बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

संस्कृतीची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारा गणांचा अधिपती

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो.
श्रावणातला ऊनपावसाचा खेळ आवरता घेत सृष्टी नवसृजनाने सजते. तिची शुभ, मंगल आणि कल्याणकारक पावले जीवनाचे रहाटगाडगे सुरू ठेवण्याची प्रेरणा देतात. निर्मितीपासून विलयापर्यंतचा हाच सृजनोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, ज्याला गणेशचतुर्थी म्हटले जाते! हा सण व हा देव सर्व अबालवृद्धांना अत्यंत आवडतो.  दरवर्षी मातीचा गणपती तयार करण्यापासून ते त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यापर्यंत हा सण अक्षरश: साजरा केला जातो. गणेश हे भारतातले सर्वांत लोकप्रिय दैवत. तो गणांचा ईश (देव) म्हणून गणेश आहे. तो गणांचा अधिपती असल्याने गणपती म्हणून ओळखला जातो. ज्याचा याच अर्थाने उल्लेख ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातील तेविसाव्या सुक्ताच्या पहिल्या मंत्रात येतो

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑तिं हवामहे क॒विं क॑वी॒नामु॑प॒मश्र॑वस्तमम्। 
ज्ये॒ष्ठ॒राजं॒ ब्रह्म॑णां ब्रह्मणस्पत॒ आ नः॑ शृ॒ण्वन्नू॒तिभिः॑ सीद॒ साद॑नम्॥

व ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील एकशेबाराव्या सुक्ताच्या नवव्या मंत्रातही 

नि षु सी॑द गणपते ग॒णेषु॒ त्वामा॑हु॒र्विप्र॑तमं कवी॒नाम् । 
न ऋ॒ते त्वत्क्रि॑यते॒ किं च॒नारे म॒हाम॒र्कं म॑घवञ्चि॒त्रम॑र्च ॥

असा उल्लेख येतो. 

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो. 

गणपती सर्व संकटे, विघ्ने, अडथळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दूर करतो. हा गणपती गजानन (गज - हत्ती व आनन - तोंड = हत्तीचे तोंड असलेला) कसा झाला, याच्या अनेक कथा शिवपुराण, भविष्यपुराण, स्कंदपुराण अशा अनेक पुराणांमध्ये येतात. वानगीदाखल तिथे आलेल्या तपशिलात शिरायचे नसते; त्यात असलेले तप आणि शील पाहायचे असते. तत्त्वांना प्रतीकात्मक रूपात रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे पुराण. प्रतीकांतून पुराणकथा नेमके काय सांगू पाहते, याचा विचार होणे गरजेचे आहे. समुद्रमंथनाची कथा कार्यकर्ता कसा असावा, हे सांगते तर गणेशजन्माची कथा नेता कसा असावा, हे सांगते!

अमृत प्राशन करतात ते देव आणि हलाहल विष प्राशन करतो तो महादेव. एरव्ही कापरासारख्या गोऱ्या असलेल्या महादेवास आपण संपूर्ण निळा रंगवतो; वास्तविक त्याचा कंठ फक्त निळा आहे. समाजात वावरताना कार्यकर्त्याला अनेक मंथनांना सामोरे जावे लागते. त्यातून निर्माण झालेले हलाहल प्राशन करणे क्रमप्राप्त असते. ते पोटात गेले तर आपला जीव जातो आणि बाहेर ओकले तर समाज नष्ट होतो. म्हणून त्या नीलकंठाप्रमाणे ते गळ्यातच ठेवावे लागते. कार्यकर्ता असावा तर तो महादेवासारखा आणि नेता असावा तर त्याच्याच मुलासारखा म्हणजे गणपतीसारखा!

चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करून, त्यात प्राण टाकले होते. मग देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. हा मुलगा कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याच वेळी देवी पार्वतीला भेटण्यासाठी महादेव तिथे येतात. लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करीत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही. त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो. मग शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतता. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा ज्या प्राण्याचे डोके दिसेल ते आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेशाचा जन्म होतो, अशी ही कथा आहे.

निर्मिती, विनाश आणि पुन्हा नवनिर्मितीची ही प्रतीकात्मक कथा आहे. गणेशाचा जन्म शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांतून झाला आहे. तो बुद्धिमत्ता आणि चैतन्याचे प्रतीक आहे. अगदी, गजमुख असले तरी तो हत्तींचा अधिपती नाही, गणांचा अधिपती म्हणजेच नेता आहे. हत्तीचेच तोंड का बरे या कथेत निवडले असावे? हा प्रश्न आपल्याला त्या प्रतीकामागील विचाराकडे घेऊन जातो. या गजमुखामध्येच नेता कसा असावा, याचे सारे सार दडले आहे. तोंडावळ्यास पाहता गजमुखाचे डोळे खूपच लहान आहेत. नेत्याची दृष्टी बारीक व दृष्टिकोन सूक्ष्म असायला हवा. या शूर्पकर्णाचे कान सुपासारखे आहेत. नेत्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे व निवडून योग्य असेल ते आत घ्यावे. हत्तीला परिसराचा सुगावा सोंडेमुळे लागतो. सुईसारखी लहानातली लहान व ओंडक्यासारखी मोठ्यातली मोठी गोष्ट उचलण्याचे सामर्थ्य त्या सोंडेत असते. हे दोनही गुण नेत्यात असाव्या लागतात. हे सर्व सांभाळणारी, समतोल साधणारी कुशाग्र, प्रवाही बुद्धिमत्ता हे गणपतीचे वैशिष्ट्य आहे. बुद्धी, संतुलन आणि स्पष्टता यांचे जतन करून परिवर्तन घडवणे हे नेत्याचे काम आहे. 

बुद्धिमत्ता म्हणजे माहितीवर प्रक्रिया करून तिचा संचय करण्याचे सामर्थ्य नव्हे. अस्तित्वाशी सुसंगत राहण्याची, प्रतिकार न करता प्रवाहित होण्याची, अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची आणि मर्यादांच्या पलीकडे विस्तारत जाण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता! म्हणूनच अडथळे दूर करणारी, समरसतेने सर्वांना एकत्र आणणारी व जीवनात संतुलन जपणारी बुद्धिमत्ता जोपासणे आवश्यक आहे. अशी बुद्धिमत्ता असलेल्या नेतृत्वाला जपणे गरजेचे आहे. 

खरी बुद्धिमत्ता कधीही निष्ठूर, एककल्ली व एकाच जागी साचलेली नसते. ती प्रवाही आणि अबाधित असते. शुद्ध चैतन्याचे प्रकट रूप असलेली हीच बुद्धिमत्ता ऋषींनी निसर्गाशी प्रामाणिक असलेल्या कृषी संस्कृतीत रुजवली. निसर्गचक्राशी जुळणारी व्यवस्था मानवी जीवनाशी जोडली. भावनेशी, उपासनेशी जोडली. म्हणूनच गणेशचतुर्थीसारखे सगळे सण निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. त्याचबरोबर ते शुद्ध चैतन्याच्या प्रवाही असण्याच्या विचाराशीही ऋषींनी जोडले. मूर्ती तयार करण्याची आणि नंतर विसर्जित करण्याची पद्धत ही अस्तित्वाच्या प्रवाही स्वरूपाची ओळख पटवण्याचा एक सांस्कृतिक मार्ग आहे. हा मार्ग वेदकाळापासून ऋषी व कृषी संस्कृतींचा संगम आहे. मूर्त प्रतीकांपलीकडे जात त्यांचे गुण आत्मसात करणे म्हणजे गणेश चतुर्थी; हा साकारातून निराकाराकडे जाण्याचा, जड (मॅटर) हे शुद्ध चैतन्याचेच (प्युअर कॉन्शिअसनेस) रूप आहे हे ओळखण्याचा उत्सव आहे! 

ही गणेशचतुर्थी आम्हा सर्वांमध्ये असलेल्या शुद्ध चैतन्यास ओळखण्याचे सामर्थ्य आम्हांला देवो. संस्कार, संकेत आणि संस्कृती यांची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारे गणांचे अधिपती आम्हांस लाभो!

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

कदाचित आवडणार नाही, तरीही...

कदाचित आवडणार नाही, तरीही...

आपली बाजू खरी, सत्याची असूनही एखाद्या परिस्थितीत कसे व्यक्त व्हावे याची अजिबात जाण नसल्यामुळे हिंदू संघटना अक्षरश: मार खातात. कृतीतून ‘आपण कसं ऐकवलंय माहितीये!’, या वृथाभिमानापलीकडे काहीच ठोस घडत नाही. कुठल्याही प्रकरणात विनाकारण आक्रमक होण्याची पद्धत नेहमीच बरोबर असते, असे नाही. अनेक प्रकरणे वेगळ्या पद्धतीने हाताळणे गरजेचे असते. त्यासाठी काही मूलभूत गोष्टींचे भान, अभ्यास असावाच लागतो.

दुसरी महत्त्वाची बाब जी ठळकपणे लक्षांत ठेवली पाहिजे, ती म्हणजे भारतात ख्रिस्तीकरण आणि इस्लामीकरण (कन्व्हर्जन) घटनात्मक आणि कायदेशीर आहे. भारतात कन्व्हर्जन हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे, त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊच शकत नाही. आता, जो सांगितला जातो तो ‘फसवणूक करून किंवा फोर्स्ड कन्व्हर्जन केल्यास’ अटक व शिक्षेचा प्रकार. फसवणुकीचा गुन्हा नोंद होतो, कन्व्हर्जन केल्याचा नाही! 'आपल्यावर ख्रिस्ती होण्याची जबरदस्ती केली नव्हती', अशी साक्ष आली की फोर्स्ड कन्व्हर्जनचे कलम गळून पडते. सगळ्यात मोठी मेख आहे ती, ‘सगळे पंथ एकच आहेत’ या विचारावर बेतलेल्या घटनात्मक तरतुदीत व त्यानुसार असलेल्या कायद्यांमध्ये. समता, समानता या नावाखाली गायीचा गवत खाण्याचा व वाघाचा गाय खाण्याचा अधिकार त्यांना एकाच ठिकाणी ठेवून मान्य करण्यासारखा प्रकार कलम २५(१)मुळे घडला आहे.

दोन केरळी नननी छत्तीसगडमध्ये जाऊन ख्रिस्तपंथाचा प्रचार केला, दुर्गम भागात ‘सेवा कार्य’ केले. ते ख्रिस्तीकरणच आहे, याबद्दल दुमत नाही. पण, जेव्हा त्याला मानवी तस्करीशी जोडून गुन्हा दाखल केला जातो तेव्हा ते कायदेशीरदृष्ट्या सिद्ध होईल का, हे पाहिलेच जात नाही. त्या महिलांना काम देण्यासाठी नेणे आणि मानवी तस्करी यात बराच फरक आहे. मग, ज्योती शर्मा यांनी अकांडतांडव केले ते कशासाठी? त्या ननना फैलावर घेऊन काय मिळवले? त्यांना तेच सांगितले जे त्यांना माहीत होते. उलट परिणाम असा झाला, की बजरंग दल चुकीचे ठरले आणि ख्रिस्तीकरण करणार्‍या नन सेवाकार्यासाठी समर्पित व निष्पाप ठरल्या! नीट अभ्यास करून, पुरावे गोळा करायला लावून किंवा पोलिसांना देऊन केस केली असती, तर ते जास्त प्रभावी ठरले असते.

ख्रिश्‍चन मिशनरि ख्रिस्तीकरण करतात यात दुमतच नाही. पण, त्यांची कार्य करण्याची पद्धत पूर्णपणे अभ्यासून त्याविरुद्ध वेगळी पद्धत उभी करणे गरजेचे आहे. ती केल्यानंतरही लोक ख्रिस्ती होतच राहणार आहेत. त्यामुळे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी अंत:प्रवाह (अन्डर करन्ट) असणे गरजेचे आहे. गिरिश कुबेरांसारखा संपादक राजीनामा देऊन घरी बसला असता, तर त्याचे फारसे वैयक्तिक नुकसान झाले नसते. पण, त्याने बिनशर्त माफी मागून संपूर्णच्या संपूर्ण अग्रलेख दुसर्‍याच दिवशी मागे घेण्याचा दळभद्रीपणा केला. कुणीही ख्रिश्‍चन माणूस किंवा ख्रिस्ती संस्था यांनी अवाक्षरही काढले नव्हते. पण, असे काय घडले की, कुबेरासारख्या संपादकाला व ‘लोकसत्ता’ला संपूर्ण अग्रलेख मागे घ्यावा लागला? त्यालाच ‘अंडरकरन्ट’ म्हणतात. तिथे हिंदू संघटनांसारखी बोंबाबोंब करावी लागत नाही. जिथे चावी फिरवायची तिथेच फिरवली की ‘निर्भीड’ कुलुपे आवाज न करता उघडतात.

जिथे इस्लाम अजूनही ‘सर तन से जुदा’ वगैरे असल्या भीती घालून कन्व्हर्जन करतो, तिथे ख्रिश्‍चनिटी लोकशाहीचा वापर करते. ‘लोकशाही’ हे कन्व्हर्जनचे आधुनिक हत्यार आहे. संस्कृतीत असलेली सर्वसमावेशकता व सहअस्तित्व या गुणांचा आणि लोकशाहीत असलेली ‘समता-समानता’ ही तत्त्वे यांचा योग्य वापर कन्व्हर्जनसाठी केला जातो. इतके सगळे करूनही आपण त्या गावचेच नसल्याचा कांगावा केला जातो. कदाचित आवडणार नाही, तरीही हिंदू संघटना बोंबाबोंब जास्त करतात; नेमका उपाय कमी प्रमाणात योजला जातो.