सोमवार, २० एप्रिल, २०२६

हिंदू धर्म संपवण्याच्या फॅक्टर्‍या...

ख्रिश्‍चनिटी व इस्लाम यांनी पंथप्रसार करण्याचे मध्ययुगीन धोरण केव्हाच बदलले आहे. आधुनिक काळात त्यासाठी पुरोगामी, सेक्युलर लोकशाहींचा यथेच्छ वापर करून घेतला जातो. त्याच पद्धतीने सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा वापर करून घेतला जात आहे.

‘कॉर्पोरेट जिहाद’ असे शब्दप्रयोग करणे, लेन्स्कार्टच्या कर्मचार्‍यांना जाऊन टिळे लावणे यावर समाधान मानल्यास आपण एका मोठ्या संकटाकडे साफ दुर्लक्ष करत आहोत. केवळ टीसीएस, लेन्सकार्ट अशा नव्हे तर जवळपास हजारो मोठ्या कंपन्या ख्रिस्तीकरण व इस्लामीकरण यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत व त्यातून सुटण्याचा मार्ग सध्या तरी उपलब्ध नाही. एक तर या कंपन्या बंद कराव्या लागतील किंवा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अन्य पर्याय नाही. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसाठी एक संस्थागत यंत्रणा, मानांकने उभी करण्यात आली आहेत, त्यांपैकी एक म्हणजे ईएसजी - एन्व्हिरोन्मेंटल, सोशल, गव्हर्नन्स(पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन) - नामक एक रचना किंवा फ्रेमवर्क. कंपन्यांना वाढीसाठी व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार मिळण्यासाठी काही मान्यता व रेटिंग असणे गरजेचे आहे. गुंतवणुकदार कुठल्याही कंपनीत हे ईएसजी रेटिंग पाहून गुंतवणूक करते व कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होते. यात जो मधला ‘एस’ आहे तो फार घातक आहे. 

या ‘एस’ म्हणजे सोशलमध्ये ‘रेडी इंडेक्स’ हे मानांकन ठरवण्याची जबाबदारी एका संस्थेला देण्यात आली आहे, तिचे नाव आहे  ’रिलिजियस फ्रीडम अँड बिझनेस फाउंडेशन’. ही ब्रायन ग्रिम या माणसाची संस्था आहे जो ‘पॉन्टिफिकल काउन्सिल फॉर सोशल कम्युनिकेशन्स’ या कॅथलिक चर्चच्या म्हणजेच व्हॅटिकनच्या अधिकृत परिषदेचा सल्लागार होता. त्याच्या ’रिलिजियस फ्रीडम अँड बिझनेस फाउंडेशन’ला व्हॅटिकन आणि अनेक कॅथलिक संस्थांचा पाठिंबा आहे.  जेव्हा अशी व्यक्ती जागतिक स्तरावर ’धार्मिक समावेशकता’ ठरवते, तेव्हा ती अब्रह्मिक, ख्रिस्ती पंथाचा प्रसारच करत असते. 

ईएसजीमधील ’एस’ म्हणजेच सामाजिक घटक. कंपन्यांना चांगले रेटिंग मिळवण्यासाठी समाजात ’बदल’ घडवून आणण्याचे उद्दिष्ट दिले जाते. त्यासाठी त्यांना रेडी इंडेक्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यांपैकी एक म्हणजे कंपन्यांमध्ये पांथिक गट तयार करणे. टीसीएसमध्ये जे मुस्लीम गट तयार झाले त्यामागेही हे कारण असण्याची अधिक शक्यता आहे. ’रिलिजिअस फ्रीडम’ या नावाखाली ख्रिश्‍चन आणि मुसलमानांता प्रचार व प्रसार करण्याची छुपी मुभा अधिकृतपणे दिली जाते. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांवर मोठा दबाव आहे. हा दबाव ग्राहकांचा नसून BlackRock किंवा Vanguardसारख्या मोठ्या गुंतवणूक संस्थांचा आहे. या संस्था ESG स्कोअर बघून गुंतवणूक करतात. जर एखाद्या कंपनीने REDI  इंडेक्स किंवा तत्सम ’वोक’ मानके पाळली नाहीत, तर त्यांचा स्कोअर कमी होतो. स्कोअर कमी झाला की गुंतवणूक कमी होते. ही एक प्रकारची बौद्धिक आणि आर्थिक खंडणी आहे, जिथे कंपन्यांना त्यांच्या देशातील स्थानिक संस्कृतीशी तडजोड करून हा अजेंडा राबवावा लागतो. 

टीसीएसने जागतिक स्तरावर ’धार्मिक समावेशकता’ (Religious Inclusion) या विषयावर काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी Faith-based Employee Resource Groups (ERGs)  तयार केले आहेत. लेन्सकार्टने त्यांच्या कामाच्या ठिकाणी ’सर्वसमावेशकता’ वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये लिंग समानता (Gender Equality) आणि एलजीबीटीक्यू+  समुदायासाठीची धोरणे यांचा समावेश आहे. लेन्सकार्टमध्ये Temasek, SoftBank आणि Alpha Wave Global यांसारख्या मोठ्या जागतिक संस्थांची गुंतवणूक आहे. हे गुंतवणूकदार आता कंपन्यांना केवळ नफा नाही, तर त्यांचा ’ईएसजी स्कोअर’ काय आहे, हे विचारतात.

अनेक कंपन्यांना बाहेरच्या देशांमध्ये विक्रीसाठी ‘हलाल सर्टिफिकेट’ मिळवावे लागते. त्याबद्दल आक्षेप नाही. पण, भारतात विक्रीसाठी ते का लागते, असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस सरकारला आजवर झाले नाही. ’फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ (एफएसएआय)सारखी मानके देणारी सरकारी संस्था काय लोणचे घालायला ठेवली आहे? जे सरकार करू शकत नाही, तेच टीसीएस, लेन्स्कार्ट यांसारख्या हजारो बहुराष्ट्रीय कंपन्या करू शकत नाहीत. कारण, सेबीने केलेल्या सक्तीमुळे २०२५-२६पर्यंत भारतातील सर्वोच्च ५०० सूचीबद्ध (Listed) कंपन्यांना ईएसजी अहवाल देणे बंधनकारक आहे. २०२६-२७पर्यंत ही संख्या वाढून १,००० कंपन्यांपर्यंत जाणार आहे. म्हणजेच, शेअर बाजारातील जवळपास सर्व मोठ्या कंपन्या आता या ’ईएसजी’च्या साच्यात अडकल्या आहेत!

कम्युनिस्ट सदस्य अनेकदा शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि सांस्कृतिक क्षेत्रात ’इतिहासतज्ज्ञ’, ‘विचारवंत’, ’चळवळीतले कार्यकर्ते’ म्हणून सक्रिय असतात, तसेच आता कॉर्पोरेट जगात ESG (Environmental, Social, and Governance) आणि DEI (Diversity, Equity, and Inclusion) च्या नावाखाली नवीन प्रकारचे ’तज्ज्ञ’ तयार होत आहेत. हे लोक स्वतःला ’इन्क्लुजन एक्सपर्ट’ किंवा ’एथिक्स कन्सल्टंट’ म्हणतात. साम्यवादी लोक ’लोकशाही’, ’समानता’ आणि ’क्रांती’ या शब्दांचा वापर करतात, तसेच ईएसजीमध्ये ’विविधता’ (Diversity) आणि ’धार्मिक समानता’ (Religious Equity) या ‘गोंडस’ शब्दांचा वापर करून कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांवर नियंत्रण मिळवले जाते. जशी डाव्या विचारांची एक 'इकोसिस्टम' असते (जिथे एक विचारवंत दुसऱ्याच्या पुस्तकाची स्तुती करतो आणि त्याला पुरस्कार मिळवून देतो), तशीच एक जागतिक इकोसिस्टम या निर्देशांकांच्या (उदा. REDI Index) मागे काम करत आहे. हे लोक एकमेकांना रेटिंग देतात. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना (MNCs) या रेटिंगवर अवलंबून राहावे लागते, कारण त्यांचे गुंतवणूकदार  हे रेटिंग बघूनच पैसे लावतात.

ख्रिश्‍चनिटी व इस्लाम यांनी पंथप्रसार करण्याचे मध्ययुगीन धोरण केव्हाच बदलले आहे. आधुनिक काळात त्यासाठी पुरोगामी, सेक्युलर लोकशाहींचा यथेच्छ वापर करून घेतला जातो. त्याच पद्धतीने सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा वापर करून घेतला जात आहे. 

यावर अत्यंत कठोर उपाय कंपन्यांनाच करावा लागेल. एक तर ईएसजी व रेडीच्या मानांकनाचे नियम भारतात लागू होणार नाहीत, हे स्पष्टपणे सांगावे लागेल. सेबीला एसजी अनिवार्य करताना रेडीचे नियम काढून टाकावे लागतील. सरकार व कंपन्यांनाच त्याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. लोकांनाही केवळ टिळे लावणे व इस्लामीकरण, ख्रिस्तीकरणाच्या तक्रारी करून पुरेसे होणार नाही. मते मागायला येतील तेव्हा आधी हे करा मग मत देतो, असे सांगावे लागेल. अन्यथा ख्रिस्तीकरणाच्या व इस्लामीकरणाच्या या फॅक्टर्‍या हिंदू धर्म संपवल्याशिवाय काही थांबणार नाहीत. 


बुधवार, १५ एप्रिल, २०२६

रोमी कोकणी ही वेगळी भाषा आहे का?

कोकणी ही भाषा एकच असली, तरी तिच्या पाच लिपी आहेत व त्यातली एक रोमी किंवा रोमन आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे. पण, ख्रिश्चन तसे मानतात का? या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लक्षांत येईल.   ईशान्य भारतात जेव्हा ख्रिस्तीकरण झाले तेव्हा सक्तीने या भाषांसाठी रोमन लिपी लागू करण्यात आली. त्या भाषांचा मूळ सांस्कृतिक पोत बदलला. अनेक शब्द बदलले. नवीन शब्द रूढ झाले. रोमन ही केवळ लिपी न राहता रोमी कोकणीसारखीच तिथेही रोमी कोकबोरोक ही भाषा म्हणून विकसित झाली. भाषेचा मूळ 'सांस्कृतिक गाभा' बदलला. एकदा गाभा बदलला की सांस्कृतिक, पांथिक, सामाजिक, भौगोलिक सगळ्या अस्मिताही आपोआप चिकटतात. प्रत्येक भाषिक वेगळेपण,  "वेगळे व्हायचेय मला" हा उद्घोष करू लागते.

कोकणी ही भाषा एकच असली, तरी तिच्या पाच लिपी आहेत व त्यातली एक रोमी किंवा रोमन आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे. पण, ख्रिश्चन तसे मानतात का? या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच आहे. https://www.facebook.com/reel/1276236410688728 येथे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लक्षांत येईल. 

ईशान्य भारतातील, विशेषतः मणिपूर, नागालँड, मिझोराम येथे स्थानिक भाषांच्या बाबतीत चर्च आणि मिशनरि यांनी काही स्थानिक भाषांसाठी रोमन लिपी सुरू केली. आसामी भाषेसाठी ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या 'कामरूपी' शैलीतून उगम पावलेली स्वतःची स्वतंत्र 'आसामी लिपी' होती. प्राचीन ताइ घराण्याच्या अहोम भाषेला 'अहोम लिपी'  होती. लेपचा भाषेची 'लेपचा लिपी' होती. चकमा लोकांच्या भाषेसाठी 'चकमा लिपी' होती. मोनपा, खंबा आणि सिक्कीममधील सिक्कीमी भाषेसाठी तिबेटी लिपी होती. ताइ खामती भाषेसाठी लिकताइ लिपी होती. 'लिंबू' भाषेसाठी 'किरात सिरीजंगा' ही लिपी होती. याशिवाय  मिझो, नागा, खासी या बोली भाषा होत्या, ज्यांना लिपी नव्हती. 

ईशान्य भारतात जेव्हा ख्रिस्तीकरण झाले तेव्हा सक्तीने या भाषांसाठी रोमन लिपी लागू करण्यात आली. त्या भाषांचा मूळ सांस्कृतिक पोत बदलला. अनेक शब्द बदलले. नवीन शब्द रूढ झाले. रोमन ही केवळ लिपी न राहता रोमी कोकणीसारखीच तिथेही रोमी कोकबोरोक ही भाषा म्हणून विकसित झाली. ख्रिस्तीकरणामुळे या भाषांमध्ये पांथिक विधी, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूळ शब्द बदलून त्या जागी इंग्रजी किंवा लॅटिन शब्दांचे प्राकृत रूप रूढ झाले. यामुळे भाषेचा मूळ 'सांस्कृतिक गाभा' बदलला. एकदा गाभा बदलला की सांस्कृतिक, पांथिक, सामाजिक, भौगोलिक सगळ्या अस्मिताही आपोआप चिकटतात. प्रत्येक भाषिक वेगळेपण,  "वेगळे व्हायचेय मला" हा उद्घोष करू लागते.  

हाच मुद्दा धरून मी अनेक कोकणी लेखकांना, रोमी कोकणी वेगळी भाषा आहे का, असे विचारले होते. बहुतेक सर्वांचे म्हणणे होते, की भाषा एकच आहे. फक्त लिपी वेगळी आहे. त्यात "गुलाब" या रोमन लिपीतून निघणार्‍या कोकणी मासिकाचे संपादक फाऊश्त दि कॉश्ता यांनीही तेच सांगितले. कोकणी अकादमीने दोन्ही रोमन व देवनागरीसाठी वेगवेगळे नियम मानक करून दिले आहेत. त्यावर एक प्रश्न उपस्थित झाला की मग "रोमी कोकणी" अशी शब्दयोजना का केली जाते? आणि भाषा एकच असेल तर लिपीनुसार वेगळी मानके का? ("सगल्यांक देवाची दया आनी मोग कळचो"  हे "sagalyaank devachi daya ani moga kalacho" असेच त्याचे लिप्यंतर होईल. तेही होताना उच्चारास जवळ जाणारे होतील. भाषेचे नियम बदलणार नाहीत. )

ज्या भाषा अनेक लिपीत लिहिल्या जातात त्यांची ओळखही लिपीवरून करून दिली जात नाही. त्यामुळे, रोमी कोकणी असे संबोधन खटकते. आता प्रत्येक ठिकाणची कोकणी वगळी असे खूळ आले तर विचारायलाच नको. कर्नाटकी, मंगळूरी, कुंदापुरी, कारवारी, हल्याळी, भटकळी अशा वेगवेगळ्या कोकणी भाषा झाल्या तर अनवस्था ओढवेल. त्यातही कॅथलिक आणि हिंदू यांचे वेगळेपण हा आणखी एक घोळ व्हायचा. 

कुठेही गेले तरी कोकणी एकच व तिची लिपीही एकच हे योग्य सूत्र आहे. कोकणीतील 'ळ', 'ण', 'ठ'  ही अक्षरे देवनागरीत जशीच्या तशी वाचून उच्चारली जातात, तिथे रोमन लिपीसारखा संभ्रम होत नाही. मराठी व कोकणीसाठी  देवनागरी हीच नैसर्गिक व योग्य लिपी आहे; रोमन नाही. 

भाषा किंवा लिपी हे केवळ माध्यम आहे, असे मानणे चुकीचे.  भाषा हे संवादाचे माध्यम नाही. भाषा, लिपी म्हणजे संस्कृतीची नाळ. विचार करण्याची पद्धत किंवा विचारप्रवाह.  तो बदलला, की सगळेच बदलते.

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

वारकरी आणि ‘पवार’करी

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!
विठ्ठलाची वारी करणार्‍यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी. ‘वैष्णव’, ‘माळकरी’ अशी नावे असलेला हा संप्रदाय भागवत धर्माखाली येतो. विठ्ठल या लोकदैवताचे विष्णू हे वैदिकीकरण असल्याचे रा. चि. ढेरे, दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले तरी ते तसे नाही. कारण, त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवादाने पेरलेल्या वर्ग विभागणीत व वर्गसंघर्षात आहे. ते वेगळेपण मानल्यामुळे त्यांना समन्वयाचा सिद्धांत मांडावा लागतो. एकाच रूपाचे भिन्न ठिकाणी वेगवेगळे रूप असे ते मानायला तयार नाहीत कारण त्यांची वैचारिक बैठकच तशी नाही. 

एकात्म तत्त्व, देवता विचार हा वेदांपासून ते आजपर्यंत एकसंध, अखंड व सातत्याने प्रवाही विचार आहे. तेहतीस प्रकारच्या निसर्गदेवतांमध्ये देवचार, क्षेत्रपाल, प्राणी, झाडे, पक्षी, वारूळ, मूर्ती सगळे येते. त्यात विठ्ठलही येतो आणि गोव्यातली सांतेरही येते. विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ आहे असा विचार जेव्हा हे विचारवंत मांडतात तेव्हा त्यांना विठ्ठलाशी काही देणेघेणे नसते, त्याचा संबंध बहुजनांशी जोडून इतरांना वेगळे किंवा आक्रमक ठरवण्याचा असतो. सांतेर असलेली शांतादुर्गा झाली हे लोकदैवतेचे, निसर्गदेवतेचे ‘ब्राह्मणीकरण’ आहे, असा विचार मांडतात. पण, खांडोळ्याच्या सांतेरीचे (वारुळाचे) मूर्तीरूप कुणी केले, याचे उत्तर मात्र देणे टाळतात. ते ब्राह्मणांनी केले नाही तर तिला भजणार्‍या मूळ स्थानिकांनीच केले, हे ते सांगत नाहीत. एकाच शक्तीरूपाचे विविध प्रकारे झालेले प्रकटीकरण हे मान्य करावे लागते. तसे केले तर पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी वर्गसंघर्ष मांडता येत नाही. 

शरद पवारांनी हल्लीच केलेले वक्तव्य हा त्याचाच पुढील भाग आहे. ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोाकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे’, असे जे शरद पवार म्हणत आहेत, त्या वारकरी संप्रदायाला पुरोगाम्यांशी काही देणेघेणे नाही. वारकरी संप्रदाय हा पूर्णतः आस्तिक्यभावावर आणि विठ्ठलभक्तीवर आधारलेला आहे. वारीत चालणारा वारकरी सामाजिक बदलासाठी नाही, तर ’विठ्ठल भेटी’साठी चालतो.

वारकरी संप्रदाय भक्तिमार्गी धार्मिकांचा व प्रतिगामींचाच आहे. त्यात पुरोगामी घुसले आहेत. सोबत समाजवादी, निधर्मी, साम्यवादी, हे लोकही घुसले आहेत. हे लोक समतेच्या, समानतेच्या, सामाजिक सुधारणेच्या गप्पा हाणतात. अभंगांचे तोडून मोडून अर्थ सांगतात. गेल्यावर्षी ते ‘अल्ला देवे, अल्ला पिलावे’ प्रकरणही असेच पुरोगामी घुसल्याचे ज्वलंत उदाहरण होते. अनेक साम्यवादी कीर्तनकार, प्रवचनकार (त्यांच्या प्रोफाइलवरही तसेच लिहिले होते) समतेच्या, समानतेच्या गप्पा हाणत होते. 

वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश हा ’विठ्ठल भेटी’ची आस आणि ’मोक्ष’ किंवा ’सायुज्यकता’ प्राप्त करणे हाच आहे. नामस्मरण, कीर्तन आणि वारी ही साधने चित्तशुद्धीसाठी आहेत. ती पुरोगामित्व, सामाजिक समतेचा राजकीय जाहीरनामा मांडण्यासाठी नाहीत. एखाद्या संस्थेत, संप्रदायात घुसून ताबा मिळवणे व नष्ट करणे हे सांस्कृतिक मार्क्सवादाचे लिखित ध्येय आहे. त्याचे राजकीय फायदे ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुरोगामी, ‘पवार’करी वार्‍या करू लागले. प्रारंभी ‘ग्यानबा तुकाराम’ याला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला होता. संतांची जातवार विभागणी या लोकांनीच केली. त्यामुळे भजन, कीर्तनात ज्ञानदेव, एकनाथ नकोसे होऊ लागले. पण, त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मग, तुकारामाच्या खुनाचे तर्कट लढवण्यात आले. ‘सदेह स्वर्गा’त जाणे तर्काला पटत नसल्याने त्यांचा खूनच झाला, असा तर्कट मांडण्यात आले. श्रद्धेच्या प्रत्येक मुळावर घाव घालताना, त्याची जातवार मांडणी करताना तोंडी समतेच्या व समानतेच्या गोष्टी कायम ठेवल्या.

मुळात वैयक्तिक सुधारणेवर भर असलेला वारकरी संप्रदाय व संत हे धार्मिकच आहेत. त्या अर्थाने ते प्रतिगामीही आहेत. त्यांना समतेच्या चळवळीचे पाईक करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. ते वारकरी संप्रदायाच्या मूळ गाभ्याशी जुळेनासे झाले तशी ‘भक्ती चळवळ’ नावाची नवी वळवळ विचारवंतांनी  सुरू केली. मग, प्राचीन काळापासून असलेली व वारकरी संप्रदायाचा मूलाधार असलेली भक्तिसूत्रे जी अनेक ऋषीमुनींनी लिहिली त्याचे काय? याचे उत्तर कुणीही देत नाही. 

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!


ब्राह्मणांचे १०० टक्के आरक्षण व तत्कालीन शिक्षण व्यवस्था

ब्राह्मणांनी इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणायला त्यांच्याकडे शिक्षण होते कुठले, याचा कुणीच विचार करत नाही. पौरोहित्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ इतर शिक्षण नव्हते.

इतर सर्व जातीच्या लोकांना व खास करून दलितां(?)ना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप ब्राह्मणांवर कायम केला जातो. सगळे विचारवंत डोळे झाकून मान्य करतत. ब्राह्मण तर स्वत:स अपराधी मानू लागले आहेत. "केले असेल पूर्वजांनी; आम्ही तर जातपात मानत नाही ना?" असा बचावात्मक पवित्रा ब्राह्मण जातीचे लोक घेतात. आरक्षणाची गोष्ट येते तेव्हा गेली हजारो वर्षे शिक्षण क्षेत्रावर ब्राह्मणांना १०० टक्के आरक्षण होते, हा खोटारडेपणा अपराधी भावनेने स्वीकारतात व गप्प बसतात. स्वत:ची जात मागास ठरवण्यासाठी आंदोलने करणार्‍यांनाही ब्राह्मणांनी शिक्षणापासून वंचित ठेवले हे खरे वाटते. 

शिक्षण म्हणजे काय इथपासूनच बहुधा सुरुवात करावी लागेल. आज ज्याला आपण शिक्षण म्हणतोय तशी क्रमिक, शालेय शिक्षणपद्धती ब्रिटिश येण्याआधी नव्हती. अधीच्या पद्धतीत स्त्री आणि पुरुष दोघांनाही व्यावसायिक शिक्षण घरातच मिळत असे. परंपरेने, पिढी दर पिढी हे शिक्षण व कौशल्य सांभाळले जात असे व वाढत असे.

जात म्हणजे व्यावसायिक ओळख!

एका जातीतले लोक आपले शिक्षण दुसर्‍या जातीस देत नसत. लोहाराला, सुतारकामातले आणि सुताराला कुंभाराच्या कामातले बारकावे, कौशल्य माहीत असत नव्हते.  म्हणजे एका जातीतले लोक इतरांना वंचित ठेवत होते, असे म्हणायचे का? व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्त अन्य काही शिकायची इच्छा असल्यास गुरुकुलात जात असत. ब्राह्मण जातीतले लोकही घरीच शिकायचे किंवा पौरोहित्यातले (जे नेहमी वापरात नसे) ते शिकायला पाठशाळेत जायचे. गोव्यातले अनेक ब्राह्मण पूर्वी नाशिक, काशी येथे जाऊन चक्क माधुकरी मागून शिकले आहेत.  ब्राह्मणांनी इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणायला त्यांच्याकडे शिक्षण होते कुठले, याचा कुणीच विचार करत नाही. पौरोहित्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ इतर शिक्षण नव्हते. तेच कशाला पौरोहित्यातही जे प्रयोग, विधी केले जायचे तेवढेच माहीत असत. म्हणूनच शिवरायांच्या आधी ३०० वर्षे कुणाचा राज्याभिषेक झालेलाच नसल्याने त्याचा विधी महाराष्ट्रातील ब्राह्मणांना माहीतच नव्हता.  

ब्रिटिशांनी शिक्षणाचे संस्थागत रूप आणले. रुग्णावर इलाज करायचा असेल तर डॉक्टरी शिका; इथपर्यंत ते ठीक होते. पण, डॉक्टरी नाही शिकला तर त्याला इलाजच करता येणार नाही किंवा तो भोंदू हे त्यांनी रुजवले. झाडपाल्याची औषधे करणारे गावोगावी होते ते वैदू ठरले. त्यांच्या उपचार पद्धती रानटी, अवैज्ञानिक, अशास्त्रीय ठरवल्या गेल्या.  टिपू सुलतानाच्या काळात कापलेल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी करणारा रस्त्याच्या कडेला बसणारा कुंभार होता. त्याला कुठल्या ब्राह्मणाने ते शिकवले? आज एखादा कुंभार प्लास्टिक सर्जरी करू शकेल? त्याच्याकडे असलेली पारंपरिक विद्या व कौशल्यच ब्रिटिशांनी नष्ट केले. तेच प्रत्येक व्यवसायाबाबत केले.

प्रत्येक जात इतरांस पूरक व परस्परावलंबी होती. पैशांची देवाणघेवाण नसे. वस्तूंची असे. ब्राह्मणाची शेतीवाडी असली तरी त्याला शेतसारा द्यावा लागे, जो सगळ्यांना वाटून जात असे. गोव्यात तर गावकारी पद्धत होती.  ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती लादून केवळ छोटे व्यवसायच संपवले असे नव्हे तर ग्रामीण भागांची आत्मनिर्भरताच संपवली. त्यांना साहेब करतील, या मनोवृत्तीत ढकलले. जे गोर्‍यांनी केले तेच काळ्या साहेबांनी पुढे चालू ठेवले. पूर्णपणे आत्मनिर्भर असणारी गावे राज्यकर्त्यांवर संपूर्णपणे अवलंबून असण्याचे कारणही तेच आहे. 

आजच्या शिक्षणव्यवस्थेची फूटपट्टी घेऊन भारतीय शिक्षण पद्धतीची मोजपापे काढणार्‍यांना आजकाल दिव्य कीर्ती मिळते, हेच दुर्दैव आहे! 

त्याहीपुढे जाऊन अजून न संपलेले वसाहतवादी बौद्धिक पारतंत्र्य हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे!


शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

हिंदू संस्कृती संपवली तरी आपणच संपवू!

कपडे कसे घालावे, दररोज देवाचे एखादे स्त्रोत्र म्हणावे, संकष्टीला वा एकादशीला वा महाशिवरात्रीला उपवास ठेवावा, असे आईवडील लहानपणापासून सांगतात तेव्हा मुलामुलींना ते नकोसे व मागासलेले वाटते. हजारो वैज्ञानिक कारणे हवी असतात. पण, मुस्लीम प्रियकराने सांगितल्यावर एका महिन्याच्या आत स्कीन टाइट कपडे नकोसे होतात, पेहराव बदलतो, पंजाबीपासून भर उन्हाळ्यातही फक्त डोळे दिसतील असा काळा पेहराव ‘स्वत:चा चॉइस’ वाटू लागतो, चक्क महिनाभर उपवासही चालतो. तेही कुठलेच वैज्ञानिक कारण न देता. 

स्वत:च्या संस्कृतीला हीन समजणारे सेक्युलर, पुरोगामी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले हिंदू हे आगामी मुसलमान किंवा ख्रिश्‍चन असतात; मग, ते गरीब असोत किंवा श्रीमंत, अशिक्षित असोत किंवा उच्चशिक्षित. 

कुणी कट्टर, मनुवादी वगैरे म्हटले तरी चालेल, मुलामुलींना देवाला पाया पडायला लावा. एक तरी स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हणायला लावा. कपाळी कुंकू किंवा टिळा लावण्यास भाग पाडा. आठवड्यातून एकदा तरी किमान जवळच्या देवळात घेऊन जा (भले भटाला दक्षिणा देऊ नका व देवळाच्या फंडपेटीत काहीही टाकू नका, पावती फाडू नका.) अगदी लहानपणापासून यातली एखादी तरी गोष्ट जाणीवपूर्वक व सातत्याने करा. तर्काने पटवण्याच्या, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याच्या भानगडीत पडू नका. मुसलमानास त्याचे वैज्ञानिक असणे त्याच्या श्रद्धेच्या आड येत नाही. सरळ, ‘तू हिंदू आहेस म्हणून तू हे केलेच पाहिजेस!’ असे आग्रहाने व स्पष्टपणे सांगा. 

असे करणे गरजेचे आहे. कारण, हिंदू धर्म हा मुळातच विस्तारवादी नाही. स्वत:ची संख्या वाढवावी यासाठी तो क्रौर्यापासून ते कल्चरल मार्क्सिझमपर्यंत आणि राज्यघटनेच्या मूलभूत हक्कापासून ते कायद्यापर्यंत सर्व गोष्टींचा  अजिबात वापर करत नाही. इतरांनी हिंदू व्हावे यासाठी प्रयत्न न करणार्‍यांना, आता स्वत: हिंदू उरावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आपल्या धर्मात काय चांगले आहे, तो कसा निसर्गपूजक आहे, हे मुलांना लहानपणापासून सातत्याने सांगावे लागेल. 

अन्यथा, जे मुसलमानांना व ख्रिश्‍चनांना गेली हजारो वर्षे जमले नाही, ते आम्ही हिंदू स्वत: येत्या पन्नास साठ वर्षांत इस्लाम किंवा ख्रिश्‍चनिटी स्वीकारून सगळा पुरोगामीपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे गुंडाळून करू. ‘हिंदू खतरे मे’ वगैरे अजिबात नाही. अन्य देशातील हजारो वर्षांची परंपरा असलेल्या प्राचीन संस्कृती ख्रिश्‍चनिटी व इस्लामने पंधरा वीस वर्षांत संपवल्या. इतकी हजारो वर्षे झाली तरी हिंदू संस्कृती नष्ट करता आली नाही. ती त्यांना संपवता आली नाही, येणारही नाही. संपवली तरी आपणच संपवू!

गुरुवार, ९ एप्रिल, २०२६

तेच झाले जे कुणालाच झालेले नको होते....


फोंड्याची पोटनिवडणूक न होणे, हा अनेक दृष्टींनी विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यात जसा कायदेशीर भाग आहे, तसाच फायदेशीर भागही खूपच महत्त्वाचा आहे. काहीही असले तरी तेच झाले जे कुणालाच झालेले नको होते....

पोटनिवडणूक घ्यावी लागेल अशी वार्ता रवि नाईक यांच्या दु:खद निधनाने समोर आली. तेव्हाच उमेदवारी कुणाला द्यायची, कुणाला नाही, कालमर्यादा, लागणारा वेळ व येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर होणारा अपेक्षित परिणाम, याची सर्व बाजूंनी चर्चा झाली असणे स्वाभाविक आहे. पण सखोल, सांगोपांग रचनेसह चर्चेचे ‘बौद्धिक’ बाळकडू जसे भाजपला मिळाले आहे, त्याची तशी वानवा कॉंग्रेससह अन्य पक्षांकडे प्रचंड आहे. व्यक्तीसामर्थ्य, निवडून येण्याची क्षमता या दोनच प्रमुख निकषांवर बाकीचे नियोजन केले जाते किंवा तेवढेच लक्षात घेऊन नियोजनच केले जात नाही.

निवडणून आलेल्यास लाभणारा कार्यकाळ जर दीड वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असता, तर या पोटनिवडणुकीचा विचार केवळ ‘उदरभरण’ असा राहिला नसता. दीर्घकालीन परिणामांचा विचार यात जास्त झाला असता. उपलब्ध पर्याय निवडणे, नवीन पर्याय देणे याचा त्या दृष्टिकोनातून खल होणे स्वाभाविक होते. आता उमेदवारी दिली व जिंकून आणले तर त्यालाच पुन्हा उमेदवारी देणे क्रमप्राप्त होते. ते लांबणीवर टाकणे अत्यावश्यक होते. तो पर्याय रवि नाईकांइतका सक्षम अजिबात नाही, याची जाणीव ‘उत्पल’ झाली होती. त्यामुळे, नवीन तयार करण्यास वेळ हवा होता. रविही कॉंग्रेसमधून आयात असल्यामुळे एरव्ही केडरमधून तयार होणारी दुसरी फळी तयारच झाली नाही. त्यामुळे निवडणूक नको होती. कॉंग्रेस व अन्य विरोधी ‘आंधळी कोशिंबिर’ ढवळण्याचे काम सुरू असल्याने तिथेही पोटभर सकस काही तयार झालेच नसते. त्यामुळे त्यांनाही निवडणूक ‘नकुशी’ होती.

‘नको असते’ तेव्हाच ते ‘हवे आहे’ किंवा ‘त्याशिवाय तरणोपाय नाही’, असे म्हणत त्यासाठी वांझोटा खेळ करणे यालाच तर राजकारण म्हणतात. जे नको ते ‘नाहीसे’ करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे न्यायालय. ‘आम्हाला निवडणूक हवीच होती, आता न्यायालयानेच मोडता घातला त्याला आम्ही तरी काय करणार?' असे म्हणायला प्रत्येक राजकीय पक्ष मोकळा. खापर फोडलेच तर निवडणूक आयोगावर फोडले जाईल. निवडणूक आयोगाने घेतलेला वेळ, वेळकाढूपणा होता असे म्हणण्यास तेवढासा प्रशासकीय वाव नव्हता. पण, निवडणुकीविरुद्ध याचिका दाखल करण्यास लागलेला वेळ व शुक्रवारचा निकाल (बहुधा तयार असलेला व फक्त जाहीर करणे बाकी असलेला - अद्याप स्पष्टता नाही) शनिवार, सोमवार व मंगळवार इतके वार ओलांडून नेमका निवडणुकीच्या आदल्या दिवशी येणे याला काय म्हणावे? कालबद्ध रचना, की विलक्षण योगायोग, हा अभ्यासाचा विषय आहे. निवडणूक आयोगाने वेळ घेतल्याने अधिवेशनाचा कालावधी आटोपता घेतला, की तो घेता यावा म्हणून वेळ काढला, हाही तसाच अभ्यासाचा विषय आहे.

यातून जास्त चर्चा न झालेला मुद्दा म्हणजे पेन्शन किंवा निवृत्तीवेतनाचा! एक वर्षाचा किमान कालावधी लाभलेल्या आमदारास जन्मभराचे निवृत्तीवेत देणे योग्य आहे का? नोकरीस लागून एक वर्षच झालेल्यास कुठल्या नोकरीत आयुष्यभरासाठी पेन्शन मिळते? त्यासाठी किमान पाच वर्षे आमदार असणे अनिवार्य करायला हवे. अगदी आतबट्ट्याचा विचार केल्यासही पोटनिवडणुकीवर आजपावेतो झालेला खर्च व द्यावे लागणारे संभाव्य निवृत्तीवेतन यांची वजाबाकी होणेही गरजेचे आहे. त्याचेही उत्तर कधीतरी मिळेलच.

ते काहीही असले तरी या सगळ्यात फोंडावासीयांची काय चूक, या प्रश्‍नाचे उत्तर काही केल्या मिळणार नाही. कुणाचेच पोट भरू न शकणारी फोंड्याची पोटनिवडणूक बहुधा कुणालाच झालेली नको होती. पण, या ‘नकोशी’ने फोंडा या मतदारसंघाला प्रतिनिधित्वाशिवाय राहावे लागेल, त्याचे काय? या सगळ्यात एक गोष्ट पुन्हा एकवार सिद्ध झाली; लोकशाहीत सर्वांत दुर्लक्ष करण्यासारखा घटक म्हणजे लोक!

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

राजकीय आरक्षण : थोडा वेगळा विचार..

आरक्षणचा संबंध गुणवत्ता कमी आखण्याशी जोडून जशी त्यामागच्या मूळ हेतूचीच वाट लावली गेली, तेच राजकीय आरक्षणाचे करण्यात आले आहे. राजकीय आरक्षणातून त्या समाजातील नेतृत्व उभे राहावे, असा जो त्यामागचा उद्देश होता, तो केवळ ‘जागा भरणे’ एवढा मर्यादित झाला. त्यातून सामाजिक विकास दूर राहिला व मधू कोडासारखी वृत्ती जन्मास आली. जरी हे उदाहरण अपवाद म्हणून धरले तरी इतक्या वर्षांत राजकीय आरक्षण मिळूनही समाज विकसित न होण्यामागचे तेच कारण आहे. समाजाचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी राजकारणात टिकून राहणे अपरिहार्य बनले. जोवर मतदारसंघ हा निकष राहील तोवर हे असेच सुरू राहील. राजकीय आरक्षण मिळाले तरी समाजाचा विकास, विचार करणारे नेतृत्व उभे राहणार नाही.
राजकीय आरक्षणामुळे समाजाचे भले होते की नाही, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी सध्या ते ज्या पद्धतीने दिले जाते त्यावर विचार होणे जास्त गरजेचे आहे. ही पद्धत बदलल्यास खूप फरक पडेल असे वाटते, म्हणून हा लेखप्रपंच. 

भारतीय राज्यघटनेचे कलम ३३० (लोकसभा) आणि कलम ३३२ (विधानसभा) मध्ये स्पष्टपणे असे म्हटले आहे की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षित (सीट्स शाल बी रिझर्व्हड्) केल्या जातील. यात ’मतदारसंघ’ हा शब्द वापरलेला नाही, तर ‘जागा’ असा शब्द वापरला आहे. ‘जागा’ ही वेगळी गोष्ट आहे आणि ‘मतदारसंघ’ ही वेगळी गोष्ट आहे. 

सध्याचा ’लोकप्रतिनिधी कायदा, १९५१’ (रिप्रेझेन्टेशन ऑफ द पीपल्स अ‍ॅक्ट १९५१) आणि ’परिसीमन कायदा’ (डीलिमिटेशन अ‍ॅक्ट) यांत ’जागा’ भरण्यासाठी ’मतदारसंघ’ आरक्षित करण्याची पद्धत निश्चित करण्यात आली आहे. संविधानातील ’जागा’ या शब्दाचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने आजवर ’भौगोलिक आरक्षणाला’ महत्त्व दिले आहे, ‘जागां’ना नाही. 

वास्तविक पाहता, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या प्रत्येक पक्षाला जागांचे प्रमाण ठरवून देणे योग्य झाले असते. गोव्याचेच उदाहरण घेऊ; ४० जागांपैकी ५ जागा (सीट्स) एसटी समाजासाठी राखीव आहेत, तर हे ५ प्रतिनिधी निवडून आणण्याची जबाबदारी राजकीय पक्षांवर सोपवली (पक्षनिहाय कोटा), तर कोणताही मतदारसंघ आरक्षित न करता संविधानातील ’जागा’ आरक्षणाची अट पूर्ण होऊ शकते. त्या पक्षास तेवढे प्रतिनिधित्व देणे बंधनकारक असले पाहिजे. उमेदवार कुठल्या मतदारसंघात उभा करायचा, तो निर्णय पक्षावर सोडून द्यावा. त्याशिवाय कुणाला स्वतंत्र उभे राहायचे असल्यास अपक्ष उभे राहण्याचा पर्याय आहेच. आताही गोव्यात जो वेळकाढूपणा सुरू आहे, तो कुठले मतदारसंघ राखीव होऊ शकतात, त्याचे राजकीय परिणाम कुणाला भोगावे लागतील आणि त्याचा परिणाम सत्ता बदलात होईल का, हे जोखण्याचे काम सुरू असल्यामुळे केला जात आहे. ते गणित जुळले की मग लगेच त्याची अंमलबजावणीही होईल. सत्तेत राहण्याचे साधन म्हणून राजकीय आरक्षणाकडे पाहिले जात आहे, सामाजिक नेतृत्व उभे राहून त्या समाजाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी नाही. 

मतदारसंघ राखीव केल्याने, उलपक्षी समाजात विभाजनाची बिजे रोवली जातात. भारताची फाळणी होण्यामागेही ही धर्मनिहाय मतदारसंघांचे विभाजन कारणीभूत ठरले. आताही मतदारसंघाची लोकसांख्यिकी (डेमोग्राफी) बदलली की राजकीय गणिते, समीकरणे बदलतात. राजकीय आरक्षणसाठी निकष मतदारसंघ ठेवल्याने आरक्षण देण्याचा मूळ हेतूच नष्ट होतो. लोकप्रतिनिधी त्या समाजाचा विचार करायचे सोडून मतदारसंघापुरता समाजाचा विचार करतो. गोव्यातही राजकीय आरक्षण नसतानाही तेवढे आमदार आहेत, पण समाजाचा विकास? तो झालाच नाही. कारण, राज्यभरातील समाज हे गणित त्यांच्यासमोर न उरता मतदारसंघातील समाज असे संकुचित व निवडून येण्यापुरते ध्येय उरले. एकदा निवडून येण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व ते साध्य झाले की प्रश्‍न सोडवण्याचे भान कुणालाच उरत नाही. लोकसंख्येप्रमाणे जागा, हे तत्त्व लागू केल्यास निवडून आलेल्यांना संपूर्ण राज्यातील समाजाचा विचार करावा लागेल. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, तेवढ्या जागेवर उमेदवार देणे बंधनकारक असल्याने पक्षांनाही त्या समाजाचा विचार करणारे गुणवान उमेदवारच शोधावे लागतील. केवळ राखीव मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देऊन भागणार नाही. 

तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे समाज मानसिकदृष्ट्या विभागला जाणार नाही. मतदारसंघ राखीव होतो, तेव्हा अन्य समाजातील लोकांच्या मनात दुही, संशय निर्माण होतो, तो होणार नाही. मतदारसंघच तोडून दुसरा भौगोलिक प्रदेश निर्माण करण्याची भीतीही नाहीशी होईल. 

आरक्षणचा संबंध गुणवत्ता कमी आखण्याशी जोडून जशी त्यामागच्या मूळ हेतूचीच वाट लावली गेली, तेच राजकीय आरक्षणाचे करण्यात आले आहे. राजकीय आरक्षणातून त्या समाजातील नेतृत्व उभे राहावे, असा जो त्यामागचा उद्देश होता, तो केवळ ‘जागा भरणे’ एवढा मर्यादित झाला. त्यातून सामाजिक विकास दूर राहिला व मधू कोडासारखी वृत्ती जन्मास आली. जरी हे उदाहरण अपवाद म्हणून धरले तरी इतक्या वर्षांत राजकीय आरक्षण मिळूनही समाज विकसित न होण्यामागचे तेच कारण आहे. समाजाचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी राजकारणात टिकून राहणे अपरिहार्य बनले. जोवर मतदारसंघ हा निकष राहील तोवर हे असेच सुरू राहील. राजकीय आरक्षण मिळाले तरी समाजाचा विकास, विचार करणारे नेतृत्व उभे राहणार नाही.