सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

शिवाजी महाराजांचा अपमान कशात आहे?

-----------------

-कोश्यारींचे हिंदी भाषण-

पहले भी इन्हे डिलिट दे चुका हूं। अब दो और युनिव्हर्सिटी के पेंडिंग पडे हैं। वह कहते हैं इन्हीको देना चाहते हैं। मैने कहा कोई और नही है क्या? हमारे दो लोगोंकोही क्यों देते हो। कुछ तो खास बात हैही है। अब इतना इनके बारे मे क्यों बोल रहां हूं क्यों के यह हमारे सामने हैं। हमारे लिए एक्जांपूल हैं, उदाहरण हैं। हम जब पढते थे, मिडल मे हायस्कूल मे, तो हमारे टीचर हमको वो देते थे, हू इज युवर फेवरेट हीरो? ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है? तो हम उस समय जिनको सुभाषचंद्र बोस अच्छे लगे, जिनको नेहरू अच्छे लगे, जिनको गांधीजी अच्छे लगे । तो मुझे ऐसा लगता है के हू इज युवर आयकॉन? हू इज युवर फेवरेट हीरो? तो बाहर जाने की कोई जरूरत  नही है। यहीं महाराष्ट्रमेही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बातहैं, मै नये युग की बात बोल रहां हूं। डॉक्टर आंबेडकर से लेकर डॉ. गडकरी तक, नितीन गडकरी तक सब आपको यंही मिल जाएंगे।

--------------

- मराठी अनुवाद -

जेव्हा आम्ही लहान होतो आणि शाळेत जायचो तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचे आवडते नेते कोण आहे, तेव्हा कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी,  तर कुणी नेहरू असे सांगायचे. मला असे वाटते जर कुणी तुम्हाला विचारले तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहे, तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. पूर्वीच्या काळातील आदर्श शिवाजी महाराज आहेत. परंतु, जर नव्या काळातील आदर्श शोधायचे झाल्यास डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरी तुम्हाला इथेच मिळतील.

----------------

यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठे झाला? उलट नव्या पिढीला शिवाजी महाराजांनंतर कुणी आदर्श नेताच नाही मिळाला, असे म्हणणे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या उंचीचे आणि कर्तृत्वाचे नेतृत्व नसूनही औरंगजेबाला एकही किल्ला घेता आला नाही, हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे व त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचे यश आहे. जुन्या काळचे आदर्श म्हटले म्हणून शिवाजी महाराज कालबाह्य होत नाहीत. आदर्श वाटावेत असे नवीन नेते निर्माण होणे यातच त्या पूर्वीच्या नेत्यांचे यश आहे. 

आता शिवाजी महाराजांच्या आदर्शाची तुलना शरद पवार व नितीन गडगरी यांच्या आदर्शाशी करावी का, हा खरा वादाचा मुद्दा आहे. ‘शिवाजी कोण होता?’ असा एकेरी उल्लेख पुस्तकाच्या नावात असणे, पवारांना जाणता राजा म्हणणे, पवारांनी शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये, असे म्हणणे यात शिवाजी महाराजांचा अपमान कुठेच, कुणालाच दिसत नाही का? 

अभिमानाचे आणि अपमानाचे वर्गीकरण ‘टोकाची अस्मिता’ या निकषावर करणे, वक्ता किंवा लेखक कोण आहे, कोणत्या विचारधारेचा आहे, यावर करणे अयोग्य आहे. कोश्यारींचे पूर्ण भाषण ऐकले असते, तर कदाचित त्यावर दिवसभर चर्चा पेटवणे, अग्रलेख खरडणे किती अप्रस्तुत आहे, हे लक्षात आले असते. पत्रकार हा शेवटी कुठल्या तरी बाजूचा असावा लागतो, तरच जयजयकार होतो. सत्य, योग्य भूमिका, खर्‍याला खरे म्हणणे व खोट्याला खोटे म्हणणे यापेक्षाही सोयीचे तेवढेच पाहणे म्हणजे पत्रकारिता...


गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धाची हत्या आणि विचार करावे असे काही...

श्रद्धा हत्येनंतर अनेक प्रश्न, अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत.  त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकलकोंडेपणा व कमालीचा अलिप्तपणा. आपण आपल्याच माणसांपासून दूर जाणे, कुणाच्याही संपर्कात न राहणे खूपच चिंताजनक आहे. आपण खरोखरच ‘सोशल’ आहोत का?

वेळग्यात आमच्या शेजारी राहणारे स्व. बाबा सहस्रबुद्धे फोंड्यात फ्लॅटमध्ये राहायला गेले होते. काही काळानंतर ते पुन्हा वेळग्यातला त्यांच्या घरी राहायला आले. त्यांनी व्यक्त केलेली एक खंत येथे सांगावीशी वाटते. फोंड्यात गेल्यापासून आठ दहा दिवस झाले तरी शेजारीपाजारी कोण आहेत याची कल्पना नाही, सगळ्यांचे दरवाजे कायम बंद, येणेजाणे नाही, बोलणे नाही. याची त्यांना अजिबात सवय नव्हती. वेळग्यात सहस्रबुद्ध्यांच्या घराचा दरवाजा सकाळी उघडला की, रात्रीच बंद होई. दिवसभर कुणाचा ना कुणाचा तरी कायम येत जात असे. अर्थात बाबा सहस्रबुद्धे ही व्यक्तीही तशीच होती. पण, ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती आठ दिवस कुणाला दिसली नाही तर चौकशी, विचारपूस झाली नाही, असे होत नाही. एवढेच कशाला संध्याकाळची दिवेलागणी आठ वाजेपर्यंत न झाल्यास लगेच शेजारी विचारपूस करतात, ‘काय बरं आहे ना?’

हीच बाब शहरात घडतेच असे नाही. उलट अशा विचारपूस करण्याला नाक खुपसणे, बॅड मॅनर्स म्हटले जाते. त्याहीपुढे जाऊन व्यक्तिगत स्पेसवरचे ते अतिक्रमण समजले जाते. नवरा-बायकोंचे एकमेकांना जाब विचारणेही व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचा घाला समजू लागलो आहोत, ‘प्रायव्हेट स्पेसवरील अतिक्रमण’ समजू लागलो आहोत. 

श्रद्धा नामक परिचयातील व्यक्ती सहा महिने दिसलीच नाही तर निदान व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, फोन वगैरे कुणी तिच्या मैत्रिणींनी, मित्रांनी केलाच नाही? केलेले तुकडे सहा महिने आफताब नेऊन जंगलात टाकत होता, ते कुणालाच दिसलं नाही? कुटुंबीयांनी विचारलंच नाही? त्याच्या ‘कॉमन’ मित्रांनाही विचारावसं वाटलं नाही? आपण खरोखरच समाज म्हणून जगतोय की, प्रत्येक जण स्वतंत्रपणे आपल्याच कोशात वावरतोय?

अजित, अंतू, धीरज, अमर, निगम यांसारख्या असंख्य मित्रांचा फोन वेळेत उचलला नाही तर ही महाबिलंदर माणसे किती खेचतात त्याला तोड नाही. सकाळी फोन केला आणि त्यांना दुपारपर्यंत प्रतिसाद दिला नाही दिला तर यातला एकटा तरी संध्याकाळपर्यंत घरी टपकतो. दार उघडल्याबरोबर प्रेमाने विचारलेला पहिला प्रश्न असतो, ‘आहेस ना जिवंत?’ 

श्रद्धा आणि आफताब हे दोघे आपल्या मित्रांपासून इतके फटकून वागत होते की, कुणीही त्यांची कसलीच चौकशी केली नाही? बरे हे घडत होते ते दूर जंगलात कुठे तरी घडत होते का? तर नाही. ते शहरी भागात, भर वस्तीत होते. तरीही असे का घडले, हा खरा चिंतेचा विषय आहे. 

आजकाल आपण इंटरनेट, मोबाइलच्या जंजाळात अडकून इतके ‘सोशल’ झालो आहोत की, प्रत्यक्ष भेट होतच नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या कुठल्यातरी अजब, विचित्र दुनियेत स्वत:ला गुरफटवत आहोत. मित्र, सहकारी, नातलग यांचा अधिकारच आहे आपली काळजी करण्याचा. कुणाला कितपत आत येऊ द्यायचे, हे निवडण्याचा आपला अधिकार निश्चितच आहे आणि तसे केलेही पाहिजे. पण, त्याचबरोबर अजिबात कुणी दखल देऊ नये, हे योग्य नाही, याचाही विचार केला पाहिजे. खास करून मुलींनी, कायम आपल्या पालकांच्या, मैत्रिणींच्या, मित्रांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आईवडिलांशी कितीही भांडण झाले तरी त्यांना आपली काळजी असते, हे अजिबात विसरू नये. अगदी त्यांच्याशी बोलतच नाही, असे असले तरीही त्यांची व आपली ख्यालीखुशाली एकमेकांना समजेल अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. कुठलाही बाप मुलीशी भांडेल, बोलल्याशिवाय राहील, पण तिचे तुकडे तुकडे करून केलेली विल्हेवाट सहन नाही करू शकणार. 

कौटुंबिक मतभेद इतकेही ताणू नयेत की, आपण एकदमच अलिप्त, असुरक्षित होऊन जाऊ. आठवड्यातून किमान एकदा तरी ग्रुपवर, फेसबुकवर, ब्लॉगवर काही ना काहीतरी लिहा, शेअर करा. आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून का असेना, पण ठेवा. किमान महिन्यातून एकदा तरी एका मित्राला, मैत्रिणीला, नातलगांना प्रत्यक्ष भेटा. तेवढा वेळ निश्चितच असतो आपल्याकडे. कुणी बर्‍याच दिवसांत दिसले नाही तर, किमान फोन तरी करा. चौकशी करा. यात गैर काहीच नाही. फार तर ती व्यक्ती रागावेल. रागावू दे. पण, ख्यालीखुशाली घ्या. आपण माणूस म्हणून वागलो नाही, तर असे अमानुष कृत्य पाहण्याची, सहन करण्याची पाळी आपल्यावरही येऊ शकते.


चित्रस्रोत : आंतरजाल

बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

माध्यमांनी हा गाढवपणा आधी बंद करावा...

एका वृत्तवाहिनीवर बाइट घेणार्‍या मुलीने संभाजी भिडेंना मंत्रालयात येण्यावरून प्रतिक्रिया विचारली. तेव्हा त्यांनी आधी ‘आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो. प्रत्येक स्त्री ही आम्हाला भारतमातेसमान आहे आणि भारतमाता विधवा नाही.’ या घटनेचे टीव्हीवर झळकणारे मथळे फार मनोरंजक होते. ‘संभाजी भिडेंकडून महिला पत्रकाराचा अपमान’, ‘म्हणे टिकली लावा तरच बोलतो’, ‘संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान’, ‘लावली नाही टिकली, तुमची का सटकली?’ त्याही पुढची गंमत म्हणजे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ‘समाजात अशा काही विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत जी सातत्याने महिलांचा आत्मविश्वास ढासळावा, त्यांना दुय्यम लेखावं, अशा पद्धतीची विधानं करताहेत आणि निश्चितपणानं राज्य महिला आयोगाच्या वतीने त्यांना आजच नोटीस जाईल. ज्याचा त्यांनी खुलासा करावा.’

‘प्रत्येक महिला ही भारतमातेसमान आहे’, यात महिलांचा अपमान कसा आहे आणि हे वादग्रस्त विधान कसे आहे, हे एकदा या माध्यमांतील बहाद्दरांनी सांगावेच. प्रश्न विचारणार्‍या महिलेने कुंकू लावण्याची अपेक्षा ठेवणे, हे स्त्रीला दुय्यम लेखण्याच्या विकृत मनोवृत्तीचे लक्षण कसे ठरते, हेही सांगावे. 

भिडेंनी प्रतिक्रिया नाकारण्यासाठी दिलेले कारण व नकार रास्त आहे का, असा प्रश्न विचारला असता, तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, काहीही करून ओढून ताणून त्याचा संबंध महिलांच्या अपमानाशी व दुय्यम लेखण्याशी लावणे, कितपत योग्य आहे, याचा विचारही झालाच पाहिजे.

जसा पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसाच कुणाला उत्तर द्यावे, कोणत्या कारणासाठी द्यावे, हे निवडण्याचा अधिकार भिडेंना नसावा का? महिला पत्रकाराला जसा कुंकू न लावण्याचा अधिकार आहे, तसाच कुंकू न लावणार्‍या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न देण्याचा अधिकार भिडेंना असू नये का?

महाराष्ट्र सरकार व राज्य महिला आयोगाने आपली शब्दयोजना सुधारणेही अत्यंत गरजेचे आहे. ‘विधवा प्रथा बंदी’ म्हणजे नेमके काय? विधवा ही प्रथा आहे का? दुर्दैवाने एखाद्या महिलेला वैधव्य प्राप्त होते की, प्रथेमुळे होते? वास्तविक ‘विधवा महिलांना दिल्या जाणार्‍या हीन वागणुकीविरुद्ध जनजागृती करा’ असा आदेश हवा. सती जाणे हा अपवादात्मक प्रकार असतानाही त्याला हिंदू धर्मातील ‘प्रथा’ ठरवून व क्रमिक पुस्तकातून शिकवून आपण मोकळे झाले आहोत. प्रथा म्हणजे अनिवार्य रीत जी पिढ्यानपिढ्या पाळलीच जाते. पाळणे हा नियम आणि न पाळणे हा अपवाद. सती या अपवादाला आपण नियम कसे ठरवले?  तेच तर्कट विधवांच्या बाबतीत लावले जात आहे. 

ज्या ज्या गोष्टींविषयी आस्था, श्रद्धा आणि आदर आहे, त्या त्या गोष्टींना चुकीचे, वाईट, घातक ठरवणे हा उद्देश आहे. एखाद्या गोष्टीला वाईट ठरवता आले नाही की, समाजात असलेले त्या गोष्टीचे स्थान, आदर यांना हळूहळू धक्का पोहोचवला जातो. त्यांच्याविषयी नकारात्मक भावना रुजवली जाते. अशा प्रकारच्या बातम्या व घटनांचे वृत्त करणे हे त्याचेच एक रूप आहे. जाणूनबुजून केला जाणारा हा गाढवपणा आहे.