बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे?


एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने घडणार्‍या इतर घटना, अनेकांचे त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन यावरून समाजमनाचा आपण अंदाज घेऊ शकतो. आर्यन खानची अटक ही तशी क्षुल्लक घटना. या घटनेची बातमी आणि त्यानंतरचा तिचा त्याला जामीन मिळेपर्यंतचा प्रवास, माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे, याचा शोध घेतो...








------------

एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने घडणार्‍या इतर घटना, अनेकांचे त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन यावरून समाजमनाचा आपण अंदाज घेऊ शकतो. आर्यन खानची अटक ही तशी क्षुल्लक घटना. या घटनेची बातमी आणि त्यानंतरचा तिचा त्याला जामीन मिळेपर्यंतचा प्रवास, माध्यमांचे समाजभान हरवले आहे की, समाजमनच तसे बनले आहे, याचा शोध घेण्यास भाग पाडतो. 

-------------


‘वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले’ असे गदिमा सहजपणे लिहून गेले. पण, या ओळी खर्‍या होत असलेल्या पाहून वेदना होतात. अमली पदार्थांचा विळखा आपल्या समाजाला किती घातक आहे, याची आपणा सर्वांना जाणीव आहे. आपली लढाई घातक, वाईट गोष्टीशी आहे हे विसरून आपण त्याला हातभार लावणार्‍यांचा उदो उदो करत आहोत. 

जवळपास महिनाभर आर्यन खान हे प्रकरण गाजत आहे. शेवटी एकदाचा त्या आर्यनला जामीन मिळाला आणि मलिकांच्या नवाबाने मोर्चा फडणवीसांकडे वळवला. या सगळ्या प्रकरणात मूळ मुद्दाच कुठल्याकुठे फेकला गेला. त्याशिवाय अनेक असे छोटे छोटे सूचक, पण महत्त्वाचे मुद्देही बाजूला फेकले गेले.

केनप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणीकृत असलेल्या, दिल्लीतील नमस क्रे नावाच्या कंपनीने कोर्डेलिआ द एम्प्रेस या क्रूज शिपवर क्रूज पार्टीचे आयोजन केले होते. या ‘नमस क्रे’चे मालक समीर सहगल आणि गोपालजी आनंद हे दोघे आणि काशिफ खान यांच्या मागावर एनसीबी होती. या क्रूजवर आणखी दोन माणसे होती जी गोव्यात विकल्या जाणार्‍या ड्रग्जमध्ये आणि सनबर्न पार्टी याच्याशी संबंधित होती. त्यापैकी एक होता श्रेयस नायर आणि दुसरा माणूस होता गोव्यात सनबर्न आयोजित करणारा मायरॉन मोहित. काशिफ खान, गोपालजी, श्रेयस आणि मायरॉन हे त्या दिवशी आयोजित क्रूज पार्टीशी संबंधित आहेत व तिथे ड्रग्ज पुरवले जाणार असल्याची टिप एनसीबीला मिळाली होती. 

समीर वानखेडे जेव्हा काशिफच्या शोधार्थ क्रूजवर पोहोचले तेव्हा तिथे त्यांना मायरॉन सापडला. एनसीबीने मायरॉनला काशिफबद्दल विचारले. त्याने माहीत नसल्याचे सांगितले. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मायरॉनच्या कानाखाली पोलिसी जाळ काढला तेव्हा तो त्यांना घेऊन एका सूटकडे गेला, खुणेचे बोट केले आणि पळाला. या आलिशान सूटमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या अमली पदार्थांसह पकडले. एनसीबीचे अधिकारी गेले होते, एका खानला पकडला सापडला भलताच खान. 

अर्थात शाहरूख खानचा मुला ड्रगच्या प्रकरणात सापडणे ही घटना म्हणून छोटी असली तरी बातमी म्हणून खूपच मोठी होती, महत्त्वाचीही होती. सर्वत्र ती झळकली. याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले. आर्यन खानला तुरुंगवासात राहावे लागेल हे जेव्हा स्पष्ट झाले तिथपर्यंतही या घटनेचे महत्त्व बातमी म्हणून निश्चितच होते. पण, त्यानंतर जो माध्यमिक धुडगूस सुरू झाला त्याला काही तोड नव्हती. तो जमिनीवर झोपेल, सकाळी काय खाईल इतक्या खालच्या पातळीवर वृत्तांकन होऊ लागले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि राष्ट्रात आर्यन खानची अटक हा एकमेव विषय उरला आहे, लोक त्याच्याविषयी सेकंदा सेकंदाला माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, अशा पद्धतीने वार्तांकन सुरू झाले. पूर्वी त्या करीनाच्या तैमूरने शी, शू केली की, नाही? हा महाराष्ट्रातील एका वर्तमानपत्राचा रोजचा ज्वलंत विषय झाला होता. आर्यनच्या बाबतीत वृत्तवाहिन्यांनी त्याहीपुढे एक पाऊल टाकले. 

आर्यन खानची बातमी अशा तर्‍हेने माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होत राजकीय इयत्तेत दाखल झाली. केंद्रीय तपास यंत्रणेचा कुठल्याही घटनेत संबंध, संपर्क आला की, तो महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी आखलेला डाव आहे, असा पक्का समज एव्हाना महाराष्ट्र सरकारचा झालेला आहे. वास्तविक शाहरूख खानच्या मुलाला अटक केल्यामुळे महाराष्ट्राचे नाक कसे कापले जाऊ शकते, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला पडलेले एक कोडेच आहे. 

अशी अस्मितेची नको इतकी ताणलेली भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र सरकार अनेकवेळा न्यायालयाकडून मार खाऊन आलेले आहे. कंगना राणावत, अर्णब, सचिन वाझे, परमवीर सिंग, अनिल देशमुख अशी ओळीने नाचक्की सहन करूनही पुन्हा आर्यन खान प्रकरणाला महाराष्ट्राच्या मानापमानाशी जोडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण, भाजपला धडा शिकवण्याची जी काही पोरकट खाज आहे, ती काही केल्या सुटत नाही. 

त्यातच नवाब मलिक यांना आपल्या जावयाच्या अटकेचा राग होता. दरदिवशी उठून समीर वानखेडेवर काहीतर बोलल्याशिवाय त्यांची आदल्या रात्रीची झोप सरत नव्हती किंवा त्या दिवशी लागत नसावी. समीर वानखेडेची जात, त्याचे आईवडील, त्याची दोन लग्ने याची माहिती घ्यायची आणि माध्यमांसमोर मांडायची. यातल्या एकाही माहितीचा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहे, असा प्रश्न विचारण्याची हिंमत एकाही पत्रकाराला होऊ नये, याचे आश्चर्य वाटते. त्याने जात, पंथ बदलला, दोन लग्ने केली याचा त्याने पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. तरीही, ‘नवाब मलिकने खोला नया राज’, ‘कौन है समीर वानखेडे?’ ‘क्या उनके कागजाद फर्जी हैं?’ यासारखे स्वत:च निर्माण केलेल्या असंबद्ध प्रश्नांची मालिकाच सुरू झाली. त्याचबरोबर ‘एका वर्षाच्या आत तुरुंगात पाठवू’ वगैरे भीष्म गर्जनाही सुरू झाल्या. 

घटनेशी संबंधित, बातम्या देणारे, बातम्या पाहणारे गटातटात विभागून गेले. फेसबुक, ट्विटर, वृत्तवाहिन्या यांच्यात युद्धे सुरू झाली. या सगळ्या गदारोळात ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आजची युवा पिढी, ड्रग पॅडलर व त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय वरदहस्त हे विषय कुठल्याकुठे विरून गेले. 

शेवटी एकदाचा काय तो आर्यनला जामीन मिळाला. आपला पोरगा चुकीचे वागला तरीही आईबापाला तो आपला पोरगाच असतो, या न्यायाने एकवेळ त्यांची भावविवषता समजून घेता येईल. यच्चयावत वृत्तवाहिन्या, माध्यमे, वर्तमानपत्रे, हजारोंच्या संख्येने जमलेले चाहते, त्यांनी बॅनर लावून, फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात केलेले ते स्वागत माझ्या आकलनापलीकडचे आहे. आपल्या देशासाठी, मुस्लीम समाजासाठी, राज्यासाठी एखादे महान कार्य करून घरी परतावा, तशा जल्लोषात, थाटात स्वागत? का? अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी जामिनावर सुटून आलेला गुन्हेगारच आहे ना तो? 

कितीही चुकीचे, वाईट गैरकृत्य केले तरीही आपण चाहते आहोत म्हणून असे स्वागत करायचे? माध्यमांनी त्याला उचलून धरायचे? न्यूज व्हॅल्यूच्या नावाखाली चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून मिरवतो, तेव्हा किळस येते स्वत:ची. लोकांनी जंगी स्वागत केल्यानंतर आली होती त्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त माध्यमांनी केलेल्या जंगी स्वागताची किळस येते. 

बर्‍याच वर्षांपूर्वी एका गावात घडलेली घटना सहज आठवली. त्या गावात आडनावांची घराणी, महाजनकी होती.  पंचायतीमध्ये काम करणार्‍या एका मुलीने घरपट्टीमधील काही पैसे स्वत:कडेच ठेवले. त्याच्या पावत्या दिल्या, पण पंचायतीत पैसे जमा केलेच नाहीत. कालांतराने हा भ्रष्टाचार उघडकीस आला. पंचायत सचिवांनी तिला कामावरून काढून टाकायचा निर्णय घेतला.  ती ज्या आडनावाची होती, ते सगळे पंचायतीत जमा झाले. गावात त्यांची संख्या जास्त असल्याने तिला पुन्हा आदराने कामावर रुजू करून घ्यावे लागले. तो प्रकार पाहून मला फार आश्चर्य वाटले होते. घराणे, समूह एखाद्या चूक केलेल्या व्यक्तीच्या मागे का उभा राहतो? तिथे आडनाव, घराणे, समाज म्हणून आपली अस्मिता का खर्ची घालतो? केवळ झुंडशाही म्हणून सोडून देणे योग्य होणार नाही. या अशा समाज मानसिकतेमागे काय कारणे आहेत, ती शोधून त्यांची पाळेमुळे उपटून फेकून दिली पाहिजेत.

३० ऑक्टोबरच्या देशदूतच्या नगरटाइम्सच्या पहिल्या पानावरील हेडलाइन होती, ‘सुपरस्टारचा दिवटा अखेर जेलबाहेर’ ज्या कुणा उपसंपादकाला हा मथळा सुचला व छापायचे धाडस झाले त्याचे खरेच कौतुक! 

माध्यमांना दोष देता देता, समाज म्हणून आपण अंधाराच्या पखाली वाहत आहोत का? समाजात आपण वाईट पोसत आहोत? याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे.  या माहितीच्या प्रकाश कल्लोळाने केलेल्या अंधारात अशी कुठेतरी त्या ‘दिवट्या’ मथळ्याची एक पणती तेवत राहिली, तरीही तिच्या मिणमिणत्या उजेडात अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दिसेल.  आपली दिवाळी साजरी होईल! 


1 टिप्पणी:

  1. खरोखरच सामाजिक भान भरकटत चाललेले आहे. त्याला ना शेंडा ना बुडखा. विषय राहतोय तिकडेच. विनाकारण फापटपसारा प्रसिद्ध करून आजची वृत्तपत्रे काय साधत आहेत? असा प्रश्न पडतो. जाणून बुजून मूळ विषयाला बगल देण्याचे काम वृत्तपत्रे अगदी सहजपणे करतात. मग तो विषय विषयक राहत नाही मात्र नको असलेले कोणताही संबंध नसलेले राजकारण पुढे. हाच खरा दैवदुर्विलास!

    उत्तर द्याहटवा