आपण जे बोलतो ते बोलल्यानंतर फार वेळ राहत नाही. जे जे नाशवंत, नाहीसे होणारे आहे त्याला आपण ‘क्षर’ म्हणतो. त्या मानाने अधिक काळ टिकणारे म्हणून आपण जे लिहितो त्याला ‘अक्षर’ (जे नाशवंत नाही, नाहीसे होत नाही) असे म्हणतात. आपण जे बोलतो, व्यक्त होतो ते टिकावे ही इच्छा जागृत झाल्यापासून माणसाने त्यासाठी विविध पर्याय शोधले. दगडावर कोरणे हा त्यातलाच एक प्रकार. आपण जे बोलतो त्याला चिन्हे, चित्रे या स्वरूपात माणसाने कोरून ठेवायला सुरुवात केली. त्याच्या सामूहिक विकासातून ‘चित्रलिपी’ तयार झाली. लेखनतंत्र व लेखनकला कालानुरूप विकसित होत गेली. आपल्याकडे सिंधूसंस्कृतीतली लिपी, वैदिक, ब्राह्मी, खरोष्टी, शारदा, नागरी अशा अनेक लिपी वेळोवेळी तयार होत गेल्या. काही लुप्त झाल्या तर काही परिवर्तित झाल्या. भाषा वेगवेगळ्या असल्या तरी अतिप्राचीन काळी बहुलिखित लिपी ब्राह्मी होती. त्यातून पुढे भाषेला जास्तीत जास्त अनुकूल होतील, अशा लिपी विकसित झाल्या. लिपी विकसित होण्याला भाषांप्रमाणेच विविध पंथांतील तंत्रमार्गाचाही महत्त्वाचा वाटा आहे.
भाषा हे केवळ संवादापुरते मर्यादित माध्यम नाही. संस्कृती, विचार, भूगोल, इतिहास, संस्कार या सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन व्यक्त होत जाणारा प्रवाह म्हणजे भाषा. ज्या भाषेत आपण बोलतो, शिकतो त्यानुसार आपले विचार होत जातात, वागणूक तशी होते आणि संस्कृतीही तशीच घडत जाते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, पूर्वीच्या काळी जेव्हा इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम झाले नव्हते, तेव्हा चार लोक एकत्र बसून पाचव्या व्यक्तीविषयी बोलत असतील व अचानक ती व्यक्ती आली, तर सहज तोंडातून निघत असे, ‘शंभर वर्षे आयुष्य’ किंवा ‘देवासारखा आलास, तुझ्याच विषयी बोलत होतो’. आता, ‘थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर’, असे वाक्य सहज तोंडात येते. फार दूर जायला नको, आपण गोव्यातील गावांची नावे कशी उच्चारू लागलो आहोत? माशेलला मार्शेल किंवा मार्सेला, केळशीला कुवेलेशीम आणि फोंडाला पोंदा. कोकणीत आडनावांच्या मागे ‘कार’ हा असलेला प्रत्यय मराठीतही जसाच्या तसा घेण्याचा आग्रह धरणारे विचारवंतही, फोंडाचे पोंदा होण्याला आक्षेप घेत नाहीत. ‘इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिथे मूळ नावाप्रमाणे उच्चारण्याचा आग्रह धरू नये’, असे म्हणत आंग्लभाषेच्या ‘पोंदा’(खाली) जातात. गोवा सरकारने विशेषत: पर्यटन खात्याने गावांची नावे रोमन लिपीत देताना सोबत देवनागरीतही ती व्यवस्थित लिहावीत. जेणेकरून गोव्याबाहेरील व्यक्ती जिला देवनागरी वाचता येते, ती तरी निदान त्या ग्रामनामाचा योग्य उच्चार करेल.
योग्य उच्चारण करण्यासाठी, शब्दाचा नेमका अर्थ व्यक्त होण्यासाठी प्रत्येक भाषेला स्वतंत्र अशी नैसर्गिक लिपीही विकसित होत गेली. आज बहुतेक संस्कृतोद्भव भाषांसाठी देवनागरी लिपी कमी अधिक फरकाने वापरली जाते. देवनागरी ही मराठी, हिंदी व कोकणी या भाषांसाठी नैसर्गिक व अत्यंत समर्पक लिपी आहे. असे नाही की, रोमन लिपीमध्ये या भाषा लिहिल्याच जाऊ शकत नाहीत. पण, त्यात वाचनार्थ नेमका व नेटका उतरेलच असे नाही. तशी इंग्रजी ही भाषा देवनागरीतही लिहिली जाऊ शकते; पण, ती इंग्रजीची नैसर्गिक लिपी ठरत नाही. अर्थबोध होण्याऐवजी अर्थहानी होणेच अधिक संभवते.
कोकणी भाषा देवनागरीप्रमाणे रोमन, कन्नड, मल्याळम व अरबी अशा लिप्यांमध्येही लिहिली जाऊ शकते; लिहिली जातेही. पण, म्हणून गोव्यातही ते स्तोम माजू द्यायचे का, हा खरा प्रश्न आहे. कर्नाटकात व अन्य ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या स्थानिक लिपीतून कोकणी लिहावीशी वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. पण, गोव्यात तसा आग्रह धरणे सर्वथैव चुकीचे आहे. गोव्यात कोकणीसाठी रोमन लिपीचा आग्रह ख्रिश्चनांसाठी धरला जात असल्याचे सांगितले जाते. पण, किती ख्रिश्चन रोमन लिपीतील कोकणी भाषा माध्यम म्हणून शिकतात? मग तरीही ‘रोमी कोकणी’ला राजाश्रयाचा आग्रह का धरला जातोय?
‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी, स्वतंत्र भाषा नाही. आता तिला ‘किरिस्तावांची कोकणी’ आणि ‘कोकण्यांची कोकणी’, असा रंग द्यायचा असेल तर तो भाग वेगळा! काहीही झाले तरी ‘रोमी कोकणी’ नावाची वेगळी भाषा नाही. रोमन लिपीत लिहिल्या जाणाऱ्या कोकणीला राजभाषा करायचे असल्यास, मग अन्य लिप्यांनी काय घोडे मारले आहे? जितक्या लिप्यांतून कोकणी लिहिता येते तितक्या लिप्यांसह कोकणी भाषेला राजभाषा करायचे का? ही अशी वर्गवारी करून कुणाला वर्गसंघर्ष पेटत ठेवायचा आहे? भौगोलिक, पांथिक अस्मिता लिपीच्या माध्यमातून वाढवत नेल्यास पुढील काळात यावरून भांडणे निश्चित होतील.
कोकणी-मराठीच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पहिले प्यादे मावजोंनी सरकवले. अंतर्विरोध असलेल्या त्यांच्या वक्तव्यातून पुढील चालींची कल्पना आली होती. आता ती प्रत्यक्षात येत आहे. राजभाषेच्या वादात राजलिपीचा वादही घुसडण्यात आला आहे. मराठी राजभाषा करायची असल्यास ‘रोमी कोकणी’लाही तो दर्जा द्या; नाही तर अन्य कुणालाच नको, अशी ही खेळी आहे. सवत रंडकी व्हावी म्हणून स्वत:च्या नवऱ्याला मारण्याच्या या उद्योगातून कुठल्याच भाषेचे काहीच भले होणार नाही. फावेल ते फक्त इंग्रजीचे.










