आपली सनातन, वैदिक, हिंदू संस्कृती ही जगातील अनेक निसर्गपूजक संस्कृतींपैकी बहुधा एकमेव जिवंत संस्कृती आहे. आपली संस्कृती का टिकली, याचा विचार करताना जगातील संस्कृती कशा संपल्या, हे समजणे आवश्यक आहे. ते समजले, की मग ‘मिश्र संस्कृती’, ‘एकाच वेळी अनेक संस्कृती भारतात नांदत होत्या’, ‘गंगा-जमना तहजीब’, ‘विविधता मे एकता’, ‘सांस्कृतिक संलयन’ ही सगळी थोतांडे उघडी पडतात.
आपली ही निसर्गपूजक संस्कृती संपूर्ण भारतात एकच आहे; फक्त जागा, परिस्थिती, जीवनशैली याप्रमाणे त्यात बदल आहेत व ते स्वाभाविक आहेत. जे जंगलात राहणारा निसर्गात पाहतो, तेच नागरी भागात राहणारा गणपतीच्या मूर्तीत व वर बांधलेल्या माटोळीत पाहतो. निसर्गाची प्रत्येक तत्त्वे व नियम जे निसर्गाच्या एकदम जवळ असलेल्यांना समजले, सृष्टीच्या त्याच नियमांना ‘ऋत’ म्हणत वेदांत वैचारिक बैठक देण्यात आली. तत्त्वांचा आचरणात आणावे व ते टिकून राहावे म्हणून ऋषींनी दिनचर्येत नियम घालून दिले. ऋत व तत्त्व यांना जीवनाच्या प्रत्येक अंगाशी जोडले. साधे उदाहरण देतो; लग्नकार्यात देवक बसवताना प्रत्येक घराण्याचा एखादा वृक्ष किंवा वनस्पती पुजण्याची पद्धत आहे. अगदी जंगलात राहणारा हिंदू जे करतो, तेच नगरात राहणारा हिंदू करतो; कारण संस्कृती एकच आहे, ती जपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. संस्कृती वेगवेगळ्या नाहीत, संस्कृती एकच आहे. सांतेर म्हणून जे वारूळ पुजले जाते ते वास्तविक त्या वारुळाच्या मातीचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. रक्त थांबवण्यासाठी शीर बंद करणे आणि दर्भ, मुंज, अश्वत्थ (पिंपळ), अर्जुन, अरुंधती, तेजना, लाक्षा (लाक), आणि वंश (बांबू) वनस्पतींसोबत वारुळाच्या मातीचे लेपन करावे असे अथर्ववेदातील आस्रावभैषज्य सूक्तात आहे. आज आपण देवावर पत्री म्हणून मिळेल त्या झाडाची पाने वाहतो; प्रत्यक्षात त्यांची नावे वाचल्यास त्या सर्व वनस्पती आहेत. ज्यांचे रक्षण नागर भागात राहणार्यांसाठी या मार्गाने करण्याची रीत ऋषींनी घालून दिली. जे ऋषींनी सांगितले ते ते सर्व कृषीत उतरले आहे. वेदांत एकही ऋचा किंवा मंत्र निसर्गाविरुद्ध नाही. जे निसर्गात राहून माणूस जपायचा तेच यज्ञातून जपले गेले, तेच मूर्तीपूजेतून जपले जाते. वडाची पूजा हे काही नवर्याचे सात जन्मांचे बुकींग नाही; पण ते कर्मकांड आहे, म्हणून हजारो वर्षे वृक्षांचे जतन झाले. जातवार देवांची विभागणी केल्यानंतर इतर लोक कुठे देवचार, खेत्री, सिद्ध, ब्रह्मा पुजतात असा प्रश्न आदिवासी व अन्य समाज यातील भेदभाव दाखवण्यासाठी विचारला जाऊ लागला. कुळागरे व शेती असणारे ब्राह्मणदेखील देवचारा रोट ठेवतात. सिद्धा, ब्रह्मा यांची पूजा बांधतात, हे विचारात घेतले नाही. एका व्यवसायातले, एका भागातले, एका समाजातले लोक सर्वसाधारण एकाच पद्धतीची निसर्गपूजा करतात. कारण ते एकाच संस्कृतीचे पाईक आहेत.
एकाच वेळी एकाच संस्कृतीचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मार्गाने आपली संस्कृती जतन करतात हे सांगण्याऐवजी सगळ्या साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी विचारवंतांनी हे सांगायला सुरुवात केली, की आदिवासी इथले मूळ निवासी आहेत. त्यांच्यावर सांस्कृतिक व भौगोलिक आक्रमण झाले. त्यांच्या लोकदैवतांचे वैदिकीकरण झाले. आता तर त्यासाठी अनेक दृष्टींनी सोयीचा असलेला ‘ब्राह्मणीकरण’ असा शब्द वापरला जातो. याची सुरुवात ख्रिश्चन मिशनर्यांनी केली असली तरी त्याचा प्रचार व प्रसार कोसंबी, ढेरे, बाबर, मांडे, भागवत यांसारख्या साम्यवादी, समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी केली. त्यांना थेट त्या वैचारिक धारणेत न ढकलता आजकाल ‘समन्वयवादी’ म्हटले जाते. यातल्या कुणालाच ही संस्कृती एकच आहे, हे माहीत नव्हते का? निश्चितच होते. पण, या एकाच संस्कृतीचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी होणारे पालन त्यांनी ‘शोषक’ आणि ‘शोषित’ या चष्म्यातून पाहिले. संस्कृती एकच आहे, असे म्हटले तर त्यांच्या विचारधारेस बाधा येत होती, हे त्यांना नेमके ठाऊक होते.
जगात सर्वत्र आपल्यासारख्या ज्या निसर्गपूजक संस्कृती होत्या त्या त्यांच्यातले कच्चे दुवे शोधून संपवण्यात आल्या. काही ठिकाणी निसर्गपूजा व्हायची; - सूर्यमंदिरे अनेक ठिकाणी होती - पण, सर्वांजवळ आपल्या संस्कृतीत आहे तशी एकसंध वैचारिक बैठक तेवढी प्रगल्भ नव्हती.
‘जेव्हा मिशनरी आफ्रिकेत आले, तेव्हा त्यांच्याकडे बायबल होते आणि आमच्याकडे जमीन होती. ते म्हणाले, ’चला आपण प्रार्थना करूया.’ आम्ही आमचे डोळे मिटले. आणि जेव्हा आम्ही डोळे उघडले, तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्याकडे आमच्या जमिनी होत्या’, असे जे डेस्मंड टूटो म्हणतात तो एक प्रकार झाला.
भारतात त्यांनी वापरलेला व प्रभावी ठरलेला मार्ग म्हणजे 'आर्यन इन्व्हेजन'. ते खोटेच होते व ते आता सिद्ध होऊ लागले तशी तेच 'आर्यन मायग्रेशन' म्हणून खपवले जात आहे. शिक्षणातून असे काही बुद्धिभेद पेरले, की त्यानंतरच्या अनेक विचारवंत त्यातूनच जन्मले. तोच वारसा पुढे साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी आणि कल्चरल मार्क्सवाद्यांनी त्याहीपेक्षा जास्त प्रभावीपणे वापरला.
आपल्या संस्कृतीविषयी अभिमान जागृत व्हावा, अशी कुठलीच सोय शिक्षणपद्धतीत अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नव्हती. उलट जिथे कुठे भेद करता येईल तिथे तो करण्याची आणि वाढत ठेवण्याची पुरेपूर सोय होती. मुसलमानी आक्रमणे झाली तेव्हा ती तलवारीच्या जोरावर इस्लामीकरणापुरती मर्यादित होती. त्यात मुसलमान हो, मर किंवा काफिर राहण्याचा कर दे इतका तो सरळ मामला होता. चर्च किंवा ख्रिश्चनिटी यांनी सुरुवातीस जगभर तेच केले. पण, जगभरातला अनुभव व भारतातला अनुभव यात त्यांना खूप फरक आढळला. इथे केवळ निसर्गपूजा नव्हती तर किमान पंधरा ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीपासून चालत आली वैचारिक बैठक होती. संस्कृती वैचारिक बैठक जेव्हा समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात झिरपते तेव्हा तिला नष्ट करणे सोपे नसते. ती नष्ट करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात.
म्हणून परस्पर पूरक व परस्परांवर अवलंबून असलेल्या जातींना एकमेकांविरुद्ध उभे केले. त्यांची सामाजिक उतरंड व उच्चनीचतेचे वैचारिक भेद उत्पन्न केले. त्यासाठी असलेल्या कारणांचा यथेच्छ वापर करण्यात आला. जिथे वैयक्तिक राग होता तो जातिगत रागात कसा परिवर्तित होईल व तो कसा फुलत राहील याची व्यवस्थित सोय मिशनर्यांनी केली. त्याच्यातला राजकीय सामाजिक लाभ ज्यांना समजला त्यांनी तेच हत्यार स्वातंत्र्यानंतरही वापरले. आदिवासी हे हिंदू संस्कृतीचाच भाग आहेत, हे पूर्णपणे माहीत असूनही केवळ मिळणारे लाभ, सुविधा हातच्या जाऊ नयेत म्हणून तसे विचार पसरवले जातात. जे खरोखरच आपली संस्कृती नाही, त्यांना ‘गंगा-जमना तहजीब’, ‘विविधता मे एकता’ आणि ‘मिश्र संस्कृती’ म्हणून हेच वैचारवंत पुढे करतात. जे एकाच संस्कृतीचे आहेत, त्यांच्यात भेद करायचा आणि जे नाहीत त्यांना मिश्र संस्कृती म्हणत एकत्र आणायचे, हा उद्योग हे विचारवंत करतात. जातिभेद संपवण्याच्या नावाखाली राजकारणी तोच पोसतात. जात ही ज्या संस्कृतीची आणि धर्माची(रिलिजन नव्हे) ओळख नाही, तिला मोठे करून यांनी अन्याय केला, त्यांनी वंचित ठेवले वगैरे म्हणत तेच काम करतात. इतकी वर्षे अन्याय केला म्हणत तो निस्तरण्यासाठी पुन्हा तोच अन्याय करतात आणि त्याला ‘सामाजिक न्याय’ म्हणतात. राज्यघटना केवळ हिंदू धर्मात बदल करण्याची मुभा देते. त्याचा अर्थ एक तर हिंदू संस्कृतीत व धर्मात बदल करण्याची गरज आहे, ती परिपूर्ण नाही जशी ख्रिश्चनिटी व इस्लाम आहे. न्यायव्यवस्थेसही जो भेदभाव हिंदू धर्मात दिसतो तो अन्य पंथांत दिसत नाही. आपली संस्कृती, धर्म संपवणे इस्लामला व ख्रिश्चनिटीला इतकी हजारो वर्षे प्रयत्न करूनही जमले नाही, ते काम आपल्या लोकशाहीचे तीनही स्तंभ प्रभावीपणे करत आहे. स्वयंघोषित चौथा स्तंभ तेच काम ‘चोवीस तास’ करत आहे. तरीही जिवंत असलेल्या संस्कृतीचा अभ्यास जाणिवेने, जिज्ञासेने व मुमुक्षू वृत्तीने केला नाही तर ही संस्कृती कधी ना कधी तरी संपेलच. अर्थात त्यासाठी आम्हीच जबाबदार असू.
स्वत:च्या संस्कृतीवर झालेले बलात्कार, सांस्कृतिक एकत्रिकरण म्हणून स्वीकारणारा हिंदू समाज हा जगातील एकमेव समाज आहे.






