गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

जनता जनार्दनाची भाषा बदलत चालली आहे का?








मलपती कुप्पुस्वामी जनार्दनम यांची प्रभारी कुलगुरूपदी निवड झाल्याची बातमी सर्वत्र कशी छापून येते याविषयी मला प्रचंड कुतूहल होते. चुका काढणे याऐवजी असे कुतूहल असण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या भाषा आणि त्यात होत असलेले बदल.

अपेक्षेप्रमाणे अनेक ठिकाणी जनार्थनम असे छापून आले, तर काही ठिकाणी ते जनार्दनम. एके ठिकाणी मलापती असेही छापून आले आहे. त्यांचे खरे नाव काय हे विचारण्यासाठी गोवा विद्यापीठातील जवळपास ८ ते १० लोकांशी संपर्क साधला,  गोवा विद्यापीठाचे संकेतस्थळही तपासून पाहिले. संकेतस्थळावर त्यांचे नाव मलपती के जनार्थनाम असे मराठीत आहे. खुद्द त्यांना फोन केला होता पण, तो बंद होता. शेवटी प्राध्यापक कृष्णन यांनी फोन केला व ते नाव उच्चारी जनार्दनम आहे, असा खुलासा केला. 

जसे आपण इंग्रजी, फ्रेंच या नावांच्याबाबतीत ती अचूक लिहिली जावीत याबाबत आग्रही असतो, तसे आपल्याच भारतीय नावांच्याबाबतीत आपण असत नाही. काय बरोबर आहे, हे सांगितले तरीही ते स्वीकारले जात नाही. प्राकृतिक अस्मिता इतक्या पराकोटीला पोहोचली आहे की, जे बरोबर आहे तेही स्वीकारले जात नाही. अहिल्या, अनुसया या शब्दांना काहीच अर्थ नाही. वास्तविक ते अहल्या (न ढळणारी) व अनसूया (जिला असूया नाही) असा होतो. रवि हे व्यक्तीचे नावसुद्धा आपण रवी असे लिहितो. र्‍हस्व दीर्घ असा व्याकरणाचा भाग त्यात नाही. रवि म्हणजे सूर्य आणि रवी म्हणजे ताक घुसळायचे साधन. आपण कुठल्याही व्यक्तीचे नाव ठेवताना त्यातला अर्थ त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. गमतीचा भाग म्हणून एक विचार मांडतो. आईवडिलांनी ठेवलेले पाळण्यातले नाव आणि इतर लोकांनी ‘ठेवलेले’ नाव, यात लोकांनी ठेवलेले नाव जास्त समर्पक असते. असो!

आमच्या गोवन वार्तामध्ये घडलेला एक प्रसंग आठवला. आमच्या इंग्रजी गोवनच्या छायापत्रकाराने टेबलवर होते ते पुस्तक उचलले आणि त्याचे  नाव त्याने वाचले. ते ऐकून मी तीनताड उडालो. तो म्हणाला, ‘बायकुला टू बँकॉक’. त्यातही तो ‘बाय’उच्चारून सेकंदभर थांबला आणि मग पुढले शब्द बोलला होता. न राहवून मी त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि घोळ माझ्या लक्षात आला. भायखळा ते बँकॉक या नावाचे हुसैन झैदी या लेखकाचे ते पुस्तक होते. रोमनमध्ये लिहिताना ‘Byculla to Bangkok’  असे लिहिल्यामुळे त्याने जसेच्या तसे वाचले. 

अशी अनेक नावे आहेत जी चुकीची लिहिली किंवा उच्चारली जातात. त्यामागे अनेक कारणे आहेत. स्थान, बोलीभाषा, लिप्यंतर, अन्य भाषिकांच्या संपर्कात आल्याने त्या भाषांचा आपल्या भाषेवर, उच्चारांवर होणारा परिणाम वगैरे. सर्वांत त्रासदायक कारण कुठले असेल तर आपण आपलीच भाषा इंग्रजीतून शिकणे. आपण आजकाल मराठीतून मराठी किंवा कोकणीतून कोकणी न बोलता इंग्रजीतून मराठी व इंग्रजीतून कोकणी बोलत आहोत. अनेक ठिकाणी रोमन लिपीत लिहिलेली आपल्याच गावांची नावे आपण भलतीच उच्चारू लागलो आहोत. माशेलचे ‘मार्सेला’ होऊ लागले आहे. केळशी या गावाचे नाव कुवालेशीम किंवा तत्सम काहीतरी भलतेच होत आहे. 

 कृती हे नाव असेल तर ते क्रिती, कृष्णाचा क्रिश्ण, ऋचाचे रिचा, ऋतूचे रितू ही सर्रास आढळणारी बाब आहे. हे असे होते याला कारण म्हणजे हे शब्द रोमन लिपीत लिहिले जातात व नंतर त्यांचे देशी भाषांत रूपांतर केले जाते. मराठी वृत्तवहिन्यांवर बातम्या देणारे, सूत्रसंचालक प्रेक्षकांसाठी ‘दर्शक’ असा शब्द वापरतात. वास्तविक दर्शक म्हणजे दाखवणारा! हा सरळ सरळ बिनडोकपणे स्वीकारलेला, हिंदीचा मराठीवरील प्रभाव आहे.  

गोव्यामध्ये  Jose हा शब्द जुझे असा उच्चारला जातो, तर महाराष्ट्रात जोस असा उच्चारला जातो. पंजाबी लोकांना जोडाक्षरे उच्चारण्यात बहुधा अनेक समस्या येत असाव्यात. ते इंद्राचे इंदर करतात. बंगाली लोक ‘भ’  साठी ‘व्ही’ हे रोमन अक्षर वापरतात. आपणही सौरभचे सौरव करतो. त्यांनाच टेकून असणारे आणि काही बंगालीसुद्धा ‘व’ या अक्षरासाठी ‘बी’ हे रोमन लिपीतील अक्षर वापरतात. त्यामुळे देवचे देब होते आणि विप्लवचे बिप्लब होते. इंग्रजांनी आपल्या भाषेतील नावांचे, आडनावांचे उच्चार आपण आजवरही इमानेइतबारे, आग्रहाने वापरतो. रवींद्रनाथांच्या ठाकूर आडनावाचे टागोर झालेले आपण आजही ठाकूर करत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. आपण आपल्याच नावांचे इंग्रजीकरण करून पुन्हा देशीकरण करतो आणि इंग्रजांनी केलेल्या आपल्या देशी नावांचे केलेले इंग्रजीकरण अगदी निष्ठेने, निरतिशय आग्रहाने सांभाळतो. 

दाक्षिणात्य लोकांना क, च, ट, त,प च्या वर्गांमधल्या अनुनासिक वगळता उरलेल्या चार व्यंजनांमधला भेद  कळत नाही किंवा तो भेद असूनही गौण मानला जातो. तीच गत दंत्य आणि मूर्धन्य अक्षरांची होते. ढोबळमानाने ‘ग’ या अक्षरासाठी ते रोमन लिपीतील ’के’ अक्षर वापरतात. ‘त’ अक्षरासाठी इंग्रजीतील ‘टी’ व ‘एच्’ ही अक्षरे जोडून वापरतात. जेव्हा ते ‘टी’ अक्षर ‘एच्’शिवाय वापरतात तेव्हा त्याचा मराठीतील उच्चार ’ट’ असा असतो. त्यामुळे, त्यांनी ज्योतीचे रोमन लिपीत लिहिलेले मराठी उच्चारण ज्योथी, कामतचे कामथ, आरोग्यचे आरोक्य असे विचित्र व चुकीचे होते. अनेक ठिकाणी ‘थिरुवनंथपुरम’ असे छापून येते. याशिवाय नावे रोमन लिपीत लिहिताना दाक्षिणात्य माणसे अनेक घोळ करून ठेवतात. ‘द’ हे अक्षरसुद्धा ‘टीएच्’ अशा रोमन अक्षरांत लिहिले जाते. 

त्यामुळे, अनेकदा गोंधळ होतो. उच्चारण त्यांचे योग्य असते. पण, जेव्हा इंग्रजी भाषेत लिहिण्यासाठी लिप्यंतर (दाक्षिणात्य ते रोमन) करतात तेव्हा घोळ  घालतात. आपण तेच रोमन लिपीत लिहिलेले नाव आपल्या भाषेत उच्चारतो, लिहितो तेव्हा या घोळाची परमावधी होते. दु:ख नेमके इथे आहे. जनता जनार्दनाची भाषा बदलत चालली आहे, आपल्याच संस्कृतीशी असलेली नाळ तोडत चालली आहे याचे अतीव दु:ख होते.  

‘जनार्दन’ हे भगवान विष्णूंचे एक नाव. ते आपल्याला नवीन अजिबात नाही. वास्तविक जनार्दन या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर प्रभारी कुलगुरूंचे नाव जनार्थनम असणार नाही, ते जनार्दनम किंवा जनार्थनाम असणे शक्य आहे, हे लक्षात येते. जन म्हणजे लोक आणि अर्दन याचा अर्थ संहार करणे, मारणे असा आहे. अधर्माने वागणार्‍या जनांना मारणारा म्हणून जनार्दन.

ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन ।जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥ ४ ॥

(ज्याच्या योगे दुष्ट जनांचा संहार होतो, ज्याच्या योगे लिंगदेहाचा नाश होतो, जो जीवाला जिवानेच ठार मारतो, तो जनार्दन कृपाळू होणार कसा?)  एकनाथी भागवत - २५.४

‘जीवो जीवस्य जीवनम्’ (एक जीव दुसर्‍या जिवावर जगतो) याच्या विपरीत ‘जिवाला जिवानेच ठार करणे’ हे किती विस्मयचकित करणारे यावर विवेचन करण्याचा मोह आवरता घेत लेखनसीमा अधोरेखित करतो. 


रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?

प्रत्येकाला हवी असलेली आणि तरीही ती नेमकी काय आहे याची माहिती नसलेली संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा केलेला ऊहापोह...


लहानपणात कळायला लागल्यापासून खटकत आलेले वाक्य  म्हणजे ‘दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.’ शाळेत शिकवलेही तसेच जायचे. ‘सर, आम्ही स्वातंत्र्य मिळवले की, मिळाले?’ असा प्रश्न आठवीत असताना शिक्षकांना विचारला होता. तेव्हा, ‘काय फरक पडतो? जास्त शहाणपणा करू नकोस.’, असा प्रेमळ सल्ला मिळाला. 

‘स्वातंत्र्य आम्ही मिळवलं’, असं का शिकवलं जात नाही असा प्रश्न नंतर अनेकदा पडला. या प्रश्नाला, ‘राजकीय सत्ताहस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य?’ या व अशा अनेक प्रश्नांची जोड मिळत गेली आणि त्या प्रश्नांच्या शृंखलेने जखडून टाकलं. त्यातून सुटण्याची धडपड आजतागायत सुरू आहे. अजूनही स्वतंत्र झालो नाही. कदाचित, होणारही नाही.

स्वत:च्या मर्जीने, तंत्राने बंधनांशिवाय हवे तसे वागण्याची, बोलण्याची मुभा म्हणजे स्वातंत्र्य, अशी त्याची ढोबळमानाने व्याख्या केली जाते. स्वतंत्र असणे याचा अर्थ स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे सामर्थ्य असणे, स्वत:चे रक्षण स्वत: करण्याची क्षमता असणे म्हणजे स्वातंत्र्य असा स्वातंत्र्य या संकल्पनेचा अनेक अंगांनी विचार करता येऊ शकतो. पण, तरीही त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही. स्वातंत्र्य हा शब्द अनेक ठिकाणी जोडला जातो. प्रत्येक ठिकाणी त्याची व्याप्ती आणि मर्यादा बदलत जातात. व्यक्ती, विचार, वर्ग, राष्ट्र, समाज, समुदाय, पंथ, संस्कृती अशा अनेक ठिकाणी स्वातंत्र्य हा शब्द जोडला जातो. या संकल्पनेच्या गळ्यात समता आणि पायात समानता अडकवली जाते. अस्मितेची भरजरी वस्त्रे नेसवली जातात. या सगळ्या अभिनिवेशात स्वातंत्र्य या संकल्पनेचीच गळचेपी होऊन ती परावलंबित्व, परवशता आणि पारतंत्र्य यात पुरती अडकते. यातून निर्माण होतो तो फक्त संघर्ष आणि संघर्ष, बाकी काहीच नाही.

व्यक्तिस्वातंत्र्य हा तर या संघर्षाचे मूलभूत स्वरूप आहे. आपण वाट्टेल ते वाट्टेल तसे बोलणे, वागणे म्हणजे स्वातंत्र्य असे अत्यंत प्रामाणिकपणे समजतो. अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या तीन वाजेपर्यंत समुद्रकिनार्‍यावर मित्रमैत्रिणींसोबत बागडणे हे तिचे व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे, असा विचार हिरिरीने मांडला जातो. तिच्या सुरक्षेची जबाबदारी अधोरेखित करणारा मुख्यमंत्री स्त्री-पुरुष समानतेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा  आणि त्याहीपुढे जाऊन स्त्रीस्वातंत्र्याचा विरोधक ठरतो. 

आपण घरात काय घालावे, काय बोलावे, कसे वागावे याचे आणि समाजात वावरताना काय घालावे, काय बोलावे, कसे वागावे याचे सर्वमान्य रूढ संकेत असतात. हे संकेत पाळण्याचा आग्रह धरणे म्हणजे स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही. वस्त्राचा उपयोग प्रामुख्याने सहसा उघड्यावर पडू नयेत असे अवयव झाकणे, हा आहे. घरात आणि चारचौघांत याचे संदर्भ बदलतात. घरात आपण काय घालतो किंवा घालत नाही, याचे कुणालाही काहीही पडलेले नसते. पण, जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा त्याचे संकेत बदलतात. ‘माझं शरीर आहे, ते किती झाकायचं आणि किती दाखवायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला आहे.’ हे एखादी स्त्री म्हणू लागते तेव्हा अनवस्था प्रसंग ओढवतो. त्या अवस्थेतल्या तशा स्त्रीकडे पाहण्याचे किंवा पाहत राहण्याचे स्वातंत्र्य पुरुषाला नसते. 

जी अवस्था व्यक्ती स्वातंत्र्याची तीच अवस्था विचार स्वातंत्र्याचीही आपण करून ठेवली आहे. माझे विचार आहेत, मी वाट्टेल तसे, वाट्टेल तिथे वापरणे म्हणजे स्वातंत्र्य असा विचार आपण रुजवला आहे. पंडित नेहरूंचे व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याच्या हव्यासापोटी आपण आपल्याच राष्ट्राच्या पंतप्रधानांचे चारित्र्यहनन सार्वजनिकपणे करतो हे लक्षातच येत नाही. मोदींना जाहीरपणे ‘नीच’, ‘मौत का सौदागर’ म्हणतानाही आपण हे भान विसरतो. व्यक्तिगत पातळीवर एकवेळ चालेल अशी टीका टिप्पणी आपण जाहीर माध्यमातून करणे, याला विचारस्वातंत्र्य म्हणत असू तर ते आपल्याच वैचारिक दळभद्रीपणाचे लक्षण ठरते. 

अशाच पद्धतीने आपण वर्ग, राष्ट्र, समाज, पंथ यांच्या स्वातंत्र्याकडे पाहतो. व्यक्ती आणि विचार या पातळीपेक्षाही यांच्या ‘स्वातंत्र्य’ संकल्पना अधिक घातक ठरतात. वर्गसंघर्षाला स्वातंत्र्य संकल्पनेची फोडणी दिली की, त्याचे कायम पेटत राहणे निश्चित होते. वर्ग स्वातंत्र्याला अस्मितेची जोड तर त्याहून अधिक प्रभावशाली ठरते. जेसिंतो बेटावर तिरंगा फडकवण्याचे स्वातंत्र्य कुणाला आहे, नुस्तेकारांना आहे की, नौदलाला आहे यावरून अस्मितेचे निखारे पेटवले की, वर्गसंघर्ष होतो आणि स्वातंत्र्य चुलीत जाते. नुस्तेकारही आपलेच आणि नौदलही आपलेच हा वर्गसमन्वय साधणे ही वैचारिक अडचण ठरते. 

कोणाचे स्वातंत्र्य मोठे किंवा महत्त्वाचे हा तर वर्गसंघर्षाचा पाया आहे. याचे वारे सर्वांत जास्त पंथस्वातंत्र्याला लागते. हेच स्वातंत्र्य शरियाचे नियम लागू करण्यास भाग पाडते आणि शरियातील दंड नको म्हणते. हेच पांथिक स्वातंत्र्य रस्त्यावर नमाज पठणाला, दूर्गापूजा करायला आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला घटनेने दिलेला अधिकार ठरवते. हेच पांथिक स्वातंत्र्य कोकणे विरुद्ध किरिस्तांव, हिंदू विरुद्ध मुसलमान असा उभा दावा निर्माण करते. 

हे सगळे पाहिल्यानंतर, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? ’ हा प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला चौर्‍याहत्तर वर्षे झाली तरीही निरागसपणे उभा राहतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य ही संकल्पना आपल्या संस्कृतीशी जोडून कधी पाहिलीच नाही. तिला स्वच्छ आणि स्पष्ट करण्याचा प्रयत्नही केला नाही. म्हणूनच स्वातंत्र्य आपण आपला अधिकार मानला. त्याआधी ती आपली जबाबदारी आहे, हे सोयीस्करपणे विसरलो.  स्वातंत्र्यातून मिळणारे लाभ उपभोगणारे आपण, त्याच्या परिणामांची जबाबदारी मात्र समाज, संस्कृती, सरकार आणि आपल्याशिवाय इतर प्रत्येक गोष्टीवर ढकलू लागलो. जबाबदारीशिवाय अधिकार आणि स्वातंत्र्य कायम संघर्षच उभा करतात हे आपण संसदेपासून आपल्या घरापर्यंत सर्वत्र दररोज अनुभवत आहोत. 

सर्वांना सामावून घेणार्‍या संस्कृतीला नावाने संबोधण्याचे धाडस आणि स्वातंत्र्य आपल्याजवळ नाही. उलट तिला नावे ठेवण्याला आपण स्वातंत्र्य समजत आहोत. समता, समानता, अधिकार, हक्क या गोष्टींशी स्वातंत्र्य ही संकल्पना न जोडता तिला संस्कृतीशी जोडले असते तर आपल्याला स्वातंत्र्य ‘मिळणे’ आणि ‘मिळवणे’ यातला फरक निश्चितच कळला असता.