 ३. ’ब्रिटिश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे.’  (शिवराम परांजपे - ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’)

भरकटलेली तरुणाई




------------------
 तरुणांमधली शक्ती विधायक कार्यासाठीही वापरता येते आणि विध्वंसक कार्यासाठीही वापरता येते. पण, जेव्हा हीच शक्ती राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनते तेव्हा ती स्वत:बरोबर समाजाचाही विध्वंस करत असते. शक्तीचा वापर कसा करावा हे समाजधुरिणांनी ठरवावं लागतं.
-------------


प्रत्येक मोर्चानंतर आणि दंगलीनंतर उडालेला धुरळा, राजकीय फायदे तोटे यांची पूर्तता झाली की, मग कदाचित फुटलेली डोकी आणि फोडणारी डोकी विचार करू लागतात, ‘आम्ही हे नक्की कशासाठी केलं? आणि यातून काय मिळवलं?’     


ब्रिटिशांनी योजलेली कूटनीती स्वातंत्र्यानंतर आजतागायत सक्रिय राहिली. प्रांतीय, जातीय अस्मिता नको तेवढ्या पेटत्या ठेवण्याचे कौशल्य गोऱ्यांकडून स्वकीय राजकारण्यांनी उचलले. आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि असलेली सत्ता उलथवण्यासाठी या अभिमानांचा, अस्मितांचा व्यवस्थित वापर होऊ लागला. कुठलाही मुद्दा पेटत ठेवायचा आणि तो राजकीय सोयीनुसार कसा भडकवायचा याचे बाळकडू राजकारण्यांना व्यवस्थित प्राप्त झाले आहे. समाज अधिकाधिक परावलंबी कसा होईल, त्याला आपल्याला हवे तसे कसे नाचवता येईल, याकडे राजकारण्यांचे पुरेपूर लक्ष असते.   


समस्या ही नाही की, राजकारण गलिच्छ झालं आहे आणि निरंतर होत आहे. समस्या ही आहे की, तरुण आपला स्वत:चा विकास करायचा सोडून या राजकारण्यांच्या तालावर नाचत आहेत. त्याही पुढची चिंतेची बाब ही की, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार व त्याला वाचा कुठल्या मार्गाने फोडायची हे ठरवण्याचे सामर्थ्यही तरुण पिढी गमावून बसली आहे. आपण करीत असलेला हिंसाचार, तोडफोड याचे समर्थन स्वत:च्या जातीवर झालेल्या अन्यायाने केले जात आहे. स्वत:च्या जातीमध्ये किती माणसं संशोधन क्षेत्रात पुढे आली, किती माणसांनी व्यवसाय सुरू केला, किती माणसे स्वकर्तृत्वाने पुढे आली यावर कुणीही विचार करताना दिसत नाहीत.     


आपल्या पूर्वजांवर अन्याय झाला, हे सांगताना त्या अन्यायाचे परिमार्जन करण्याकरता आपण विधायक कार्य काय केले, याचे उत्तर अनेकांजवळ असत नाही. ज्यांनी शिक्षण घेतले, स्वकष्टाने व्यवसाय उभारले, नोकरी केली, प्रगतीची कास धरली, ती माणसे अन्याय करणाऱ्या माणसांपेक्षा खूप पुढे जाऊन पोहोचली आहेत. अशांना विध्वंसक कार्यासाठी वेळ नसतो आणि इच्छाही नसते. त्यांच्या हातून जे होईल ते विधायक कार्य करण्यात त्यांना आनंद प्राप्त होतो.     


फळ्यावरची एखादी रेघ मोठी करायची असल्यास दोन मार्ग असतात. पहिला मार्ग रेघ मोठी करणे आणि दुसरा मार्ग त्याच्या बाजूची रेघ पुसून कमी करणे. बाजूची रेघ पुसल्याने ती कमी होते यात शंका नाही. पण, जी रेघ मोठी व्हावी यासाठी दुसरी रेघ पुसली, ती रेघ तेवढीच राहते. स्वत:चा व्यक्तिगत विकास साधल्याने आपल्यासोबत आपल्या समाजाचाही विकास होतो, हे तरुणांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.     


अन्याय करणारे आणि ज्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय झाला ते आज नाहीत. ‘अन्याय झाला होता’ हे उगाळत बसल्याने आज आपली प्रगती होणार आहे का? माथी भडकवल्यामुळे तरुणांचे होणारे नुकसान आणि समाजाचे होणारे नुकसान, त्याहीपेक्षा जास्त अन्याय्य नाही का? जेव्हा आपल्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन  स्वत: न्याय करून, प्रगत होऊन करता येणे शक्य आहे, अशावेळेस आपला अमूल्य वेळ आणि शक्ती विध्वंसक कार्यात खर्च करण्यात काय अर्थ आहे?

   
अन्यायाला उत्तर त्याहीपेक्षा मोठा अन्याय करून द्यायचं की, न्याय करून द्यायचं हे आजच्या तरुणाईने थंड डोक्याने ठरवले पाहिजे.


वर्तमानात विध्वंस करण्यासाठी आपल्याकडे ऐतिहासिक कारणांची अजिबात कमतरता नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण आजतागायत त्या कारणांना हाताशी धरून विध्वंसक कार्य करतच आलो आहोत. कुठेतरी हे थांबायला नको? यातून जय कुणाचा होतो पराजय कुणाचा होतो, याला काहीच अर्थ उरत नाही, जेव्हा आपणच आपली डोकी फोडतो, तेव्हा विजय मात्र नेहमी आपल्याला पारतंत्र्यात ढकलणाऱ्यांचाच होतो.