शनिवार, ११ जानेवारी, २०२५

दोष आणि जबाबदारी

दोष आणि जबाबदारी
मठ, मंदिराच्या वादात दोष आणि जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. ज्याचा दोष आहे त्यावरच त्याची जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. विचारवंत आणि विश्वस्त दोघेही आपापल्या जागी दोषी आहेत. त्यांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. अन्यथा संस्कृतीची हानी होणे निश्चित आहे.

लूट, लुटालूट म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय पैसे, मालमत्ता बळजबरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, जमिनीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूशिवाय अन्य गोष्टींसाठी वापर होणे याला फसवणूक म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला तर त्याला लुटणे म्हणता येत नाही. मंदिर, मठ लुटालूट करतात का? तर ‘नाही’ हे त्याला स्पष्ट व रोखठोक उत्तर आहे. मग फसवणूक, लुबाडणूक कोण करतात? याचे उत्तर मंदिर, मठ समिती असे द्यावे लागेल.

देव वेगळा व देवस्थान वेगळे. लोक देवासाठी श्रद्धेने पैसे देतात व देवळे, मठ लुटतात. त्याच तर्काने जायचे तर देवस्थान, मठ वेगळे व त्यांच्या समित्या वेगळ्या. लोक देवस्थान, मठ यांना देणग्या देतात ते त्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे देतात. लोक मठ, मंदिराला श्रद्धास्थान मानतात. त्या देवस्थान किंवा मठाच्या समित्यांना लोक श्रद्धास्थान मानत नाहीत. देवस्थान जागृत आहे, असे म्हटले जाते; देवस्थान समिती जागृत आहे, असे म्हटले जात नाही. समित्यांनी भ्रष्टाचार, अपहार केला, असे म्हटल्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्यांना लक्ष्य करण्याऐवजी जाणूनबुजून श्रद्धास्थानाला लुटारू, हीन ठरवले जाते. कुठल्याही डॉक्टरने लुबाडणूक, फसवणूक केली तर आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो; वैद्यकशास्त्राला नाही. त्याप्रमाणेच मंदिर, मठ समितीने भ्रष्टाचार केल्यास समितीला दोषी धरले पाहिजे, मंदिर किंवा मठाला नाही.  धर्माच्या, मंदिराच्या, मठाच्या नावे गैरव्यवहार केला जातो, असा तर्क मांडायचा तर तोच तर्क विज्ञानाचा, वैद्यकशास्त्राचा वापर करून फसवणार्‍या डॉक्टरलाही लागू होतो. विज्ञान, वैद्यकशास्त्र दोषी नसते; धर्म, मंदिर, मठ असतात असे कसे?

अनेक देवस्थानांना बाजारू रूप आले आहे, ते समित्यांमुळे आले आहे. देवस्थानांचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम समित्यांनी केले आहे. देवस्थानाच्या जमिनी परस्पर विक्रीस काढणे, पैशांचे गैरव्यवहार आदी हीन प्रकार इतके चालतात की लिहितानाही कठीण वाटते. अनेक लहान लहान देवळांच्या जत्रा पटकार प्रायोजित करतात. काही ठिकाणी ‘देवाची’ आणि ‘पटकारांची’ अशा दोन दोन जत्रा भरतात. जत्रेला दूर कोपर्‍यात दारूची दुकाने सुरू असतात. देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि पुजारी यांचे वाद अनेक देवळांत होतात. हाणामारीची भांडणे होतात. ज्या देवासाठी देवस्थान आहे, त्याची मूर्तीच उपटून काढण्यापर्यंत मजल जाते. या सगळ्यांना जे जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. एका गावातल्या मंदिरात समिती नेमण्यासाठी माणसे ओढून आणावी लागायची, त्या गावात एक कंपनी आल्याबरोबर आणि तिने पैसा ओतायला सुरुवात केल्याबरोबर देवस्थान समितीवर वर्णी लागण्यासाठी अक्षरश: घराघरांत वाद होऊ लागले. सत्ता, संपत्ती यांच्या नादात बरबटलेल्या देवस्थान समित्यांनी व सदस्यांनी देवस्थानांचे सांस्कृतिक महत्त्व कमी केले आणि अक्षरश: बाजार मांडला. उलट काही देवस्थान, मठ समित्यांनी केलेले सामाजिक, सांस्कृतिक कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. अनेक लहानलहान मंदिरे लहानमोठे उपक्रम चालवत आहेत. शेगाव, पावस यांचे कार्य याबाबत अभ्यासण्यासारखे आहे. जे वाईट आहे ते वाईट आणि जे चांगले आहे ते चांगले, या न्यायाने ज्याचे माप त्याच्या पदरी घालणे म्हणूनच फार महत्त्वाचे ठरते.

लुटालूट हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. त्यामुळे, विचारवंत देवळे, मठ यांनाही लुटारू ठरवतात. वास्तविक त्यासाठी समित्यांना जबाबदार धरले पाहिजे. पण, तसे न करता विचारवंतांनी मंदिर व मठ यांना लुटारूंच्या श्रेणीत ढकलले. विचारवंतांची त्यामागची भूमिका, हेतू वेगळे आहेत हे ठळकपणे जाणवत असले तरीही देवस्थान समित्या आणि विश्वस्त सोवळे ठरत नाहीत. विचारवंत आणि विश्वस्त यांच्या चुकीच्या भूमिकांचे दूरगामी परिणाम म्हणजे धर्म, संस्कृती याविषयी नकारात्मक, त्याज्य, हीन भावनेत वाढ होते. समाजकारण, राजकारण यात सांस्कृतिक मानबिंदूंचा खेळ मांडणे कुणाच्याच  हिताचे नाही. त्याचप्रमाणे देवस्थानच्या नावाला बट्टा लागेल, अधर्म होईल असे कोणतेही कृत्य न करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी मठ, मंदिर समित्यांवर आणि विश्वस्त असलेल्या लोकांवर आहे. विचारवंत आणि विश्वस्त यांनी संस्कृतीच्या मानबिंदूंना धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. 

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

श्रद्धास्थानांवर आघात करणे हाच हेतू

दत्ता नायक व मोहनदास लोलयेकर या दोघांनी मांडलेली मते व त्यावर उमटलेली प्रतिक्रिया यावरून बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. त्यावर कुणी कसे व्यक्त व्हावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. इथे जाणीवपूर्वक श्रद्धास्थानांना लक्ष्य केले जातेय का, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.  ‘लुटालूट’, ‘देऊळ’ असेच शब्द का वापरले गेले? कारण ती श्रद्धास्थाने आहेत. संस्कृतीचे मानदंड असलेली प्रतीके आहेत. 

लूट, लुटालूट म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय पैसे, मालमत्ता बळजबरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, जमिनीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूशिवाय अन्य गोष्टींसाठी वापर होणे याला फसवणूक म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला तर त्याला लुटणे म्हणता येत नाही. 

लोलयेकर म्हणतात देव वेगळा व देवस्थान वेगळे. लोक देवासाठी श्रद्धेने पैसे देतात व देवळे, मठ लुटतात. त्याच तर्काने जायचे तर देवस्थान, मठ वेगळे व त्यांच्या समित्या वेगळ्या. लोक देवस्थान, मठ यांना देणग्या देतात ते त्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे देतात. ते त्यांना श्रद्धास्थान मानतात. त्या देवस्थान किंवा मठाच्या समितींना लोक श्रद्धास्थान मानत नाहीत. समित्यांनी भ्रष्टाचार, अपहार केला, असे म्हटल्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जाणूनबुजून श्रद्धास्थानाला लुटारू, हीन ठरवले जाते. कुठल्याही डॉक्टरने लुबाडणूक, फसवणूक केली तर आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो; वैद्यकशास्त्राला नाही. त्याप्रमाणेच मंदिर, मठ समितीने भ्रष्टाचार केल्यास समितीला दोषी धरले पाहिजे, मंदिर किंवा मठाला नाही.  धर्माच्या, मंदिराच्या, मठाच्या नावे गैरव्यवहार केला जातो, असा तर्क मांडायचा तर तोच तर्क विज्ञानाचा, वैद्यकशास्त्राचा वापर करून फसवणार्‍या डॉक्टरलाही लागू होतो. विज्ञान, वैद्यकशास्त्र दोषी नसते; धर्म, मंदिर, मठ असतात असे कसे?

दत्ता नायक व लोलयेकर यांनी देवस्थान समिती, मठ समिती लुटालूट करते असे म्हटले नाही. देवळे, मठ लुटालूट करतात असे म्हटले आहे. हे अनवधानाने नाही. पाच-सहा पिढ्या कळत नकळत रुजवलेल्या नकारात्मक विचारांचे ते प्रतिबिंब आहे. जगभर जिथे जिथे संस्कृती संपल्या तिथे तिथे हेच पाहावयास मिळते. अगदी नकळत बिंबवलेल्या शब्दांचा परिणाम खूप मोठा होतो. सगळे हिंदी चित्रपट काढून पाहा; त्यात वाईट घडते ते सणाच्या दिवशीच का असते? देवळात लपूनछपून प्रेम(?) करणारे दाखवतात; कधीही मशिदीत, चर्चमध्ये का नाही? ‘हवस का पुजारी’, असतो; पाद्री, मौलवी का नाही? प्रश्‍न हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्‍चन असा नाहीच मुळी. आपल्या संस्कृतीची श्रद्धास्थाने पद्धतशीरपणे नकारात्मक, घृणास्पद ठरवण्यात आली. याचा परिणाम इतका होतो की, ज्या सणांनी पर्यावरण जपले ते सण पर्यावरणविरोधी ठरवले जातात. देवळात बोकडाच्या बळीवर कायदेशीर बंदी आणली जाते. ईदला बोकडाचा बळी हा राज्यघटनेने दिलेला अधिकार ठरतो. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी व साम्यवादी विचारवंतांनी शेकडो वर्षे रुजवलेले नकारात्मक विचार अशा पद्धतीने फलद्रूप होत आहेत. आपण आपल्याच संस्कृतीच्या प्रतीकांना हीन, वाईट ठरवत आहोत. 

याचीच दुसरी बाजू पाहू; यातला एकही विचारवंत, इतिहासतज्ज्ञ चर्च संस्थेने देवळे पाडून चर्च बांधल्या असे म्हणत नाही. ते बिल पोर्तुगिजांच्या नावे फाडले जाते. पोर्तुगिजांनी देवळे पाडून चर्च उभी केली असे म्हटले जाते. भारतभर देवळे पाडून मशिदी बांधल्या त्याचे बिल मुस्लीम शासकांवर फोडले जाते, इस्लामवर नाही. 

लुटालूट हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. देवळे, मठ हेही लुटारू ठरतात. नास्तिकवाद, समतावाद, पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम असलेले सगळे विचारवंत, अ‍ॅक्टिव्हिस्ट संस्कृतीच्या प्रतीकांना, मानबिंदूंना लक्ष्य करतात. म्हणूनच देवस्थान व मठ समितीऐवजी ‘देवळां’, ‘मठ’ आणि भ्रष्टाचार, फसवणूक याऐवजी ‘लूट’ असे शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात. दत्ता नायक यांचा राजकीय लाभ मिळवण्याचा हेतूही असू शकेल. वाद होतील, पेटतील, चर्चेत राहता येईल या अपेक्षेने वाक्ये उच्चारलेली असू शकतात. मोहनदास लोलयेकरांनी समतावादी दृष्टिकोनातून भूमिका मांडलेली असावी. समाजकारण, राजकारण यात सांस्कृतिक मानबिंदूंचा खेळ मांडणे कुणाच्याच  हिताचे नाही. यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त वादावादी आणि दूरगामी परिणाम म्हणजे धर्म, संस्कृती याविषयी नकारात्मक, त्याज्य, हीन भावनेत वाढ होते.