शनिवार, १ जून, २०२४

किती म्हणून तो प्रसिद्धीचा सोस!

कमी जास्त प्रमाणात का असेना, प्रसिद्धी प्रत्येक माणसाला हवीच असते. अनेकांची प्रसिद्धीपराङ्‌मुखता प्रसिद्धीपेक्षाही अधिक प्रसिद्ध होते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक मार्ग चोखाळले जातात. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत कुणालाही प्रसिद्ध होण्याचा सोस सोडवत नाही आणि ज्यांनी तो पाहायचा त्यांना सोसवत नाही. म्हणजे मग प्रसिद्ध होऊच नये का? स्वत:ची प्रसिद्धी स्वत: करणे अगदीच गैर आहे का? वाहवा,  दाद, कौतुकाची थापही मिळणार नसेल तर कुणीही केलेल्या परिश्रमांना तरी काय अर्थ राहतो? 

आज काल प्रसिद्ध होण्याचे अनंत मार्ग उपलब्ध झालेले आहेत. ज्या क्षणी गोष्ट घडली, त्याच क्षणी ती कधी एकदा संपूर्ण जग पाहते असे होऊन जाते. जगाने ते पाहावे याची सोय उपलब्ध झाल्यापासून तर या ‘होऊन जाण्याला’ भलताच चेव चढला आहे. एखादा अपघात घडला तर अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीची वैद्यकीय सेवा देण्याऐवजी जमलेले त्याची ‘रिळं’ काढू लागतात. हा ‘रील’ नावाचा जो काही प्रकार या भूतलावर यथेच्छ थैमान घालत आहे, तो पाहता नसलेल्या अंगभूत गुणांचे चीज होत नाही यावरचा विश्वासच उडाला आहे. इतका उडालाय की काही केल्या खाली बसायचे नावच घेत नाही. आपण आपल्या पदरचे पैसे खर्च करून इतरांची श्रीमंती पाहण्याचा उद्योग करतो - त्याला सज्जन लोक सिनेमा पाहणे म्हणतात - तो का करतो? कारण त्यात दाखवणाऱ्यांकडे दाखवण्यासारखे व पाहायला आलेल्यांकडे पाहण्यासारखे भरपूर काही असते. रंग, रूप, नृत्य, कला, अभिनय यांची प्रमाणबद्ध रेलचेल असते. त्या सिनेमातल्या कुठल्या तरी एका गीतावर नवराबायकोची एक जोडी रील करून ‘व्हायरल’ करते. त्यातील बायकोचे आकारमान लक्षांत घेता, नवऱ्यास कमीच जागा लाभते, तो भाग वेगळा. पण, दोघे मिळून जे काही अंगविक्षेप, हावभाव करतात त्याला नृत्य म्हणणे अगदीच जिवावर येते. अंतू बर्व्याच्या शब्दांत सांगायचे तर ‘काय ते दिसणें आणि काय ते नाचणें!’ असे असले तरी त्या जोडीची रिळे पाहून त्यांना प्रसिद्ध करणाऱ्यांची संख्या अतोनात असते. 

मेट्रोत रिळे काढणाऱ्यांचे धाडस पाहिल्यास त्यापुढे गेल्या पिढीत मिसरूड फुटू लागताच ‘तसल्या’ भाड्याच्या टेप व्हीएचएस प्लेयरवर चारपाच मित्रांसह गुप्त जागी चोरून पाहण्याचे केलेले धाडस म्हणजे अगदीच वरणभात, भेंडीची भाजी ठरते. भांडणे व शिव्या तर त्याहीपेक्षा लाजवाब! दोहोंचा एकत्रित विश्वकोश कुणास पाहायची इच्छा असल्यास मेट्रो रील्स पाहावीत. विभक्तीचे प्रत्यय कुठे कुठे व कसे कसे ‘लावता’ येतील याचा अंदाज बहुधा आद्य व्याकरणकार पाणिनी, तर्खडकरांपासून ते आधुनिक काळातील कोणत्याही प्रज्ञावंतास येणे शक्य नाही. प्रसिद्धीसाठी का असेना, पण अशा थोर विभूती आपल्या सामान्य जनांचे कचाकचा ज्ञानवर्धन करत अहोरात्र मेट्रोमधून रिल्स काढत फिरतात हे भाग्यच म्हटले पाहिजे. याची संभावना प्रसिद्धीचा सोस म्हणून करणे कसे बरे योग्य होईल?

येनकेन प्रकारेण प्रसिद्ध होणे हा तर अभिनेत्यांसाठी अविभाज्य घटकच आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात हमासच्या हल्ल्यामुळे इस्राईलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचा नामक अभिनेत्रीला भारताने इस्राईल सरकारच्या मदतीने सोडवून सुखरूप मायदेशी परत आणले. आता ही बया प्रसिद्धीसाठी आपल्याला बघा म्हणण्याऐवजी ‘ऑल आइज ऑन रफाह’ म्हणते. फार लांब कशाला, आपली माधुरी दीक्षितही हेच म्हणते. भाजपचे आमदार असलेल्या मनोज तिवारींची कन्या रिती तिवारीसुद्धा हेच म्हणते. अभिनेत्यांच्या बाबतीत प्रसिद्धीतून पैसा आणि पैशातून प्रसिद्धी असे एक इष्टापत्ती चक्र असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्यासाठी जे जे केले जाते तेच सर्व राष्ट्रीय स्तरावरही केले जाते. त्यांना तसे करू सांगणारी, त्यासाठी प्रसिद्ध करणारी अतिशय सक्रिय यंत्रणा असते. कुठल्या ‘स्थानी’ झालेल्या बलात्कारांविरोधात प्लेकार्ड घेऊन प्रसिद्धी मिळवायची व कुठल्या नाही, हेही ही यंत्रणाच ठरवते. कटू असले तरी हे सत्य आहे.

या अभिनेत्यांपेक्षाही एक पाऊल पुढे टाकतात ती नेतेमंडळी. चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या वृत्तवाहिन्यांचा ‘बूम’ नामक माइक तोंडासमोर आला की जी काही मुक्ताफळे उधळली जातात, त्यांना अखिल विश्वात तोड नाही. सामान्य माणूस ज्यांना ‘शिव्या’ म्हणतो, त्यांचे अर्थ यांच्या शब्दकोशात वेगळेच गोंडस असतात. कुठे पगडी घालायची, कुठे पागोटे घालायचे आणि कुठे टोपी फिरवायची, याचे प्रसिद्धीनुरूप हिशेब ठरलेले असतात. ‘हल्लाबोल’, ‘खडसावले’, ‘गरजले’ असे मथळे देत तो चोख पाळणारे पाळीव पत्रकारही असतात. ही ‘उभयपक्षी’ प्रसिद्धी जशी राजकारण्यांना लाभदायक ठरते, तशीच ती पत्रकारांनाही बरेच काही देऊन जाते. राजकारणी पत्रकारांच्या मागे प्रसिद्धीसाठी तगादा लावतात की पत्रकार त्यांच्या मागे लागतात, की हे प्रसिद्धीच्या इष्टापत्तीचे चक्र आहे हा खरे तर संशोधनाचा विषय आहे.

अभिनेते, नेते यांप्रमाणेच त्यांचे कार्यकर्तेही प्रसिद्धीसाठी खूप कष्ट घेतात. मग ते समाजमाध्यमांवर एकमेकांच्या नेत्यांविरुद्ध चिखलफेक करण्याची झुंडशाही असो किंवा ‘कमळ’ सोडुनी ‘हाती’ ‘झाडू’ घेत स्वच्छता अभियान नामक यानात बसून फोटो काढणे असो, प्रसिद्ध होण्याच्या हव्यासात कुठेही कमतरता नाही. फोटोग्राफरांना घेऊनच फिरतात सगळे. तसे आता ‘ऑल आइज ऑन मोदी मेडिटेशन’ म्हणत सगळ्यांचे डोळे तिथेच वटारले आहेत. धड ‘आप’लेेही नव्हे व धड परकेही नव्हे असे प्रशांत भूषणही टीका करत आहेत. काँग्रेसने तर मोदींच्या ध्यानधारणेची तक्रार निवडणूक आयोगाकडे करून टाकली आहे. आता निवडणुकीचा ताण घालवण्यासाठी लंडनला जावे की सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम जावे की कन्याकुमारीला ध्यानस्थ बसावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, त्याचे फोटो काढावेत व जाहीर करावेत का, हा खरा प्रश्न आहे. इतर सर्व राजकारण्यांप्रमाणे मोदींनाही प्रसिद्धी हवी, यात दुमत नाही. मागे त्यांचे लक्षद्वीप फोटोसेशन गाजले होते व आता कन्याकुमारीचे गाजत आहे. मोदी ध्यानास बसलेल्याचे सर्व कोनातून व्हिडिओ व फोटो काढले जातात व प्रसिद्धही होतात यावर राजकीय विरोधक आक्षेप घेतात. तो घेतला पाहिजे; पण एक फरकही लक्षांत घेतला पाहिजे. मोदी ताण घालवण्यासाठी अशा ठिकाणी जातात जिथे फोटोग्राफरला नेऊन फोटो काढणे व ते प्रसिद्ध करणे शक्य असते. इतर राजकारणी ताण घालवण्यासाठी अशा ठिकाणी जातात, जिथे फोटोग्राफर नेणे शक्य नसते व कुणी काढलेच फोटो तर प्रसिद्ध करणेही शक्य नसते. हा यातला फरक आहे.

राजकारण्यांनी प्रसिद्ध असण्याचा, होण्याचा संदेश राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगवेगळा उमटत असतो. त्यातून स्वप्रसिद्धी करायची आहे की काही संकेत द्यायचे आहेत यावर त्याचे मूल्य ठरते. सामान्य माणसांच्याबाबतीत हा फरक थोडा वेगळ्या पद्धतीने लागू होतो. कर्तृत्व आणि कीर्ती समसमान असतात तेव्हा होणारी प्रसिद्धी खटकत नाही. त्यासाठी केलेले प्रयत्न ‘सोस’ ठरत नाहीत. आपल्याला दाद मिळावी ही कलाकाराची माफक अपेक्षा असणे यात काहीच गैर नाही. वेळप्रसंगी ती आपसूक मिळतेही. पण, त्यासाठीच आदळआपट करणे म्हणजे ‘सोस’. आपले विचार अनेकांपर्यंत पोहोचावेत असे लेखकाला वाटणे साहजिकच आहे; आपलेच विचार पोहोचावेत, इतरांचे पोहोचू नये यासाठी केलेली यातायात म्हणजे ‘सोस’. अनुयायी, चाहते आणि सामान्य माणूस यांना हा लोकप्रिय व्यक्तींच्या ठायी असलेला प्रसिद्धीचा सोस सोसेनासा होतो. ‘प्रसिद्ध’ होण्याआधी ‘सिद्ध’ होणे अधिक महत्त्वाचे असते. त्याविना जो काही केला जातो तो सगळा सोसच असतो.

२ टिप्पण्या:

  1. प्रसन्न सर, तुमचे लेखन अफलातून आहे. भविष्यात लेकसत्ता, मटा वा दिव्य मराठी दैनिकांत तुमचे सदर सुरू व्हावे, ही सदिच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. फारच योग्य लिहील आहे .तुम्ही फरक काय तो अगदी बरोबर सांगीतलाय.

    उत्तर द्याहटवा