नालासोपार्यातील गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी बावीस वर्षीय आरती रामदुलार यादव व एकोणतीस वर्षे वयाच्या रोहित यादव यांचे एकमेकांवर गेली सहा वर्षे प्रेम होते. पण, तिचे अन्य कोणावर तरी प्रेम बसले आहे व ती आपल्याला दूर लोटतेय हा संशय रोहितच्या मनात बळावला. त्यावरून शनिवार दि. १६ जून रोजी त्यांचे भांडण झाले. त्याने तिला मारले व तिचा मोबाइल फोडला. तिने व तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी रोहितला बोलावून असे न करण्याविषयी समज दिली व सोडून दिले. मंगळवार दि. १८ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आरती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. गावराई पाडा येथील स्टेट बँकेसमोर रोहितने तिला अडवले आणि सोबत आणलेल्या जाडजूड लोखंडी-पान्याने आरतीवर एकामागून एक असे सुमारे १५ वेळा प्रहार केले. त्या दोघांच्या अगदी जवळ पाच माणसे (यात एक स्त्रीसुद्धा होती) व काही अंतरावर सुमारे दहा माणसे हा प्रकार पाहत होती. दोन चार घाव घातल्यानंतर एका व्यक्तीने रोहितला अडवले. पण, त्याची शक्ती अपुरी पडली असावी किंवा रोहितच्या आक्रमकपणामुळे तो मागे सरकला. यातील एक दोघांनी या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरणही केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत, आरती मेल्यावरही तिच्याजवळ बसून रोहित तिला ‘क्यों किया ऐसा मेरे साथ..?’ असा प्रश्न विचारत असल्याचे ऐकू येते. एका सीसीटीव्हीतही ही घटना चित्रित झाली आहे. त्यावरून व त्यानंतरच्या बातम्यांवरून हा सर्व घटनाक्रम समोर येतो.
‘कोविड’सारख्या जीवघेण्या साथमारीत एकमेकांना सांभाळून घेण्याची, तसे कार्य प्रत्यक्ष करणार्यांना प्रोत्साहन देण्याची सामूहिक भावना प्रकर्षाने समाजात दिसत होती. ‘कोविड’नंतर ती पुन्हा कमी होऊन माणूस स्वत:पुरता वर्तुळाकार कोषात गुरफटला आहे. ‘कशाला दुसर्यांच्या भानगडीत पडा?’, असा सोयीस्कर व स्वत:च्या कोडगेपणाचे निर्लज्ज समर्थन करणारा प्रश्न त्याला महत्त्वाचा वाटू लागला आहे. जिथे चुकत असेल तिथे स्वत:ला व इतरांना जाब विचारणेच बंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी स्त्रीवर उघड उघड होणारा अन्याय रोखण्यास जावे व तिने ‘माइंड युवर ओन बिझनेस’ असे साहेबी भाषेत ऐकवावे हे प्रकार घडत आहेत. ‘मी वाट्टेल ते करेन; तुम्ही विचारणारे कोण?’ असे विचारणे किंवा ‘हे विचारण्याचा तुम्हांला अधिकार नाही’, असे बजावणे ही सामान्य बाब झाली आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अचाट कल्पनांमुळे पूर्वी माणसांमध्ये असलेली सांस्कृतिक व सामूहिक जबाबदारी घेण्याची भावनाच नष्ट होत चालली आहे. पूर्वी ‘भावोजी’, ‘जावई’ हे एका घरापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण गावाचे असायचे. त्यामुळे, आपण चुकीचे वागल्यास गावातील कुणीही जाब विचारू शकतो, ही भीती असायची. आजकाल कुणी विचारतही नाही आणि कुणाला विचारलेले आवडतही नाही.
एखाद्याचे व्यक्तिगत भांडण सोडवणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य रोखणे यात फरक आहे. पण, पोलीस अशी घटना पाहणार्याला, त्याविरुद्ध आवाज उठवणार्या नागरिकांना आरोपीसारखी वागणूक देतात ही वस्तुस्थिती आहे. ‘ज्याच्या हातात ससा तो पारधी’ या उक्तीला खरे करणारा पोलिसी खाक्या सामान्य माणसाला भरडून काढतो. साक्ष, कोर्ट-कचेर्या या चक्रात अडकणे नकोसे होऊन जाते. स्वत:च्या संसाराचे रहाटगाडगे ओढणार की, ‘घटना बघण्याचे’ परिणाम पाहत बसणार? त्यापेक्षा बघूनही न बघितल्यासारखे करणे माणसाला जास्त योग्य वाटते. मारहाणीची, धमकीची तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीची पार्श्वभूमी, मानसिक स्थिती पडताळून तज्ज्ञांकडून समुपदेशन आवश्यक आहे का, याचाही धांडोळा पोलिसांनी घेतला पाहिजे. पोलिसी समज देण्याऐवजी मानसोपचार तज्ज्ञांकरवी त्याची तपासणी झाली असती, तर तिचा जीव कदाचित वाचला असता. जर-तर याला आता अर्थ नसला तरी एक धूसर शक्यता होती.
एखाद्या गुन्ह्याची घटना अनेकजण एकाचवेळी बघतात, पण ती थांबवायला कुणीही पुढे येत नाही. जेवढे अधिक लोक त्याठिकाणी बघत उभे असतात तेवढीच प्रत्येकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव कमी होत जाते. कुणीही पुढे आले नाही तरी समोर घडत असलेला गुन्हा रोखणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असेही वाटत नाही. त्यातही थोडासा सूक्ष्म फरक लिंगभेदाचाही आहे. वसईतल्या घटनेत दोघेही पुरुष असते तर कदाचित चित्र वेगळे होण्याची शक्यता आहे. प्रेम वगैरे प्रकरणात ‘दोष त्या मुलीचाच असणार’, असे गृहीत धरणारे शेकडा नव्वद लोक असतात. चूक कुणाची आहे, यापेक्षाही आत्ता कुणाचा तरी जीव जातोय तो वाचवणे महत्त्वाचे आहे, हा विचार पट्कन डोक्यात येत नाही.
‘तू माझी झाली नाहीस, तर तुला कुणाचीही होऊ देणार नाही’, या खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण करणारे बरेच चित्रपट मध्यंतरीच्या काळात येऊन गेले. नाही म्हटले तरी त्याचा सूक्ष्म प्रमाणात पगडा युवकांच्या मनावर बसला. ‘हेच खरे प्रेम’ व त्यासाठी जीव घेतला तरी ते योग्य आहे (एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर), असा समज दृढ झाला आहे. स्वभावत: रागीट, खुनशी असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात हा विचार घट्ट बसला की, सारासार विचार करणेच संपते. आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिला जिवापाड जपण्याऐवजी प्रसंगी तिचा जीव घेणे योग्य वाटू लागते.
केवळ हळहळ किंवा माणुसकी हरवल्याचा दोष माणसाच्या माथी मारून फारसा फरक पडणार नाही. पुढे कधी तरी असाच आणखी एका आरतीचा बळी जाईल, लोक बघ्याची भूमिका घेतील, राज्यकर्ते कठोर शासन करण्याचे आश्वासन देतील, विरोधक कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे सांगतील आणि आपण किमान पळभर ‘हाय’ म्हणून आपापल्या कामाला लागू! जेव्हा आपण एखाद्या घटनेवर तात्पुरते व्यक्त होतो तेव्हा आपल्या चिंतेचा व चिंतनाचा प्रवास एका घटनेपासून दुसर्या घटनेपर्यंत होतच राहतो. व्यक्ती, स्थान, संदर्भ बदलतात; पण घटना घडणे थांबत नाही. आपली वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी, किमान शक्य असलेल्या पातळीवर तरी निभावणे रुजले पाहिजे. निदान सार्वजनिक ठिकाणी तरी चुकीचे घडत असल्यास जाब विचारला गेला पाहिजे. कुटुंबामध्ये, समाजमनामध्ये, व्यवस्थेमध्ये याचा विचार होणे गरजेचे आहे. स्वत:च विणलेल्या सज्जनेताच्या कोषात गुरफटलेल्या प्रत्येकास प्रत्येक गोष्टीची खंत करावी लागेल. तेव्हाच भविष्यात कुठेतरी एखादी आरती यादव अशी निर्घृण हत्या होण्यापासून वाचेल...



