मंगळवार, ४ जून, २०२४

काय होणार आज?

‘काय होणार आज?’, या प्रश्नाचे उत्तर तयार करण्याचे काम विरोधी पक्षाने, समर्थक विचारवंतांनी फार पूर्वीच सुरू केले होते. किंबहुना त्यांनी तो विचार मनाशी धरूनच  रणनीती आखावी, अशी व्यूहरचना करण्यात आली होती. याची सुरुवात ‘काँग्रेसमुक्त भारत’ या विचारपेरणीने झाली, याचा मध्य ‘चार सौ पार’ या घोषणेच्या पेरणीने झाला आणि याची सांगता स्थानिक पक्षांचे राष्ट्रीय अस्तित्व समाप्त करण्यासाठी सुरू असलेल्या विचारप्रक्रियेतून कदाचित होईल. यात राजकीय पक्षांचे मतदारांविषयी असलेले पारंपरिक कयास मोडीत निघत आहेत, हे मात्र नक्की.  बदलते विचारप्रवाह विरोधकांनी आत्ता ओळखले नाहीत, तर भाजप स्वकर्माने स्खलित होईपर्यंत विरोधकांना सत्ता प्राप्त होणार नाही, हे सत्य आहे. 

२०१४च्या यशासाठी भाजपने अखंड प्रयत्न केले होते. हळूहळू पण सातत्याने संघटनात्मक बांधणी केली होती. नवनवीन कल्पना निवडणूक प्रक्रियेत आणल्या होत्या व आजही आणत आहेत. सत्ता प्राप्त झाल्यानंतर मोदींनी ज्या ज्या योजना राबवल्या त्या त्या फक्त निवडणुकीत मते मिळवण्यापुरत्या सीमित नव्हत्या. निवडणुकीत मिळणारे यश हे त्याचे उपफल (बायप्रॉडक्ट) आहे. मतदारांची व राजकीय पक्षांची निवडणुकीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचे काम या योजनांनी केले. योजना कशा असफल झाल्या आहेत, याचेच चर्वितचर्वण करण्यात विरोधक गर्क झाले. त्यातून ‘मोदी कसे असफल झाले’, हे सिद्ध करण्यावर नको इतका भर देण्यात आला. अल्पसंख्याक हे काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवर व समाजवादी पक्षाचे स्थानिक पातळीवर बलस्थान होते. या योजनांनी त्या बलस्थानाचा पाया हलवण्याचे काम केले. भाजप केवळ हिंदूहिताच्या गोष्टी करत बसला असता तर विरोधक म्हणतात तसे ‘धार्मिक ध्रुवीकरण’ मोठ्या प्रमाणावर व्हायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. गृहकर्जात सरकारकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी घर महिलेच्या नावावर हवे, यामुळे महिलांना कौटुंबिक निर्णयप्रक्रियेमध्ये आपसूक प्राधान्य मिळत गेले. महिलांच्या शिक्षणाबाबत, उद्योगधंद्यांमध्ये सहभागी होण्याबाबत, गृहिणींचे जीवन कमी कष्टाचे करण्याबाबत, स्वच्छतेबाबत असंख्य योजना यशस्वी पद्धतीने राबवण्यात आल्या. या प्रत्येक योजनेतून सत्तास्थापनेसाठी अनुकूल असलेला महिलांचा एक वर्ग निर्माण झाला. महिलांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीमध्ये लाभदायक ठरलेल्या या योजनांनी आणखी एक भिंत मोडीत काढली ती म्हणजे जात, पंथ आणि समाज यांची. ग्रामीण भागासह अन्य भागांतही महिलांनी मतदान करण्याच्या प्रमाणात झालेली लक्षणीय वाढ, हे त्या बदललेल्या विचारप्रवाहाचे द्योतक आहे. या निवडणुकीत १३७ जागांवर मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक होते. जातपात, पंथ वगैरे गोष्टी हटवत केवळ महिलावर्ग म्हणून आपल्याला मतदान करावे म्हणून आकर्षित करण्याचा प्रयत्न किंवा तसा ठोस विचार विरोधी पक्षाने केलाच नाही. भर केवळ ‘मोदी व त्यांच्या योजनांचे फसणे’ यावरच राहिला. महिलांबाबत मतदारांचा एक वर्ग म्हणून होणारा प्रवाह आपल्याकडे वळवण्याचा विचार झाला नाही. 

जे महिलांबाबत झाले तेच अन्य सामाजिक धारणांबाबतही घडले. मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल अद्याप घडलेला नसला तरीही केवळ जात, पंथ, समाज यापलीकडे जाऊन मतदान करण्याचा विचार मूळ धरू लागला आहे. स्वत:च्या जातीचा आहे, समाजाचा आहे म्हणून मतदान करण्याऐवजी अन्य विचार रुजू लागला आहे. अशा मानसिकतेतून विचार करणाऱ्या मतदारांचा एक वेगळा वर्ग तयार झाला आहे. अर्थात, तो भाजपसाठी अनुकूल आहे, हे सांगणे नलगे. पण, तो आपल्या बाजूने वळावा किमान त्याला मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी तरी काँग्रेसने काय प्रयत्न केले? गोव्यात तर काही बूथवर पोलिंग एजंटही नव्हते. हा असा वर्ग तयार करण्यासाठी आर्थिक, सामाजिक योजना व तयार झालेला वर्ग मतदानाला घेऊन येण्यासाठी संघटनेची बांधणी, यात भाजपने केलेले प्रयत्न निर्विवाद आहेत. त्याची संभावना ‘पाशवी बहुमतासाठी केलेली यांत्रिकता’, अशी करून विरोधकांनी बदलते प्रवाह स्वत:ला अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न बंद पाडले. त्याहीपुढे जाऊन बोलायचे तर हे बदल नाकारण्यामध्येच शक्ती खर्च केली. 

आपल्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करून लोकांसमोर येण्याचा पर्याय निवडण्याऐवजी ‘वॉशिंग मशीन’ म्हणत हेटाळणी करणे किंवा त्यात स्वत:चे डाग लपवत भाजपवासी होण्याचे मार्ग अनेकांनी निवडले. आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करायचे सोडून ‘वॉशिंग मशीन’वरच जास्त प्रकाशझोत ठेवला गेला. पण वॉशिंग मशीन म्हणतोय म्हणजे ‘डाग असणे’ आपण स्वीकृत करतो, असा त्याचा अर्थ निघतो, हे अनेकांच्या लक्षातच आले नाही. ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा असाच एक फसवा चक्रव्यूह आहे. गोव्यात ‘काँग्रेसयुक्त भाजप’ हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ज्यांच्या जिंकून येण्यामध्ये संघटना म्हणून काँग्रेसचे योगदान नगण्य होते, अशा आधुनिक संस्थानिकांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्यांना जाब विचारणारी, हरवणारी व पर्याय देणारी संघटनशक्तीच काँग्रेसकडे नाही. राष्ट्रीय पक्षाची ही गत असेल तर स्थानिक पक्षांची काय अवस्था असेल, हे वेगळे सांगायला नको. परिवार व पक्ष वेगळे नाहीत, असे स्थानिक पक्ष संपण्यास बहुतेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. स्थानिक पक्षांचे अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर संपवण्याचा प्रयत्न २०१४नंतर झाला. २०२४नंतर हे अस्तित्व स्थानिक पातळीवरही राहू नये या प्रयत्नांचे सुतोवाच नवीन पटनायक व बिजू जनता दलाच्या माध्यमातून झाले आहे. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे जे झाले ते अन्य स्थानिक पक्षांचे भवितव्य असू शकते. शरद पवारांनी पक्षविलयाचे जे विधान केले ते त्याचे सार्थ कथन आहे. वेगवेगळे राहून हरायचे की, काँग्रेस किंवा भाजपमध्ये विलीन व्हायचे हे बहुतेक क्षीण झालेल्या स्थानिक पक्षांना ठरवावे लागेल. युती, आघाडी करून लढण्याचा लाभ होण्याऐवजी तोटाच अधिक असतो. इंडिया आघाडीचे घटक असलेले स्टॅलिन तामिळनाडू वगळता अन्यत्र कुठेही दिसले नाहीत. तीच परिस्थिती अन्य राज्यांतील स्थानिक पक्ष प्रमुखांची होती. विधानसभेसाठी एकत्र व लोकसभेसाठी स्वतंत्र या धेडगुजरी मांडणीमुळे सांघिक शक्ती क्षीण झाली. 

ही निवडणूक एक ‘माइंड गेम’ होती. मोदींनी केलेल्या ‘चार सौ पार’ या घोषणेनंतर भाजपला चारशे जागा कशा मिळणार नाहीत, हे सांगण्याची अहमहमिका लागली. त्याचाच दुसरा अर्थ असा होता की, भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार हे विरोधी पक्षांनी वैचारिक पातळीवर निवडणुकांआधी व निर्णय लागण्याआधीच मान्य केले. त्वेषाने मुद्दे मांडणारे प्रवक्ते असूनही एक्झिट पोलच्या वृत्तवाहिनीवरील चर्चांत भाग घेणे काँग्रेसने टाळले, हे त्याचेच द्योतक आहे. हे पराभव होण्याआधी पराभव स्वीकारणे इतकेच नसून प्रतिस्पर्धी विजयी होण्याआधीच त्याचा विजय स्वीकारणे झाले. आयात केलेल्या उमेदवारांचे सत्तास्थापनेनंतर भाजप काय करतो, यावर भाजपची पुढील दिशा ठरणार आहे. या विजयाने पुढील विजयाची नांदी होईल की, पराजयाची बीजे रोवली जातील हे येणारा काळच ठरवेल. 

संघटनशक्ती मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणू शकते, पण त्याचे रूपांतर मते मिळण्यात होईलच याची खात्री देत नाही. राज ठाकरेंचे वक्तृत्व कौशल्य सभेला गर्दी खेचू शकते, पण, त्याचे रूपांतर मते पडण्यात होत नाही. आडाखे बांधणाऱ्या प्रत्येक राजकीय तज्ज्ञांपेक्षा कितीतरी पटीने मतदार कायमच हुशार असतो. केवळ हुशारच नव्हे तर प्रामाणिकही असतो. तो ‘जागा’ निवडून देतो, तशी जागाही दाखवतो. त्याला गृहीत धरणे कायम चुकीचेच असते.

३ टिप्पण्या:

  1. correct analysis. voters know better than so called political analyst and journalists.

    उत्तर द्याहटवा
  2. सर्वच मतदार तसे नसतात बरेच जण अर्धवटराव, अंधभक्तीच्या आहारी गेलेले ... तर शिक्षित मतदार सुद्धा राजकीय पक्षांचे खरे स्वरूप ओळखण्यात कमी पडत असल्याने व राजकीय पटलावरील घडामोडींचा सखोल अभ्यास करण्यात सुद्धा कमी पडत असल्याने मतदान हे कुठल्याकुठेच भरकटते. काही ठिकाणांवरचा अपवाद हि वेगळी गोष्ट.

    उत्तर द्याहटवा
  3. मतदार सुज्ञ आहेत, समतोल कसा राखायचा त्याची जाण आहे. ऊतू नको, मातू नको...हाच संदेश देत आहेत.

    उत्तर द्याहटवा