बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

कट्टरतेविरुद्ध कट्टरता, डोळ्यास डोळा आणि जशास तसे

कट्टरतेला कट्टरता हे उत्तर असू शकत नाही, हे जेव्हा आपण मान्य करतो, तेव्हा मुळात कट्टरताच नष्ट करण्यासाठी आपण काही व्यवस्था करतो का? हा प्रश्न विचारला जाणे आवश्यक आहे. अन्यथा आपण कट्टरतेची व्याख्या आणि संदर्भ यांचा एकांगी विचार करू लागतो. केवळ विचार व्यक्त करणार्‍यावर कट्टरतेचे लेबल लावून मोकळे होतो आणि तशीच कट्टर पांथिक कृती करणार्‍याविरुद्ध अवाक्षरही उच्चारत नाही...



-----------

कट्टरतेला कट्टरता हे उत्तर असू शकत नाही, हे जेव्हा आपण मान्य करतो, तेव्हा मुळात कट्टरताच नष्ट करण्यासाठी आपण काही व्यवस्था करतो का? हा प्रश्न विचारला जाणे आवश्यक आहे. अन्यथा आपण कट्टरतेची व्याख्या आणि संदर्भ यांचा एकांगी विचार करू लागतो. केवळ विचार व्यक्त करणार्‍यावर कट्टरतेचे लेबल लावून मोकळे होतो आणि तशीच कट्टर पांथिक कृती करणार्‍याविरुद्ध अवाक्षरही उच्चारत नाही...

------------


विनोबा भावे यांनी १९२४ ते १९२७ या कालावधीत ’महाराष्ट्र-धर्म’ साप्ताहिकात लिहिलेला एक लेख आम्हाला अभ्यासक्रमात होता. त्यात ते म्हणतात;

’आपण ’जशास तसें’ पुष्कळ वेळा म्हणतो, पण आपल्याला त्यातला मतलबच समजत नाही. ’जशास तसें’ याचा अर्थ इतकाच करावा की, दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपली ढाल मजबूत असली पाहिजे. ’जशास तसें’ याचा अर्थ तलवारीशी तलवार लढवावयाची, असा करणें मंद बुद्धीचें काम आहे. तलवारीशी लढवावयाची तर ढालच. पण त्या ढालीचा सहन करण्याचा जोर तलवारीच्या मारण्याच्या जोरापेक्षा कमी पडता कामा नये. दुश्मनाच्या सवालात जर पांच शेर राग भरलेला असला तर आपल्या जबाबात पांच शेराहून कमी प्रेम नसावें.’

आम्हाला तो लेख समजावून सांगतांना सर म्हणाले, ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा हा नियम लावल्यास एक दिवस सगळे जग आंधळे होईल. तसेच तलवारीविरुद्ध तलवार लढवणे योग्य नाही.’

मी हात वर केला. सर, म्हणाले, 

‘विचार, काय विचारायचे आहे!’

सर, असा कुठला योद्धा आहे का, जो फक्त ढालच घेऊन लढाईला जातो?

या प्रश्नाला सरांनी उत्तर दिले नाही. पुढे अनेक वर्षे हा प्रश्न माझ्याशी लढाई करत राहिला. संदर्भ बदलले, विषय बदलले, प्रश्न अनुत्तरितच राहिला.

आता हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे हरिद्वार येथे दि. १७ ते दि. १९ रोजीपर्यंत भरलेल्या या धर्मसंसदेत विविध आखाड्याच्या महंतांनी मांडलेले विचार आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया. यात मांडले गेलेले विचार मंचावरील अनेक महंतांना पटले नाहीत, आवडले नाहीत व ते ती सभा सोडून निघूनही गेले. आता याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटू लागले आहेत. ‘हिंदू धर्म तालिबानी होत चालला आहे का?’ इथपासून ते ‘कट्टर हिंदू धर्म अधिकच हिंसक, द्वेष पसरवणारा आणि कट्टर होत आहे’ इथपर्यंत अनेक तर्कवितर्क मांडले गेले. अनेकांनी त्याचा संदर्भ येऊ घातलेल्या निवडणुकीशी जोडला, तर अनेकांनी त्याचा संदर्भ २०१४साली झालेल्या सत्तापरिवर्तनाशी जोडला. आता त्यात भाषणे देणार्‍या ज्ञात, अज्ञात महंतांविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल होऊन गुन्हेही नोंदवले गेले आहेत. पुढील कारवाईही यथोचित होईल.

राहता राहतो प्रश्न कट्टरतेचा. मुळात हिंदू धर्म हा प्रेषितांनी स्थापित केलेल्या पंथांइतका कट्टर, एकचालकानुवर्ती आहे का? तर नाही आणि कधीच नव्हता. त्याहीपुढे जाऊन धर्म आणि पंथ यांची तुलना करणेच चुकीचे आहे. हिंदू धर्माअंतर्गत येणार्‍या विविध पंथांमध्ये म्हणजे शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध, शीख इत्यादी पंथांमध्ये कमी अधिक प्रमाणात कट्टरता आढळते, जशी ती अब्राह्मिक पंथांमध्ये म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम पंथामध्ये आढळते.  हिंदू धर्माच्या शाखा असलेले पंथ सहअस्तित्व मान्य करतात. अब्राह्मिक पंथांत सहअस्तित्व ही संकल्पना मान्य नाही. यातच सर्व पांथिक कट्टरतेचे व संघर्षाचे मूळ आहे.

कुठल्याही अन्य पंथीयांच्या आणि विशेष करून मुस्लीम व ख्रिश्चन प्रार्थनास्थळविरहित हिंदू राष्ट्र निर्माणाची संकल्पना हरिद्वार येथे मांडली गेली, ती अत्यंत चुकीची व धर्मविरोधीच आहे. किंबहुना ती नसलेल्या कट्टरतेला जन्माला घालणारी आहे. दुसरी संकल्पना होती ती शस्त्रसज्ज होण्याची. हे शस्त्रसज्ज होणे स्वरक्षणासाठी होते की मुस्लिमांना कापून काढण्यासाठी हे त्या तिन्ही दिवसांचा पूर्ण व्हिडिओ उपलब्ध झाल्यानंतरच लक्षात येईल. उपलब्ध जे व्हिडिओ तुकड्या तुकड्यांमधून सोशल मीडियावरून फिरत आहेत, त्यावरून ठोस निष्कर्ष काढणे घाईचे व चुकीचे होईल. आधीच तयार निष्कर्षांना पुरावे म्हणून त्यांचा वापर सध्या जोरात सुरू आहे. 

आक्षेपार्ह भाषेचा वापर माझ्या पाहण्यात आला तो रायपूर येथे भरलेल्या धर्मसंसदेत अकोल्यातील कालीचरण महाराज यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे सगळेच विचार सगळ्यांनाच पटतील असे नाही, पण म्हणून त्यांचा उल्लेख अशा पद्धतीने करणे कसे समर्थनीय ठरते? केवळ असमर्थनीय नव्हे तर ज्याची कितीही निंदा केली तरी कमीच असा शब्दप्रयोग त्यांनी गांधीजींबाबत केला. अध्यात्म (?) क्षेत्रात असलेल्या व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा? कठीण आहे!  खरंच खूप कठीण आहे!

हरिद्वार येथे झालेली भाषणे किंवा इतर कुठल्याही हिंदूंच्या सभेत झालेली भाषणे व त्यांचा परिणाम हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यात व्यक्त होणार्‍या भावना आणि हिंदूंची प्रत्यक्ष अवस्था यात अंतर नसते. पण, त्याचा अपेक्षित परिणाम अजिबात होत नाही. राणा भीमदेवी थाटात केलेल्या या भाषणांचा बोलणार्‍यांच्या प्रत्यक्ष कृतीशी, वागण्याशी काहीही संबंध नसतो. उलट जे खरोखरच प्रभावी असतात त्यांना अशी भाषणे देण्याची, आरोळ्या ठोकण्याची आवश्यकताच नसते. उदाहरणच द्यायचे झाल्यास एक उत्तम उदाहरण आहे. 

लोकसत्तामध्ये दि. १७ मार्च २०१६ रोजी ‘असंतांचे संत’ हा अग्रलेख छापून आला होता. त्यावर सोशल मीडियामध्ये, वाचकांच्या पत्रांमध्ये किंवा रस्त्यावर येऊन घोषणा देत, मोर्चे काढून कुठेही निषेध व्यक्त झाला नाही. पण, तरीही दुसर्‍याच दिवशी पहिल्या पानावर दिलगिरी व्यक्त करीत संपूर्ण अग्रलेखच्या अग्रलेख मागे घेण्यात आला. त्यातील भाषाही फारच अभ्यासनीय आहे. एरव्ही ‘नकळत, अहेतुकपणे भावना दुखावल्या गेल्या असल्यास’ अशी शब्दयोजना केली जाते. पण, या क्षमायाचनेत ‘भावना दुखावल्याबद्दल’ असे शब्द योजले व संपूर्ण अग्रलेख मागे घेतला. याच कुबेरांनी मोहन भागवत जे बोललेच नव्हते ते जाणीवपूर्वक मुद्दाम अग्रलेखामध्ये छापले होते. त्यावर प्रतिक्रिया उमटताच तिसर्‍या पानावर मोघम दिलगिरी व्यक्त केली होती. ‘असंतांचे संत’ या अग्रलेखात मदर तेरेसा यांच्यावर आणि इतर भोंदू साधूंवर टीका होती, जी चर्चला आवडली नाही. मालकांना फोन आला आणि मालकांचा संपादकांना. त्यानंतर वृत्तपत्राच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण अग्रलेख मागे घेण्याचा असा कुबेरी दळभद्रीपणा घडला. कुठेही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढण्यात आला नाही. याला चर्चचा अंत:प्रवाह (अंडर करंट) म्हणतात. फारशी वाच्यता न करता आतून जिथे हव्या तिथेच चाव्या फिरवायच्या. हे हिंदू धर्ममार्तंडांना, पीठांना, पीठाधीश्वरांना जमतं? फक्त बोंबाबोंब करायची.  या धर्मभूषणांनी फक्त तोंडाच्या वाफा दवडायच्या. स्वघोषित सन्याशांनी अघोषित पत्नीसह सेल्फी घेत विदेशात धर्मसभा गाजवायच्या. या व्यतिरिक्त धर्म जतन करण्यासाठी नेमके काय केले जाते? जे केले जाते ते पंथ, संप्रदाय, समाज यांच्यापुरतेच मर्यादित कार्य असते. 

आमच्याकडे गोवन वार्तामध्ये पुरवणीत नजराना दरवेश/शेख नावाची एक लेखिका लेख लिहायची. माझ्याशी ओळख होताच तिने मला एकदा कुराणाचे मराठी भाषांतर असलेले पुस्तक दिले. त्या पुस्तकाच्या कागदाचा दर्जा, बाइंडिंग, टिकावे यासाठी घेतलेली काळजी पाहता त्यासाठी खर्चही अफाट आला असणार हे निश्चित होतं. पण, मला हे पुस्तक तिने विनामूल्य दिलं. मी माझी मते बदलणार नाही, हे माहीत असूनही दिलं. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी जुना करार, नवा करार ही पुस्तके मला दिली आहेत. आमच्या घरी माझ्या लहानपणी न चुकता शुभवर्तमान नावाचं लहान पुस्तक यायचं. ख्रिश्चन, मुस्लीम पंथाचा विस्तार करण्याचे मिशन हाती घेतलेली ही माणसे अविरत कार्यरत असतात. त्याचा लेखाजोखा त्यांचे इमाम घेतात. किमान, आपण आपला धर्म समजून घेण्यासाठी तरी काय प्रयत्न करतो?

कुणी गीतेचे, उपनिषदांचे, हिंदू मूल्यांचे विवेचन करणारे पुस्तक वितरित करतो का? आपल्या परिसरात किती हिंदू घरांमधून संध्याकाळच्या वेळी किमान रामरक्षा तरी म्हटली जाते का, याचा धांडोळा किती मठाधीश घेतात? किती आईवडील आपल्या मुलांना रामरक्षा म्हणायला लावतात? किती विचारवंत, प्राध्यापक धर्म आणि पंथ यातील फरक किंवा हिंदू धर्माची जीवनमूल्ये यांचा प्रसार करतात? उलट ‘हिंदू’ हा शब्द ऐकताच अंगावर पाल पडल्यासारखे झटकून टाकतात. 

हरिद्वार येथे शस्त्रसज्ज होण्याची किंवा इतर पंथीयांविषयी कथित द्वेष पसरवणारी भाषा करणार्‍यांनी खरोखरच किती कत्तली, वंशविच्छेदन आजपर्यंत केले आहे? या उलट मोपला नरसंहार, डायरेक्ट अ‍ॅक्शन, फाळणी आणि त्यानंतर पूर्व पाकिस्तानात व काश्मीरमध्ये हिंदूंचे वंशविच्छेदन झाले आहे. जिथे प्रतिकार झाला, तिथे तिथे त्याला हिंदू-मुस्लीम दंग्याचे रूप दिले गेले आहे. हिंदूंच्या कट्टरतेचे उदाहरण म्हणून हरिद्वार येथे झालेल्या भाषणांचा उल्लेख करताना हे हिंदू वंशविच्छेदनाचे संदर्भ मुस्लीम कट्टरतेबाबत विचारवंतांनी देणे आवश्यक आहे. अन्यथा ते एकांगी होईल.

अनेक विचारवंत अशी एकांगी भूमिका मांडतात. तशीच एकांगी भूमिका म्हणजे, अंगभूत असलेल्या मुस्लीम कट्टरतेला छेद देण्यासाठी हिंदूंनी कट्टर होणे. कट्टरता नाहीशी करण्याचा हा उपाय निश्चितच नाही. 

एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये, किंवा डोळ्यास डोळा हा नियम झाल्यास सगळे जग आंधळे होईल, असे म्हणण्याआधी मुळात गाय मारलीच जाऊ नये आणि डोळा फोडलाच जाऊ नये, अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. लढाईच्या प्रसंगी वार अडवायला जशी ढाल आवश्यक आहे, तशीच प्रसंगी वार करण्यासाठी किंवा शत्रूच्या मनात धाक निर्माण करण्यासाठी तलवार असणेही आवश्यकच आहे. 


४ टिप्पण्या:

  1. हिंदु मनाचा मागोवा घेणारा लेख, आताची आक्रमणाची चाल शस्त्र घेऊन नव्हे तर हिंदु मन कलुषित किंवा निष्क्रिय करून केले जाते, हिंदूंनी स्वतः मध्ये धर्मा बद्दल गुणात्मक विकास करण्याची वेळ आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. आधी हिंदू धर्म समजून घेऊया.. मगच कट्टरता जातीयवाद याला थारा देऊ .. कट्टरता म्हणजे दुसऱ्या धर्माचा राग द्वेष करणे असा अर्थ नाही.. मुळातच हिंदू धर्म सर्व धर्म समभाव मानण्यातला आहे.. सर्व हिंदूंनी स्वतः मध्ये आपल्या स्वधर्माबद्दल अभिमान बाळगुन स्वतःबरोबरच धर्माचा विकास करण्याची वेळ आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. आधी हिंदू धर्म काय आहे कसा आहे आमच्या धर्माचे रीतिरिवाज,संस्कार,परंपरा काय आहेत त्याच रूप स्वरूप प्रथम जाणुन घेणे हे गरजेचे आहे व त्यानुसार प्रत्येकाने लागायला हवे.स्व:तापासुन सुरवात केली पाहीजे .असा प्रत्येकजण जर वागू लागला आपला देश परमवैभवाप्रत जाईल यात शंका नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप सुंदर एवढे समतोल लेखन आजकाल दुर्मिळ झाले आहे.

    उत्तर द्याहटवा