हा लेख लिहायला घेतला तोवर कुठल्या देवळात कोण महाजन आहेत व का आहेत, हा विचार कधी डोक्यात आलाच नाही. देव महत्त्वाचा, तिथे जाऊन त्याचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. देव तिथे आहे, म्हणून ते देवस्थान इतकेच देवस्थानाला महत्त्व देत आलो. अनेक देवळे अशी आहेत, जिथे एकदा जाऊन आलो, तिथे पुन्हा कधीच पाऊलही टाकणार नाही. बाहेरूनच नमस्कार! कारण, तिथे चाललेले प्रकार शास्त्र सोडूनच द्या, श्रद्धेलाही पायदळी तुडवणारे होते.
लहान स्वरूपात असलेली देवळे ही गावाची केंद्रस्थाने होती. ती प्रत्येकाची जबाबदारी होती. देवळात प्रवेश नसला तरी तो अन्याय वाटत नसे. देवाला आपल्यासाठी बाहेर यावे लागते याचे दु:ख असे. ‘देव काय तो या एकाच देवळात आहे’, अशी भावना कधीच नव्हती. देवळेही वेगवेगळी होती. ग्रामदेवता, कुलदेवता अशी साधारण झोपडीवजा देवळांची विभागणी होती. बाकी राखणदार, क्षेत्रपाल, निसर्गदेवता या उघड्यावरच असायच्या. त्यांना देवळे नव्हती आणि खरे सांगायचे तर असूच नयेत. राखणदार हा फिरताच हवा, त्याला बंदिस्त करणे अयोग्य आहे. सीमा संपेपर्यंत तो आपले रक्षण करत येतोय, ही भावना तिथून जाणार्या प्रत्येकाची असे. दगड, वारूळ या निसर्गरूपात पुजण्यापासून ते मूर्तीरूपात पुजणे हा एकाच संस्कृतीचा भाग होता व आहे.
जबाबदारीची जागा हक्काने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली. पहिले दर्शन घेण्याचा, पहिली पूजा करण्याचा मान महत्त्वाचा ठरला. देवापेक्षाही देवस्थानाला नको इतके महत्त्व प्राप्त झाले. आपले हक्क प्रस्थापित करणे गरजेचे ठरले. अनेक देव जे स्थलांतरित झाले, त्यांची देवळे सुरुवातीस झोपडी किंवा लहान घरांसारखीच होती. कवळे, म्हार्दोळ, मंगेश ही देवस्थानेही तशी लहानच होती. वतने मिळवून, आर्थिक व राजकीय वजन वापरून देवळे भव्य बांधली. ज्यांनी त्यांची पुनर्स्थापना मोठ्या प्रमाणात केली, त्यांचा दबदबा तिथे राहिला. पुढे ‘मझानिया’अंतर्गत त्यांनी आपले वर्चस्व व हक्क अबाधित राहील, अशी सोय राजकीय व वैयक्तिक वजन वापरून केली. यात एक सूक्ष्म फरक व कारण आहे, जे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये सारस्वतांची महाजनकी आहे. यातही कुळावी असलेले सर्व सारस्वत महाजन नाहीत. प्रामुख्याने वत्स, कौशिक आणि भारद्वाज या गोत्रांतील सारस्वतच महाजन आहेत. इतर सारस्वत नाहीत आणि अन्य जातीचेही कुणी नाहीत. असे फक्त सारस्वतांनीच केले आहे का, तर तसेही नाही. श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानात १२ क्षत्रिय कुळे महाजन आहेत. तिथे अन्य क्षत्रिय कुळांना व अन्य कुणासही महाजन होण्याचा अधिकार नाही. गोव्यातील एकूण साधारण ४५० मंदिरांपैकी, ५०च्या आसपास मंदिरे सारस्वतांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. उर्वरित ४००हून अधिक मंदिरे ही बहुजन, क्षत्रिय मराठा, दैवज्ञ (शेट), देसाई आणि इतर हिंदू समुदायांची आहेत. या सर्व मंदिरांमध्ये तोच ’मझानिया’ नियम लागू होतो आणि ज्या कुळांनी/कुटुंबांनी मंदिराची स्थापना किंवा पुनर्स्थापना केली, त्यांच्याकडेच प्रशासकीय हक्क (महाजनकी) राहतात. त्यामुळे, तो अन्य लोकांवर, जातींवर अन्याय आहे, अशी भूमिका मांडणे व त्याचे सार्वत्रिकीकरण, सरसकटीकरण करणे चुकीचे आहे.
काही देवस्थानांच्या महाजनकीत व जमिनींत स्वजातीयांची नावे घुसडण्याचे काम सारस्वतांनी केले आहे, यात काहीच वाद नाही. पण, तो नियम सरसकट देवळांसाठी लावणे चुकीचे ठरेल. प्रत्येक देवस्थान सुटे सुटे घेऊन त्याचा अभ्यास करणे व मांडणी करणे गरजेचे आहे. कुलदेवतेची, ग्रामदेवतेची, स्थानदेवतेची, निसर्गदेवतेची व आधुनिक काळात बांधलेली इष्टदेवतेची मंदिरे अशी त्याची विभागणी करणे गरजेचे आहे.
मंदिरांबाबत थेट ‘सारस्वतीकरण’ असा शब्द ज्यांना वापरायचा नव्हता, त्यांनी त्याला ‘ब्राह्मणीकरण’ म्हटले. त्यालाच पुढे ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले. त्यासाठी ढेरे, भागवत, कोसंबी यांचे दाखले दिले; ज्यांनी या सर्वांची विभागणी शोषक-शोषित या दृष्टिकोनातूनच केली. एकाच संस्कृतीची वेगवेगळी रूपे अशी त्याची वास्तविक मांडणी त्यांनी केली नाही. त्यामुळे, आता ज्याला ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले जाते ते कुठल्या तरी उपर्या संस्कृतीने केलेले आक्रमण आहे, अशा पद्धतीने ते मांडले जाते. साम्यवादी, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी जी पाचर मारली, तीच आता पुढे मंदिरे तोडण्यात आणि फोडण्यात उपयोगी पडत आहे. ज्या ‘सांतेर’ या निसर्गदेवतेची मूर्ती आधुनिक काळात झाली, ती कुणी केली? बोडगिणीतल्या अमूर्त देवाला ‘राख रे बाबा’ म्हणत दिवा लावला जायचा, त्याचे मूर्तीरूप व देवस्थान कुणी केले?
जसे ग्रामीण भागाचे शहरीकरण होताना जे जे बदल होते गेले, तसेच बदल निसर्गदेवतांचे मूर्तीत रूपांतरण होत गेले. जशी त्याची मांडणी केली जाते, तसा हा नंतर आलेल्यांनी आदिवासींवर केलेला अन्याय नव्हता. सांगायचेच झाले तर ज्याला आदिवासींचे मूलस्थान म्हणतात तिथे सांतेर नाहीच. तो एक वेगळा स्वतंत्र व वादाचा विषय आहे. त्याची मांडणी पुढे कधी तरी करेन.
‘ब्राह्मणीकरण’, ‘संस्कृतीकरण’ हा विचार आता एका घातक वळणावर पोहोचलेला आहे. चर्च, मिशनरि यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. ती संस्कृती वेगळी, भिन्न व मूर्तीभंजनाचा जगभर इतिहास असलेली संस्कृती आहे. तिला अन्यायकारी, अत्याचारी म्हणायचे असेल तर मग रोईण किंवा वारूळरूपी सांतेर देवतेची मूर्ती झाली, भट व मंत्र आले यालाही अन्याय, अत्याचार म्हणा अशी ‘समांतर रेषा’ आखली जात आहे. एखादा वकील ‘तू करतोस तेच त्याने तुझ्या पत्नीसोबत केले याला बलात्कार म्हणावयाचे तर तू जे आपल्या पत्नीसोबत करतोस, त्यालाही बलात्कार म्हणावे लागेल’ असा तर्क देऊ लागला तर ते जितके अभद्र असेल तितकेच हेही आहे.
प्रत्येक देवळाचा स्वतंत्र व वेगळा अभ्यास करून, त्यांची वर्गवारी करून नंतर एखाद्या विधानावर येणे योग्य ठरेल. ‘आदिवासींवर अत्याचार’ अशा पद्धतीने जे सरसकटीकरण केले जाते व त्यातून ख्रिश्चनिटीचे अत्याचार सौम्य करण्याचे प्रकार थांबलेच पाहिजेत. जे अशा विचारसरणीला पुढे ढकलतात, ते स्वत: दरवर्षी जांबावलीला जाऊन गुलाल उधळतात, हे लक्षांत घेतल्यास त्यामागचा ‘समाजवाद’ही कळतो. अशांनाच विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ वाटतो आणि बुद्धमंदिर पाडून विठ्ठलाचे मंदिर उभारल्याचा साक्षात्कारही होतो.
देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक जबाबदारीसाठी आहे, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग, ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते अन्याय-अत्याचार यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, जबाबदारीची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील!















