शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

२६/११सारख्या घटना घडतच राहतील!


२६/११सारखा अतिशय नियोजनबद्ध हल्ला कुठल्याही स्थानिक मदतीशिवाय झाला आणि हे भारताविरुद्धचे युद्ध नाही, असे ज्यांना वाटते त्यांची कीव करावी तेवढी थोडी. दहशतवादाला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हणणे आणि पाकिस्तान करीत असलेल्या युद्धाला ‘युद्ध’ म्हणणे व रणकर्कश पद्धतीने त्यांचा बीमोड करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा वर्षातल्या प्रत्येक दिवशी आपल्याला मेणबत्त्या पेटवतच बसावे लागेल.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी लिखित, परंतु, अप्रकाशित असलेल्या ‘१० फ्लॅशपॉइंट ः २० इअर्स- नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इम्पॅक्ट इंडिया’ या पुस्तकामध्ये त्यांनी २६/११ मुंबई हल्ल्यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतावरून सध्या काँग्रेस पक्षावर टीका सुरू झाली आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तत्कालीन यूपीए सरकारने कोणतीही कारवाई न करणे हा सरकारचा कमकुवतपणा आहे, असे तिवारी पुस्तकात म्हणाले आहेत.  मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. ती वेळच अशी होती की तेव्हा प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भाजपने याचा राजकीय लाभ घेणे स्वाभाविक आहे. त्यांच्या जागी काँग्रेस असती तरीही तेच झालं असतं. २६/११ला आज तेरा वर्षे पूर्ण होत आहेत. काय झालं, कसं झालं याबद्दल खूप लिखाण झालं आहे. २६/११ दहशतवादी हल्ला या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. कॅथी स्कॉट क्लार्क व अ‍ॅड्रिअन लेव्ही यांचे ‘द सीज : ६८ आवर्स इनसाइड द ताज हॉटेल’, अंकुर चावला यांचे ‘१४ आवर्स’, विनिता कामटे यांनी त्यांचे पती अशोक कामटे यांच्यावर लिहिलेले ‘टू द लास्ट बुलेट’, रमेश महालेंचे ‘कसाब आणि मी’, हरिंदर बावेजा यांचे ‘२६/११ मुंबई अटॅक्ड’, संदीप उन्नीथन यांचे ‘ब्लॅक टॉर्नेडो’, जुई करकरे यांनी आपले वडील हेमंत करकरे यांच्यावर लिहिलेले पुस्तक, राकेश मारिया यांनी लिहिलेले ‘लेट मी से इट नाउ’  आणि आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेले ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ ही काही महत्त्वाची उल्लेखनीय पुस्तके. 

प्रत्यक्ष हल्ला, पोलिसांचे अतुल्य साहस, राजकारण, दहशतवाद, सुरक्षा यंत्रणा या व अशा अनेक कोनातून या एका घटनेकडे पाहिले गेले आहे. पण, बहुतेक ठिकाणी दोन गोष्टींचा उल्लेख केला जात नाही किंवा टाळला जातो, त्या दोन गोष्टी म्हणजे युद्ध आणि इस्लामी दहशतवाद. 

आजही आपण मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख दहशतवादी हल्ला असाच करत आहोत. वास्तविक पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेलं हे युद्ध आहे. याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. दहशतवाद हे या युद्धात वापरलं गेलेलं बाहुलं आहे. ज्याच्या आडून पाकिस्तान इतर देशांसमोर आपण पीडित असल्याची भूमिका मांडून स्वत:चा बचाव करत आहे. डोसिअर आणि निषेध या व्यतिरिक्त भारत सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही हेच खरे. २६/११ ची जखम भरून काढण्यासाठी आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची वेळ आली आहे.


लडके लिया पाकिस्तान हंस के लेंगे हिंदुस्थान असे म्हणून फाळणी करायला भाग पाडलेल्या नेत्यांचा तेव्हापासून आत्तापर्यंतचा ‘भारताशी युद्ध’ हा एक कलमी कार्यक्रम आहे. नेते, लष्करी अधिकारी, दहशतवादी, गँगस्टर बदलतात ध्येय तेच राहते. त्यांची प्रत्येक कृती ही युद्धच असते. आपल्यासाठी मात्र कलेचे आदानप्रदान, गँगवॉर, फुटिरतावाद आणि कसले कसले वाद असतात. या सर्वांचे स्लीपर सेल भारतात सक्रिय असतात. 

हे स्लीपर सेल वर्तमानपत्रे, मीडिया, अभिनय, मानवतावाद, कला, पर्यावरण अशा अनेक माध्यमातून तीच भूमिका घेतात जी पाकिस्तानला हवी असते. हे स्लीपर सेल एक गठ्ठा मते बनून राजकीय पक्षांना मदतही करतात. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभाव पाडतात किंवा त्यांच्या विचारसरणीचा फायदा आपल्यासाठी करून घेते. विशिष्ट विचारसरणी रुजवतेही. 

उदाहरणच द्यायचे झाले तर, प्रभावलोपन (न्यूट्रलाइझेशन) हा एक प्रकार एखादी घटना घडल्यानंतर समतोल राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून केला जातो. पण, त्याचा लाभ मुंबईत स्फोट घडवणार्‍या दाऊदला होत असेल तर? १९९३साली मुंबईत ११ बॉम्बस्फोट हिंदूबहुल वस्तीत दाऊदने घडवून आणले होते. याचा समतोल राखण्यासाठी शरद पवार यांनी धावत जाऊन न घडलेला बारावा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत घडल्याची आणि या मागे श्रीलंकेतील दहशतवादी संघटना असल्याची लोणकढी थाप मारली.  बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त ऐकता ऐकता ते सगळे मुस्लीम वस्तीत झाले आहेत, हे कुणाला लगेच कळाले नसते. जरी कळाले असते तरी कुठल्याही हिंदूने जाऊन मुस्लिमांना कापून काढले नसते किंवा मुस्लिमबहुल वस्तीत बॉम्बही फोडले नसते. मग, शरद पवारांनी हा खुळचटपणा कशासाठी केला? त्याचा लाभ कुणाला झाला? याच दळभद्री मानसिकतेतून मालेगाव बाँबस्फोटप्रकरणामध्ये पकडलेले दोन दहशतवादी सोडून देण्यात आले आणि कर्नल पुरोहित यांना त्यात गोवले. कर्नल पुरोहित यांना गोवण्यामागे त्यांनी संपूर्ण किनारपट्टी भागात दाऊद व दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलचा लावलेला शोध हे कारण होते. साध्वी प्रज्ञासिंग आणि अभिनव भारतचे इतर सदस्यांना पकडून हिंदू दहशतवाद (दहशतवादाचा समतोल राखण्यासाठी) सिद्ध करता येणे शक्य होते. कर्नल पुरोहितांना त्यात गोवावे हा पाकिस्तानचा, दाऊदचा आदेश महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळणार्‍यांना टाळता येणे शक्यच नव्हते. पुरोहितांना गोवल्यामुळे आणि किनारी भागातील गस्त हटवल्यामुळे कसाब आणि त्याच्या टोळीला जलमार्गे घुसणे शक्य झाले. 

२६/११च्या आधी दोन दिवस आधी गृह सचिव आणि आपात्कालात निर्णय घेण्यास अधिकृत असलेले गृह मंत्रालयातील ९ सदस्य पाकिस्तानात बैठकीसाठी असणे व त्यांचा एक दिवस वाढवला जाणे हा निव्वळ योगायोग मानायचा? या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग नाही, असे गृहमंत्र्यांनी म्हणणे स्लीपर सेलची पाठराखण नव्हे? अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक आहे हे पाकिस्तानने ३० डिसेंबर रोजी मान्य करेपर्यंत हा हिंदू दहशतवाद आहे, असे कंठरवाने कोण ओरडत होते? 

प्रत्येक लहानमोठा हल्ला हे पाकिस्तानचे भारताविरुद्ध चाललेले युद्ध आहे, या पद्धतीनेच ते हाताळले नाही, तर चीन, तालिबानी आणि खलिस्तानी यांच्या साहाय्याने पाकिस्तान भारताला कधी गिळंकृत करेल हे कळणारही नाही. 

इतकी वर्षे सातत्याने होणार्‍या दहशतवादाला आम्ही आजही ‘इस्लामी दहशतवाद’ असे लिहायलाही घाबरतो. जैश ए मुहम्मद, लष्कर ए तैयबा या सारख्या तमाम मुस्लीम संघटनांनी माजवलेल्या अत्याचाराला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हटल्याने भारतीय मुस्लिमांना वाईट वाटेल, त्यांच्याविरुद्ध तिरस्काराची भावना हिंदू जोपासतील हा विचारच खुळचटपणाचा आहे. भारतीय मुसलमानाचे ‘इस्लामी दहशतवादा’शी काहीही देणेघेणे नाही. या मुद्दाम पसरवलेल्या अनाठायी भीतीपायी आपण ’इस्लामी दहशतवाद’ असे म्हणत नाही. उलटपक्षी त्याला सौम्य करण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ नावाचं थोतांड उभं करतो किंवा ‘सामाजिक शांतता’ बिघडण्याची भीती व्यक्त करतो. याचा त्रास हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही भोगावा लागतो. 

कसाबकडे समीर दिनेश चौधरी या नावाचे बनावट ओळखपत्र मिळाले तेव्हा त्याने त्याची ही हिंदू ओळख दाखवण्यासाठी हातावर धागा बांधला होता. जर त्या रात्री तुकाराम ओंबळेंनी कसाबला जिवंत पकडला नसता आणि त्याचा मृत्यू झाला असता तर तो ‘हिंदू दहशतवादी’ म्हणून मरण पावला असता. ‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना सत्य म्हणून जगभर नोंदवली गेली असती.

जे सत्य आहे, त्याला सत्य म्हणण्याचे धाडस नसणे ही माणसांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. ‘इस्लामी दहशतवाद‘ आणि पाकिस्तानचे भारताविरुद्ध युद्ध या दोन गोष्टी आपण जेव्हा त्या जशा आहेत तशाच स्वीकारू तेव्हाच त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे शक्य होईल. त्याऐवजी आपण मानवतेचे, शांततेचे अनाठायी आभास बाळगले तर २६/११ सारख्या घटना घडतच राहतील. इतक्या की, ३६५ दिवसही भरून जातील!


बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

आपल्या सामाजिक प्रतिक्रिया हिंसकच का?

घटनांचे पडसाद उमटणे ही स्वाभाविक गोष्ट मानली जात असली तरीही, पडसाद उमटवण्यासाठी घटना रचल्या जात असतील, तर ते देशासाठी घातकच आहे. बांग्लादेशमधील घटनेचे पडसाद त्रिपुरात, त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात हा घटनाक्रम दुखावणार्‍या पांथिक, सामाजिक भावनांवर पुन्हा विचार करायला लावतो आणि आपल्याच हिंसक प्रतिक्रियेचे विश्लेषण करायला भाग पाडतो.



एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया ही कुठे ना कुठे तरी उमटतेच. पण, प्रतिक्रिया कशी उमटते यावर आपली संस्कृती ठरत असते. जे बांग्लादेशात घडले, त्रिपुरात घडले, महाराष्ट्रात घडले आणि मडगाव येथे घडता घडता घडले नाही त्याचा विचार करणे म्हणूनच अगत्याचे ठरते.

या सर्व घटनाक्रमाची सुरुवात बांग्लादेशमधून झाली. तीही आता नव्हे तर, नवरात्रांत झाली. दि. १३ ऑक्टोबर रोजी कुणीतरी दुर्गा मंडपामधील हनुमंताच्या पायावर कुराणाची प्रत ठेवली. त्यावरून दुर्गा मंडप जाळण्यात आले. नंतर सीसीटीव्ही फूटेजवरून हे लक्षात आले की, असे करणारी व्यक्ती एक मुस्लीमच होती. कोमिलातील सुजानगर येथे राहणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन. त्याची आई अमिना बेगम यांच्या म्हणण्यानुसार तो एक ड्रग अ‍ॅडिक्ट होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पोलिसांच्या माहितीनुसार तो अनेक वर्षांपासून बेकार होता. आता इथे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. खरोखरच तो अमली पदार्थांचे सेवन करत होता, गतिमंद होता, बेकार होता असे असेल तर निश्चितच त्याचा वापर कुणीतरी करून घेतला आहे. एखादा मुस्लीम हनुमंताच्या पायावर कुराण ठेवून कुराणाचाच अपमान करणार नाही. त्यामुळे, त्याच्या व्यसनांचा किंवा आर्थिक स्थितीचा वापर हे त्याच्याकडून करवून घेण्यात झाला असावा. त्यामुळेच, त्याला पकडून प्रश्न सुटणार नाही. त्याला असे करायला लावणारे कोण होते, हे समोर येणे जास्त आवश्यक आहे. 

ज्यांनी याचे नियोजन केले त्यांचा हेतू त्याचा आधार घेऊन हिंदूंची घरे पेटवणे, दुर्गा मंडप जाळणे, मंदिरे तोडणे हाच होता. त्यासाठी त्यांना एखादे निमित्त हवे होते. त्यासाठी, मुसलमानांनी  कुरणाचाच अपमान करून हे निमित्त तयार केले. त्यांना वाटले होते, ‘हे कुणी हिंदूनेच केले आहे’ या आवईखाली सगळे खपून जाईल. पण, सीसीटीव्ही फूटेजने सर्व उघड केले. हिंदूंना संपवण्यासाठी मुस्लिमांनी त्यांच्यासाठी सर्वोच्च, पवित्र असलेल्या कुराणाचाच अपमान केला. कुठून येते ही आपल्या आस्थेशिवाय इतर आस्था मानणार्‍यांविषयी नकारात्मक, द्वेषाची भावना? वाट्टेल तसे हिंसेने त्यांना संपवण्याची संकल्पना कुठून येते? याचा साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. 

उत्तर त्रिपुराच्या धर्मनगर या जिल्ह्यातील चमतिला या गावी विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या निषेध यात्रेत मशिदीवर दगडफेक आणि मुस्लिमांच्या दुकानांची तोडफोड झाली. या घटनेनंतर ट्विटरच्या ६८, फेसबुकच्या ३१ आणि यूट्यूबच्या २ पोस्टमधून मशीद जाळल्याचे, मुस्लिमांची दुकाने, घरे जाळल्याचे आणि मुसलमानांचे हत्याकांड केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दंगल पेटली.  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून मशिदीवर दगडफेक होणे निषेधार्हच आहे. यात दुमत असण्याचे कारण निश्चितच नाही. 

पण, जे बांग्लादेशात मुद्दाम घडवण्यात आले आणि त्रिपुरातही मुद्दामच घडवण्यात आले त्याबद्दल काय म्हणायचे? त्याला स्वाभाविक, साहजिक प्रतिक्रिया कसे म्हणता येईल? ‘मुस्लीम समाज आपल्या पंथाविषयी खूपच संवेदनशील आणि हळवा आहे’, हे जाळपोळीचे, मंदिर तोडण्याचे, हत्या करण्याचे आणि दंगल पेटवण्याचे समर्थक कारण कसे होऊ शकते? तसाच विचार केल्यास मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची हजारो देवळे तोडली आणि त्यावर मशिदी बांधल्या, गोव्यात ख्रिस्ती प्रचारकांनी देवळे तोडली, त्यावर चर्च उभारली. त्याची प्रतिक्रिया याच पद्धतीने उमटली असती तर एक तरी मशीद आणि एक तरी चर्च शिल्लक राहिले असते का, याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रतिक्रिया कशी उमटते व का उमटते या बरोबरच ती कुठे उमटते हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

भौगोलिक परिस्थिती पाहिली तर त्रिपुराचा बहुतांश भाग बांग्लादेशच्या सीमांलगत आहे. कोमिला ते धर्मनगर हे अंतरही १०० किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे, कोमिलात जे काही घडले त्याचे पडसाद धर्मनगर येथे उमटणे स्वाभाविकच आहे. पण, त्रिपुरात घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांत न उमटता, चक्क महाराष्ट्रात उमटतात. त्याही अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये. जिथे हिंदू मुस्लीम दंगे होण्याचा इतिहास आहे, अशा राज्यांमध्ये न होता महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात. खरे तर घडवल्या जातात.

अपेक्षेप्रमाणे त्रिपुरात आणि महाराष्ट्रात याचे राजकीय भांडवल झाले. शिवसेनेने भाजपला यासाठी जबाबदार धरले आणि भाजपने राष्ट्रवादीला. खरे तर चुकीच्या ठिकाणी होत असलेला मुस्लिमांचा राजकीय-अनुनय याला जबाबदार आहे. महाराष्ट्रात मविआ सत्तेत आल्यानंतर शरद पवार म्हणाले होते की, अल्पसंख्याकांमुळेच आम्ही सत्तेत आलो, काँग्रेसचे अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही मुस्लिमांची परवानगी घेऊन मगच शिवसेनेशी युती केली. हे दोघे कुणाबद्दल बोलत आहेत? मुस्लिमांबद्दल की, रझा अकादमीसारख्या संघटनांबद्दल बोलत आहेत? मुस्लीम समाज या राजकारण्यांनाअभिप्रेत नाही. भिवंडी, मुंबई आणि आता अमरावती, नांदेड पेटवणार्‍या रझा अकादमीशी व त्यांच्या एका हाकेवर एकत्र येणार्‍या मुस्लिमांच्या संख्येशी या राजकारण्यांचे देणेघेणे आहे. 

यातील समान सूत्रे आणि त्यामागची मूळ संकल्पना लक्षात घेणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा, असे दंगे आणि घटना वारंवार घडतच राहतील. त्रिपुरामध्ये दंगे भडकण्यामागे मशीद जळण्याचे फोटोशॉप केलेले फोटो पसरवण्यात आले. तीच पद्धत महाराष्ट्रातही अवलंबली गेली. त्यानंतर येणार्‍या राजकीय आणि माध्यमावरील विचारवंतांच्या प्रतिक्रिया ‘बहुसंख्य अल्पसंख्याकांवर बाय डिफॉल्ट अन्याय करतात’ या नॅरेटिव्हबरहुकूम होत्या. त्यानंतर मग आरोप-प्रत्यारोप, इतिहासातील दाखले देणे, चिखलफेक, झुंडशाही हे सर्व षोडशोपचार झाले. यातून दर खेपेला असे का घडते हा मुद्दा, त्यावरील विचारमंथन आणि त्यानुरूप उपाययोजना करणे बाजूलाच पडले किंवा मुद्दाम पाडले गेले. 

मुस्लीम समाजाच्या जगभरातील प्रतिक्रिया हिंसक का असतात, याबद्दल विवेचन करताना वफा सुल्तान ‘अ गॉड हू हेट्स’ या पुस्तकात म्हणतात की, इस्लाम हा फक्त एक पंथ नसून ती एक राजकीय विचारसरणी आहे जी हिंसेचा प्रचार करते आणि आपले म्हणणे सक्तीने लागू करते. इस्लाममुळे जगात निर्माण झालेल्या समस्यांचे मूळ इस्लामच्या शिकवणीतच आहे, असेही त्या म्हणतात. एकेश्वरवाद आपल्याकडेही आहे. पण, त्यासाठी इतर देवांवर विश्वास ठेवणार्‍यांविषयी घृणा, द्वेष किंवा नकारात्मक विचारसरणी नाही. 

हिंदू संघटना, विचारसरणी इस्लामसारखीच होत आहे का, हा मुद्दाही आता त्यासोबत पडताळणे आवश्यक आहे. सर्वसमावेशकता हा हिंदूंचा गुण हिंदूंसाठीच मारक ठरत आहे, या निष्कर्षाप्रत हिंदू समाज येऊन पोहोचला आहे. या गुणाचे श्रेयही मिळत नाही आणि उलटपक्षी कायम मारच खात राहणे पदरी पडते हा अनुभव आहे. अगदी विसाव्या शतकापासून जरी याची सुरुवात केली तरी मोपला हिंसाचार, डायरेक्ट अ‍ॅक्शन, फाळणी, बांग्लादेशची निर्मिती, काश्मिरी हिंदूंचे पलायन या सर्व घटनांबद्दल हिंदूंनी एकांगी मार खाल्ला आहे. जिथे प्रतिकार केला किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली तेव्हा त्यांना ‘हिंदू-मुस्लीम दंगे’ किंवा ‘हिंदूंची असहिष्णुता’ असे लेबल लावले गेले आहे.

याचा परिणाम असा होतो की, हिंदू एक तर या विषयावर बोलणेच टाळतो किंवा हिंदूवरच झालेल्या अत्याचारांविरुद्ध सामाजिक शांतता बिघडेल म्हणून गप्प बसतो. ‘हिंदू’ हा शब्द ऐकला रे ऐकला की पाल अंगावर पडल्यासारखे वाटते. स्वत:च्या समाजाविषयी इतकी नकारात्मक आणि घृणास्पद भावना हिंदूमध्येच प्रकर्षाने जाणवते. त्याविरुद्ध आणखी एक प्रतिक्रिया म्हणजे हिंदू हिंसेला हिंसेनेच प्रतिउत्तर देतो. ‘हे योग्य आहे का?’, निश्चितच नाही. पण, असे विचारणार्‍यांनी मुळात सामाजिक हिंसेचा इतिहास तपासून ज्याचे माप त्याच्या पदरी टाकले पाहिजे.  असे केल्यानंतरच सामाजिक हिंसाचाराच्या आणि प्रतिक्रियात्मक हिंसाचाराच्या समस्येवर तोडगा निघणे शक्य आहे. 

मुस्लिमांना हिंसाचारास प्रवृत्त करणार्‍या त्यांच्या पांथिक शिकवणीपासून दूर करून निर्गुण निराकाराच्या आध्यात्मिक शिकवणीकडे वळवले पाहिजे आणि हिंदूंना अध्यात्माच्या पायावर आधारलेल्या सर्वसमावेशक धर्माकडे वळवले पाहिजे. त्यानंतर कदाचित आपल्या पांथिक, सामाजिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. आपल्या प्रतिक्रिया हिंस्र पद्धतीने उमटणार नाहीत. 


बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे?


एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने घडणार्‍या इतर घटना, अनेकांचे त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन यावरून समाजमनाचा आपण अंदाज घेऊ शकतो. आर्यन खानची अटक ही तशी क्षुल्लक घटना. या घटनेची बातमी आणि त्यानंतरचा तिचा त्याला जामीन मिळेपर्यंतचा प्रवास, माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे, याचा शोध घेतो...








------------

एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने घडणार्‍या इतर घटना, अनेकांचे त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन यावरून समाजमनाचा आपण अंदाज घेऊ शकतो. आर्यन खानची अटक ही तशी क्षुल्लक घटना. या घटनेची बातमी आणि त्यानंतरचा तिचा त्याला जामीन मिळेपर्यंतचा प्रवास, माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे, याचा शोध घेण्यास भाग पाडतो. 

-------------


‘वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले’ असे गदिमा सहजपणे लिहून गेले. पण, या ओळी खर्‍या होत असलेल्या पाहून वेदना होतात. अमली पदार्थांचा विळखा आपल्या समाजाला किती घातक आहे, याची आपणा सर्वांना जाणीव आहे. आपली लढाई घातक, वाईट गोष्टीशी आहे हे विसरून आपण त्याला हातभार लावणार्‍यांचा उदो उदो करत आहोत. 

जवळपास महिनाभर आर्यन खान हे प्रकरण गाजत आहे. शेवटी एकदाचा त्या आर्यनला जामीन मिळाला आणि मलिकांच्या नवाबाने मोर्चा फडणवीसांकडे वळवला. या सगळ्या प्रकरणात मूळ मुद्दाच कुठल्याकुठे फेकला गेला. त्याशिवाय अनेक असे छोटे छोटे सूचक, पण महत्त्वाचे मुद्देही बाजूला फेकले गेले.

केनप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणीकृत असलेल्या, दिल्लीतील नमस क्रे नावाच्या कंपनीने कोर्डेलिआ द एम्प्रेस या क्रूज शिपवर क्रूज पार्टीचे आयोजन केले होते. या ‘नमस क्रे’चे मालक समीर सहगल आणि गोपालजी आनंद हे दोघे आणि काशिफ खान यांच्या मागावर एनसीबी होती. या क्रूजवर आणखी दोन माणसे होती जी गोव्यात विकल्या जाणार्‍या ड्रग्जमध्ये आणि सनबर्न पार्टी याच्याशी संबंधित होती. त्यापैकी एक होता श्रेयस नायर आणि दुसरा माणूस होता गोव्यात सनबर्न आयोजित करणारा मायरॉन मोहित. काशिफ खान, गोपालजी, श्रेयस आणि मायरॉन हे त्या दिवशी आयोजित क्रूज पार्टीशी संबंधित आहेत व तिथे ड्रग्ज पुरवले जाणार असल्याची टिप एनसीबीला मिळाली होती. 

समीर वानखेडे जेव्हा काशिफच्या शोधार्थ क्रूजवर पोहोचले तेव्हा तिथे त्यांना मायरॉन सापडला. एनसीबीने मायरॉनला काशिफबद्दल विचारले. त्याने माहीत नसल्याचे सांगितले. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मायरॉनच्या कानाखाली पोलिसी जाळ काढला तेव्हा तो त्यांना घेऊन एका सूटकडे गेला, खुणेचे बोट केले आणि पळाला. या आलिशान सूटमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या अमली पदार्थांसह पकडले. एनसीबीचे अधिकारी गेले होते, एका खानला पकडला सापडला भलताच खान. 

अर्थात शाहरूख खानचा मुला ड्रगच्या प्रकरणात सापडणे ही घटना म्हणून छोटी असली तरी बातमी म्हणून खूपच मोठी होती, महत्त्वाचीही होती. सर्वत्र ती झळकली. याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. आर्यन खानला तुरुंगवासात राहावे लागेल हे जेव्हा स्पष्ट झाले तिथपर्यंतही या घटनेचे महत्त्व बातमी म्हणून निश्चितच होते. पण, त्यानंतर जो माध्यमिक धुडगूस सुरू झाला त्याला काही तोड नव्हती. तो जमिनीवर झोपेल, सकाळी काय खाईल इतक्या खालच्या पातळीवर वृत्तांकन होऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि राष्ट्रात आर्यन खानची अटक हा एकमेव विषय उरला आहे, लोक त्याच्याविषयी सेकंदा सेकंदाला माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, अशा पद्धतीने वार्तांकन सुरू झाले. पूर्वी त्या करीनाच्या तैमूरने शी, शू केली की, नाही? हा महाराष्ट्रातील एका वर्तमानपत्राचा रोजचा ज्वलंत विषय झाला होता. आर्यनच्या बाबतीत वृत्तवाहिन्यांनी त्याहीपुढे एक पाऊल टाकले. 

आर्यन खानची बातमी अशा तर्‍हेने माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होत राजकीय इयत्तेत दाखल झाली. केंद्रीय तपास यंत्रणेचा कुठल्याही घटनेत संबंध, संपर्क आला की, तो महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी आखलेला डाव आहे, असा पक्का समज एव्हाना महाराष्ट्र सरकारचा झालेला आहे. वास्तविक शाहरूख खानच्या मुलाला अटक केल्यामुळे महाराष्ट्राचे नाक कसे कापले जाऊ शकते, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला पडलेले एक कोडेच आहे. 

अशी अस्मितेची नको इतकी ताणलेली भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र सरकार अनेकवेळा न्यायालयाकडून मार खाऊन आलेले आहे. कंगना राणावत, अर्णब, सचिन वाझे, परमवीर सिंग, अनिल देशमुख अशी ओळीने नाचक्की सहन करूनही पुन्हा आर्यन खान प्रकरणाला महाराष्ट्राच्या मानापमानाशी जोडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण, भाजपला धडा शिकवण्याची जी काही पोरकट खाज आहे, ती काही केल्या सुटत नाही. 

त्यातच नवाब मलिक यांना आपल्या जावयाच्या अटकेचा राग होता. दरदिवशी उठून समीर वानखेडेवर काहीतर बोलल्याशिवाय त्यांची आदल्या रात्रीची झोप सरत नव्हती किंवा त्या दिवशी लागत नसावी. समीर वानखेडेची जात, त्याचे आईवडील, त्याची दोन लग्ने याची माहिती घ्यायची आणि माध्यमांसमोर मांडायची. यातल्या एकाही माहितीचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहे, असा प्रश्न विचारण्याची हिंमत एकाही पत्रकाराला होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. त्याने जात, पंथ बदलला, दोन लग्ने केली याचा त्याने पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही, ‘नवाब मलिकने खोला नया राज’, ‘कौन है समीर वानखेडे?’ ‘क्या उनके कागजाद फर्जी हैं?’ यासारखे स्वत:च निर्माण केलेल्या असंबद्ध प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. त्याचबरोबर ‘एका वर्षाच्या आत तुरुंगात पाठवू’ वगैरे भीष्म गर्जनाही सुरू झाल्या. 

घटनेशी संबंधित, बातम्या देणारे, बातम्या पाहणारे गटातटात विभागून गेले. फेसबुक, ट्विटर, वृत्तवाहिन्या यांच्यात युद्धे सुरू झाली. या सगळ्या गदारोळात ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आजची युवा पिढी, ड्रग पॅडलर व त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय वरदहस्त हे विषय कुठल्याकुठे विरून गेले. 

शेवटी एकदाचा काय तो आर्यनला जामीन मिळाला. आपला पोरगा चुकीचे वागला तरीही आईबापाला तो आपला पोरगाच असतो, या न्यायाने एकवेळ त्यांची भावविवषता समजून घेता येईल. यच्चयावत वृत्तवाहिन्या, माध्यमे, वर्तमानपत्रे, हजारोंच्या संख्येने जमलेले चाहते, त्यांनी बॅनर लावून, फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात केलेले ते स्वागत माझ्या आकलनापलीकडचे आहे. आपल्या देशासाठी, मुस्लीम समाजासाठी, राज्यासाठी एखादे महान कार्य करून घरी परतावा, तशा जल्लोषात, थाटात स्वागत? का? अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी जामिनावर सुटून आलेला गुन्हेगारच आहे ना तो? 

कितीही चुकीचे, वाईट गैरकृत्य केले तरीही आपण चाहते आहोत म्हणून असे स्वागत करायचे? माध्यमांनी त्याला उचलून धरायचे? न्यूज व्हॅल्यूच्या नावाखाली चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून मिरवतो, तेव्हा किळस येते स्वत:ची. लोकांनी जंगी स्वागत केल्यानंतर आली होती त्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त माध्यमांनी केलेल्या जंगी स्वागताची किळस येते. 

बर्‍याच वर्षांपूर्वी एका गावात घडलेली घटना सहज आठवली. त्या गावात आडनावांची घराणी, महाजनकी होती.  पंचायतीमध्ये काम करणार्‍या एका मुलीने घरपट्टीमधील काही पैसे स्वत:कडेच ठेवले. त्याच्या पावत्या दिल्या, पण पंचायतीत पैसे जमा केलेच नाहीत. कालांतराने हा भ्रष्टाचार उघडकीस आला. पंचायत सचिवांनी तिला कामावरून काढून टाकायचा निर्णय घेतला.  ती ज्या आडनावाची होती, ते सगळे पंचायतीत जमा झाले. गावात त्यांची संख्या जास्त असल्याने तिला पुन्हा आदराने कामावर रुजू करून घ्यावे लागले. तो प्रकार पाहून मला फार आश्चर्य वाटले होते. घराणे, समूह एखाद्या चूक केलेल्या व्यक्तीच्या मागे का उभा राहतो? तिथे आडनाव, घराणे, समाज म्हणून आपली अस्मिता का खर्ची घालतो? केवळ झुंडशाही म्हणून सोडून देणे योग्य होणार नाही. या अशा समाज मानसिकतेमागे काय कारणे आहेत, ती शोधून त्यांची पाळेमुळे उपटून फेकून दिली पाहिजेत.

३० ऑक्टोबरच्या देशदूतच्या नगरटाइम्सच्या पहिल्या पानावरील हेडलाइन होती, ‘सुपरस्टारचा दिवटा अखेर जेलबाहेर’ ज्या कुणा उपसंपादकाला हा मथळा सुचला व छापायचे धाडस झाले त्याचे खरेच कौतुक! 

माध्यमांना दोष देता देता, समाज म्हणून आपण अंधाराच्या पखाली वाहत आहोत का? समाजात आपण वाईट पोसत आहोत? याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे.  या माहितीच्या प्रकाश कल्लोळाने केलेल्या अंधारात अशी कुठेतरी त्या ‘दिवट्या’ मथळ्याची एक पणती तेवत राहिली, तरीही तिच्या मिणमिणत्या उजेडात अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दिसेल.  आपली दिवाळी साजरी होईल!