गुरुवार, २ जुलै, २०२६

सावित्रीपासून सावित्रीपर्यंत..

दोन्ही सावित्री वंदनीयच आहेत! एका सावित्रीला दुसर्‍या सावित्रीच्या विरुद्ध उभे करून आपण सुशिक्षित, विज्ञाननिष्ठ वगैरे अजिबात होत नाही. उलट, स्वत:च्याच ज्ञानपरंपरेला नाकारणारे, हीन लेखणारे कपाळकरंटे ठरत आहोत. सत्यवानाची सावित्री आणि जोतिबांची सावित्री हे भारतीय शिक्षण परंपरेतले दोन महत्त्वाचे बिंदू आहेत, ती स्थित्यंतरे आहेत. त्यांचा यथार्थ आदर करणे हीच आपली संस्कृती आहे.

वटपौर्णिमा आली की तिचा ‘अंधश्रद्धा’ म्हणत विरोध करण्याचा कार्यभाग हल्लीच्या काळात उरकला जातो. अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान, गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्य आणि सावित्री विरुद्ध सावित्री अशा पद्धतीने मांडणी केली जाते. केवळ भारतीय पद्धतीचे शिक्षण देण्यासच नव्हे, तर स्वत:च्या ज्ञानपरंपरेला व संस्कृतीला हीन ठरवण्याची मानसिकता रुजवण्यातही वसाहतवादी पूर्णपणे यशस्वी झाले आहेत, याचाच तो पुरावा आहे. 

सत्यवानाशी विवाह झालेली सावित्री ही राजा अश्‍वपतीची कन्या होती. महाभारताच्या वनपर्वातील अध्याय २९३ ते २९९मध्ये ही कथा येते. सावित्रीने यमाशी केलेला संवाद हा निव्वळ भावनिक रडगाणे नव्हता, तर तो सर्वोच्च दर्जाचा न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्रावरील वाद होता. सज्जनांची संगत आणि विवेक हा ओढवलेल्या मृत्यूवरही कसा मात करू शकतो, हे ती पाच वेगवेगळे तर्क देत यमासमोर सिद्ध करते. वादविवादाच्या प्रत्येक मुद्द्यावर विजयी होत ती आधी यमाकडून सासर्‍यांचे राज्य, डोळे आणि वडिलांना पुत्रप्राप्तीचे वर मागून घेतले. शेवटी, ती स्वतःसाठी ’पुत्रवती भव’ (पुत्रप्राप्तीचा) वर मागते व यम ‘तथास्तु’ म्हणतो. त्यामुळे, यमाला तिच्या नवर्‍याचे प्राणही परत द्यावे लागतात. यातला यमादिकाचा प्रतीकात्मक भाग सोडला तर तात्त्विक चिंतन आणि तिचा अभ्यास आजही वंदनीय आहे. यम किंवा मृत्यूसंबंधी तत्त्वचिंतन दोघांचे प्रसिद्ध आहे; एक नचिकेता आणि दुसरी सावित्री. दोघेही विद्वान, सुशिक्षित आणि म्हणूनच वंदनीय आहेत. 

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील नायगावमधील लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील यांच्यापोटी जन्मलेल्या सावित्रीबाई यांच्यावर लहानपणापासून कष्टांचे संस्कार झाले होते. त्यांचे कुटुंब माळी समाजातील होते आणि त्यांचे वडील गावाचे पाटील होते. माहेरी असताना सावित्रीबाईंना कोणतेही औपचारिक किंवा शालेय शिक्षण मिळालेले नव्हते. पण, पारंपरिक व्यवसायाचे प्रत्यक्ष शिक्षण अगदी लहान वयात मिळाले होते. जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सासरच्या परंपरागत व्यवसायात स्वत: कष्ट करून हातभार लावत होत्या. त्यांना अक्षरओळख जोतिबा फुले यांनी करून दिली. तोवर त्या निरक्षर असल्या तरी अशिक्षित, अडाणी नव्हत्या. प्राथमिक अक्षरओळख घरीच झाल्यानंतर सावित्रीबाईंना थेट शाळा चालवण्याचे आणि व्यवस्थापनाचे आधुनिक धडे देण्यासाठी दोन मोठ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये जोतिरावांनी पाठवले; अहमदनगरची सिंथिया फॅरारबाईंची संस्था आणि मिशेलबाईंचे पुण्यातील ’नॉर्मल स्कूल’. याशिवाय, जोतिबांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे, केशव शिवराम भवाळकर (जोशी), सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सगुणाबाई क्षीरसागर यांनीही सावित्रीबाईंच्या शिक्षणास हातभार लावला. 

पुढील काळात सर्व जातीच्या स्त्रियांसाठी आधुनिक पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या तेव्हा याचा त्यांना फार उपयोग झाला. स्वत:च्या समाजाकडून व सनातनी ब्राह्मणांकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. शेणाचे, मातीचे गोळे व दगडही सहन करावे लागले. सासर्‍यांनी घराबाहेर काढले तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या अंगभूत गुणांची व मानसिक कणखरतेची कसोटी लागली. फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा वाहतानाही हेच कौशल्य दिसले. 

स्वत: जोतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत व नंतर स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये झाले होते. त्या काळी स्त्री व पुरुष यांचे शिक्षण घरीच होत असे. गुरुकुल किंवा पंतोजीच्या शाळेत (इंडिजिनिअन स्कूल) शिकणार्‍या मुलामुलींपेक्षा घरीच व्यावसायिक कौशल्य व शिक्षण घेणार्‍या मुलामुलींची संख्या पाचपट होती, हे त्या काळातील ब्रिटिश सर्वेक्षणावरून लक्षांत येते. 

केवळ संस्थात्मक शालेय शिक्षण घेणे यालाच ‘शिक्षण’ म्हणण्याच्या वसाहतवादी दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी भारतीयांना अशिक्षित, अडाणी व निरक्षर ठरवले. जातींच्या माध्यमातून हजारो वर्षे जतन केलेले परंपरागत कौशल्य व व्यावसायिक शिक्षण ब्रिटिशांनी सक्तीने बंद पाडले. त्यामुळे कापड, धातू, रसायन, वैद्यकशास्त्र, शस्त्रक्रिया, शेती यांसारख्या क्षेत्रातील परंपरागत ज्ञान व कौशल्य नाहीसे झाले. ब्रिटिश गिरणीतले कापड व अन्य व्यवसायांची भरभराट झाली. आधुनिक व संस्थागत शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या. पण, यातही भारतीय आपल्या मुलांना, मुलींना पाठवत नव्हते कारण या शाळा स्थापन करण्यात चर्च व मिशनरिंनी प्रचंड प्रमाणात पुढाकार घेतला होता. स्वत:ची सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी अनेक समाजांतून त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. 

अशा काळात फुले दांपत्याने हे पाश्‍चात्त्य पद्धतीचे आधुनिक शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारताची जुनी जात(व्यावसायिक गट) आधारित  अर्थव्यवस्था नष्ट होत चालली होती. नवीन जगात टिकण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कायदे-प्रशासकीय व्यवस्थेशी लढण्यासाठी ’पुस्तकी आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ शिक्षण’ अनिवार्य झाले होते.  अशा वेळी केवळ पारंपरिक ज्ञान व कौशल्यांवर कुठलाच समाज टिकू शकणार नाही, हे ओळखून व्यवसायबाह्य आणि पाश्‍चात्त्य पद्धतीच्या आधुनिक शिक्षणाची दारे सर्व जातींतील स्त्री-पुरुषांसाठी खुली केली, यात फुलेंचे आणि त्यांना साथ देणार्‍या सावित्रीबाईंचे थोरपण आहे.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन होत नाही; सावित्रीचे होते. ते सात जन्म ‘नवर्‍याचे बुकिंग’ नाही; तर ते शिक्षणाची थोर परंपरा असलेल्या सावित्रीचे पूजन आहे. जिचे पूजन करायचे ती सावित्री आहे आणि जिथे पूजन करायचे ती जागा वड आहे. यमाशी वाद घालून जिंकणारी सत्यवानाची सावित्रीही अशिक्षित नव्हती आणि जोतिबा फुलेंची सावित्रीही अशिक्षित नव्हती. शिक्षणापासून वंचित ठेवून ‘चूल आणि मूल’ या भारतीय स्त्रीला पुरुषसत्ताक पद्धतीने जखडून टाकले होते, असे सांगितले जाते ते अत्यंत चुकीचे आहे. वडाच्या झाडाला फेर्‍या घालणे ही ‘अंधश्रद्धा’ नाही, ते भारतीय शिक्षण परंपरेचे प्रतीक आहे. ‘सात जन्म हाच पती मिळो’ म्हणून वडाला सूत गुंडाळले जाते हे जेवढे चुकीचे आहे, तेवढेच सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाची दारे खुली करण्याआधी स्त्रिया अशिक्षित होत्या, हेही चुकीचे आहे. 

दोन्ही सावित्री वंदनीयच आहेत! एका सावित्रीला दुसर्‍या सावित्रीच्या विरुद्ध उभे करून आपण सुशिक्षित, विज्ञाननिष्ठ वगैरे अजिबात होत नाही. उलट, स्वत:च्याच ज्ञानपरंपरेला नाकारणारे, हीन लेखणारे कपाळकरंटे ठरत आहोत. सत्यवानाची सावित्री आणि जोतिबांची सावित्री हे भारतीय शिक्षण परंपरेतले दोन महत्त्वाचे बिंदू आहेत, ती स्थित्यंतरे आहेत. त्यांचा यथार्थ आदर करणे हीच आपली संस्कृती आहे. 

सोमवार, २९ जून, २०२६

सिटिझन व्हिजिलान्टे : न्याय बंदुकीने करावा, की चांगुलपणा जपत त्याची वाट पाहावी?

काश्मीरमध्ये हिंदूंना केवळ हिंदू आहेत म्हणून मारण्यात आले, हे सत्य सांगण्याचे धाडस भारतीय लोकशाहीचा एकही स्तंभ करू शकत नाही. का? याचे एकमेव कारण संपूर्ण लोकशाही इस्लामला चळचळा कापते.  स्वत:च्या संस्कृतीचे नाणे राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात ठणकावून वाजवावे लागते. अन्यथा, नौखालीपासून काश्मीरपर्यंत नरसंहार होऊनही जगातील मानवतावादाला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ‘व्हिजिलान्टे’प्रमाणे हाती शस्त्र न घेण्याच्या किंवा त्याविरुद्ध व्यक्तही न होण्याच्या  चांगुलपणासही काहीच अर्थ नसतो.

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ चित्रपट पाहिला. या चित्रपटात एक प्रसंग आहे, जिथे चित्रपटाचा नायक(खलनायक) मायकल सँडर्स, ज्या स्थलांतरितांनी बलात्कार केलेला असतो, त्यांची हत्या करत सुटतो. त्या प्रसंगातील संवाद फार उत्तम व बेधडक आहे.

------------ 

युसुफ: मला माफ करा. आम्ही जे केलं त्यासाठी मला माफ करा. आम्हाला वाटलं की तिचीही इच्छा होती.

मायकल सँडर्स: तुला वाटलं की... तिची इच्छा होती की तुम्ही तिला पकडावं आणि पार्कमधल्या एका निर्जन ठिकाणी झाडीत ओढत न्यावं? तिची इच्छा होती की तू तिचा तोंड दाबावंस आणि तुझ्या सात मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करावा? या घटनेनंतर तुझ्या सोशल मीडियावर मला कोणताही पश्चात्ताप किंवा सहानुभूती दिसली नाही. उलट, मला वाटतं तू असं लिहिलं होतं की ती बलात्काराच्याच लायकीची होती.

युसुफची बहीण: माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, त्या चुकीचे कपडे घालतात. आणि त्यांच्या मिनी स्कर्ट्समुळे मुलांना आकर्षित करतात. त्या आपले पाय आणि छाती दाखवतात.

मायकल सँडर्स: तू लिहिलं होतं की ती याच लायकीची होती.

युसुफची बहीण: मी ते डिलीट करेन.

मायकल सँडर्स (इब्राहिमला): तुम्ही तुमच्या मुलांना हेच संस्कार शिकवत आहात का?

इब्राहिम: मी त्याला कुराणमधील मूल्ये आणि आमच्या कुटुंबाचे संस्कार शिकवतो.

मायकल सँडर्स: बरं, जर तुमचे संस्कार हेच आहेत-की अमेरिका आणि युरोपमधील महिला कपड्यांच्या पद्धतीमुळे बलात्काराच्या पात्र आहेत-तर मग तुम्ही इथे का आलात?

इब्राहिम: तुम्हाला माहीत आहे की आमच्या देशात गृहयुद्ध सुरू आहे, आणि आमचे जीवन धोक्यात होते. म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. आणि मला वाटतं तुम्हाला हे माहीत आहे.

मायकल सँडर्स: मला काय वाटतं माहीत आहे? मला नाही वाटत की तुमच्या देशातून चांगले लोक बाहेर पडले. मला वाटतं वाईट लोक बाहेर आले आहेत. आणि मला वाटतं तुम्ही तुमच्यासोबत तुमची जुनाट विचारसरणी आणि लोकशाही किंवा कायद्याच्या राज्यापेक्षा रिलिजनला वरचढ मानण्याची वृत्ती सोबत घेऊन आला आहात.

---------------

यानंतर मायकल सँडर्स युसूफसह सर्वांना गोळ्या घालतो. 

‘सिटिझन व्हिजिलान्टे’ या चित्रपटावर जर्मनीनेे बंदी घातली आहे. अन्य युरोपीय देशही त्याच मार्गावर आहेत. या चित्रपटाची कथा युरोपीय देशांत निर्वासित म्हणून आश्रय घेतलेल्या इस्लामी लोकांनी सुरू केलेले अत्याचार व त्यांची तेथील न्यायव्यवस्थेने, प्रशासनाने केलेली पाठराखण यातून निर्माण झालेल्या असंतोषावर आधारित आहे. यात अनाम नायक या सर्व गुन्हे, बलात्कार केलेल्या निर्वासितांना मारीत सुटतो. हे कृत्य अयोग्य की योग्य, हा प्रश्‍न विचारणारे इस्लामच्या नावे केलेले अत्याचार व ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ (निर्वासित व्हावे लागल्याचा आघात झाल्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे) या सबबीखाली गुन्हेगार सुटतात त्यावर अवाक्षरही काढीत नाहीत. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे; पण जिथे ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’ या नावाखाली बलात्कार करण्याचे समर्थन न्यायालयच करते, तिथे कायद्याला अर्थ काय उरतो? ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ जशी हाती बंदुक घेतो, तशी काश्मिरी हिंदूंनी घेतली नाही हे त्यांचे चुकले का? 

जे आज युरोप व पाश्चिमात्त्य देश भोगत आहेत, ते भारताने हजारो वर्षे भोगले आहे. त्याला ‘मध्ययुगीन मानसिकता’ म्हणून झाकले गेले व तेच जेव्हा स्वतंत्र भारतात अनेकदा घडले तेव्हा न्यायव्यवस्थेने ‘खूप काळ लोटल्याचे’ तकलादू कारण पुढे करत त्याची सुनावणीच नाकारली. भारत आज ‘मिश्र संस्कृती’चा देश म्हणून समाजवादी, साम्यवादी मिरवतात; पण, आज जे पाश्चिमात्त्य देशांत सुरू आहे ती याचीच सुरुवात आहे. पुढे या गोष्टी सामान्य झाल्या की मिश्र संस्कृती म्हणून जगण्याशिवाय युरोपीय देशांकडे पर्याय उरणार नाही. जे वसाहतवाद्यांनी भारतात केले व साम्यवादी-समाजवादी विचारसरणीने पांघरूण घातले, तेच भोगावे लागणे हा ‘काव्यात्म न्याय’ (पोएटिक जस्टिस) आहे.

निर्वासितांनी केवळ इस्लाममध्ये म्हटले आहे म्हणून बलात्कार केल्याचे सत्य अक्षरश: लोकशाहीच्या सर्व स्तंभ युरोपमध्ये झाकत आहेत. चौदा जणांनी नवर्‍याच्या डोळ्यांसमोर बलात्कार केल्यानंतरही तिच्या दुर्दैवाने जिवंत राहिलेल्या गिरिजा टिक्कूचा जिवंत देह करवतीने चिरण्यात आला होता. तिला आजवर साधा नैसर्गिक न्यायही मिळाला नाही. एकाही काश्मिरी हिंदूने या अत्याचाराच्या बदल्यात बंदूक उचलली नाही. पण, त्यांचे कुणालाही काही पडलेले नाही. युरोपमध्ये इस्लाममुळे होणार्‍या बलात्कारांना ‘सिटिझन व्हिजिलान्टे’ने बंदुकीतून दिलेल्या उत्तराचे कौतुक आम्ही तरी का करावे? त्यांच्या न्यायव्यवस्थेला ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे बलात्कार करणे सामान्य व समर्थनीय वाटत असेल तर त्याचे दु:ख जगात कुणीच करू नये. जे ‘व्हिजिलांटे’च्या कायदा हातात घेण्याला विरोध करतात, ते केलेल्या बलात्कारातून ’ट्रॉमॅटिक इंटिग्रेशन’मुळे सुटलेल्या इस्लामी निर्वासितांचा विरोध व त्यांना शिक्षा करण्याबद्दल काहीही बोलत नाहीत. म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय त्याने शांत राहावे. हा एका अर्थाने युरोपने बलात्कार करण्यास दिलेला परवानाच आहे.

स्वत:स ‘इस्लामोफोबिक’ ठरवले जाण्याची भीती प्रत्येक युरोपीय देशास आहे. पण, त्यासाठी गुन्हेगारीस पाठीशी घालावे का, याचे उत्तर एकाही देशाकडे नाही. एवढे इस्लामिक देश असतानाही, सगळे मुस्लीम निर्वासित उदारमतवादी युरोपीय देशांतच का जातात, याचा विचारही त्यांना शिवत नाही. ‘व्हिजिलान्टे’पद्धतीने कायदा हाती घेण्याची बळावत चाललेली वृत्तीही युरोपीय देशांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे.  

काश्मीरमध्ये हिंदूंना केवळ हिंदू आहेत म्हणून मारण्यात आले, हे सत्य सांगण्याचे धाडस भारतीय लोकशाहीचा एकही स्तंभ करू शकत नाही. का? याचे एकमेव कारण संपूर्ण लोकशाही इस्लामला चळचळा कापते.

स्वत:च्या संस्कृतीचे नाणे राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक क्षेत्रात ठणकावून वाजवावे लागते. अन्यथा, नौखालीपासून काश्मीरपर्यंत नरसंहार होऊनही जगातील मानवतावादाला त्याचे काहीही सोयरसुतक नसते. ‘व्हिजिलान्टे’प्रमाणे हाती शस्त्र न घेण्याच्या किंवा त्याविरुद्ध व्यक्तही न होण्याच्या  चांगुलपणासही काहीच अर्थ नसतो. 


शनिवार, २७ जून, २०२६

सनसनाटी विरुद्ध वस्तुस्थिती आणि भाषेचा बळी

बातमी देताना त्यात हेतू घुसडू नये, हा संकेत आहे. पण, तसे होत नाही. बातमीत सत्यतेपेक्षा ती जास्तीत जास्त पाहिली जावी, याकडे लक्ष देण्याकडे वृत्तपत्रांचा कल वाढला आहे. त्यामुळे, मथळा इतका सनसनाटी केला जातो की त्यात सत्य हरवते. पण, या सगळ्याचा परिणाम काय होतो, याचा विचार कुणीही करत नाही. खप वाढला, इंटरनेटवर बातमी (केवळ मथळा व पहिला परिच्छेद फार तर वाचला जातो) किती वेळा पाहिली गेली याचे जाहिराती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हिशेब मांडले जातात. कमी वाचले जाते यामुळे संपादकीय अग्रलेखच काढून टाकले जातात. 

सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात पाठ्यपुस्तकांत किती टक्केवारी गोमंतकीयांची आहे व किती अन्य लेखाकांची आहे, याची व्यवस्थित पडताळणी झाली नाही. ज्या ज्या साहित्यिकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यांनी तरी याची पडताळणी करण्याचे कष्ट घेतले का? प्रत्येक ठिकाणी अस्मिता जोडून शिक्षण होणार नाही. गोव्यातला वैज्ञानिक, इंग्रजी साहित्यिक नाही तर पाठ्यपुस्तक चुकीचे ठरवू लागलो तर विषयच बंद करावे लागतील. या सनसनाटीपायी वृथा गैरसमज व चुकीचा नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होत आहे का? मुळात लेखक कुठले, हा मुद्दाच असू शकत नाही. जे साहित्य घेतले आहे ते दर्जेदार आहे की नाही व त्यातून भाषा या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काही सकस व पोषक वाचायला, अभ्यासायला मिळते की नाही हा योग्य मुद्दा आहे. मराठी व कोकणी दोन्ही भाषांसाठी केवळ हाच निकष ठेवून विचार होणे गरजेचे आहे. टोकाच्या अस्मिता पेटवून व त्यांची चूड नको तिथे लावून केवळ रस्त्यावर उतरून तोडफोड करणारे धटिंगण निर्माण होतील. आम्हांला पुढच्या पिढीच्या हाती लेखणी द्यायची आहे, की दगड याचे चिंतन व्हावे हीच इच्छा आहे.

या निमित्ताने विषय निघालाच आहे, तर मराठी व कोकणी पाठ्यपुस्तकांत दर्जेदार साहित्य आहे की नाही याचाही धांडोळा घेतला जावा. पुरस्कारासाठी होते तसे लॉबिंग पाठ्यपुस्तकात धडा व कविता घ्यावी यासाठी होते का, याचीही पडताळणी व्हावी. 


शुक्रवार, २६ जून, २०२६

प्रादेशिक अस्मिता किती ताणायची?

भाषा हा विषय शिकवताना, शिकताना त्या भाषेतले साहित्याचे प्रवाह विद्यार्थ्याला समजतील अशी रचना असणे अपेक्षित आहे. तिथे लेखक कुठला आहे व स्थानिक लेखकांना स्थान आहे की नाही, हा प्रश्‍नच उद्भवत नाही. गोव्यात मराठी साहित्यिक नाहीत किंवा त्यांच्यात लिहिण्याची क्षमता, वैविध्य नाही असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गोव्याचे लेखक किती आणि गोव्याबाहेरील लेखक किती, याकी गणिती आकडेमोड करण्यापेक्षा एक विषय म्हणून भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येतात की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

गोव्याच्या मराठी पुस्तकांत गोमंतकीय मराठी लेखक नाहीत याची खंत वर्तमानपत्रांना झाली, हे बरे वाटले. पण, मराठी भाषा विषय म्हणून शिकताना स्थानिक अस्मितेला किती रेटायचे, याचा विचार होणेही तितकेच आवश्यक आहे. 

भाषा हा विषय शिकवताना, शिकताना त्या भाषेतले साहित्याचे प्रवाह विद्यार्थ्याला समजतील अशी रचना असणे अपेक्षित आहे. तिथे लेखक कुठला आहे व स्थानिक लेखकांना स्थान आहे की नाही, हा प्रश्‍नच उद्भवत नाही. गोव्यात मराठी साहित्यिक नाहीत किंवा त्यांच्यात लिहिण्याची क्षमता, वैविध्य नाही असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गोव्याचे लेखक किती आणि गोव्याबाहेरील लेखक किती, याची गणिती आकडेमोड करण्यापेक्षा एक विषय म्हणून भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येतात की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हे लेखक निवड करताना ४०-६० असे प्रमाण सहसा असते. ४० टक्के गोमंतकीय व ६० टक्के अन्य. मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ही विभागणी आहे की नाही, हा खरे तर महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पण त्याला गोमंतकीय अस्मितेशी जोडून केलेली मांडणी व वार्तांकन अत्यंत हिणकस आहे. कुठल्या तरी गोमंतकीय साहित्यिकाचा समावेश न झाल्याने, ‘जय महाराष्ट्रा’ची काडी पेटवून दिल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुळात गोव्यातील लोकांना पात्र असूनही नोकरी नाकारली जाते, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तिथे ‘जय गोमंतक’ करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी विषय म्हणून शिकवली जाणारी भाषा गोमंतकीय अस्मितेशी जोडणे कितपत योग्य आहे?

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’ हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? हल्ली प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेन्ड’ सुरू आहे. त्या धर्तीवर ‘महाराष्ट्र धार्जिणे’, ‘महाराष्ट्रवादी’ किंवा त्याही पुढे जाऊन मराठीवादी म्हणजे महाराष्ट्रवादी, ‘मागील दाराने गोवा महाराष्ट्रात ढकलू पाहणारे’ वगैरे विमर्ष (नॅरेटिव्ह) पुढे सरकवले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळे संत, राष्ट्रपुरुष आणि अगदी देवही जातीत ढकलले जातात तसेच मराठी भाषेला ब्राह्मण (नंतर बामण) जातीशी जोडण्याचा प्रयत्न हल्लीच झाला. त्याचीच पुढची पायरी म्हणजे मराठीला महाराष्ट्राशी जोडून गोव्यापासून तोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘गोंयान रावचे आसा जाल्यार कोकणी उलवचे पडटलें’ हे वाक्यही महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात ऐकू येणे फार दूर नाही. 

टोकाची अस्मिता असणे हे अस्मिता नसण्यापेक्षा जास्त घातक असते. कुठलीही गोष्ट स्वत:त परिपूर्ण नसते आणि ती जोडली जाते तेव्हा समृद्ध होत जाते. त्यासाठी हक्क असण्याऐवजी पूरक असणे महत्त्वाचे आहे. आज जिथे कुठल्याही लेखकाचे जगात कुठेही वाचले जाण्याची सोय उपलब्ध असताना, प्रादेशिक अस्मितेच्या शृंखलांमध्ये भाषेला किती जखडून ठेवायचे, याचा तारतम्याने विचार करणे योग्य ठरेल. 

बुधवार, २४ जून, २०२६

भेंब्रेंनी ब्राह्मणांचे बामण केले यातच सगळे आले...



उदय भेंब्रे यांच्या लेखाच्या पूर्वार्धात असलेले शीर्षक ‘गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली’ उत्तरार्धात ‘होय, बामणांनीच मराठी परंपरा सुरू केली’, असे झाले किंवा केले. पूर्वार्धातील तिसर्‍या परिच्छेदात जे म्हटले आहे, ते पाहता त्यांना सारस्वतांव्यतिरिक्त असलेले ब्राह्मण म्हणायचे आहे, हे स्पष्ट आहे. पुन्हा उत्तरार्धात ब्राह्मण आणि बामण हे एकच आहे; आता जे बामण म्हणतोय, त्याच ब्राह्मणांनी मराठी गोव्यात आणली, अशी मखलाशी करतात. महाराष्ट्रात ब्राह्मणांना ‘बामनं’ म्हणतात, गोव्यातील स्थानिक पद्दे व महाराष्ट्रातून इथे आलेल्यांना ‘बामण’ म्हणत नाहीत. केवळ सारस्वतांना ‘बामण’ म्हणतात. गोव्यातील सारस्वत हे सरस्वती नदी आटल्यावर उत्तर-पूर्व भारतातून किंवा गौड देशातून इथे आले, असे मत यांच्यासारखेच विचारवंत मानतात. मग, त्यांची परंपरा ‘मराठी’ कशी? या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे हे ‘बामणबुद्दी’चे उद्योग भेंब्रे यांनी आता तरी बंद करावेत.

उत्तरार्धातील त्यांच्या लेखात पुन्हा पूर्वीसारखे ओढूनताणून निष्कर्ष काढले आहेत. इतकेच कशाला, स्वत:च आधीच्या परिच्छेदात मांडलेला मुद्दा नंतरच्या परिच्छेदात खोडून काढला आहे. ‘१५२६ नंतर सुमारे दोनशे ते सव्वादोनशे वर्षांत गोमंतकीयांनी कोंकणीत किंवा मराठीत काहीच लिहिलेले आढळत नाही... कोणताच साहित्य मिळत नाही’, असे एका परिच्छेदात ते म्हणतात व त्यानंतरच्या परिच्छेदात म्हणतात की, सतराव्या शतकात आठ युरोपियन पाद्र्यांनी कोंकणी धार्मिक साहित्य रचले... आणि तीन मराठी पुस्तकेही लिहिली. जर १६१६मध्ये ’ख्रिस्तपुराण’सारखे वाङ्मय निर्माण होत होते आणि छापले जात होते, तर तो काळ ’काहीच न लिहिण्याचा’ कसा असू शकतो? जरी ते गोमंतकीयांनी लिहिले नसले, तरी गोव्यात साहित्य निर्मिती पूर्णपणे थांबली नव्हती.

जर १५२६मध्ये कृष्णदास शामा यांनी ’श्रीकृष्णचरित्रकथा’ सारखे प्रगल्भ मराठी काव्य लिहिले असेल तर ती भाषा त्यांनी अचानक एका दिवसात शिकणे शक्य नाही. कोणतीही व्यक्ती साहित्याची निर्मिती तेव्हाच करू शकते, जेव्हा ती भाषा तिच्या समाजात किमान १००-१५० वर्षांपासून रुजलेली असते. शामा यांच्या भाषेचा बाज हा यादवकालीन महाराष्ट्रीशी, मराठीशी मिळताजुळता आहे.

भेंब्रे एवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांचा भामटेपणा एक पॅरलल (समांतर रेषा) आखतो.

जसा संस्कृत पंडितांनी मराठी लेखनास ती बोली म्हणत विरोध केला, तसाच विरोध गोव्यातील मराठीवाद्यांनी कोकणीस केला.

ही ती समांतर रेषा.

मुळात संस्कृत पंडितांनी आक्षेप घेतले होते, वाद घातला होता; विरोध केला नव्हता. पैठणमध्ये एकनाथ महाराज संस्कृत ’भागवत पुराणावर’ मराठीत टीका लिहीत आहेत, हे जेव्हा काशीच्या विद्वानांना समजले, तेव्हा त्यांनी एकनाथांना काशीला पाचारण केले. भागवतासारख्या अत्यंत गूढ ग्रंथाचा अचूक तात्त्विक अर्थ प्राकृतात उतरवणे अशक्य आहे आणि तसे केल्यास अर्थाचा अनर्थ होईल, असा संस्कृत पंडितांचा आक्षेप होता. काशीच्या विद्वानांनी एकनाथांच्या ग्रंथाची अतिशय कठोर, शास्त्रीय तपासणी केली. त्यांनी एकनाथी भागवताचे अध्याय स्वतः वाचले, त्यातील तात्त्विक मांडणी तपासली आणि संस्कृतमधील मूळ वेदान्ताचा अर्थ मराठीत कुठेही ढळलेला नाही, याची खात्री करून घेतली. जेव्हा पंडितांना कळाले की एकनाथांनी संस्कृतमधील मूळ अर्थाला यत्किंचितही धक्का न लावता, अत्यंत अचूकतेने तो मराठीत आणला आहे, तेव्हा त्यांनी एकनाथांचा आणि त्यांच्या ’एकनाथी भागवता’चा काशीत हत्तीवरून मिरवणूक काढून सर्वोच्च सन्मान केला आणि ग्रंथाला अधिकृत मान्यता दिली. विरोध हा मराठीला किंवा ज्ञानाचा नव्हता, तर ’संस्कृतमधील नेमका तात्त्विक अर्थ प्राकृत पेलू शकते का’ या तांत्रिक क्षमतेचा होता. ज्ञानेश्वर, एकनाथ आणि नंतरच्या संतांनी आपल्या साहित्यातून मराठीची ही क्षमता शतप्रतिशत सिद्ध करून दाखवली. जर विरोधच करायचा असता, तर तो आक्षेप खोडून काढल्यावरही केला असता. भेंब्रेंसारखे विचारवंत ‘तात्त्विक वादा’ला ‘विरोध’ म्हणतात ते केवळ मराठीवाद्यांनी कोकणीस केलेल्या विरोधाशी समांतर रेषा जोडण्यासाठी.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ही राज्ये म्हणून निर्माण झाली आहेत. त्याआधी ती संयुक्तपणे किंवा वेगवेगळी कुठल्या तरी राजवटीचा भाग होती. प्राचीन काळी महाराष्ट्री किंवा प्राकृत ही माळव्यापासून ते थेट दक्षिण कर्नाटकातील कृष्णा-तुंगभद्रा नद्यांपर्यंत आणि संपूर्ण गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर बोलली जाणारी मुख्य लोकभाषा व राजभाषा होती. त्यातून मराठी व कोकणी या आधुनिक काळातील भाषा तयार झाल्या. कोकणी ना आदिवासींनी आणली, ना मराठी ब्राह्मणांनी. या भाषा कुठल्याही ‘भायल्या’ जातसमूहाने कुठूनही बाहेरून आणलेल्या नाहीत, त्या इथल्या मातीतच तयार झाल्या, वाढल्या व विस्तारल्या. त्यानंतर झालेल्या ‘महाराष्ट्र’ व ‘गोवा’ या भौगोलिक भेदांवरून भाषांची विभागणी करण्याचा कर्मदरिद्रीपणा आपण करत आहोत. भाषिक वर्गीकरणावरून वांशिक वर्गीकरणापर्यंत पोहोचण्याची जी बीजे वसाहतवाद्यांनी पेरली होती, त्यांच्याच संकरित रूपांची लागवड भेंब्रेंसारखे विचारवंत करत आहेत. ते न कोकणीचे समर्थक आहेत ना मराठीचे; वास्तविक ते इंग्रजीचेच ‘बरे मागते’ आहेत.

देव त्यांचे लवकर भले करो!

गुरुवार, १८ जून, २०२६

हिंदू बहुत ही डरपोक कौम है!

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही!

'सत्य हिंदी' या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'बात बोलेगी' या कार्यक्रमात "हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए?"   या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश कुमार सिंग यांनी 

प्रख्यात विचारवंत, लेखक, सामाजिक विश्लेषक आणि दिल्ली विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद झा यांची मुलाखत घेतली आहे.  यात अपूर्वानंद झा म्हणाले, 

“हिंदूंना इतके कट्टर झाले आहेत,  की हिंदूंच्या प्रत्येक घरातील हिंदू हा संभाव्य खुनी किंवा संभाव्य बलात्कारी आहे. प्रत्येक हिंदू प्रत्यक्षात किंवा स्वप्नांत एखाद्या मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करत असतो. आणि याला उचित मानले जाते. ”

मुकेश कुमार सिंग व अपूर्वानंद झा हे दोघेही डाव्या विचारांचे उदारमतवादी (हाही एक विनोदच आहे) आहेत. प्रतिकार करणारा हिंदू यांना कधीच नको. इतिहासातही जिथे जिथे प्रतिकार केला तिथे तिथे सुरुवात कुणी केली व प्रतिकार केलाच नसता तर काय झाले असते, हे कधी सांगितलेच जात नाही.  प्रतिकार केला नाही, तर "हिंदूंचा नरसंहार" असा शब्द वापरत नाहीत व केलाच "जातीय दंगली" असा शब्द वापरला जातो. 

नौखालीचा व काश्मीरचा हिंदू नरसंहार झाला कारण हिंदूंनी प्रतिकारच केला नाही! परिणामी नरसंहार व जीव वाचवण्यासाठी पलायन झाले. नौखालीत तर नोव्हेंबर १९४६ ते मार्च १९४७ या काळात गांधीजी उपस्थित असताना  हिंदूंचा नरसंहार झाला आहे. तो एकतर्फी असल्याने त्याला "जातीय दंगली" म्हणता येत नव्हते म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून दाबून टाकण्यात आले. पाठ्यपुस्तकातही आले नाही व कधी शिकवलेच नाही. तिथे त्यावेळेस मुस्लीम जमावाने केलेल्या बलात्कारातून गरोदर राहिलेल्या महिलांना अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा सल्ला देताना गांधीजी म्हणाले,  

"जर एखाद्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग आला आणि ती स्वतःचा बचाव करू शकत नसेल, तर तिने दात आणि ओठ घट्ट दाबून मृत्यू पत्करावा" 

असा सल्ला देणारे गांधी त्यानंतर दिल्लीत झालेल्या प्रार्थनासभेत म्हणाले, 

"जर मुसलमानांनी सर्व हिंदूंना मारून टाकले, तरी हिंदूंनी हिंसेचा मार्ग पत्करू नये, तर शांतपणे मृत्यूला सामोरे जावे. जर त्यांनी असे केले, तर हिंदू धर्म अमर होईल आणि त्या बलिदानातून आपण एका नव्या भारताचा किंवा नव्या विश्वाचा उदय पाहू."

प्रत्येक हिंदू घरातील हिंदू कधीच हिंसक नव्हता व होणारही नाही. तो फार तर आपल्याच भावकीत कोर्टाच्या पायर्‍या झिजवून  वकिलांचे बंगले उभारण्यास मदत करेल. म्हणूनच "प्रत्येक हिंदू हिंसक, बलात्कारी झाला आहे" हे विधान राजकीय आणि इस्लामी कट्टरतेला, दहशतवादाला कव्हर देणारे संरक्षक कवच आहे. याविरुद्ध कुणी बोलणार नाही व त्याविरुद्ध काहीही होणार नाही. उलट, झुंडशाही सक्रिय होईल. मनुवादी, संघोटे, अंधभक्त वगैरे म्हणत हल्ला एक झुंड करेल व दुसरी झुंड मुस्लीम लांगूलचालन करणारे, गुलाम वगैरे म्हणत प्रतिहल्ला चढवेल. मूळ मुद्दा बाजूलाच राहील. जसा प्रत्येक हिंदू हिंसक व बलात्कारी नाही, तसाच प्रत्येक मुसलमान व ख्रिश्चनही नाही. तरीही हे नरसंहार का घडले, हा मूळ प्रश्नच बाजूला पडत आहे. ते घडले, घडत आहेत व घडत राहतील, म्हणून हिंदूंनी मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा द्वेष करणे चुकीचे आहे. तसेच यामागचे मूळ कारण व भेद लक्षांत न घेता राज्यघटनेने सर्व पंथीयांना प्रचार व प्रसाराचा समान घटनात्मक अधिकार देणेही चुकीचेच आहे. वास्तविक प्रत्येक पंथ आणि राज्यव्यवस्था यांचा काही संबंध नसणे ही इहवादी भूमिका सोडून भारताने प्रत्येक पंथाला चुचकारणारी "सेक्युलर" व समाजवादी विचारसरणी स्वीकारली. सांस्कृतिक मार्क्सवादाला शिक्षण क्षेत्रावर अनिर्बंध सत्ता गाजवू दिली. 

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही! 



गुरुवार, ११ जून, २०२६

गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली?

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे!

केलेले दावे सप्रमाण खोडून काढल्यानंतर तेच दावे पुन्हा चार पाच वर्षांनी करण्याची खोड असलेल्या उदय भेंब्रे यांनी ‘गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली’ केलेला हा दावा चुकीचा आहे. यातून त्यांनी ‘मराठी ही गोव्याबाहेरची भाषा’ हे सिद्ध करण्याचा खटाटोप केला आहे. 

संपूर्ण लेखात त्यांनी मांडलेले सिद्धांत दिशाभूल करणारे आहेत. २०१९साली राखीगडी संशोधनातून ‘सर्व भारतीयांचे पूर्वज एकच आहेत’ हे सप्रमाण सिद्ध झालेले असतानाही ते ‘प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड’ सिद्धांत पुढे रेटतात. नाकाची लांबी, त्वचेचा रंग यावरून डिक्सननी मांडलेला व गुहा यांनी पसरवलेला सिद्धांत भेंब्रे मांडतात. आर्य आक्रमणाचा पूर्णपणे खोटा व मुद्दाम पसरवलेला सिद्धांत आता पटवून देता येत नाही, त्यामुळे शब्दांचे खेळ करत त्याला ‘आर्यन मायग्रेशन’ केले आहे. पण, त्याचा आधार घेतल्याशिवाय वर्गीकृत संघर्षाची बिजे पेरताच येत नाहीत. त्यामुळे, ‘आर्य उत्तरेतून आले’, असे ते मिशेल दानिनोचा संदर्भ देऊन सांगतात. ‘आर्य म्हणजे सारस्वत’ अशीही पुस्ती जोडतात. मुळात आर्य हा शब्द वंशवाचक, जातिसूचक नाही. हे ‘मायग्रेशन’ रेटण्यामागे एक फार मोठे कारण आहे. जसे सगळे गोव्यात ‘आले’ तसेच पोर्तुगीजही ‘आले’, हा सिद्धांत मांडून दोन गोष्टी साध्य केल्या जातात. एक या सर्वांची संस्कृती भिन्न आहे आणि दुसरी ख्रिश्‍चन अत्याचार सामान्य केले जातात. त्यातून ‘आदिवासींची मूळ संस्कृती  पहिल्यांना हिंदूंनी नष्ट केली व नंतर ख्रिश्‍चनांनी केली; त्यामुळे ख्रिश्‍चनांना दोष द्यायचा असेल तर तो हिंदूंनाही द्यावाच लागेल’, हा विचार रुजवता येतो. ‘सगळ्यांचे पूर्वज एकच होते, निसर्गपूजक संस्कृतीही एकच होती’, हा विचार मान्य केला तर शोषक आणि शोषित या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करता येत नाही. भेंब्रे यांनी मांडलेल्या ‘मायग्रेशन’ सिद्धांताप्रमाणे ‘सगळेच आले’, हे गृहीत धरले तर सर्वांत प्रथम आले ते फार तर, ‘आधीवासी’ (आधी येऊन राहिलेले) ठरतात; ‘आदिवासी‘ किंवा ‘मूलनिवासी’ नाही.  

भाषेचे गट पाडून त्याची फाडणी पुढे वांशिक गटापर्यंत करण्यात सगळ्या ब्रिटिश, मिशनरि भाषाविद्वानांनी यश मिळवले आहे. त्यांचे कार्य इमानेइतबारे समाजवादी, साम्यवादी व पुरोगामी विचारवंत पुढे नेत आहेत. उदय भेंब्रे यांनी कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ या महाराष्ट्रातून येऊन इथे स्थायिक झालेल्यांच्या यादीत इथले पद्देही बसवले आहेत. जर पद्दे नंतर आले तर ते गावकारीत कसे आहेत? जी भटी भाषा पद्दे बोलतात, ती मराठी आहे. याचाच अर्थ कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ येण्याआधीपासूनच मराठी गोव्यात होती. कर्‍हाटमधून आलेल्या कर्‍हाड्यांची उपशाखा म्हणजे पद्दे हा युक्तिवाद ते कदाचित ते पुढील लेखात करतील. पण, तसे ते नाही. पद्दे जी मराठी बोलतात ती आणि कर्‍हाडे जी मराठी बोलतात, त्यात फरक आहे. जसा इथला वनवासी समाज गोव्यातलाच आहे, तसेच हे पद्देही गोव्यातीलच आहेत. वनवासींबाबत - ‘आदिवासी’ इथले ‘मूलनिवासी’ - हा विचार मांडताना त्यांच्याशिवाय गोव्यातील सखल, सागरी भागात कुणी राहतच नव्हते, असे म्हणणे पटत नाही. 

लिखित साहित्याचा विचार केला तरीही कोकणीपेक्षा मराठीमध्ये साहित्य विपुल प्रमाणात होते. ते ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी, पोर्तुगिजांनी नष्ट केले. तरीही प्रशासकीय दस्तऐवज मराठीतूनच होते. तेव्हाही गोमंतकीयांची मुख्यत्वे बोलण्याची भाषा कोकणी व लिहिण्याची भाषा मराठी होती. सारस्वतांकडून स्टीफन्सने कोकणी भाषेची रचना शिकून घेतली व ’आर्ते दा लिंगाओ कॅनारिम्’ हे कोकणीचे पहिले व्याकरण लिहिले. भाषेची व्याकरण लिहिण्याएवढी समृद्धता असतानाही त्याने ‘ख्रिस्तपुराण’ कोकणीतून का लिहिले नाही? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोकणीत छंदोबद्ध, ओवीबद्ध लिखित साहित्य त्यावेळेस उपलब्ध नव्हते व तेवढी शब्दसंपदाही त्यावेळेस उपलब्ध नव्हती. भेंब्रे म्हणतात तसे,  ‘एका ब्राह्मणाने विनंती केली म्हणून मग फादर स्टीफन्स याने मराठीत ख्रिस्तपुराण लिहिले’, केवळ यामुळे नव्हे. स्टीफन्सबद्दल लिहिताना ‘तो मराठीही शिकला, हे नंतर कळून येते’ हे  वाक्य मखलाशीचा उत्तम नमुना आहे. 

ख्रिश्‍चन प्रसारासाठी चर्चमधून कोकणीतून प्रवचने दिली जात असत. ती वाचता यावीत, समजावीत म्हणून पूर्णपणे शुद्ध कोकणी भाषेतील ’डोक्ट्रीना क्रिस्ता’सारखी पुस्तके रोमन लिपीत लिहिली गेली. बहुतांश लोकांना मराठीची वा कोकणीची देवनागरी, गोंयकानडी (किंवा कांदवी)  व मोडी लिपीही माहीत नव्हती तिथे रोमन लिपीत लिहिलेले कोकणी पुस्तक वाटून काहीही लाभ नव्हता. ते पुस्तक मिशनरि शिक्षकांसाठी होते. कोकणीत बोलता यावे, यासाठी रोमन लिपीतून लिहिलेले कोकणी साहित्य होते. मौखिक कोकणी त्यांना ख्रिस्तप्रसारासाठी, संपर्कासाठी महत्त्वाची होती. कोकणीचे एवढे महत्त्व वाटत असते, तर त्यांनी तेच देवनागरीत किंवा मोडीत लिहिले असते. स्टीफन्सनंतरही जे साहित्य लिहिले गेले ते सामान्य लोकांसाठी नव्हते, ते पाद्रींनी कोकणीतून प्रवचने देता यावीत यासाठी रोमन लिपीत लिहिलेले साहित्य आहे. त्यात कोकणीची महत्तता जराही सिद्ध होत नाही, उलट चर्चची उपयुक्तता सिद्ध होते. ‘आदिवासींनी कोकणी आणली’, हा विचार ‘मूळ आदिवासींची भाषा संथाली, मुंडारी, खासी होती’ या विचारला छेद देणारा आहे. 

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे!