गौतम खट्टर याने जे वक्तव्य केले त्यावरून वादंग माजलेले आहे. असे जेव्हा होते तेव्हा एक चुकीची गोष्ट सोबत आपोआप घडत जाते. ती म्हणजे; हिंदुत्ववादी आहात तर खट्टरचे समर्थन करा आणि नसाल किंवा ख्रिश्चन असाल तर त्याचा विरोध करा, ही विभागणी होते. खट्टर जे काही बोलला त्यातील किती बरोबर, किती चूक याचे विश्लेषण करायच्या भानगडीत कुणीच पडत नाही. त्यामुळे, निर्माण होते ती फक्त आणि फक्त झुंडशाही.
आक्रमकता आणि विचार मांडणे यात एक सूक्ष्म रेषा असते. ती ओलांडली की वक्ता अभद्रतेच्या दिशेने वाहवत जातो. ते मुळीच समर्थनीय असत नाही. अनेकदा जो मूळ मुद्दा (खरोखच वैध आणि सत्य) असतो त्याचीच हानी होते. भावनेला न दुखावताही सत्य मांडता येते. ते सत्य इतके प्रखर व नाकारता न येण्यासारखे असते, तिथे भावनांचे काहीही अस्तित्व उरत नाही. उलट, भावना असण्यावरच शंका उपस्थित होते.
प्रान्सिस झेविअर ‘गोंयचो सायब’ किंवा संत नाही, हे सांगण्यासाठी त्याच्या पार्थिवाच्या अवशेषांची अवहलेना करण्याची काहीच गरज नव्हती. याची जाणीव झाल्यानंतर आयोजकांपैकी किंवा आमदार, मंत्री यांपैकी कुणी तरी चिठ्ठी पाठवून भाषण थांबवायला सांगितले. त्याचा उल्लेख खट्टरने केला, तेव्हा प्रेक्षकांतून बोलत राहण्याचा एक आवाज आला, तो अत्यंत चुकीचा होता. यासाठी खट्टर व तो आवाज देणार्—या दोघांचीही कठोर शब्दांत निंदाच योग्य आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. त्यासाठी जी शिक्षा खट्टरला मिळायला हवी, ती बिनदिक्कत दिलीच पाहिजे. कुठल्याच हिंदूने याबाबतीत खट्टरचे समर्थन करू नये.
फ्रान्सिस झेविअरच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हिंदूंनी जाणे सर्वथैव चुकीचे आहे. हा मुद्दा जो खट्टरने मांडला तो योग्यच आहे. फ्रान्सिस झेविअर ना संत आहे, ना ‘गोंयचो सायब’ आहे. फ्रान्सिस झेवियरने १६ मे १५४५ रोजी पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याला पत्र लिहून गोव्यासाठी ‘इन्क्विझिशन’ची मागणी केली व त्याचाच परिपाक म्हणून ते पुढील पाच वर्षांत लादलेही गेले.
‘मुलांना त्यांच्या पालकांसमोर फटके मारले जात आणि हळूहळू त्यांचे अवयव कापले जात; पालकांनी हे सर्व पाहावे याची खात्री करण्यासाठी त्यांच्या पापण्या कापून टाकल्या जात. शरीराचे हात-पाय अत्यंत काळजीपूर्वक कापले जात, जेणेकरून एखादी व्यक्ती केवळ धड आणि डोके शिल्लक असतानाही शुद्धीवर राहावी. पत्नींसमोर पुरुषांची जननेंद्रिये काढून जाळली जात, महिलांचे स्तन कापले जात आणि पतींना पाहायला लावून तलवारींनी त्यांच्या गुप्तांगावर वार केले जात... आणि हे सर्व दोनशे वर्षे चालले’.
(संदर्भ : पॉल विल्यम्स रॉबर्ट्स, द एम्पायर ऑफ द सोल: सम जर्नीज इन इंडिया, न्यूयॉर्क, १९९७.)
ख्रिश्चन करण्यासाठी व ख्रिस्ती झाल्यानंतर ख्रिश्चन राहण्यासाठी जो अमानुष, नृशंस नरसंहार झाला त्याची जबाबदारी आजही चर्च घेत नाही. झाडून सगळे विचारवंत त्याचे बिल पोर्तुगीज सत्तेवर फाडतात. शांततेतून आणि सेवेतून ‘शुभवर्तमाना’चा, ख्रिश्चनिटीचा प्रसार झाला, हे सांगायला चर्च मोकळी राहते. केवळ गोव्यातच नव्हे तर जगभरात तसे अजिबात घडले नाही. ख्रिश्चनिटी पसरली ती क्रौर्याच्या जोरावर.
राजा उन्नी केरळ वर्मा यांनी झेविअर यांना ’वलिया पाद्रे’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. राजाने दिलेल्या देणगीतून (सुमारे २००० पणाम - तत्कालीन चलन) झेविअरने कोल्लम आणि त्रावणकोरच्या किनारपट्टीवर सुमारे ४०-४५ चर्च बांधली. यात कोम्बुथुराई येथील सेंट स्टीफन्स चर्चचाही समावेश होता. हिंदू राजांकडून मदत आणि संरक्षण मिळाल्यानंतर, झेव्हिअरने जोरात ख्रिस्तीकरण आरंभले. ते करताना त्याला काय वाटत होते याचे वर्णन तो स्वत: १५ जानेवारी १५४५ रोजी रोममधील आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात करतो.
‘बाप्तिस्म्यानंतर, नवीन ख्रिस्ती लोक आपापल्या घरी परततात आणि नंतर त्यांच्या पत्नी व कुटुंबासह परत येतात जेणेकरून त्यांनाही बाप्तिस्म्यासाठी तयार करता येईल. सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, मी असा आदेश देतो की सर्वत्र खोट्या देवांची मंदिरे पाडून टाकावीत आणि मूर्ती फोडून टाकाव्यात. जे लोक पूर्वी या मूर्तींची पूजा करत असत, त्यांच्याच हस्ते त्या पाडल्या जाण्याचे आणि नष्ट करण्याचे दृश्य पाहून मला जो आनंद होतो, त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही’.
मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्याबाबत, त्याने १५४३मध्ये रोममधील ’सोसायटी ऑफ जीझस’ला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो;
‘मला पूर्ण विश्वास आहे की, देवाच्या कृपेने ही मुले त्यांच्या वडिलांपेक्षा खूप सरस ठरतील. ती मुले ईश्वरी कायद्याबद्दल तीव्र प्रेम आणि आपला पवित्र धर्म शिकण्यासाठी व इतरांना शिकवण्यासाठी कमालीची उत्सुकता दाखवतात. मूर्तीपूजेबद्दलचा त्यांचा तिरस्कार विस्मयकारक आहे. ते या विषयावरून मूर्तिपूजकांशी वाद घालतात, आणि जेव्हा त्यांचे स्वतःचे आई-वडील मूर्तीपूजा करतात, तेव्हा ती मुले त्यांना दोष देतात आणि लगेच मला येऊन सांगतात. जेव्हा कधी मला मूर्तीपूजेच्या कोणत्याही कृत्याबद्दल समजते, तेव्हा मी या मुलांच्या मोठ्या टोळीसह त्या ठिकाणी जातो. ही मुले सैतानाचा (मूर्तीचा) इतका अपमान आणि विटंबना करतात, जितका सन्मान आणि पूजा अलीकडे त्यांच्या पालकांनी, नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी केली नसेल. ही मुले मूर्तींकडे धावत जातात, त्या उलथवून टाकतात, खाली आदळतात, त्यांचे तुकडे करतात, त्यांच्यावर थुंकतात, त्यांना तुडवतात, लाथा मारतात आणि थोडक्यात सांगायचे तर, शक्य तितका अपमान करतात’.
(संदर्भ : जोसेफ विकी, डॉक्युमेंटा इंडिका, खंड ४, रोम, १९५६.)
एक माणूस म्हणूनही फ्रान्सिस झेविअरची काय योग्यता होती, त्याने स्वत:च लिहिलेल्या पत्रांवरून समजते. संत आणि सायब होणे दूरच राहिले. फ्रान्सिस झेविअरला संत म्हणणतात किंवा त्याच्या पार्थिव दर्शनासाठी ख्रिस्ती येतात, हा त्यांच्या पंथाचा व श्रद्धेचा भाग आहे. पण, हिंदूंनी त्याच्या पार्थिवाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी जाणे चुकीचेच आहे. त्याही पुढे जाऊन तो आपल्याच पूर्वजांचा आपण केलेला घोर अपमान आहे. इतके अन्याय अत्याचार सहन करूनही जे ख्रिस्ती झाले नाहीत, त्यांच्या हिंदू धर्मावरील श्रद्धेचा अपमान आहे.





