शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

२६/११सारख्या घटना घडतच राहतील!


२६/११सारखा अतिशय नियोजनबद्ध हल्ला कुठल्याही स्थानिक मदतीशिवाय झाला आणि हे भारताविरुद्धचे युद्ध नाही, असे ज्यांना वाटते त्यांची कीव करावी तेवढी थोडी. दहशतवादाला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हणणे आणि पाकिस्तान करीत असलेल्या युद्धाला ‘युद्ध’ म्हणणे व रणकर्कश पद्धतीने त्यांचा बीमोड करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा वर्षातल्या प्रत्येक दिवशी आपल्याला मेणबत्त्या पेटवतच बसावे लागेल.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनीष तिवारी लिखित, परंतु, अप्रकाशित असलेल्या ‘१० फ्लॅशपॉइंट ः २० इअर्स- नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन दॅट इम्पॅक्ट इंडिया’ या पुस्तकामध्ये त्यांनी २६/११ मुंबई हल्ल्यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतावरून सध्या काँग्रेस पक्षावर टीका सुरू झाली आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तत्कालीन यूपीए सरकारने कोणतीही कारवाई न करणे हा सरकारचा कमकुवतपणा आहे, असे तिवारी पुस्तकात म्हणाले आहेत.  मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला हवी होती. ती वेळच अशी होती की तेव्हा प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे होते, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भाजपने याचा राजकीय लाभ घेणे स्वाभाविक आहे. त्यांच्या जागी काँग्रेस असती तरीही तेच झालं असतं. २६/११ला आज तेरा वर्षे पूर्ण होत आहेत. काय झालं, कसं झालं याबद्दल खूप लिखाण झालं आहे. २६/११ दहशतवादी हल्ला या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. कॅथी स्कॉट क्लार्क व अ‍ॅड्रिअन लेव्ही यांचे ‘द सीज : ६८ आवर्स इनसाइड द ताज हॉटेल’, अंकुर चावला यांचे ‘१४ आवर्स’, विनिता कामटे यांनी त्यांचे पती अशोक कामटे यांच्यावर लिहिलेले ‘टू द लास्ट बुलेट’, रमेश महालेंचे ‘कसाब आणि मी’, हरिंदर बावेजा यांचे ‘२६/११ मुंबई अटॅक्ड’, संदीप उन्नीथन यांचे ‘ब्लॅक टॉर्नेडो’, जुई करकरे यांनी आपले वडील हेमंत करकरे यांच्यावर लिहिलेले पुस्तक, राकेश मारिया यांनी लिहिलेले ‘लेट मी से इट नाउ’  आणि आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेले ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ ही काही महत्त्वाची उल्लेखनीय पुस्तके. 

प्रत्यक्ष हल्ला, पोलिसांचे अतुल्य साहस, राजकारण, दहशतवाद, सुरक्षा यंत्रणा या व अशा अनेक कोनातून या एका घटनेकडे पाहिले गेले आहे. पण, बहुतेक ठिकाणी दोन गोष्टींचा उल्लेख केला जात नाही किंवा टाळला जातो, त्या दोन गोष्टी म्हणजे युद्ध आणि इस्लामी दहशतवाद. 

आजही आपण मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख दहशतवादी हल्ला असाच करत आहोत. वास्तविक पाकिस्तान भारताविरुद्ध करत असलेलं हे युद्ध आहे. याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. दहशतवाद हे या युद्धात वापरलं गेलेलं बाहुलं आहे. ज्याच्या आडून पाकिस्तान इतर देशांसमोर आपण पीडित असल्याची भूमिका मांडून स्वत:चा बचाव करत आहे. डोसिअर आणि निषेध या व्यतिरिक्त भारत सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही हेच खरे. २६/११ ची जखम भरून काढण्यासाठी आता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची वेळ आली आहे.


लडके लिया पाकिस्तान हंस के लेंगे हिंदुस्थान असे म्हणून फाळणी करायला भाग पाडलेल्या नेत्यांचा तेव्हापासून आत्तापर्यंतचा ‘भारताशी युद्ध’ हा एक कलमी कार्यक्रम आहे. नेते, लष्करी अधिकारी, दहशतवादी, गँगस्टर बदलतात ध्येय तेच राहते. त्यांची प्रत्येक कृती ही युद्धच असते. आपल्यासाठी मात्र कलेचे आदानप्रदान, गँगवॉर, फुटिरतावाद आणि कसले कसले वाद असतात. या सर्वांचे स्लीपर सेल भारतात सक्रिय असतात. 

हे स्लीपर सेल वर्तमानपत्रे, मीडिया, अभिनय, मानवतावाद, कला, पर्यावरण अशा अनेक माध्यमातून तीच भूमिका घेतात जी पाकिस्तानला हवी असते. हे स्लीपर सेल एक गठ्ठा मते बनून राजकीय पक्षांना मदतही करतात. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभाव पाडतात किंवा त्यांच्या विचारसरणीचा फायदा आपल्यासाठी करून घेते. विशिष्ट विचारसरणी रुजवतेही. 

उदाहरणच द्यायचे झाले तर, प्रभावलोपन (न्यूट्रलाइझेशन) हा एक प्रकार एखादी घटना घडल्यानंतर समतोल राखण्यासाठी राजकीय पक्षांकडून केला जातो. पण, त्याचा लाभ मुंबईत स्फोट घडवणार्‍या दाऊदला होत असेल तर? १९९३साली मुंबईत ११ बॉम्बस्फोट हिंदूबहुल वस्तीत दाऊदने घडवून आणले होते. याचा समतोल राखण्यासाठी शरद पवार यांनी धावत जाऊन न घडलेला बारावा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत घडल्याची आणि या मागे श्रीलंकेतील दहशतवादी संघटना असल्याची लोणकढी थाप मारली.  बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त ऐकता ऐकता ते सगळे मुस्लीम वस्तीत झाले आहेत, हे कुणाला लगेच कळाले नसते. जरी कळाले असते तरी कुठल्याही हिंदूने जाऊन मुस्लिमांना कापून काढले नसते किंवा मुस्लिमबहुल वस्तीत बॉम्बही फोडले नसते. मग, शरद पवारांनी हा खुळचटपणा कशासाठी केला? त्याचा लाभ कुणाला झाला? याच दळभद्री मानसिकतेतून मालेगाव बाँबस्फोटप्रकरणामध्ये पकडलेले दोन दहशतवादी सोडून देण्यात आले आणि कर्नल पुरोहित यांना त्यात गोवले. कर्नल पुरोहित यांना गोवण्यामागे त्यांनी संपूर्ण किनारपट्टी भागात दाऊद व दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलचा लावलेला शोध हे कारण होते. साध्वी प्रज्ञासिंग आणि अभिनव भारतचे इतर सदस्यांना पकडून हिंदू दहशतवाद (दहशतवादाचा समतोल राखण्यासाठी) सिद्ध करता येणे शक्य होते. कर्नल पुरोहितांना त्यात गोवावे हा पाकिस्तानचा, दाऊदचा आदेश महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळणार्‍यांना टाळता येणे शक्यच नव्हते. पुरोहितांना गोवल्यामुळे आणि किनारी भागातील गस्त हटवल्यामुळे कसाब आणि त्याच्या टोळीला जलमार्गे घुसणे शक्य झाले. 

२६/११च्या आधी दोन दिवस आधी गृह सचिव आणि आपात्कालात निर्णय घेण्यास अधिकृत असलेले गृह मंत्रालयातील ९ सदस्य पाकिस्तानात बैठकीसाठी असणे व त्यांचा एक दिवस वाढवला जाणे हा निव्वळ योगायोग मानायचा? या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग नाही, असे गृहमंत्र्यांनी म्हणणे स्लीपर सेलची पाठराखण नव्हे? अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक आहे हे पाकिस्तानने ३० डिसेंबर रोजी मान्य करेपर्यंत हा हिंदू दहशतवाद आहे, असे कंठरवाने कोण ओरडत होते? 

प्रत्येक लहानमोठा हल्ला हे पाकिस्तानचे भारताविरुद्ध चाललेले युद्ध आहे, या पद्धतीनेच ते हाताळले नाही, तर चीन, तालिबानी आणि खलिस्तानी यांच्या साहाय्याने पाकिस्तान भारताला कधी गिळंकृत करेल हे कळणारही नाही. 

इतकी वर्षे सातत्याने होणार्‍या दहशतवादाला आम्ही आजही ‘इस्लामी दहशतवाद’ असे लिहायलाही घाबरतो. जैश ए मुहम्मद, लष्कर ए तैयबा या सारख्या तमाम मुस्लीम संघटनांनी माजवलेल्या अत्याचाराला ‘इस्लामी दहशतवाद’ म्हटल्याने भारतीय मुस्लिमांना वाईट वाटेल, त्यांच्याविरुद्ध तिरस्काराची भावना हिंदू जोपासतील हा विचारच खुळचटपणाचा आहे. भारतीय मुसलमानाचे ‘इस्लामी दहशतवादा’शी काहीही देणेघेणे नाही. या मुद्दाम पसरवलेल्या अनाठायी भीतीपायी आपण ’इस्लामी दहशतवाद’ असे म्हणत नाही. उलटपक्षी त्याला सौम्य करण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ नावाचं थोतांड उभं करतो किंवा ‘सामाजिक शांतता’ बिघडण्याची भीती व्यक्त करतो. याचा त्रास हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही भोगावा लागतो. 

कसाबकडे समीर दिनेश चौधरी या नावाचे बनावट ओळखपत्र मिळाले तेव्हा त्याने त्याची ही हिंदू ओळख दाखवण्यासाठी हातावर धागा बांधला होता. जर त्या रात्री तुकाराम ओंबळेंनी कसाबला जिवंत पकडला नसता आणि त्याचा मृत्यू झाला असता तर तो ‘हिंदू दहशतवादी’ म्हणून मरण पावला असता. ‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना सत्य म्हणून जगभर नोंदवली गेली असती.

जे सत्य आहे, त्याला सत्य म्हणण्याचे धाडस नसणे ही माणसांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. ‘इस्लामी दहशतवाद‘ आणि पाकिस्तानचे भारताविरुद्ध युद्ध या दोन गोष्टी आपण जेव्हा त्या जशा आहेत तशाच स्वीकारू तेव्हाच त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे शक्य होईल. त्याऐवजी आपण मानवतेचे, शांततेचे अनाठायी आभास बाळगले तर २६/११ सारख्या घटना घडतच राहतील. इतक्या की, ३६५ दिवसही भरून जातील!


1 टिप्पणी:

  1. प्रत्येक धर्म ग्रंथ हे सरकारी मान्यता प्राप्त संघटने द्वारा योग्य अयोग्य अशा लोकहितार्थ तथ्य अतिरिक्त व्यक्तव्य आढळल्यास असे धर्म ग्रंथ बंद केल्यास धर्माच्या नावाने केले जाणारे आतंकवाद कमी होण्यास मदत होईल

    उत्तर द्याहटवा