सहज भरता आली असती, अशा जखमेचे आता गँगरीन झाले आहे. आरोग्यमंत्री आणि डॉक्टर या दोघांनीही याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले आहे. वास्तविक दोघांनीही सेवेत, व्यवस्थेत सुधारणा घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुट्टीच्या दिवशी, रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ओपीडी बंद असते तेव्हा नियमित उपचार घेण्याची व्यवस्था कुठे करावी? अशा उपलब्ध असलेल्या सेवेची माहिती कशी द्यावी, याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा अशीच स्थिती उद्भवल्यास काय करावे, याचे उत्तर कुणाचकडे नसेल.
आता ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करा अशी मागणी डॉक्टर करत आहेत. पण, जीएमसीमध्ये ओळख असल्याशिवाय तातडीने काम होत नाही, लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. ओपीडीसमोर रुग्ण रांगेत उभे असताना थेट ‘आत’ घेऊन जाणार्यांना किती डॉक्टर जाब विचारतात? अडलेला, अडवलेला माणूस कुठून तरी ओळख काढून आपले काम करून घेतो, हाही नेहमीचा अनुभव आहे.
जोडरस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहन घेताना किंवा थांबलेल्या वाहतुकीत वाहन सर्वांत पुढे नेण्यासाठी जी घाई काही वाहनचालक करतात, ती पुढे मार्गक्रमण करताना किंवा वाहतूक सुरळीत झाल्यावर दिसत नाही. पुढे घाई करणारा वाहन सावकाशच हाकत असतो. अनेकदा नेमका हाच प्रकार ओपीडीबाहेर घडतो. रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती घाई करते, पुढे पुढे जाते आणि तपासून घेऊन बाहेर येते. जरा पुढे गेल्यावर सोबतची व्यक्ती एक वाक्य बोलते, ‘पळयले मरे, फुडे सल्लो म्हणोन बेग्यान जालें. लायनीन, फाटी रावल्लो जाल्यार दनपार जावपाची आमकां’. याच वृत्तीची माणसे खासगी रुग्णालयात जातात तेव्हा तिथल्या बाकड्यांवर शांत बसलेली असतात. जेव्हा सिस्टर किंवा मदतनीस नाव पुकारतात तेव्हाच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जातात.
असे अनेक पत्रकार, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी स्वत:ची ओळख वापरून रात्रीच्या दोन तीन वाजता अनेक रुग्णांना मदत केली आहे. मग ते त्यांचे नातलग असतील किंवा नसतील. ओळख वापरणे हा एक भाग झाला, कसलीही ओळख नसताना केवळ माणुसकी म्हणून अपरात्री; एक्स रे काढायला, सिटिस्कॅन करायला रुग्णासोबत त्याला घेऊन जाणारे, रात्रभर थांबणारे पत्रकार, कार्यकर्ते पाहिले आहेत. त्यांना कुणीही कसलेही पदक देत नाही, नंतर ओळखही दाखवीत नाहीत. उलट, ‘तेका खाजा असा रे हें नाका जाल्लें करपाची’ ही स्तुती ऐकायला मिळते. प्रश्न इथे मदत करतात किंवा वजन वापरतात त्याचा नाही; असे करावे लागते याचा आहे. ‘फावोर लावचो पड्टा’ ही स्थिती आणि मानसिकता खरे तर बंद झाली पाहिजे.
फारशी आवश्यकता नसताना, केवळ मोठेपणा, रुबाब दाखवण्यासाठी केलेला व खपवून घेतलेला गैरवापर म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’. सर्वांसाठी असलेल्या नियमांना काहींसाठी वाकवणे म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’. किती डॉक्टरांनी, अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी त्याला प्रत्यक्षात विरोध केला आहे? प्रश्न नोकरीचा असतो, तेव्हा अपवाद म्हणून का होईना, पण हे खपवून घेतले जाते.
रुग्णसेवा, शिस्तपालन यासाठी खासगी रुग्णालयात मनुष्यबळ वापरले जाते, तसे सार्वजनिक रुग्णालायत वापरले जात नाही. त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न झाले पाहिजेत. सार्वजनिक सेवेबद्दल बहुतांश लोकांची मानसिकता गैरवापर, ओरबाडणे, वाट्टेल तसे वापरणे अशी असते. कमी पैशात किंवा किंमत न मोजता मिळालेल्या सेवेचे मूल्य राहत नाही, देणार्याला व घेणार्यालाही!
चित्रस्रोत : आंतर्जाल
सोमवार, ९ जून, २०२५
‘व्हीयापी कल्चर’ म्हणजे नेमके काय?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा