आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही शालेय भौतिकशास्त्राची जागतिक स्पर्धा आहे. यातील छप्पन्नावी स्पर्धा कोलंबियातील बुकारामंगा येथे ५ ते १२ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा ऋद्धेश अनंत बेंडाळे, दिल्लीतल्या द्वारका येथील ऋषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी या पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकले आणि भारताची ‘जेन झी’ काय आहे, ते जगाला दाखवून दिले. या निर्भेळ विजयामुळे भारत संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत बरोबरी साधली.
या स्पर्धेत ३८१ विद्यार्थी आणि ८५ हून अधिक देश यात सामील झाले होते. त्यातील प्रत्येक जण आपापल्या देशातील भौतिकशास्त्राचा सर्वोत्तम विद्यार्थी होता. भारताने पाच मुलांना पाठवले होते. ते पाचही जण सुवर्णपदक घेऊन परत आले. आयपीएचओमध्ये सहभागी होण्याची ही भारताची सत्ताविसावी खेप होती. या सर्व वर्षांमध्ये, सुमारे ४४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ४१ टक्क्यांनी रौप्य, तर १० टक्क्यांनी कांस्य पदक जिंकले आहे. गेल्या दहा वर्षांत, प्रत्येक भारतीय विद्यार्थी पदक घेऊन घरी परतला आहे. ६२ टक्के सुवर्ण, ३८ टक्के रौप्य. गेल्या दशकात एकही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेला नाही. एका वर्षात पाच सुवर्णपदके जिंकण्याची घटना फक्त दोनदाच घडली आहे. या वर्षी आणि याआधी २०१८साली.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचा हा कार्यक्रम एचबीसीएसई, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे चालवला जातो. हे टीआयएफआरच्या अंतर्गत येते, जे अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत येते. ते ही संपूर्ण प्रक्रिया चालवतात. एक राष्ट्रीय परीक्षा, त्यानंतर एक राष्ट्रीय ऑलिम्पियाड, मग एक कठोर निवड घेऊन पाच मुले निवडली जातात. ज्यांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. या टीमचे नेतृत्व एचबीसीएसई-टीआयएफआरचे प्राध्यापक अन्वेश मजूमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या डॉ. लीना जोशी यांनी केले. वैज्ञानिक निरीक्षकांमध्ये आयआयएसईआर कोलकाताचे प्राध्यापक आनंद दासगुप्ता आणि रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या निशा केळकर यांचा समावेश होता.
एक सरकारी अनुदानित केंद्र गेल्या २७ वर्षांपासून भारतीय किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही प्रतिभा शांतपणे घडवत आहे. हे सार्वजनिक शिक्षण असे काहीतरी करत आहे, जे खाजगी कोचिंग इंडस्ट्री स्वतःच्या बळावर कधीच करू शकली नसती. स्पर्धेत शॉर्टकटचा कोणताही धडा नसतो. तुम्हाला वाचवणारी कोणतीही सूत्रपत्रिका नसते. कधीही न पाहिलेल्या समस्येला सोडवत विद्यार्थ्यांना बसावे लागते आणि विचार करावा लागतो. ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही ज्ञात प्रकार नसतो. कोचिंग इंडस्ट्री एका गोष्टीत खूप चांगली आहे. ती विद्यार्थ्याला एखादी ज्ञात समस्या वेगाने सोडवायला शिकवते.
नीट आंदोनामागे कोचिंग माफिया, शिक्षक, विद्यार्थी व राजकारणी होते. त्यांचा प्रत्येकाचा स्वार्थ आहे व तो साधण्यासाठी विद्यार्थी वापरून घेण्यात आले. या सर्वांना वापरणारी एक वेगळीच व्यवस्था कार्यरत होती. हे विद्यार्थ्यांच्या निमित्ताने झालेले, पण विद्यार्थ्यांसाठी नसलेले आंदोलन होते. यात ज्यांनी ज्यांनी संसद भवन उखडून टाकण्याची भाषा केली, दगडफेक केली, अर्वाच्च शिव्या घातल्या, स्वत:ला पोलिसांनी मारबडव केली याचे भांडवल केले, अपशब्दांना ट्रोल केल्याचे भांडवल केले, माफी मागायला लावली त्याचेही रडत आणि हसत भांडवल केले ते ‘जेन झी’ भारताचे भविष्य नाहीत. हे पाच विद्यार्थी व ते सर्व विद्यार्थी जे गेली सत्तावीस वर्षे जिंकले आहेत, ते युवा, ते जेनझी भारताचे भविष्य आहेत.
स्वत:चाच वापर करायला देऊन आपल्या आयुष्याचे पायपुसणे करू द्यायचे की स्वत:च्याच पायांनी जग जिंकायचे हे आता जेनझी, युवावर्गानेच ठरवायचे आहे!
अभिनंदन कनिष्क, ऋद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे खरेच मनापासून अभिनंदन!
मुलांच्या आणि भारताच्या या विजयाची ही माहिती देणार्या आमशेकर सरांचे मनापासून धन्यवाद!




