मंगळवार, २६ मे, २०२६

मराठीला गोव्याची राजभाषा का करायची?

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल.
राजभाषा म्हणून जे काही मिळायचे, ते मराठीलाही मिळते मग मराठीला गोव्याची राजभाषा का करायची, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. गोव्यातली मराठी खूप प्राचीन आहे, तिला लिखित व मौखिक दोन्ही परंपरा आहेत, हे सत्यच आहे. ‘राजभाषा’ ही मुख्यत: लिखित स्वरूपात वापरली जाणारी शासकीय भाषा या अर्थी तिचा वापर होतो. राजभाषेचा संबंध बोलण्याशी कमी व लिहिण्याशी आणि लिहिलेले वाचण्याशी अधिक येतो. या निकषावर पाहिल्यास मराठी राजभाषा होण्यात कोणतीच अडचण नाही. कोकणी ही बोलण्याची आणि मराठी ही लिहिण्यावाचण्याची भाषा आहे, याबद्दल कुठल्याच गोमंतकीयाच्या मनात कसलीच शंका नाही. सर्वाधिक लिहिली व वाचली जाणारी स्थानिक भाषा असूनही तिला राजभाषा न करणे, हा मराठीवर केलेला अन्यायच आहे. त्याहीपेक्षा, मराठीचा गोव्याच्या अस्मितेशी असलेला संबंध नाकारणे हा जास्त मोठा अपमान आहे. आम्हीच केलेली आमच्याच भाषेची ती अवहेलना आहे.

मराठी ही महाराष्ट्राची व कोकणी ही गोव्याची, असे सरळ ‘एक घाव दोन तुकडे’ केले जातात. पण, थोडे बारकाईने पाहिल्यास गोव्यातील मराठी व महाराष्ट्रातील मराठी यात बराच फरक आहे. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास, मराठी भाषिक गोमंतकीय कधीच ‘नारळाचे झाड’, ‘पोफळीचे झाड’ असे म्हणत नाही व लिहीतही नाही. तो सरळ ‘माड’ आणि ‘माडी’ असे शब्द वापरतो. स्थानिक असलेली अनेक फळे, भाज्या यांना कोकणीत व मराठीत समान शब्द वापरले जातात. स्थानिक भूमीशी संबंधित अनेक शब्द महाराष्ट्रातील मराठीस नवखे आहेत. गोव्याच्या मराठीतील अनेक शब्दांचे लिखित रूप व उच्चारण वेगवेगळे आहे. हे पाहता गोव्यातली मराठी ही गोव्याची अस्मिता नाही, असे कसे बरे म्हणता येईल? कोकणी व मराठी दोन्ही भाषा गोव्याच्या अस्मिता आहेत. 

मराठी राजभाषा केल्यास गोमंतकीयांच्या जागा महाराष्ट्रीय लोक हिरावून घेतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. नोकरीसाठी अर्ज करताना जे निवासाचे प्रमाणपत्र (रेसिडेन्स सर्टिफिकेट) घेतले जाते, त्यात ‘या व्यक्तीचे पूर्वज १९६१पूर्वी गोव्याचे निवासी होते’ हे प्रमाणित केलेले असणे अनिवार्य करावे. त्यासाठी तेर्म किंवा तेव्हापासून आजवरचा कालावधी गोव्यातच स्थायिक असल्याचा पुरावा घ्यावा. सरकारकडेच १९६३सालची जनगणना आहे, त्यालाच प्रमुख आधार बनवावे. याशिवाय जमिनीचे कागदपत्र, गावकारी-कोम्युनिदाद दस्तऐवज, पोर्तुगीज शासकीय कागदपत्रे वगैरेंचा आधार घेता येणे शक्य आहे. गाव हे एक लहान युनिट पकडल्यास त्यात कोण कुठून कधी आला होता, याची मौखिक परंपरा असते, त्याचाही आधार घेता येणे शक्य आहे. एकूण मूळ महत्त्वाचा मुद्दा काय, की केवळ मराठी राजभाषा झाली म्हणून महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी गोमंतकीयांचा हक्क हिरावून घेऊ नये. 

वास्को हे प्रातिनिधिक उदाहरण घेतल्यास एक दोन महिन्यात रेशन कार्डापासून आधारकार्डापर्यंत सगळी प्रमाणपत्रे करून देणारे अधिकारी गोमंतकीयच नव्हते का? तेव्हा नोकरीचा हक्क हिरावला जाण्याची भीती कुठे गेली होती? आजही नजीकच्या काळात गोव्यात आलेल्यांना व्यवसायाची सर्व सुविधा, कागदपत्रे बिनदिक्कत कशी मिळतात, हे एक उघड रहस्य आहे. मराठी राजभाषा झाल्याने होणाऱ्या कथित नुकसानापेक्षा हे प्रत्यक्षात झालेले व होत असलेले नुकसान खूप आहे. 

मराठीला राजभाषा करून करणार काय, हा एक प्रश्‍न असतो. हाच प्रश्‍न कोकणीबाबत, ‘राजभाषा होऊनही काय मिळाले?’ असा उपस्थित होतो. भाषा म्हणून विकास होण्याचा मार्ग खरे तर खुला झाला होता. पण, काही मोजक्या लेखकांचा पारितोषिकांनी भरलेला दिवाणखाना, या व्यतिरिक्त कोकणी भाषेची भरीव प्रगती अभावानेच आढळते. किती कोकणी लेखक भाषेसाठी कार्य करतात? व्याकरण, व्युत्पत्ती, कोश तयार करण्यासाठी किती लोक धडपडतात? भाषा म्हणून पाहायचे झाल्यास मराठीत जशी या गोष्टींची निरंतर परंपरा व एकवाक्यता आहे, तशी कोकणीत नाही. काही मोजकीच माणसे आहेत, जे मूळ कोकणी शब्द कोणते याचा शोध घेत गावोगावी जाऊन जुन्या पिढीतील लोकांशी संवाद साधतात. विस्मृतीत गेलेले किंवा वापरात नसलेले कोकणी शब्द व त्यांचे अर्थ शोधत हिंडतात. हे व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे. नवीन लेखक, वाचक घडवणे हा प्रस्थापित कोकणी लेखकांचा नित्यक्रम असला पाहिजे. मराठीत तसे प्रयत्न सातत्याने झाले आहेत व आजही होत आहेत. कोकणीस अजून बराच पल्ला गाठायचा आहे; तो गाठण्यासाठी वापरायची शक्ती मराठी राजभाषा होण्यापासून रोखण्यात वापरली जाते. 

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल. 

सोमवार, २५ मे, २०२६

समता, समानता आणि भारत

संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून.

मागील काही लेखांमध्ये, ‘भारताची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सर्वांत यशस्वी ठरली ती ख्रिश्‍चनिटी’, असे म्हटले होते. आता त्याचे काही अन्य कंगोरे आणि परिणाम यावर विचार करू. संस्कृती, समाज आणि उद्योग यांचा नाश करण्यासाठी ‘समता व समानता‘ या दोन शस्त्रांचा वापर प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासक, युरोपीय विचारवंत आणि ख्रिश्चन मिशनरि यांनी पद्धतशीरपणे केला. 

ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी (निदान कॅलिको ॲक्ट होण्यापूर्वी तरी) केवळ व्यापार करण्यात स्वारस्य होते. म्हणून त्यांनी मिशनरिंवर बंदीस मान्यता मिळवली होती. त्यामुळे, डच राज्य करत असलेल्या सेरामपूर येथे मिशनरि कार्य सुरू झाले. इथेच समता व समानतेचे बीज रोवणारे ‘सेरामपूर त्रिकुट’ (विल्यम कॅरी, जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड) सक्रिय झाले. त्यांनी ‘देवासमोर सर्व माणसे समान आहेत’ हा खिश्‍चनिटीचा सिद्धांत (जो पाश्‍चिमात्य देशातही त्यावेळी लागू नव्हता) छापून पसरवला व शाळा उघडून शिकवायला सुरुवात केली. हेच कार्य अलेक्झांडर डफ या स्कॉटिश मिशनरीने केले व चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज या अँग्लिकन मिशनऱ्याने भारतातील गरिबांच्या आणि कामगारांच्या समान हक्कांसाठी बोलणे सुरू केले. थॉमस मेकॉले व हेन्री विवियन डेरोझिओ यांनी हे विषारी बियाणे इथे रुजेल अशी भूमी तयार केली. त्याला वैचारिक बैठक विल्यम जोन्स आणि मॅक्स म्युलर यांनी दिली. 

भारतीय समाजव्यवस्था पूरकता आणि परस्परावलंबित्व यावर आधारित होती. समाजाचा प्रत्येक घटक, अन्य घटकांस व समाजास पूरक आणि परस्परांवर अवलंबून होता. या प्रत्येक घटकाला कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव होती. समतेचा आणि समानतेचा उद्घोष करणारे आजचे विचारवंत जात ही व्यावसायिक ओळख होती, प्रत्येक जात इतरांना पूरक व्यवसाय करणारी होती आणि इतरांवर अवलंबून असणारी होती हे सांगत नाहीत. ते सांगितले तर विषमतेच्या आणि शोषक-शोषित या गृहीतकांना बाधा येते. जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा शेतसारा असायचा, तेव्हा उच्चनीचता कशी संभवते? याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. मग, ते कुणालाही कोणतेही काम करण्याची मुभा व सामाजिक प्रतिष्ठा याकडे वळतात. भारतीय समाजव्यवस्थेत प्रत्येकाला त्याच्या स्थानी, तेवढ्यापुरता मान होता. प्रत्येकाला आपापल्या जागी एक निश्‍चित आणि आदराचे स्थान होते. ज्यांना त्याकाळी अस्पृश्य व आजकाल ‘शोषित’ म्हटले जाते, त्यांनाही देवस्थानाच्या कार्यात, सण-उत्सवात मान होता. पण, तो प्रांगणापर्यंत होता, देवळात नव्हता. आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे, जातीचा व्यवसाय न करणाराही त्याच जातीचा उरणे. आचमनही माहीत नसलेला केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून ‘भट’ होतो व जन्मल्यापासून कधीही चामडे न सोललेला माणूस ‘चर्मकार’ होतो आणि त्या त्या जातीचे गुणदोष भोगतो. 

अस्पृश्यतेचा जन्म अतिशुचितेतून होतो. या अस्पृश्यतेची आजची वर्णनेही याच समतेच्या, समानतेच्या दृष्टिकोनातून आहेत. त्यांची घरे गावच्या वेशीजवळ असत किंवा मुख्य वस्तीपासून दूर असत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायाचे ठिकाण व निवासाचे ठिकाण एकच असणे. आजच्यासारखे दुकाने, कारखाने तेव्हा नव्हते; सुतार, कुंभार, लोहार, चर्मकार आपापली कामे घरीच करत असत. दुर्गंधी, स्वच्छता(हायजीन) या कारणांसाठी त्यांची घरे मुख्यवस्तीपासून दूर असत. त्यांचे शोषणच करायचे असते तर देवळाच्या प्रांगणात तरी प्रवेश का दिला असता? या व्यवस्थेमुळे प्रत्येक गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होता. संरक्षण व काही प्रमाणात न्याय, वगळता एकही गाव राजावर अवलंबून नव्हता. सत्ता कुणाचीही असली तरी फरक पडत नसे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समूहभावना जाज्वल्य होती.

प्रत्येक जातीला त्यांचे व्यावसायिक शिक्षण व कौशल्य घरीच शिकण्याची व्यवस्था होती. त्यामुळे, ‘शिक्षणापासून वंचित ठेवले’ वगैरे थोतांडही आजच्या शिक्षणपद्धतीच्या फूटपट्ट्या लावून पसरवले जाते. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ या समता, समानतेच्या गृहीतकावर आधारित शिक्षण व्यवस्थेमुळे, मुलाकडे उपजत कोणते गुण, कौशल्य आहे व त्याचा नैसर्गिक कल कुठे आहे, याचा अभ्यासच केला जात नाही. हा अभ्यास पूर्वी गुरुकुलात केला जात असे. आज विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागेही हे एक महत्त्वाचे कारण आहे. परंपरेने चालत आलेले कौशल्य व ज्ञान एका जातीतच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे दिले जायचे. त्यामुळे, जात हे ‘स्पेशलाइझेशन ऑफ वर्क’ होते. याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश आले तेव्हा व यायच्या आधी भारत तयार उत्पादने बाहेरच्या देशांना विकायचा. धातू, वस्त्र, रसायने यातील अनेक दर्जेदार उत्पादनांसाठी जग भारतावर अवलंबून होते. जगाला आपण तयार उत्पादने विकायचो;  आता जगाची सेवा करतोय. कच्चा माल व पक्की बुद्धी जगाला पुरवतो आणि जग आपल्याला त्यातून तयार केलेली उत्पादने विकते. 

ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्‍चन मिशनरि यांनी हे समतेचे, समानतेचे विचार पसरवायला सुरुवात केली व प्रत्येक गोष्टीला शोषक व शोषित यातच विभागणी करण्याची विचारसरणी रुजवली. त्याला भारतीय समाजातून पहिला पाठिंबा बंगालमध्ये राममोहन रॉय यांनी दिला आणि नंतर जोतिबा फुले यांनी. रॉय यांनी पाश्‍चात्य शिक्षणाचा पाया घालण्याचे काम केले. महाराष्ट्रात फुलेंनी व दक्षिणेत ई. रामासामी यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत सामाजिक स्तरावर प्रत्यक्षात आणला. दक्षिणेत त्याला राजकीय यश मिळाले. महाराष्ट्रात डझनभर मती असलेले राजकारणी आजवर त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा यथेच्छ प्रयत्न करतात. दक्षिणेतील राजकीय यशापेक्षाही महाराष्ट्रात झालेले सामाजिक नुकसान कैक पटीने मोठे व भरून निघू शकत नाही, असे आहे. सगळ्यांत मोठे झालेले सांस्कृतिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसान त्यांच्या लक्षांत येत नाही. आपल्याच देवदेवतांना, संस्कृतीला आणि पूर्वजांना यथेच्छ शिव्या दिल्या जातात. प्रत्येक देव, संत आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती यांचे वर्गीकरण जातीत झाले आहे. जातींचे वर्ग आणि वर्गांच्या झुंडी तयार झाल्या आहेत. समाजामध्ये जबाबदारीऐवजी हक्क फार महत्त्वाचे झाले आहेत. आधी जे ‘गावचे’ असायचे ते आता स्वत:च्या कुटुंबाचेही उरले नाहीत. समाज उभा आडवा फाटला आहे. हजारो वर्षांच्या परंपरेने टिकवून ठेवलेले व्यावसायिक कौशल्य, ज्ञान केव्हाच संपले आहे; इतकेच नव्हे तर ते व्यवसायही नष्ट झाले आहेत. ज्या जातिगत व्यवसायांचा अभिमान बाळगला जायचा, त्याचीच आता लाज वाटू लागली आहे. जातींचा इतरांनी केलेला उल्लेख ‘ॲट्रॉसिटी’ व अपमान वाटतोय, तर स्वत:च्याच जातीला मागास म्हणवून घेण्यात अभिमान वाटतोय. स्वत:च्या जातीला ‘मागास म्हणा’ म्हणून आंदोलने केली जात आहेत. सर्वांत मोठा विरोधाभास म्हणजे हेच लोक तोंडाने समतेच्या आणि समानतेच्या गोष्टी करत आहेत. 

राज्यघटनेने नसलेली पांथिक समता अनिवार्य केली आणि व्यवस्थेने पाळायची नागरी समता ऐच्छिक केली. त्यामुळे हक्क, अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा इतका गवगवा झालाय, की त्यातून आपली झोपण्याची खोलीही सुटलेली नाही. अगदी नवरा बायकोचे नाते पूरक असण्याऐवजी समता व समानतेत अडकले आहे. लग्न एक संस्कार होता, तो आता करार झाला आहे; त्याहीपुढे जाऊन बाजार झाला आहे. संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून. 


वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल?


उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाला, ते आजवर चालत आलेल्या व पुढेही सुरू राहणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. वैदिक सनातन हिंदू संस्कृती संपवण्याचा प्रयास आजकालचा नाही; त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमणे नृशंस होती. पण, त्यांचा प्रभाव संस्कृती संपवण्याइतका घातक नव्हता. ख्रिश्‍चनिटी त्यात फारच पुढारलेली व शिस्तबद्ध आहे. ख्रिश्‍चनिटी व समाजवादी-साम्यवादी हे दोन्ही ‘कल्ट’ आहेत. संस्कृती संपवण्याची त्यांची पद्धत सारखी आहे. एरव्ही भारताबाहेर त्यांचे एकमेकांत पटत नाही. पण, भारतात एकवाक्यता असते; इथे ते हातात हात घालून फिरतात. जगभरातही जिथे जिथे निसर्गपूजक संस्कृती संपवल्या तिथे तिथेही ते तसेच वागले आहेत.
 
जिथे ख्रिश्‍चनिटीचा उदय झाला तिथेही तो स्थानिक मूर्ती फोडूनच झाला. पण, बळ असेपर्यंतच यश मिळू लागले. मग, एका नव्या नीतीचा उदय झाला. संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधण्याचा; त्या शोधायच्या, वाढवायच्या व त्यांना सोडून द्यायचे. तेच एकमेकांत लढून लढून मरतात आणि उरलेले ख्रिस्ती होतात. संस्कृतीही संपते आणि आपले हातही रक्ताने माखत नाहीत, अशी ही संपूर्ण योजना चर्चने राजसत्तेतून राबवली. त्यासाठी स्थानिकांचाच वापर केला. त्यांना मोठे केले.
 
ओफोन्सो (प्रथम) या मध्य आफ्रिकेतील कॉंगो राजाने स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीला ’सैतानी’ आणि ’अंधश्रद्धेचे जाळे’ घोषित केले. त्याने कॉंगोच्या पारंपारिक देवदेवतांच्या मूर्ती, चिन्हे आणि प्रार्थनास्थळे जाहीरपणे शिव्या शाप देत जाळून, फोडून टाकली. हा राजा तेथील व पाश्‍चात्य पाठ्यपुस्तकांत आता आफ्रिकेचा ‘पहिला प्रबुद्ध आणि आधुनिक राजा’ म्हणून शिकवला जातो. कॉंगोला ’रानटी’ अवस्थेतून बाहेर काढणारा ‘महान सुधारक’ म्हणून तो शिकवला जातो. ऍझ्टेक संस्कृतीतील देवतांना गलिच्छ भाषेत शिव्या देऊन सैतान संबोधण्याचे काम करणारा हुआन डिएगो, आज तेथील अभ्यासक्रमात ’स्थानिक लोकांमध्ये शांतता आणि ख्रिश्चन प्रेमाचा प्रसार करणारा महान दूत’ म्हणून गौरवला जातो. उत्तर अमेरिकेतील ’माटोआका’ नामक स्त्री नंतर ’रेबेका’ झाली. तिने स्वतःच्या टोळीच्या पारंपारिक धार्मिक समजुती आणि देवांना ’अंधार पसरवणारे’ आणि ‘रानटी’ ठरवून त्यांचा त्याग केला. आजही अमेरिकन शाळांमध्ये तिला ’एक महान नायिका’ म्हणून शिकवले जाते. हॉलिवूडमध्ये तिच्यावर चित्रपटही काढण्यात आले. हॉन्ग झिक्वुआन याने चीनमधील पारंपारिक बौद्ध, कन्फ्युशियन आणि ताओइस्ट संस्कृतीला ’सैतानी’ म्हटले. त्याने त्याच्या लाखो अनुयायांच्या मदतीने चीनमधील प्राचीन बौद्ध मंदिरे, कन्फ्युशियन पुतळे आणि ग्रंथ जाळून खाक केले, कोट्यवधी लोक मारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रारंभिक काळात चीनला जुन्या सरंजामशाहीतून आणि अंधश्रद्धेतून मुक्त करू पाहणारा क्रांतिकारक आणि सुधारक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.
 
हेच कार्य भारतीय संस्कृतीला नावे ठेवणार्‍यांना जागतिक पातळीवर व भारतीय अभ्यासक्रमात महान ठरवण्यात आले. त्यांच्याच बगलबच्च्यांकडून त्यांना ‘राजा’, ‘महात्मा’ आणि ‘पेरियर’ अशा पदव्या बहाल करवण्यात आल्या. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड या जागतिक विद्यापीठांमध्ये या ’सुधारकांवर’ पीएचडी आणि संशोधनासाठी मोठा निधी दिला गेला. हाच अभ्यासक्रम पुढे भारतासारख्या देशांच्या पाठ्यपुस्तकांत जसाच्या तसा उतरवला गेला.
 
भारतात त्यांना मारण्यासाठी एक न निखळणारी पाचर मिळाली; ‘सामाजिक अस्मिता’! स्वत:च्याच संस्कृतीतील देवतांना अभद्र, गलिच्छ आणि हीन शिव्या हासडणार्‍यांना व त्यांच्या सामाजिक कार्याला समाजाच्या अस्मितेशी घट्ट बांधून टाकले. आज पुरोगामी म्हणून टिकून राहण्यासाठी आपल्याच देवदेवतांना हीन पातळीवर जाऊन टीका करण्याच्या त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक तरी करावी लागते, किंवा त्याचे समर्थन तरी करावे लागते. चुकीच्या सामाजिक चालीरीतींवर प्रहार करण्यासाठी देवदेवतांची अभद्र निंदा का करावी लागते, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. जातिभेद, उच्चनीचता संपवून समता, समानता आणायची होती म्हणून त्यांनी तसे केले, असे समर्थन पुरोगामी विचारवंत करतात. पण, तशी निंदानालस्ती न करताही सामाजिक सुधारणा करणारे स्वामी दयानंद सरस्वती, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरू असे असंख्य समाजसुधारक भारतातील प्रत्येक राज्यांत होते. त्यांची नावे पाठ्यपुस्तकात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाच जातीवर सगळे खापर फोडायचे, आत्यंतिक जातीय द्वेष पसरवायचा आणि त्यालाच जातिभेद, उच्चनीचता संपवण्याचे महान कार्य म्हणायचे. या समाजसुधारकांनी केलेल्या जातीयद्वेषाचा उल्लेख केला तरी, तसे करणाराच जातीयवादी ठरतो. आपल्या संस्कृतीवर, देवांवर केलेल्या गलिच्छ टीकेस, ‘गलिच्छ आहे’ असे म्हणतो तोच आज ‘कम्युनरल’ ठरतो.

चर्च, मिशनरि, वसाहतवादी आणि आधुनिक काळात समाजवादी-साम्यवादी विचारवंतांनी अभेद्य करून ठेवलेल्या ‘समाजसुधारकां’च्या विचारांवर टीका करणारा ‘मनुवादी’, प्रतिगामी, समतेचा विरोधक वगैरे ठरवला जातो. इतकेच नव्हे तर तो त्या संपूर्ण समाजाचा विरोधक ठरवला जातो. या माणसांचे कार्य मोठे नाही का? निश्‍चितच आहे, पण आपल्याच संस्कृतीला, देवदेवतांना हीन ठरवून ही माणसे महान झाली आहेत. हीच शृंखला पुढे सुरू आहे आणि संस्कृती संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. दक्षिण भारत स्वतंत्र द्राविडी अस्मितेपायी आणि महाराष्ट्रासह उत्तर भारत समता-समानतेच्या वेडापायी आपलीच संस्कृती संपवत आहे. या वाळवींनी पोखरलेली संस्कृती किती तग धरते, तेच पाहत राहणे आपल्या हाती आहे. ते पाहण्याआधीच या जन्मी तरी निदान डोळे मिटावेत हीच इच्छा!

केवळ उदयनिधीच हे म्हणतोय का?


मंगळवार दि. १२ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आपले पहिले भाषण करताना उदयनिधी स्टॅलिनने त्याच्या जुन्या विधानाचाच पुनरुच्चार केला आहे. ‘सनातन धर्म हा नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे जे तो काल म्हणाला तेच त्याने ‘सनातन निर्मूलन परिषदे’त २०२३मध्ये म्हटले होते. सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे; त्यामुळे त्याला नष्ट केलेच पाहिजे असे तो म्हणाला होता. आता डेंग्यू मलेरिया थेट नष्ट करता येत नाही, त्यासाठी तो पसरवणारे डास मारावे लागतात. सनातन नष्ट करण्यासाठी सनातन धर्माचे वाहक, मानणारे मारावे लागतील, हा थेट इशारा होता. त्यामुळे, त्याला जे म्हणायचे होते तो थेट हिंदूंचा नरसंहारच होता; अन्य काहीही नव्हते. पण, निर्णय देणाऱ्या न्यायालयास ते तसे काही वाटलेच नाही. ‘तो जे बोलला होता ते ‘हेट स्पीच’ आहे व त्यासाठी तो दोषी आहे’ हेही आजतागायत न्यायालयाने मान्य केले नाही.

हिंदू म्हणजे सांप्रदायिक, अत्यंत नीच, घाणेरडा, अविकसित, सुधारणा न झालेला किंवा मान्य नसलेला समाज आहे, हे भारतीय राज्यघटनेचे अलिखित मत आहे. केवळ राज्यघटनेचेच नव्हे तर त्याअंतर्गत झालेल्या कायद्यांचे, कायदा करणाऱ्यांचे आणि त्याचे पालन करावयास लावणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचेही तेच अलिखित मत आहे. एवढेच कशाला, भारतीय शिक्षणव्यवस्थाही तेच मानते.

राज्यघटनेस केवळ सामाजिक सुधारणा अपेक्षित असती, तर कलम २५ (२ ब)मध्ये ‘हिंदू’ हा शब्दच आला नसता. 'सामाजिक सुधारणा' या गोंडस नावाखाली सरकारला हिंदू संस्थांमध्ये बदल करता आले नसते. कायद्याबाबत बोलायचे झाल्यास हिंदू वगळता अन्य एकाही पर्सनल लॉ बोर्डाचा एकही कायदा आजतागायत संपूर्णपणे कोडिफाय झालेला नाही. अगदी लग्नाचे वय ठरवणारा कायदाही मुस्लीम पर्सनल लॉ रद्दबातल ठरवत नाही. असे असंख्य कायदे आहेत जे लागू होतात असेही ठामपणे म्हणता येत नाही आणि लागू होत नाहीत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. यालाच ‘ग्रे एरिया’ म्हणतात. हा इतकी वर्षे मुद्दाम ‘ग्रे’ ठेवण्यात आला आहे. हिंदूंचे सरळ ब्लॅक आणि व्हाईट करून टाकले आहे.

शिक्षणात सामाजिक त्रुटी सांगताना बालविवाह, केशवपन वगैरे हजारो गोष्टी केवळ हिंदू धर्माबद्दल घृणा व नकारात्मक भाव निर्माण करणाऱ्या शिकवल्या जातात. आजही मुस्लिमांत बालविवाह आहे व तो कायदेशीर आहे, हे शिकवले जात नाही.

अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून सनातन हिंदू धर्म संपवण्याचे काम स्वतंत्र भारतातील लोकशाहीने पद्धतशीरपणे केले आहे व करत आहे. समता, समानता ही शस्त्रे त्यासाठी प्रभावीपणे वापरली जात आहेत. उदयनिधी तेच थेट मांडले होते व काल पुन्हा मांडले आहे. तो किमान थेट बोलण्याची हिंमत दाखवतो, भारतीय लोकशाही तीही दाखवीत नाही. उदयनिधीसारख्या लोकांसाठी हिंदू हा कुत्र्याच्या मौतीने मरण्यायोग्य किंवा किड्यामुंग्यांप्रमाणे संपवण्यायोग्य समाज आहे. प्रश्‍न त्याचा किंवा लोकशाहीचा नाहीच. प्रश्‍न आहे तो हिंदूंचा.

हिंदू स्वत:स काय समजतात, हा खरा प्रश्‍न आहे!

जगभरातील संस्कृतींना अवघ्या काही वर्षांत जमीनदोस्त करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला व इस्लामला सनातन वैदिक हिंदू धर्म संपवता आला नाही व इतकी वर्षे लोकशाहीसही ते जमले नाही. जगभरात केवळ एकच शक्ती हिंदू धर्माला संपवेल, ती म्हणजे स्वत: हिंदू. त्यामुळे, हिंदू स्वत:स काय समजतात या प्रश्‍नाच्या उत्तरावरच हिंदूंचे अस्तित्व टिकणे किंवा संपणे अवलंबून आहे.

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

परवाच एक मित्राने विचारले,

‘तुला माहिती आहे का, की वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते?’
‘नाही.’
‘काय? तुला माहीत नाही? पत्रकार ना तू! (हे एक अत्यंत अवघड प्रकरण आहे. पत्रकाराला सगळे माहीत असलेच पाहिजे असा या लोकांचा आग्रह. पत्रकार असण्याचा मानही, अपमान करण्यासाठीच दिला जातो.)
शरणागती पत्करत म्हटले, ‘नाही बाबा, खरेच माहीत नाही. तू सांग.’
तो म्हणाला, ‘अग्रलेख’
‘काय?’ मी उडालोच.
कुठल्या तरी सर्व्हेची कसली तरी आकडेवारी तोंडावर फेकत तो विजयी चेहर्‍याने विचारता झाला, ‘कळालं?’

त्याच्या डेटाने पुरवलेल्या ‘शास्त्रीय’ माहितीपुढे माझ्यासारख्या प्रतिगाम्याने वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. गप्प बसलो.

हे आकड्यांचे खेळ करून आपल्याला हवे ते म्हणणे रेटण्याचा ‘साइंटिफिक’ खेळ अनेक ठिकाणी खेळला जातोय. हेच निकष लावायचे तर डॉन ब्रॅडमन, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर वगैरे फलंदाज अतिशय निकृष्ट दर्जाचे ठरतील. कायम शेवटी खेळायला येणारा फलंदाज, जो कमी चेंडू खेळून जास्त - म्हणजे चारपाच - धावा काढतो, तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरेल. अंक किंवा आकडे हे कमीत कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणार्‍या नव्यानेच यौवनात प्रवेश केलेल्या मदालसेसारखे असतात; ते जे दाखवतात ते आकर्षक असते, लपवतात ते महत्त्वाचे असते!
अग्रलेखाचे महत्त्व तो किती लोक वाचतात, यावर ठरूच शकत नाही. अग्रलेख ही वर्तमानपत्राची भूमिका असते आणि दररोज घ्यावी लागते. ज्याला ‘बिटविन द लाइन्स’ म्हटले जाते ते प्रखरपणे सांगावे लागते. ते संपादकाचे वैयक्तिक मत नसते, ते वर्तमानपत्राचे मत असते. एखादा संपादक उजव्या विचारांचा असला, आणि वृत्तपत्र डाव्या विचारसरणीकडे झुकणारे असले; तरी त्याला स्वत:चे मत मांडता येत नाही. त्यासाठी त्याने वेगळा लेख लिहिला तरी चालतो; पण, अग्रलेखात ते घुसडणे पाप असते.

‘एखादी महत्त्वाची गोष्ट घडली तरच अग्रलेख लिहावा, अन्यथा लिहूच नये’ हा विचारच चुकीचा आहे. घटनेची बातमी होताना, त्यात हेतू किंवा भूमिका येता कामा नये. ती अग्रलेखात येणे अवश्यमेव असते. हडफड्यात घडलेल्या अग्नितांडवाची बातमी अग्रलेखापेक्षाही विस्तृत व जास्त माहिती देणारी असते. पण, त्यामागचा विचार, मत मांडण्याचे काम अग्रलेखाने करावयाचे असते. ते सर्वांसाठी असते. सामान्य वाचकांपासून सरकारपर्यंत सर्वांना त्यात घटनेचा बोध असतो.

लता मंगेशकर यांच्या स्वरकारकिर्दीस पंचवीस वर्षे झाली तेव्हा, त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या, लेखही छापून आले. पण, ‘मराठा’मध्ये त्या दिवशी आचार्य अत्रे यांचा जो अग्रलेख आला होता त्याला तोड नाही. शीर्षकापासूनच सुरुवात, ‘स्वरलता’! अग्रलेखाची सुरुवातच वाचण्यासारखी व लता मंगेशकर म्हणजे काय याचे मूर्तिमंत शब्दरूप साकारणारी होती. ‘पक्ष्याचं कूजन, वाहणारा झरा, मोराचं नृत्य, पहिल्या पावसातल्या मातीचा गंध, यांना विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये. त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर, याला फक्त ‘लता’ म्हणावं. अतिपरिचयानेसुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे लताचा निखळ, मुक्त सूर!’ असा प्रारंभ केल्यानंतर अग्रलेखात पुढे मानवी ध्वनिसिद्धीच्या प्रांतातील अद्भुत चमत्कार असलेल्या लतादीदीच्या कंठाची मुक्तकंठाने स्तुती करताना अत्रे लिहितात, ‘उर्वशीच्या नुपूरांची रुणझूण, सरस्वतीच्या वीणेचा झंकार आणि कृष्णाच्या मुरलीची साद, हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवलेला असावा!’ लताच्या मृदू कंठाचे अभिवादन केवळ अग्रलेखातच होऊ शकते, वर्तमानपत्रातल्या अन्य कुठल्याही जाड्याभरड्या रकान्यात होऊच शकत नाही. प्रत्येकाची आपली जागा असते व ती तिथे, तशीच सांभाळायची असते!
आजतागायत असंख्य संपादकांनी लिहिलेल्या अग्रलेखातील शब्दसंचितांचे मूल्य कोण किती वाचतो, या आकड्यांत ठरवणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ‘वाचकांचे खिळलेले लक्ष’ हा निकष लावायचा, तर उत्तान, मादकतेने मुसमुसलेल्या अर्धनग्न युवतीच्या भिजलेल्या स्तनाग्रांवरही नजर खिळते, खिळून राहते; पण मग तो ‘हैदोस’ छापायचा का वर्तमानपत्रात? मटक्याचे आकडे छापावे लागतात म्हणून राजीनामा देणारे दिव्य दृष्टी लाभलेले संपादकही पाहिले आहेत आणि कुणीही न सांगता पहिल्या पानावर थेट माफी मागून संपूर्ण अग्रलेखच्या अग्रलेख मागे घेणारे दळभद्री संपादकही पाहिले आहेत. हा गुणदोष त्या संपादकांचा असला, तरी त्यामुळे अग्रलेखांचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, होणार नाही!

जाहिरात, वितरण या क्षेत्रातली माणसे बातम्यांचे महत्त्व व जागा ठरवू लागल्यापासून वर्तमानपत्रांची पत ढासळत चालली आहे, हे उघड सत्य आहे. या ढासळत चाललेल्या प्रतिष्ठेला कुणी सावरून धरत असेल तर तो अग्रलेख! दहा पैशाच्या दहा चिल्लर गोष्टींनी कदाचित गल्ला भरणारा रुपया होत असेल; पण बंदा रुपया हा शेवटी बंदा रुपयाच असतो. अग्रलेख हा त्या बंद्या रुपयासारखा असतो, त्याचे किंमत चिल्लरीत करू नये!

हे सगळे त्या मित्राला समजावणे आणि त्याने समजणे, दोन्ही कठीणच होते. ‘स्वत:स पत्रकार म्हणवून घेतात, खुर्च्या तापवतात आणि काडीचीही अक्कल नसते, माहिती नसते’, असे मनातल्या मनात म्हणत तो ‘जितं मया’च्या आविर्भावात निघूनही गेला होता. अस्मादिक कायम हरलेल्या चेहर्‍याने त्याची पाठमोरी आकृती पाहत हताश उभे होते.

मंगळवार, ५ मे, २०२६

गोव्यातील मंदिरे व त्यांचे ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण

ची जागा हक्काने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली.  देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक जबाबदारीसाठी आहे, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग, ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते अन्याय-अत्याचार यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, जबाबदारीची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील!

हा लेख लिहायला घेतला तोवर कुठल्या देवळात कोण महाजन आहेत व का आहेत, हा विचार कधी डोक्यात आलाच नाही. देव महत्त्वाचा, तिथे जाऊन त्याचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. देव तिथे आहे, म्हणून ते देवस्थान इतकेच देवस्थानाला महत्त्व देत आलो. अनेक देवळे अशी आहेत, जिथे एकदा जाऊन आलो, तिथे पुन्हा कधीच पाऊलही टाकणार नाही. बाहेरूनच नमस्कार! कारण, तिथे चाललेले प्रकार शास्त्र सोडूनच द्या, श्रद्धेलाही पायदळी तुडवणारे होते. 

लहान स्वरूपात असलेली देवळे ही गावाची केंद्रस्थाने होती. ती प्रत्येकाची जबाबदारी होती. देवळात प्रवेश नसला तरी तो अन्याय वाटत नसे. देवाला आपल्यासाठी बाहेर यावे लागते याचे दु:ख असे. ‘देव काय तो या एकाच देवळात आहे’, अशी भावना कधीच नव्हती. देवळेही वेगवेगळी होती. ग्रामदेवता, कुलदेवता अशी साधारण झोपडीवजा देवळांची विभागणी होती. बाकी राखणदार, क्षेत्रपाल, निसर्गदेवता या उघड्यावरच असायच्या. त्यांना देवळे नव्हती आणि खरे सांगायचे तर असूच नयेत. राखणदार हा फिरताच हवा, त्याला बंदिस्त करणे अयोग्य आहे. सीमा संपेपर्यंत तो आपले रक्षण करत येतोय, ही भावना तिथून जाणार्‍या प्रत्येकाची असे. दगड, वारूळ या निसर्गरूपात पुजण्यापासून ते मूर्तीरूपात पुजणे हा एकाच संस्कृतीचा भाग होता व आहे. 

जबाबदारीची जागा हक्काने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली. पहिले दर्शन घेण्याचा, पहिली पूजा करण्याचा मान महत्त्वाचा ठरला. देवापेक्षाही देवस्थानाला नको इतके महत्त्व प्राप्त झाले. आपले हक्क प्रस्थापित करणे गरजेचे ठरले. अनेक देव जे स्थलांतरित झाले, त्यांची देवळे सुरुवातीस झोपडी किंवा लहान घरांसारखीच होती. कवळे, म्हार्दोळ, मंगेश ही देवस्थानेही तशी लहानच होती. वतने मिळवून, आर्थिक व राजकीय वजन वापरून देवळे भव्य बांधली. ज्यांनी त्यांची पुनर्स्थापना मोठ्या प्रमाणात केली, त्यांचा दबदबा तिथे राहिला. पुढे ‘मझानिया’अंतर्गत त्यांनी आपले वर्चस्व व हक्क अबाधित राहील, अशी सोय राजकीय व वैयक्तिक वजन वापरून केली. यात एक सूक्ष्म फरक व कारण आहे, जे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये सारस्वतांची महाजनकी आहे. यातही कुळावी असलेले सर्व सारस्वत महाजन नाहीत. प्रामुख्याने वत्स, कौशिक आणि भारद्वाज या गोत्रांतील सारस्वतच महाजन आहेत. इतर सारस्वत नाहीत आणि अन्य जातीचेही कुणी नाहीत. असे फक्त सारस्वतांनीच केले आहे का, तर तसेही नाही. श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानात १२ क्षत्रिय कुळे महाजन आहेत. तिथे अन्य क्षत्रिय कुळांना व अन्य कुणासही महाजन होण्याचा अधिकार नाही. गोव्यातील एकूण साधारण ४५० मंदिरांपैकी, ५०च्या आसपास मंदिरे सारस्वतांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. उर्वरित ४००हून अधिक मंदिरे ही बहुजन, क्षत्रिय मराठा, दैवज्ञ (शेट), देसाई आणि इतर हिंदू समुदायांची आहेत. या सर्व मंदिरांमध्ये तोच ’मझानिया’ नियम लागू होतो आणि ज्या कुळांनी/कुटुंबांनी मंदिराची स्थापना किंवा पुनर्स्थापना केली, त्यांच्याकडेच प्रशासकीय हक्क (महाजनकी) राहतात. त्यामुळे, तो अन्य लोकांवर, जातींवर अन्याय आहे, अशी भूमिका मांडणे व त्याचे सार्वत्रिकीकरण, सरसकटीकरण करणे चुकीचे आहे. 

काही देवस्थानांच्या महाजनकीत व जमिनींत स्वजातीयांची नावे घुसडण्याचे काम सारस्वतांनी केले आहे, यात काहीच वाद नाही. पण, तो नियम सरसकट देवळांसाठी लावणे चुकीचे ठरेल. प्रत्येक देवस्थान सुटे सुटे घेऊन त्याचा अभ्यास करणे व मांडणी करणे गरजेचे आहे. कुलदेवतेची, ग्रामदेवतेची, स्थानदेवतेची, निसर्गदेवतेची व आधुनिक काळात बांधलेली इष्टदेवतेची मंदिरे अशी त्याची विभागणी करणे गरजेचे आहे. 

मंदिरांबाबत थेट ‘सारस्वतीकरण’ असा शब्द ज्यांना वापरायचा नव्हता, त्यांनी त्याला ‘ब्राह्मणीकरण’ म्हटले. त्यालाच पुढे ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले. त्यासाठी ढेरे, भागवत, कोसंबी यांचे दाखले दिले; ज्यांनी या सर्वांची विभागणी शोषक-शोषित या दृष्टिकोनातूनच केली. एकाच संस्कृतीची वेगवेगळी रूपे अशी त्याची वास्तविक मांडणी त्यांनी केली नाही. त्यामुळे, आता ज्याला ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले जाते ते कुठल्या तरी उपर्‍या संस्कृतीने केलेले आक्रमण आहे, अशा पद्धतीने ते मांडले जाते. साम्यवादी, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी जी पाचर मारली, तीच आता पुढे मंदिरे तोडण्यात आणि फोडण्यात उपयोगी पडत आहे. ज्या ‘सांतेर’ या निसर्गदेवतेची मूर्ती आधुनिक काळात झाली, ती कुणी केली? बोडगिणीतल्या अमूर्त देवाला ‘राख रे बाबा’ म्हणत दिवा लावला जायचा, त्याचे मूर्तीरूप व देवस्थान कुणी केले? 

जसे ग्रामीण भागाचे शहरीकरण होताना जे जे बदल होते गेले, तसेच बदल निसर्गदेवतांचे मूर्तीत रूपांतरण होत गेले. जशी त्याची मांडणी केली जाते, तसा हा नंतर आलेल्यांनी आदिवासींवर केलेला अन्याय नव्हता. सांगायचेच झाले तर ज्याला आदिवासींचे मूलस्थान म्हणतात तिथे सांतेर नाहीच. तो एक वेगळा स्वतंत्र व वादाचा विषय आहे. त्याची मांडणी पुढे कधी तरी करेन. 

‘ब्राह्मणीकरण’, ‘संस्कृतीकरण’ हा विचार आता एका घातक वळणावर पोहोचलेला आहे. चर्च, मिशनरि यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. ती संस्कृती वेगळी, भिन्न व मूर्तीभंजनाचा जगभर इतिहास असलेली संस्कृती आहे. तिला अन्यायकारी, अत्याचारी म्हणायचे असेल तर मग रोईण किंवा वारूळरूपी सांतेर देवतेची मूर्ती झाली, भट व मंत्र आले यालाही अन्याय, अत्याचार म्हणा अशी ‘समांतर रेषा’ आखली जात आहे. एखादा वकील ‘तू करतोस तेच त्याने तुझ्या पत्नीसोबत केले याला बलात्कार म्हणावयाचे तर तू जे आपल्या पत्नीसोबत करतोस, त्यालाही बलात्कार म्हणावे लागेल’ असा तर्क देऊ लागला तर ते जितके अभद्र असेल तितकेच हेही आहे. 

प्रत्येक देवळाचा स्वतंत्र व वेगळा अभ्यास करून, त्यांची वर्गवारी करून नंतर एखाद्या विधानावर येणे योग्य ठरेल. ‘आदिवासींवर अत्याचार’ अशा पद्धतीने जे सरसकटीकरण केले जाते व त्यातून ख्रिश्‍चनिटीचे अत्याचार सौम्य करण्याचे प्रकार थांबलेच पाहिजेत. जे अशा विचारसरणीला पुढे ढकलतात, ते स्वत: दरवर्षी जांबावलीला जाऊन गुलाल उधळतात, हे लक्षांत घेतल्यास त्यामागचा ‘समाजवाद’ही कळतो. अशांनाच विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ वाटतो आणि बुद्धमंदिर पाडून विठ्ठलाचे मंदिर उभारल्याचा साक्षात्कारही होतो. 

देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक जबाबदारीसाठी आहे, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात सुरू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग, ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते अन्याय-अत्याचार यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, जबाबदारीची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील!


मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

लिखित पुरावा नाही, म्हणजे घडलेच नाही?

वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत. पण, कधी तरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे? त्याचप्रमाणे हात कात्रो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. लोकांच्या स्मरणात नावे त्या जागी घडलेल्या घटनांवरून भीतीने पडतात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.
गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना 'मानशीर', 'बानार' असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले तर कुणीही ऐकून घेणार नाही. वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत. पण, कधी तरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे? त्याचप्रमाणे हात कात्रो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्या जागी घडलेल्या घटनांवरून व त्याची जबरदस्त भीती बसल्याने लोकांच्या स्मरणात त्या संदर्भातील नावे घट्ट राहतात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.

पेलोरिनो नोव्हो (Pelourinho Novo) हा खांब एका प्राचीन हिंदू देवळाचा भाग होता. स्तंभाच्या खालच्या भागावर कन्नड लिपीत "दयादंन्या" असे लिहिलेले आहे. हा शिवालयाचा खांब असावा. आता देवळाचा खांब पेलोरिनो नोव्हो कसा झाला याबाबत कुणीही सांगत नाही. देऊळ पाडून राहिलेल्या खांबाजवळ उभे राहून फर्माने देत असतील की शिक्षा देत असतील, हा तर्काचा भाग आहे. त्यातही पुन्हा पेलोरिनो वेल्हो (Pelourinho Velho) हा जुना स्तंभ बाजारपेठेजवळ होता.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा; पेलोरिनो नोव्हो नावाचा स्तंभ फक्त गोव्यातच होता का? नाही. दमण, दीव व कोचिन येथेही असे स्तंभ होते. पण, त्या स्तंभांना अशी शिक्षा दिल्याचा, जाळल्याचा, हात कापल्याचा संदर्भ असलेले नाव तिथे प्रचलित नाही. हात कातरो असे नाव फक्त गोव्यातच आहे. का? कारण तिथे फक्त आदेशच जाहीर केले जायचे व येथे हात कापले जायचे.

सोमनाथचे मोठे शिवलिंग फोडले, तोडले व त्याचे तुकडे दिल्लीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांवर बसवले. का? येता जाता त्याला तुडवावे म्हणून. का? तर काफिरांविषयी व त्यांच्या देवांविषयी असलेली आत्यंतिक घृणा. तीच घृणा त्या पंथाचे नसलेल्यांविरुद्ध बाळगणारे ख्रिश्चन व पोर्तुगीज पाडलेल्या स्थानिकांच्याच देवळाच्या खांबाला बांधून स्थानिकांनाच शिक्षा देतील, हात कापतील की कायदेशीर व्यवहारांच्या आणि अधिकृत शासकीय घोषणा देतील याचा विचार तर्काने करावा लागतो.

सगळेच लिहिलेले नसते. लिहिलेले नाही, म्हणजे तसे झालेच नाही असे होत नाही.