चारही आश्रमांपैकी गृहस्थाश्रम प्रमुख आहे. आपण गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्यावर हयात असलेल्या तीन पिढ्यांची व हयात नसलेल्या तीन पिढ्यांची जबाबदारी असते. वसू, रुद्र आणि आदित्य स्वरूपात असलेल्या मागील तीन पिढ्यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्यासाठी श्राद्धात दानाच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत. ब्राह्मणाला दान द्यायचे नसल्यास देऊ नका. अगदी आपण नास्तिक असलो, कर्मकांड वगैरे मानत नसलो तरीही आपापल्या योग्यतेप्रमाणे या पद्धतींचा अवलंब करावा. पूर्वी ओझे ठेवण्यासाठी खांब बांधले जात, तळी, जलाशय, पाणपोयी उभारली जात, तोही यातलाच प्रकार आहे. आईवडिलांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले; भले ते शिक्षण, उपक्रम, विचार किंवा अन्य काही असेल ते पुढे न्यावे. एखाद्या मुलास शिक्षणात मदत करावी(आपल्या नावाचा जयजयकार न करता). सर्वांना हे करणे शक्य होईलच असे नाही. त्यांनी विधीयुक्त श्राद्ध, तर्पण तरी करावे. अजिबातच शक्य नसेल त्यांनी किमान, ब्राह्मणाला शिधा तरी त्याच तिथीस द्यावा. मात्र, काहीच केल्याशिवाय राहू नये.
सूक्ष्म देहाने स्थूल देह सोडणे म्हणजे मृत्यू. सूक्ष्म देहाला स्थूल देहाच्या आकाराची काही काळ का असेना सवय होते. (म्हणूनच आपल्याकडे पार्थिव शरीर पुरण्याऐवजी जाळण्याचा विचार ऋषींनी दिला तो योग्यच आहे. ख्रिश्चनिटी व इस्लाममध्ये पार्थिव शरीर पुरले जाते व जजमेंट डे किंवा कयामत का दिन या दिवशी देव निर्णय करेपर्यंत तसे ठेवावे लागते. म्हणूनच ते ‘रेस्ट इन पीस’ म्हणतात.) सूक्ष्म देहाला जाणीव असते, पण व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे स्थूल देह त्याच्याकडे नसतो. सूक्ष्म देहाने हा देह सोडून पुढच्या प्रवासास लागावे म्हणूनच तो जाळला जातो. यासाठी जे या विचारांनी जगले त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना श्रद्धांजली देताना ‘रेस्ट इन पीस’ म्हणू नये. एका बाजूने पार्थिव देह जाळायचा आणि दुसऱ्या बाजून त्याच पार्थिवाला ‘शांततेत विश्रांती घे’ म्हणायचे ही माणसाची मेल्यानंतर केलेली अक्षम्य आणि क्रूर थट्टा आहे. शांततेने विश्रांती घेण्यासाठी (रेस्ट इन पीस) स्थूल देह किंवा पार्थिव शरीर आहे कुठे? ते तर जाळले गेले आहे. स्थूल देह जाळल्यानंतर, सूक्ष्म देहाचा पुढे प्रवास होणे अपेक्षित आहे. त्याने तिथेच गुरफटून राहणे अपेक्षित नाही.
कोणत्याच कर्मफलाचे बंधन नसल्यास सूक्ष्म देह सत्, चित्, आनंद या अवस्थेस जातो. आपल्याकडील सर्व संत याच अवस्थेतून पुन्हा स्थूल देह धारण करतात व परत त्याच अवस्थेत परततात. पुन्हा स्थूल देह प्राप्त होईपर्यंत किंवा शुद्ध चैतन्य होईपर्यंत सूक्ष्म देहाचा प्रवास सुरूच राहतो. तो वसू, रुद्र, आदित्य या स्वरूपात राहतो. त्याला पुढे गती मिळावी म्हणून जशी त्याची कर्मे साहाय्यक होतात, तशीच आपण जाणीवपूर्वक आणि श्रद्धेने केलेली कर्मेही साहाय्यभूत होतात. स्थूल देह धारण केला तरीही आपण त्यांच्यासाठी केलेली कर्मे त्या जन्मात ‘काहीही स्वार्थ, संबंध नसताना मदत मिळणे’, वगैरे अशा पद्धतीने साहाय्यभूत होतात. आपण आपल्या पूर्वजांचे देणे लागतो, जो देह धारण केला आहे तो त्यांच्यामुळे आहे, एवढे तरी किमान लक्षात ठेवून आणि आपली जबाबदारी म्हणून जाणीवपूर्वक व श्रद्धेने श्राद्ध करावे.
माणूस मेल्यावर ‘आत्म्याला सद्गती लाभो’, ‘आत्म्याला शांती लाभो’, असे आपण म्हणतो ते एका अर्थाने चुकीचे आहे. आत्मा (शुद्ध चैतन्य किंवा जाणीव) शांतच असतो व त्याला कुठेही जायचे नसते. ज्याला कर्माच्या बंधनातून सुटेपर्यंत एका स्थूल देहातून दुसऱ्या स्थूल देहात प्रवास करायचा असतो, तो सूक्ष्मदेह असतो. म्हणूनच प्रत्येक जन्मी आपल्याला चारही प्रकारचे ऋण अंशत: फेडण्यासाठी जाणीवपूर्वक आणि श्रद्धेने कर्म करणे आवश्यक आहे. तो आपला धर्म आहे. त्याचे पालन करावे; थट्टा करू नये.

