गुरुवार, १८ जून, २०२६

हिंदू बहुत ही डरपोक कौम है!

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही!

'सत्य हिंदी' या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'बात बोलेगी' या कार्यक्रमात "हिंदू पहले से हिंसक थे या अब हो गए?"   या मथळ्याखाली एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार मुकेश कुमार सिंग यांनी 

प्रख्यात विचारवंत, लेखक, सामाजिक विश्लेषक आणि दिल्ली विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद झा यांची मुलाखत घेतली आहे.  यात अपूर्वानंद झा म्हणाले, 

“हिंदूंना इतके कट्टर झाले आहेत,  की हिंदूंच्या प्रत्येक घरातील हिंदू हा संभाव्य खुनी किंवा संभाव्य बलात्कारी आहे. प्रत्येक हिंदू प्रत्यक्षात किंवा स्वप्नांत एखाद्या मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करत असतो. आणि याला उचित मानले जाते. ”

मुकेश कुमार सिंग व अपूर्वानंद झा हे दोघेही डाव्या विचारांचे उदारमतवादी (हाही एक विनोदच आहे) आहेत. प्रतिकार करणारा हिंदू यांना कधीच नको. इतिहासातही जिथे जिथे प्रतिकार केला तिथे तिथे सुरुवात कुणी केली व प्रतिकार केलाच नसता तर काय झाले असते, हे कधी सांगितलेच जात नाही.  प्रतिकार केला नाही, तर "हिंदूंचा नरसंहार" असा शब्द वापरत नाहीत व केलाच "जातीय दंगली" असा शब्द वापरला जातो. 

नौखालीचा व काश्मीरचा हिंदू नरसंहार झाला कारण हिंदूंनी प्रतिकारच केला नाही! परिणामी नरसंहार व जीव वाचवण्यासाठी पलायन झाले. नौखालीत तर नोव्हेंबर १९४६ ते मार्च १९४७ या काळात गांधीजी उपस्थित असताना  हिंदूंचा नरसंहार झाला आहे. तो एकतर्फी असल्याने त्याला "जातीय दंगली" म्हणता येत नव्हते म्हणून इतिहासाच्या पुस्तकातून दाबून टाकण्यात आले. पाठ्यपुस्तकातही आले नाही व कधी शिकवलेच नाही. तिथे त्यावेळेस मुस्लीम जमावाने केलेल्या बलात्कारातून गरोदर राहिलेल्या महिलांना अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा सल्ला देताना गांधीजी म्हणाले,  

"जर एखाद्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग आला आणि ती स्वतःचा बचाव करू शकत नसेल, तर तिने दात आणि ओठ घट्ट दाबून मृत्यू पत्करावा" 

असा सल्ला देणारे गांधी त्यानंतर दिल्लीत झालेल्या प्रार्थनासभेत म्हणाले, 

"जर मुसलमानांनी सर्व हिंदूंना मारून टाकले, तरी हिंदूंनी हिंसेचा मार्ग पत्करू नये, तर शांतपणे मृत्यूला सामोरे जावे. जर त्यांनी असे केले, तर हिंदू धर्म अमर होईल आणि त्या बलिदानातून आपण एका नव्या भारताचा किंवा नव्या विश्वाचा उदय पाहू."

प्रत्येक हिंदू घरातील हिंदू कधीच हिंसक नव्हता व होणारही नाही. तो फार तर आपल्याच भावकीत कोर्टाच्या पायर्‍या झिजवून  वकिलांचे बंगले उभारण्यास मदत करेल. म्हणूनच "प्रत्येक हिंदू हिंसक, बलात्कारी झाला आहे" हे विधान राजकीय आणि इस्लामी कट्टरतेला, दहशतवादाला कव्हर देणारे संरक्षक कवच आहे. याविरुद्ध कुणी बोलणार नाही व त्याविरुद्ध काहीही होणार नाही. उलट, झुंडशाही सक्रिय होईल. मनुवादी, संघोटे, अंधभक्त वगैरे म्हणत हल्ला एक झुंड करेल व दुसरी झुंड मुस्लीम लांगूलचालन करणारे, गुलाम वगैरे म्हणत प्रतिहल्ला चढवेल. मूळ मुद्दा बाजूलाच राहील. जसा प्रत्येक हिंदू हिंसक व बलात्कारी नाही, तसाच प्रत्येक मुसलमान व ख्रिश्चनही नाही. तरीही हे नरसंहार का घडले, हा मूळ प्रश्नच बाजूला पडत आहे. ते घडले, घडत आहेत व घडत राहतील, म्हणून हिंदूंनी मुसलमानांचा, ख्रिश्चनांचा द्वेष करणे चुकीचे आहे. तसेच यामागचे मूळ कारण व भेद लक्षांत न घेता राज्यघटनेने सर्व पंथीयांना प्रचार व प्रसाराचा समान घटनात्मक अधिकार देणेही चुकीचेच आहे. वास्तविक प्रत्येक पंथ आणि राज्यव्यवस्था यांचा काही संबंध नसणे ही इहवादी भूमिका सोडून भारताने प्रत्येक पंथाला चुचकारणारी "सेक्युलर" व समाजवादी विचारसरणी स्वीकारली. सांस्कृतिक मार्क्सवादाला शिक्षण क्षेत्रावर अनिर्बंध सत्ता गाजवू दिली. 

ज्या विचारसरणीने इतिहासात हिंदूंच्या स्वसंरक्षणाच्या व प्रतिकाराच्या अधिकाराला नाकारले आणि त्यांना विनाकारण बळी पडू दिले, तीच विचारसरणी आज आधुनिक काळात हिंदू सण, परंपरा किंवा त्यांच्या स्वसंरक्षण करण्याच्या कायदेशीर अधिकारांना 'उग्र आणि हिंसक' ठरवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे. स्वत:ला "पॉलिटकली करेक्ट"  ठेवणारा हिंदू याला साधा वैचारिक प्रतिकारही करण्याच्या स्थितीत उरला नाही. त्यामुळे, ही वाळवी केवळ हिंदू समाजच नव्हे तर संस्कृतीही पोखरल्याशिवाय थांबणार नाही! 



गुरुवार, ११ जून, २०२६

गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली?

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे!

केलेले दावे सप्रमाण खोडून काढल्यानंतर तेच दावे पुन्हा चार पाच वर्षांनी करण्याची खोड असलेल्या उदय भेंब्रे यांनी ‘गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली’ केलेला हा दावा चुकीचा आहे. यातून त्यांनी ‘मराठी ही गोव्याबाहेरची भाषा’ हे सिद्ध करण्याचा खटाटोप केला आहे. 

संपूर्ण लेखात त्यांनी मांडलेले सिद्धांत दिशाभूल करणारे आहेत. २०१९साली राखीगडी संशोधनातून ‘सर्व भारतीयांचे पूर्वज एकच आहेत’ हे सप्रमाण सिद्ध झालेले असतानाही ते ‘प्रोटो-ऑस्ट्रोलॉइड’ सिद्धांत पुढे रेटतात. नाकाची लांबी, त्वचेचा रंग यावरून डिक्सननी मांडलेला व गुहा यांनी पसरवलेला सिद्धांत भेंब्रे मांडतात. आर्य आक्रमणाचा पूर्णपणे खोटा व मुद्दाम पसरवलेला सिद्धांत आता पटवून देता येत नाही, त्यामुळे शब्दांचे खेळ करत त्याला ‘आर्यन मायग्रेशन’ केले आहे. पण, त्याचा आधार घेतल्याशिवाय वर्गीकृत संघर्षाची बिजे पेरताच येत नाहीत. त्यामुळे, ‘आर्य उत्तरेतून आले’, असे ते मिशेल दानिनोचा संदर्भ देऊन सांगतात. ‘आर्य म्हणजे सारस्वत’ अशीही पुस्ती जोडतात. मुळात आर्य हा शब्द वंशवाचक, जातिसूचक नाही. हे ‘मायग्रेशन’ रेटण्यामागे एक फार मोठे कारण आहे. जसे सगळे गोव्यात ‘आले’ तसेच पोर्तुगीजही ‘आले’, हा सिद्धांत मांडून दोन गोष्टी साध्य केल्या जातात. एक या सर्वांची संस्कृती भिन्न आहे आणि दुसरी ख्रिश्‍चन अत्याचार सामान्य केले जातात. त्यातून ‘आदिवासींची मूळ संस्कृती  पहिल्यांना हिंदूंनी नष्ट केली व नंतर ख्रिश्‍चनांनी केली; त्यामुळे ख्रिश्‍चनांना दोष द्यायचा असेल तर तो हिंदूंनाही द्यावाच लागेल’, हा विचार रुजवता येतो. ‘सगळ्यांचे पूर्वज एकच होते, निसर्गपूजक संस्कृतीही एकच होती’, हा विचार मान्य केला तर शोषक आणि शोषित या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करता येत नाही. भेंब्रे यांनी मांडलेल्या ‘मायग्रेशन’ सिद्धांताप्रमाणे ‘सगळेच आले’, हे गृहीत धरले तर सर्वांत प्रथम आले ते फार तर, ‘आधीवासी’ (आधी येऊन राहिलेले) ठरतात; ‘आदिवासी‘ किंवा ‘मूलनिवासी’ नाही.  

भाषेचे गट पाडून त्याची फाडणी पुढे वांशिक गटापर्यंत करण्यात सगळ्या ब्रिटिश, मिशनरि भाषाविद्वानांनी यश मिळवले आहे. त्यांचे कार्य इमानेइतबारे समाजवादी, साम्यवादी व पुरोगामी विचारवंत पुढे नेत आहेत. उदय भेंब्रे यांनी कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ या महाराष्ट्रातून येऊन इथे स्थायिक झालेल्यांच्या यादीत इथले पद्देही बसवले आहेत. जर पद्दे नंतर आले तर ते गावकारीत कसे आहेत? जी भटी भाषा पद्दे बोलतात, ती मराठी आहे. याचाच अर्थ कोकणस्थ, कर्‍हाडे, कोकणस्थ व देशस्थ येण्याआधीपासूनच मराठी गोव्यात होती. कर्‍हाटमधून आलेल्या कर्‍हाड्यांची उपशाखा म्हणजे पद्दे हा युक्तिवाद ते कदाचित ते पुढील लेखात करतील. पण, तसे ते नाही. पद्दे जी मराठी बोलतात ती आणि कर्‍हाडे जी मराठी बोलतात, त्यात फरक आहे. जसा इथला वनवासी समाज गोव्यातलाच आहे, तसेच हे पद्देही गोव्यातीलच आहेत. वनवासींबाबत - ‘आदिवासी’ इथले ‘मूलनिवासी’ - हा विचार मांडताना त्यांच्याशिवाय गोव्यातील सखल, सागरी भागात कुणी राहतच नव्हते, असे म्हणणे पटत नाही. 

लिखित साहित्याचा विचार केला तरीही कोकणीपेक्षा मराठीमध्ये साहित्य विपुल प्रमाणात होते. ते ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी, पोर्तुगिजांनी नष्ट केले. तरीही प्रशासकीय दस्तऐवज मराठीतूनच होते. तेव्हाही गोमंतकीयांची मुख्यत्वे बोलण्याची भाषा कोकणी व लिहिण्याची भाषा मराठी होती. सारस्वतांकडून स्टीफन्सने कोकणी भाषेची रचना शिकून घेतली व ’आर्ते दा लिंगाओ कॅनारिम्’ हे कोकणीचे पहिले व्याकरण लिहिले. भाषेची व्याकरण लिहिण्याएवढी समृद्धता असतानाही त्याने ‘ख्रिस्तपुराण’ कोकणीतून का लिहिले नाही? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कोकणीत छंदोबद्ध, ओवीबद्ध लिखित साहित्य त्यावेळेस उपलब्ध नव्हते व तेवढी शब्दसंपदाही त्यावेळेस उपलब्ध नव्हती. भेंब्रे म्हणतात तसे,  ‘एका ब्राह्मणाने विनंती केली म्हणून मग फादर स्टीफन्स याने मराठीत ख्रिस्तपुराण लिहिले’, केवळ यामुळे नव्हे. स्टीफन्सबद्दल लिहिताना ‘तो मराठीही शिकला, हे नंतर कळून येते’ हे  वाक्य मखलाशीचा उत्तम नमुना आहे. 

ख्रिश्‍चन प्रसारासाठी चर्चमधून कोकणीतून प्रवचने दिली जात असत. ती वाचता यावीत, समजावीत म्हणून पूर्णपणे शुद्ध कोकणी भाषेतील ’डोक्ट्रीना क्रिस्ता’सारखी पुस्तके रोमन लिपीत लिहिली गेली. बहुतांश लोकांना मराठीची वा कोकणीची देवनागरी, गोंयकानडी (किंवा कांदवी)  व मोडी लिपीही माहीत नव्हती तिथे रोमन लिपीत लिहिलेले कोकणी पुस्तक वाटून काहीही लाभ नव्हता. ते पुस्तक मिशनरि शिक्षकांसाठी होते. कोकणीत बोलता यावे, यासाठी रोमन लिपीतून लिहिलेले कोकणी साहित्य होते. मौखिक कोकणी त्यांना ख्रिस्तप्रसारासाठी, संपर्कासाठी महत्त्वाची होती. कोकणीचे एवढे महत्त्व वाटत असते, तर त्यांनी तेच देवनागरीत किंवा मोडीत लिहिले असते. स्टीफन्सनंतरही जे साहित्य लिहिले गेले ते सामान्य लोकांसाठी नव्हते, ते पाद्रींनी कोकणीतून प्रवचने देता यावीत यासाठी रोमन लिपीत लिहिलेले साहित्य आहे. त्यात कोकणीची महत्तता जराही सिद्ध होत नाही, उलट चर्चची उपयुक्तता सिद्ध होते. ‘आदिवासींनी कोकणी आणली’, हा विचार ‘मूळ आदिवासींची भाषा संथाली, मुंडारी, खासी होती’ या विचारला छेद देणारा आहे. 

सचिन मदगे यांनी सप्रमाण चुकीचे ठरवूनही नंतर चार वर्षांनी पुन्हा पूर्वी मारलेल्या त्याच ऐतिहासिक लोणकढी थापांसारखाच ‘मराठी गोव्याची भाषा नाही’, हे सिद्ध करण्याचा उदय भेंब्रेंचा हा प्रयत्न आहे. मराठी ही कुठल्याही ब्राह्मणांनी बाहेरून आणलेली भाषा नाही. मराठी ही गोव्याचीच भाषा आहे! 


रविवार, ३१ मे, २०२६

आदिवासी की वनवासी?

शब्दांना अर्थ असतो म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत राहतात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे जो पाश्‍चिमात्त्य विद्वानांनी मुद्दाम योजला. हा शब्द भारताच्या प्राचीन वाङ्मयात नाही. इतकेच कशाला इथल्या मूळ म्हणून सांगितल्या जातात त्या मुंडारी व ऑस्ट्रिक भाषांतही तो नाही. भारतातील जंगलात राहणारे आणि मैदानी भागात राहणारे लोक वेगवेगळ्या वंशाचे व संस्कृतीचे आहेत, असा विचार पेरायला पाश्‍चिमात्त्य विद्वान व मिशनरि यांनी सुरुवात केली, त्यातून योजलेला शब्द म्हणजे ‘आदिवासी’.

शब्दांना अर्थ असतो म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत राहतात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे जो पाश्‍चिमात्त्य विद्वानांनी मुद्दाम योजला. हा शब्द भारताच्या प्राचीन वाङ्मयात नाही. इतकेच कशाला इथल्या मूळ म्हणून सांगितल्या जातात त्या मुंडारी व ऑस्ट्रिक भाषांतही तो नाही. भारतातील जंगलात राहणारे आणि मैदानी भागात राहणारे लोक वेगवेगळ्या वंशाचे व संस्कृतीचे आहेत, असा विचार पेरायला पाश्‍चिमात्त्य विद्वान व मिशनरि यांनी सुरुवात केली, त्यातून योजलेला शब्द म्हणजे ‘आदिवासी’. 

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात ’ॲबओरिजिनल्स’,  ’इंडिजिनस’ अशी संकल्पना होती, कारण तिथे युरोपियन लोकांनी बाहेरून जाऊन स्थानिक लोकांना व संस्कृतीला संपवले होते. भारतात तशी परिस्थिती नव्हती. येथील सर्वांचे पूर्वज व संस्कृती एकच होती. परंतु, ब्रिटिश प्रशासकांनी आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पाश्चात्त्य सिद्धांतांची हुबेहूब नक्कल करून भारतामध्येही ’मूळ रहिवासी विरुद्ध नंतर आलेले आक्रमक’ असा चुकीचा विखार पेरला. त्या ’ॲबओरिजिनल्स’ शब्दाचे व त्याच्या अर्थासह संकल्पनेचे भारतीय रूप म्हणजे ‘आदिवासी’ व ‘मूलनिवासी’. 

’आदिवासी’ हा शब्द पहिल्यांदा १९३०च्या दशकात (साधारण १९३० ते १९३५ दरम्यान) अधिकृतपणे वापरात आला. प्रसिद्ध समाजसुधारक ठक्कर बाप्पा यांनी १९३०च्या दशकात जंगलात आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी सामूहिकरीत्या ’आदिवासी’ (आदि = सुरुवातीचे, वासी = रहिवासी) हा शब्द पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर प्रचलित केला. त्याच काळात आजच्या झारखंडमधील (तेव्हाचा बिहार) ’छोटा नागपूर’ भागातील वनहक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी हा शब्द स्वीकारला. त्यातून ’आदिवासी महासभे’चा उदय झाला. ’आदिवासी महासभे’चे नेते जयपाल सिंह मुंडा यांनी राज्यघटनेत ’आदिवासी’ हा शब्द वापरण्याची मागणी केली होती. परंतु, घटनासमितीने ती नाकारली. ठक्कर व मुंडा हे दोघेही आदिवासी शब्द वापरत असले तरी त्यांच्यात एक वैचारिक फरक होता. आदिवासी हे हिंदू संस्कृतीचाच भाग असल्याचे ठक्करबाप्पांचे मत होते, ‘आम्ही हिंदू नाही आणि कधीच नव्हतो’, मुंडा यांचे मत होते. आदिवासींना बळजबरीने हिंदू ठरवणे किंवा त्यांच्यावर हिंदू रितीरिवाज लादणे म्हणजे आदिवासींची मूळ निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणे असे मुंडांचे म्हणणे होते. मुंडा हे आदिवासी होते, हे सांगितले जात असले तरी ते मिशनरि संस्कृतीत वाढलेले ख्रिश्‍चन होते. ख्रिश्‍चन पंथाने जगभर निसर्गपूजक संस्कृती संपवल्या हे मुंडा यांना माहीत नव्हते काय? निश्‍चितच व चांगलेच माहीत होते. तरीही स्वत:स ख्रिश्‍चनिटीपासून दूर न करता त्यांनी कायम वनात, जंगलात राहणाऱ्यांना निसर्गपूजक हिंदू संस्कृतीपासून तोडण्याचे काम केले. 

वनात राहणारे, जंगलांच्या पायथ्याशी राहणारे, सखल किंवा मैदानी भागात राहणारे व समुद्रकिनारी राहणारे यांत भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वागण्याबोलण्यात भेद आहेत; पण त्यांची संस्कृती एकच आहे. हिंदू ही जगातली एकमेव जिवंत निसर्गपूजक संस्कृती आहे. सगळ्या धारणा, विचार, सण, उत्सव, संकेत हे एकाच निसर्गपूजक संस्कृतीतून आलेले आहेत. राखीगढीच्या जनुकीय संशोधनात सर्व भारतीयांचे मूळ एकच असल्याचे व त्यात सातत्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, ना मानवी वेगळेपण आहे ना संस्कृतीचे वेगळेपण आहे; भेद आहे तो त्याच्या भौगोलिक रचनेनुसार आलेला फरक आहे. हेच फरक, संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधून, ते मोठ्या करून संपूर्ण जगातील  निसर्गपूजक संस्कृती नष्ट करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला भारतात ते का पूर्णपणे जमले नाही? त्यामागे मुख्य कारण म्हणजे तात्त्विक व वैचारिक बैठक. ज्या निसर्गपूजक संस्कृती संपल्या ते केवळ निसर्गपूजक होते, त्यामागचा विचार विभिन्न स्तरावर मौखिक किंवा लिखित स्वरूपात रुजला नव्हता. आपली संस्कृती टिकून राहिली कारण आपल्याकडे ती वैचारिक बैठक होती व अजूनही आहे. 

ही वैचारिक बैठक नष्ट करण्यासाठी खूप कष्ट लागतात, सातत्य लागते आणि शेकडो वर्षे द्यावी लागतात. त्यांची ती तयारी होती. म्हणून त्यांनी भाषेची वर्गवारी केली व तिला वांषिक वर्गवारीपर्यंत आणून जोडले. त्यातूनच अशी स्थानिक माणसे शोधून काढली व वाढवली जी हा भेद मोठा करत राहतील. अशा लोकांना जातीय, सामाजिक अस्मिता यांचे प्रतीक बनवले. त्यामुळे, आता त्यांना विरोध म्हणजे समाजाला, जातीला विरोध ही भावना दृढ झाली. जे वनवासी लोकांबाबत केले गेले, तेच आर्य-द्रविड, दलित-सवर्ण(तथाकथित) आणि शीखांबाबतही केले गेले. परिणामी सगळे हिंदू संस्कृतीपासून स्वत:ला वेगळे सिद्ध करू लागले. 

ब्रिटिश राजवटीत जेव्हा संथाल परगणा आणि छोटा नागपूर भागात नवीन जमीन महसूल व्यवस्था (कायम धारा पद्धत) लागू झाली, तेव्हा जंगल व जमिनी बळकावण्यासाठी बाहेरून लोक आले. यामध्ये हिंदू जमीनदार आणि सावकार (महाजन) जसे होते, तसेच मुस्लिम व्यापारी, ब्रिटिश अधिकारी आणि नंतर आलेले ख्रिश्चन मिशनरीसुद्धा होते. या सर्वांसाठी ‘दिक्कू’ हा शब्द वापरात आला. जर निसर्गपूजक संस्कृतीवर हिंदू संस्कृतीने आक्रमण केले असते, तर हा शब्द हजारो वर्षांपूर्वीच यायला हवा होता. पण, तो आधुनिक आहे. यावरूनच ‘हिंदू संस्कृती लादली’ हा विचार टिकत नाही. संथाली आणि मुंडारी भाषेत स्वतःच्या समूहाला ’होर’ किंवा ’होडोपोन’ (माणूस किंवा मानव) म्हणतात. द्रविडी भाषांत डोंगरावर राहणाऱ्यांना ’मळैवासी’ (डोंगरावरील रहिवासी) किंवा ’कुळ’, तर जंगलात राहणाऱ्यांना ’काडूवासी’ (वनात राहणारे) म्हटले जायचे. ऑस्ट्रिक (मुंडा) भाषा समूहातील (उदा. संथाली, मुंडारी, हो) लोक स्वतःला किंवा इतरांना ओळखण्यासाठी ‘आदिवासी’सारखा कालवाचक शब्द (आधी-नंतर) कधीच वापरत नाहीत. द्रविड भाषांमधील मूळ शब्दमूळ प्रोटो-द्रविड किंवा प्राचीन तमिळ, कन्नड, तेलुगू भाषांमध्येही ’आदिवासी’ या संकल्पनेला समांतर शब्द नाही. 

’वनवासी’ हा स्थानवाचक शब्द ’स्थान’ किंवा ’भूगोल’ दर्शवतो. याचा अर्थ होतो-’जंगलात किंवा वनात राहणारे’ . हा शब्द कुठेही कोण आधी आले आणि कोण नंतर आले हा काळाचा किंवा वंशाचा भेद करत नाही. तो संपूर्ण भारतीय समाज हा एकच आहे आणि त्यातील काही लोक वनात राहतात, हे सत्य हा शब्द स्पष्ट करतो. ’आदिवासी’ हा कालवाचक किंवा आक्रमण सूचक ओळख सांगणारा शब्द आहे. ’आदि’ म्हणजे सर्वात पहिले. हा शब्द वापरल्याने नकळतपणे एक असा संदेश जातो की, हे लोक ’पहिले’ आहेत आणि बाकीचे सर्व हे ’नंतर आलेले’ किंवा ’बाहेरचे’ आहेत, ही एकाच संस्कृतीच्या लोकांमध्ये ’परकेपणाची’ भावना निर्माण होते. एका प्रदेशात, एका कालखंडात फक्त ‘आदिवासी’च राहत होते व अन्य कुणीच नव्हते, हे न पटणारे आहे. 

या सगळ्यात एक अत्यंत घातक विचार रुजवला जातो. तो म्हणजे इस्लामी व ख्रिस्ती विचार रुजवण्यासाठी जे अत्याचार करण्यात आले, त्यांना सामान्य करणे किंवा नाहीसे करणे यासाठी. ख्रिश्‍चनांना व मुसलमानांना दोष द्यायचा असेल तर हिंदूंना तो स्वत:लाही द्यावा लागेल; कारण आदिवासींना पहिल्यांदा हिंदू करण्यात आले, नंतर मुसलमान किंवा ख्रिश्‍चन. सगळेच बाहेरून आलेले, सगळ्यांनीच आमच्यावर अन्याय केला, हा घातक विचार रुजवला जातोय. त्यासाठी तेव्हा योजलेला ‘आदिवासी’ शब्द आता अत्यंत उपयुक्त व साहाय्यक ठरतोय. त्यामागचा अर्थ व हेतू आता फलद्रूप होत आहे. 


मंगळवार, २६ मे, २०२६

मराठीला गोव्याची राजभाषा का करायची?

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल.
राजभाषा म्हणून जे काही मिळायचे, ते मराठीलाही मिळते मग मराठीला गोव्याची राजभाषा का करायची, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. गोव्यातली मराठी खूप प्राचीन आहे, तिला लिखित व मौखिक दोन्ही परंपरा आहेत, हे सत्यच आहे. ‘राजभाषा’ ही मुख्यत: लिखित स्वरूपात वापरली जाणारी शासकीय भाषा या अर्थी तिचा वापर होतो. राजभाषेचा संबंध बोलण्याशी कमी व लिहिण्याशी आणि लिहिलेले वाचण्याशी अधिक येतो. या निकषावर पाहिल्यास मराठी राजभाषा होण्यात कोणतीच अडचण नाही. कोकणी ही बोलण्याची आणि मराठी ही लिहिण्यावाचण्याची भाषा आहे, याबद्दल कुठल्याच गोमंतकीयाच्या मनात कसलीच शंका नाही. सर्वाधिक लिहिली व वाचली जाणारी स्थानिक भाषा असूनही तिला राजभाषा न करणे, हा मराठीवर केलेला अन्यायच आहे. त्याहीपेक्षा, मराठीचा गोव्याच्या अस्मितेशी असलेला संबंध नाकारणे हा जास्त मोठा अपमान आहे. आम्हीच केलेली आमच्याच भाषेची ती अवहेलना आहे.

मराठी ही महाराष्ट्राची व कोकणी ही गोव्याची, असे सरळ ‘एक घाव दोन तुकडे’ केले जातात. पण, थोडे बारकाईने पाहिल्यास गोव्यातील मराठी व महाराष्ट्रातील मराठी यात बराच फरक आहे. साधे उदाहरण द्यायचे झाल्यास, मराठी भाषिक गोमंतकीय कधीच ‘नारळाचे झाड’, ‘पोफळीचे झाड’ असे म्हणत नाही व लिहीतही नाही. तो सरळ ‘माड’ आणि ‘माडी’ असे शब्द वापरतो. स्थानिक असलेली अनेक फळे, भाज्या यांना कोकणीत व मराठीत समान शब्द वापरले जातात. स्थानिक भूमीशी संबंधित अनेक शब्द महाराष्ट्रातील मराठीस नवखे आहेत. गोव्याच्या मराठीतील अनेक शब्दांचे लिखित रूप व उच्चारण वेगवेगळे आहे. हे पाहता गोव्यातली मराठी ही गोव्याची अस्मिता नाही, असे कसे बरे म्हणता येईल? कोकणी व मराठी दोन्ही भाषा गोव्याच्या अस्मिता आहेत. 

मराठी राजभाषा केल्यास गोमंतकीयांच्या जागा महाराष्ट्रीय लोक हिरावून घेतील, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यासाठी एक सोपा उपाय आहे. नोकरीसाठी अर्ज करताना जे निवासाचे प्रमाणपत्र (रेसिडेन्स सर्टिफिकेट) घेतले जाते, त्यात ‘या व्यक्तीचे पूर्वज १९६१पूर्वी गोव्याचे निवासी होते’ हे प्रमाणित केलेले असणे अनिवार्य करावे. त्यासाठी तेर्म किंवा तेव्हापासून आजवरचा कालावधी गोव्यातच स्थायिक असल्याचा पुरावा घ्यावा. सरकारकडेच १९६३सालची जनगणना आहे, त्यालाच प्रमुख आधार बनवावे. याशिवाय जमिनीचे कागदपत्र, गावकारी-कोम्युनिदाद दस्तऐवज, पोर्तुगीज शासकीय कागदपत्रे वगैरेंचा आधार घेता येणे शक्य आहे. गाव हे एक लहान युनिट पकडल्यास त्यात कोण कुठून कधी आला होता, याची मौखिक परंपरा असते, त्याचाही आधार घेता येणे शक्य आहे. एकूण मूळ महत्त्वाचा मुद्दा काय, की केवळ मराठी राजभाषा झाली म्हणून महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी गोमंतकीयांचा हक्क हिरावून घेऊ नये. 

वास्को हे प्रातिनिधिक उदाहरण घेतल्यास एक दोन महिन्यात रेशन कार्डापासून आधारकार्डापर्यंत सगळी प्रमाणपत्रे करून देणारे अधिकारी गोमंतकीयच नव्हते का? तेव्हा नोकरीचा हक्क हिरावला जाण्याची भीती कुठे गेली होती? आजही नजीकच्या काळात गोव्यात आलेल्यांना व्यवसायाची सर्व सुविधा, कागदपत्रे बिनदिक्कत कशी मिळतात, हे एक उघड रहस्य आहे. मराठी राजभाषा झाल्याने होणाऱ्या कथित नुकसानापेक्षा हे प्रत्यक्षात झालेले व होत असलेले नुकसान खूप आहे. 

मराठीला राजभाषा करून करणार काय, हा एक प्रश्‍न असतो. हाच प्रश्‍न कोकणीबाबत, ‘राजभाषा होऊनही काय मिळाले?’ असा उपस्थित होतो. भाषा म्हणून विकास होण्याचा मार्ग खरे तर खुला झाला होता. पण, काही मोजक्या लेखकांचा पारितोषिकांनी भरलेला दिवाणखाना, या व्यतिरिक्त कोकणी भाषेची भरीव प्रगती अभावानेच आढळते. किती कोकणी लेखक भाषेसाठी कार्य करतात? व्याकरण, व्युत्पत्ती, कोश तयार करण्यासाठी किती लोक धडपडतात? भाषा म्हणून पाहायचे झाल्यास मराठीत जशी या गोष्टींची निरंतर परंपरा व एकवाक्यता आहे, तशी कोकणीत नाही. काही मोजकीच माणसे आहेत, जे मूळ कोकणी शब्द कोणते याचा शोध घेत गावोगावी जाऊन जुन्या पिढीतील लोकांशी संवाद साधतात. विस्मृतीत गेलेले किंवा वापरात नसलेले कोकणी शब्द व त्यांचे अर्थ शोधत हिंडतात. हे व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे. नवीन लेखक, वाचक घडवणे हा प्रस्थापित कोकणी लेखकांचा नित्यक्रम असला पाहिजे. मराठीत तसे प्रयत्न सातत्याने झाले आहेत व आजही होत आहेत. कोकणीस अजून बराच पल्ला गाठायचा आहे; तो गाठण्यासाठी वापरायची शक्ती मराठी राजभाषा होण्यापासून रोखण्यात वापरली जाते. 

कोकणी व मराठी हे दोन्ही गोमंतकीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. संस्कृती, अस्मिता यांचा उद्घोष करताना, मराठीला डावलणे कोकणीच्याही हिताचे नाही. मराठी राजभाषा झाल्याने स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणून तिचा योग्य सन्मान होईल. गोमंतकीय संस्कृतीत कोकणीसोबत मराठीचा जो मान आहे तो राखला जावा, यासाठी मराठी राजभाषा झाली पाहिजे. गोव्यात मराठीतून अधिक लिहिले, वाचले जाते म्हणून कोकणीचे आजवर काहीही नुकसान झाले नाही. तसेच मराठी राजभाषा झाल्यानेही कोकणीचे नुकसान होणार नाही. उलट, आपल्याच संस्कृतीच्या घटकाचा मान राखल्याचे समाधान मिळेल. 

सोमवार, २५ मे, २०२६

समता, समानता आणि भारत

संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून.

मागील काही लेखांमध्ये, ‘भारताची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सर्वांत यशस्वी ठरली ती ख्रिश्‍चनिटी’, असे म्हटले होते. आता त्याचे काही अन्य कंगोरे आणि परिणाम यावर विचार करू. संस्कृती, समाज आणि उद्योग यांचा नाश करण्यासाठी ‘समता व समानता‘ या दोन शस्त्रांचा वापर प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासक, युरोपीय विचारवंत आणि ख्रिश्चन मिशनरि यांनी पद्धतशीरपणे केला. 

ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी (निदान कॅलिको ॲक्ट होण्यापूर्वी तरी) केवळ व्यापार करण्यात स्वारस्य होते. म्हणून त्यांनी मिशनरिंवर बंदीस मान्यता मिळवली होती. त्यामुळे, डच राज्य करत असलेल्या सेरामपूर येथे मिशनरि कार्य सुरू झाले. इथेच समता व समानतेचे बीज रोवणारे ‘सेरामपूर त्रिकुट’ (विल्यम कॅरी, जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड) सक्रिय झाले. त्यांनी ‘देवासमोर सर्व माणसे समान आहेत’ हा खिश्‍चनिटीचा सिद्धांत (जो पाश्‍चिमात्य देशातही त्यावेळी लागू नव्हता) छापून पसरवला व शाळा उघडून शिकवायला सुरुवात केली. हेच कार्य अलेक्झांडर डफ या स्कॉटिश मिशनरीने केले व चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज या अँग्लिकन मिशनऱ्याने भारतातील गरिबांच्या आणि कामगारांच्या समान हक्कांसाठी बोलणे सुरू केले. थॉमस मेकॉले व हेन्री विवियन डेरोझिओ यांनी हे विषारी बियाणे इथे रुजेल अशी भूमी तयार केली. त्याला वैचारिक बैठक विल्यम जोन्स आणि मॅक्स म्युलर यांनी दिली. 

भारतीय समाजव्यवस्था पूरकता आणि परस्परावलंबित्व यावर आधारित होती. समाजाचा प्रत्येक घटक, अन्य घटकांस व समाजास पूरक आणि परस्परांवर अवलंबून होता. या प्रत्येक घटकाला कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव होती. समतेचा आणि समानतेचा उद्घोष करणारे आजचे विचारवंत जात ही व्यावसायिक ओळख होती, प्रत्येक जात इतरांना पूरक व्यवसाय करणारी होती आणि इतरांवर अवलंबून असणारी होती हे सांगत नाहीत. ते सांगितले तर विषमतेच्या आणि शोषक-शोषित या गृहीतकांना बाधा येते. जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा शेतसारा असायचा, तेव्हा उच्चनीचता कशी संभवते? याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. मग, ते कुणालाही कोणतेही काम करण्याची मुभा व सामाजिक प्रतिष्ठा याकडे वळतात. भारतीय समाजव्यवस्थेत प्रत्येकाला त्याच्या स्थानी, तेवढ्यापुरता मान होता. प्रत्येकाला आपापल्या जागी एक निश्‍चित आणि आदराचे स्थान होते. ज्यांना त्याकाळी अस्पृश्य व आजकाल ‘शोषित’ म्हटले जाते, त्यांनाही देवस्थानाच्या कार्यात, सण-उत्सवात मान होता. पण, तो प्रांगणापर्यंत होता, देवळात नव्हता. आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे, जातीचा व्यवसाय न करणाराही त्याच जातीचा उरणे. आचमनही माहीत नसलेला केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून ‘भट’ होतो व जन्मल्यापासून कधीही चामडे न सोललेला माणूस ‘चर्मकार’ होतो आणि त्या त्या जातीचे गुणदोष भोगतो. 

अस्पृश्यतेचा जन्म अतिशुचितेतून होतो. या अस्पृश्यतेची आजची वर्णनेही याच समतेच्या, समानतेच्या दृष्टिकोनातून आहेत. त्यांची घरे गावच्या वेशीजवळ असत किंवा मुख्य वस्तीपासून दूर असत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायाचे ठिकाण व निवासाचे ठिकाण एकच असणे. आजच्यासारखे दुकाने, कारखाने तेव्हा नव्हते; सुतार, कुंभार, लोहार, चर्मकार आपापली कामे घरीच करत असत. दुर्गंधी, स्वच्छता(हायजीन) या कारणांसाठी त्यांची घरे मुख्यवस्तीपासून दूर असत. त्यांचे शोषणच करायचे असते तर देवळाच्या प्रांगणात तरी प्रवेश का दिला असता? या व्यवस्थेमुळे प्रत्येक गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होता. संरक्षण व काही प्रमाणात न्याय, वगळता एकही गाव राजावर अवलंबून नव्हता. सत्ता कुणाचीही असली तरी फरक पडत नसे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समूहभावना जाज्वल्य होती.

प्रत्येक जातीला त्यांचे व्यावसायिक शिक्षण व कौशल्य घरीच शिकण्याची व्यवस्था होती. त्यामुळे, ‘शिक्षणापासून वंचित ठेवले’ वगैरे थोतांडही आजच्या शिक्षणपद्धतीच्या फूटपट्ट्या लावून पसरवले जाते. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ या समता, समानतेच्या गृहीतकावर आधारित शिक्षण व्यवस्थेमुळे, मुलाकडे उपजत कोणते गुण, कौशल्य आहे व त्याचा नैसर्गिक कल कुठे आहे, याचा अभ्यासच केला जात नाही. हा अभ्यास पूर्वी गुरुकुलात केला जात असे. आज विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागेही हे एक महत्त्वाचे कारण आहे. परंपरेने चालत आलेले कौशल्य व ज्ञान एका जातीतच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे दिले जायचे. त्यामुळे, जात हे ‘स्पेशलाइझेशन ऑफ वर्क’ होते. याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश आले तेव्हा व यायच्या आधी भारत तयार उत्पादने बाहेरच्या देशांना विकायचा. धातू, वस्त्र, रसायने यातील अनेक दर्जेदार उत्पादनांसाठी जग भारतावर अवलंबून होते. जगाला आपण तयार उत्पादने विकायचो;  आता जगाची सेवा करतोय. कच्चा माल व पक्की बुद्धी जगाला पुरवतो आणि जग आपल्याला त्यातून तयार केलेली उत्पादने विकते. 

ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्‍चन मिशनरि यांनी हे समतेचे, समानतेचे विचार पसरवायला सुरुवात केली व प्रत्येक गोष्टीला शोषक व शोषित यातच विभागणी करण्याची विचारसरणी रुजवली. त्याला भारतीय समाजातून पहिला पाठिंबा बंगालमध्ये राममोहन रॉय यांनी दिला आणि नंतर जोतिबा फुले यांनी. रॉय यांनी पाश्‍चात्य शिक्षणाचा पाया घालण्याचे काम केले. महाराष्ट्रात फुलेंनी व दक्षिणेत ई. रामासामी यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत सामाजिक स्तरावर प्रत्यक्षात आणला. दक्षिणेत त्याला राजकीय यश मिळाले. महाराष्ट्रात डझनभर मती असलेले राजकारणी आजवर त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा यथेच्छ प्रयत्न करतात. दक्षिणेतील राजकीय यशापेक्षाही महाराष्ट्रात झालेले सामाजिक नुकसान कैक पटीने मोठे व भरून निघू शकत नाही, असे आहे. सगळ्यांत मोठे झालेले सांस्कृतिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसान त्यांच्या लक्षांत येत नाही. आपल्याच देवदेवतांना, संस्कृतीला आणि पूर्वजांना यथेच्छ शिव्या दिल्या जातात. प्रत्येक देव, संत आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती यांचे वर्गीकरण जातीत झाले आहे. जातींचे वर्ग आणि वर्गांच्या झुंडी तयार झाल्या आहेत. समाजामध्ये जबाबदारीऐवजी हक्क फार महत्त्वाचे झाले आहेत. आधी जे ‘गावचे’ असायचे ते आता स्वत:च्या कुटुंबाचेही उरले नाहीत. समाज उभा आडवा फाटला आहे. हजारो वर्षांच्या परंपरेने टिकवून ठेवलेले व्यावसायिक कौशल्य, ज्ञान केव्हाच संपले आहे; इतकेच नव्हे तर ते व्यवसायही नष्ट झाले आहेत. ज्या जातिगत व्यवसायांचा अभिमान बाळगला जायचा, त्याचीच आता लाज वाटू लागली आहे. जातींचा इतरांनी केलेला उल्लेख ‘ॲट्रॉसिटी’ व अपमान वाटतोय, तर स्वत:च्याच जातीला मागास म्हणवून घेण्यात अभिमान वाटतोय. स्वत:च्या जातीला ‘मागास म्हणा’ म्हणून आंदोलने केली जात आहेत. सर्वांत मोठा विरोधाभास म्हणजे हेच लोक तोंडाने समतेच्या आणि समानतेच्या गोष्टी करत आहेत. 

राज्यघटनेने नसलेली पांथिक समता अनिवार्य केली आणि व्यवस्थेने पाळायची नागरी समता ऐच्छिक केली. त्यामुळे हक्क, अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा इतका गवगवा झालाय, की त्यातून आपली झोपण्याची खोलीही सुटलेली नाही. अगदी नवरा बायकोचे नाते पूरक असण्याऐवजी समता व समानतेत अडकले आहे. लग्न एक संस्कार होता, तो आता करार झाला आहे; त्याहीपुढे जाऊन बाजार झाला आहे. संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून. 


वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल?


उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाला, ते आजवर चालत आलेल्या व पुढेही सुरू राहणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. वैदिक सनातन हिंदू संस्कृती संपवण्याचा प्रयास आजकालचा नाही; त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमणे नृशंस होती. पण, त्यांचा प्रभाव संस्कृती संपवण्याइतका घातक नव्हता. ख्रिश्‍चनिटी त्यात फारच पुढारलेली व शिस्तबद्ध आहे. ख्रिश्‍चनिटी व समाजवादी-साम्यवादी हे दोन्ही ‘कल्ट’ आहेत. संस्कृती संपवण्याची त्यांची पद्धत सारखी आहे. एरव्ही भारताबाहेर त्यांचे एकमेकांत पटत नाही. पण, भारतात एकवाक्यता असते; इथे ते हातात हात घालून फिरतात. जगभरातही जिथे जिथे निसर्गपूजक संस्कृती संपवल्या तिथे तिथेही ते तसेच वागले आहेत.
 
जिथे ख्रिश्‍चनिटीचा उदय झाला तिथेही तो स्थानिक मूर्ती फोडूनच झाला. पण, बळ असेपर्यंतच यश मिळू लागले. मग, एका नव्या नीतीचा उदय झाला. संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधण्याचा; त्या शोधायच्या, वाढवायच्या व त्यांना सोडून द्यायचे. तेच एकमेकांत लढून लढून मरतात आणि उरलेले ख्रिस्ती होतात. संस्कृतीही संपते आणि आपले हातही रक्ताने माखत नाहीत, अशी ही संपूर्ण योजना चर्चने राजसत्तेतून राबवली. त्यासाठी स्थानिकांचाच वापर केला. त्यांना मोठे केले.
 
ओफोन्सो (प्रथम) या मध्य आफ्रिकेतील कॉंगो राजाने स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीला ’सैतानी’ आणि ’अंधश्रद्धेचे जाळे’ घोषित केले. त्याने कॉंगोच्या पारंपारिक देवदेवतांच्या मूर्ती, चिन्हे आणि प्रार्थनास्थळे जाहीरपणे शिव्या शाप देत जाळून, फोडून टाकली. हा राजा तेथील व पाश्‍चात्य पाठ्यपुस्तकांत आता आफ्रिकेचा ‘पहिला प्रबुद्ध आणि आधुनिक राजा’ म्हणून शिकवला जातो. कॉंगोला ’रानटी’ अवस्थेतून बाहेर काढणारा ‘महान सुधारक’ म्हणून तो शिकवला जातो. ऍझ्टेक संस्कृतीतील देवतांना गलिच्छ भाषेत शिव्या देऊन सैतान संबोधण्याचे काम करणारा हुआन डिएगो, आज तेथील अभ्यासक्रमात ’स्थानिक लोकांमध्ये शांतता आणि ख्रिश्चन प्रेमाचा प्रसार करणारा महान दूत’ म्हणून गौरवला जातो. उत्तर अमेरिकेतील ’माटोआका’ नामक स्त्री नंतर ’रेबेका’ झाली. तिने स्वतःच्या टोळीच्या पारंपारिक धार्मिक समजुती आणि देवांना ’अंधार पसरवणारे’ आणि ‘रानटी’ ठरवून त्यांचा त्याग केला. आजही अमेरिकन शाळांमध्ये तिला ’एक महान नायिका’ म्हणून शिकवले जाते. हॉलिवूडमध्ये तिच्यावर चित्रपटही काढण्यात आले. हॉन्ग झिक्वुआन याने चीनमधील पारंपारिक बौद्ध, कन्फ्युशियन आणि ताओइस्ट संस्कृतीला ’सैतानी’ म्हटले. त्याने त्याच्या लाखो अनुयायांच्या मदतीने चीनमधील प्राचीन बौद्ध मंदिरे, कन्फ्युशियन पुतळे आणि ग्रंथ जाळून खाक केले, कोट्यवधी लोक मारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रारंभिक काळात चीनला जुन्या सरंजामशाहीतून आणि अंधश्रद्धेतून मुक्त करू पाहणारा क्रांतिकारक आणि सुधारक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.
 
हेच कार्य भारतीय संस्कृतीला नावे ठेवणार्‍यांना जागतिक पातळीवर व भारतीय अभ्यासक्रमात महान ठरवण्यात आले. त्यांच्याच बगलबच्च्यांकडून त्यांना ‘राजा’, ‘महात्मा’ आणि ‘पेरियर’ अशा पदव्या बहाल करवण्यात आल्या. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड या जागतिक विद्यापीठांमध्ये या ’सुधारकांवर’ पीएचडी आणि संशोधनासाठी मोठा निधी दिला गेला. हाच अभ्यासक्रम पुढे भारतासारख्या देशांच्या पाठ्यपुस्तकांत जसाच्या तसा उतरवला गेला.
 
भारतात त्यांना मारण्यासाठी एक न निखळणारी पाचर मिळाली; ‘सामाजिक अस्मिता’! स्वत:च्याच संस्कृतीतील देवतांना अभद्र, गलिच्छ आणि हीन शिव्या हासडणार्‍यांना व त्यांच्या सामाजिक कार्याला समाजाच्या अस्मितेशी घट्ट बांधून टाकले. आज पुरोगामी म्हणून टिकून राहण्यासाठी आपल्याच देवदेवतांना हीन पातळीवर जाऊन टीका करण्याच्या त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक तरी करावी लागते, किंवा त्याचे समर्थन तरी करावे लागते. चुकीच्या सामाजिक चालीरीतींवर प्रहार करण्यासाठी देवदेवतांची अभद्र निंदा का करावी लागते, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. जातिभेद, उच्चनीचता संपवून समता, समानता आणायची होती म्हणून त्यांनी तसे केले, असे समर्थन पुरोगामी विचारवंत करतात. पण, तशी निंदानालस्ती न करताही सामाजिक सुधारणा करणारे स्वामी दयानंद सरस्वती, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरू असे असंख्य समाजसुधारक भारतातील प्रत्येक राज्यांत होते. त्यांची नावे पाठ्यपुस्तकात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाच जातीवर सगळे खापर फोडायचे, आत्यंतिक जातीय द्वेष पसरवायचा आणि त्यालाच जातिभेद, उच्चनीचता संपवण्याचे महान कार्य म्हणायचे. या समाजसुधारकांनी केलेल्या जातीयद्वेषाचा उल्लेख केला तरी, तसे करणाराच जातीयवादी ठरतो. आपल्या संस्कृतीवर, देवांवर केलेल्या गलिच्छ टीकेस, ‘गलिच्छ आहे’ असे म्हणतो तोच आज ‘कम्युनरल’ ठरतो.

चर्च, मिशनरि, वसाहतवादी आणि आधुनिक काळात समाजवादी-साम्यवादी विचारवंतांनी अभेद्य करून ठेवलेल्या ‘समाजसुधारकां’च्या विचारांवर टीका करणारा ‘मनुवादी’, प्रतिगामी, समतेचा विरोधक वगैरे ठरवला जातो. इतकेच नव्हे तर तो त्या संपूर्ण समाजाचा विरोधक ठरवला जातो. या माणसांचे कार्य मोठे नाही का? निश्‍चितच आहे, पण आपल्याच संस्कृतीला, देवदेवतांना हीन ठरवून ही माणसे महान झाली आहेत. हीच शृंखला पुढे सुरू आहे आणि संस्कृती संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. दक्षिण भारत स्वतंत्र द्राविडी अस्मितेपायी आणि महाराष्ट्रासह उत्तर भारत समता-समानतेच्या वेडापायी आपलीच संस्कृती संपवत आहे. या वाळवींनी पोखरलेली संस्कृती किती तग धरते, तेच पाहत राहणे आपल्या हाती आहे. ते पाहण्याआधीच या जन्मी तरी निदान डोळे मिटावेत हीच इच्छा!

केवळ उदयनिधीच हे म्हणतोय का?


मंगळवार दि. १२ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आपले पहिले भाषण करताना उदयनिधी स्टॅलिनने त्याच्या जुन्या विधानाचाच पुनरुच्चार केला आहे. ‘सनातन धर्म हा नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे जे तो काल म्हणाला तेच त्याने ‘सनातन निर्मूलन परिषदे’त २०२३मध्ये म्हटले होते. सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे; त्यामुळे त्याला नष्ट केलेच पाहिजे असे तो म्हणाला होता. आता डेंग्यू मलेरिया थेट नष्ट करता येत नाही, त्यासाठी तो पसरवणारे डास मारावे लागतात. सनातन नष्ट करण्यासाठी सनातन धर्माचे वाहक, मानणारे मारावे लागतील, हा थेट इशारा होता. त्यामुळे, त्याला जे म्हणायचे होते तो थेट हिंदूंचा नरसंहारच होता; अन्य काहीही नव्हते. पण, निर्णय देणाऱ्या न्यायालयास ते तसे काही वाटलेच नाही. ‘तो जे बोलला होता ते ‘हेट स्पीच’ आहे व त्यासाठी तो दोषी आहे’ हेही आजतागायत न्यायालयाने मान्य केले नाही.

हिंदू म्हणजे सांप्रदायिक, अत्यंत नीच, घाणेरडा, अविकसित, सुधारणा न झालेला किंवा मान्य नसलेला समाज आहे, हे भारतीय राज्यघटनेचे अलिखित मत आहे. केवळ राज्यघटनेचेच नव्हे तर त्याअंतर्गत झालेल्या कायद्यांचे, कायदा करणाऱ्यांचे आणि त्याचे पालन करावयास लावणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचेही तेच अलिखित मत आहे. एवढेच कशाला, भारतीय शिक्षणव्यवस्थाही तेच मानते.

राज्यघटनेस केवळ सामाजिक सुधारणा अपेक्षित असती, तर कलम २५ (२ ब)मध्ये ‘हिंदू’ हा शब्दच आला नसता. 'सामाजिक सुधारणा' या गोंडस नावाखाली सरकारला हिंदू संस्थांमध्ये बदल करता आले नसते. कायद्याबाबत बोलायचे झाल्यास हिंदू वगळता अन्य एकाही पर्सनल लॉ बोर्डाचा एकही कायदा आजतागायत संपूर्णपणे कोडिफाय झालेला नाही. अगदी लग्नाचे वय ठरवणारा कायदाही मुस्लीम पर्सनल लॉ रद्दबातल ठरवत नाही. असे असंख्य कायदे आहेत जे लागू होतात असेही ठामपणे म्हणता येत नाही आणि लागू होत नाहीत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. यालाच ‘ग्रे एरिया’ म्हणतात. हा इतकी वर्षे मुद्दाम ‘ग्रे’ ठेवण्यात आला आहे. हिंदूंचे सरळ ब्लॅक आणि व्हाईट करून टाकले आहे.

शिक्षणात सामाजिक त्रुटी सांगताना बालविवाह, केशवपन वगैरे हजारो गोष्टी केवळ हिंदू धर्माबद्दल घृणा व नकारात्मक भाव निर्माण करणाऱ्या शिकवल्या जातात. आजही मुस्लिमांत बालविवाह आहे व तो कायदेशीर आहे, हे शिकवले जात नाही.

अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून सनातन हिंदू धर्म संपवण्याचे काम स्वतंत्र भारतातील लोकशाहीने पद्धतशीरपणे केले आहे व करत आहे. समता, समानता ही शस्त्रे त्यासाठी प्रभावीपणे वापरली जात आहेत. उदयनिधी तेच थेट मांडले होते व काल पुन्हा मांडले आहे. तो किमान थेट बोलण्याची हिंमत दाखवतो, भारतीय लोकशाही तीही दाखवीत नाही. उदयनिधीसारख्या लोकांसाठी हिंदू हा कुत्र्याच्या मौतीने मरण्यायोग्य किंवा किड्यामुंग्यांप्रमाणे संपवण्यायोग्य समाज आहे. प्रश्‍न त्याचा किंवा लोकशाहीचा नाहीच. प्रश्‍न आहे तो हिंदूंचा.

हिंदू स्वत:स काय समजतात, हा खरा प्रश्‍न आहे!

जगभरातील संस्कृतींना अवघ्या काही वर्षांत जमीनदोस्त करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला व इस्लामला सनातन वैदिक हिंदू धर्म संपवता आला नाही व इतकी वर्षे लोकशाहीसही ते जमले नाही. जगभरात केवळ एकच शक्ती हिंदू धर्माला संपवेल, ती म्हणजे स्वत: हिंदू. त्यामुळे, हिंदू स्वत:स काय समजतात या प्रश्‍नाच्या उत्तरावरच हिंदूंचे अस्तित्व टिकणे किंवा संपणे अवलंबून आहे.