गुरुवार, २ जुलै, २०२६

सावित्रीपासून सावित्रीपर्यंत..

दोन्ही सावित्री वंदनीयच आहेत! एका सावित्रीला दुसर्‍या सावित्रीच्या विरुद्ध उभे करून आपण सुशिक्षित, विज्ञाननिष्ठ वगैरे अजिबात होत नाही. उलट, स्वत:च्याच ज्ञानपरंपरेला नाकारणारे, हीन लेखणारे कपाळकरंटे ठरत आहोत. सत्यवानाची सावित्री आणि जोतिबांची सावित्री हे भारतीय शिक्षण परंपरेतले दोन महत्त्वाचे बिंदू आहेत, ती स्थित्यंतरे आहेत. त्यांचा यथार्थ आदर करणे हीच आपली संस्कृती आहे.

वटपौर्णिमा आली की तिचा ‘अंधश्रद्धा’ म्हणत विरोध करण्याचा कार्यभाग हल्लीच्या काळात उरकला जातो. अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान, गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्य आणि सावित्री विरुद्ध सावित्री अशा पद्धतीने मांडणी केली जाते. केवळ भारतीय पद्धतीचे शिक्षण देण्यासच नव्हे, तर स्वत:च्या ज्ञानपरंपरेला व संस्कृतीला हीन ठरवण्याची मानसिकता रुजवण्यातही वसाहतवादी पूर्णपणे यशस्वी झाले आहेत, याचाच तो पुरावा आहे. 

सत्यवानाशी विवाह झालेली सावित्री ही राजा अश्‍वपतीची कन्या होती. महाभारताच्या वनपर्वातील अध्याय २९३ ते २९९मध्ये ही कथा येते. सावित्रीने यमाशी केलेला संवाद हा निव्वळ भावनिक रडगाणे नव्हता, तर तो सर्वोच्च दर्जाचा न्यायशास्त्र आणि धर्मशास्त्रावरील वाद होता. सज्जनांची संगत आणि विवेक हा ओढवलेल्या मृत्यूवरही कसा मात करू शकतो, हे ती पाच वेगवेगळे तर्क देत यमासमोर सिद्ध करते. वादविवादाच्या प्रत्येक मुद्द्यावर विजयी होत ती आधी यमाकडून सासर्‍यांचे राज्य, डोळे आणि वडिलांना पुत्रप्राप्तीचे वर मागून घेतले. शेवटी, ती स्वतःसाठी ’पुत्रवती भव’ (पुत्रप्राप्तीचा) वर मागते व यम ‘तथास्तु’ म्हणतो. त्यामुळे, यमाला तिच्या नवर्‍याचे प्राणही परत द्यावे लागतात. यातला यमादिकाचा प्रतीकात्मक भाग सोडला तर तात्त्विक चिंतन आणि तिचा अभ्यास आजही वंदनीय आहे. यम किंवा मृत्यूसंबंधी तत्त्वचिंतन दोघांचे प्रसिद्ध आहे; एक नचिकेता आणि दुसरी सावित्री. दोघेही विद्वान, सुशिक्षित आणि म्हणूनच वंदनीय आहेत. 

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील नायगावमधील लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवसे पाटील यांच्यापोटी जन्मलेल्या सावित्रीबाई यांच्यावर लहानपणापासून कष्टांचे संस्कार झाले होते. त्यांचे कुटुंब माळी समाजातील होते आणि त्यांचे वडील गावाचे पाटील होते. माहेरी असताना सावित्रीबाईंना कोणतेही औपचारिक किंवा शालेय शिक्षण मिळालेले नव्हते. पण, पारंपरिक व्यवसायाचे प्रत्यक्ष शिक्षण अगदी लहान वयात मिळाले होते. जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सासरच्या परंपरागत व्यवसायात स्वत: कष्ट करून हातभार लावत होत्या. त्यांना अक्षरओळख जोतिबा फुले यांनी करून दिली. तोवर त्या निरक्षर असल्या तरी अशिक्षित, अडाणी नव्हत्या. प्राथमिक अक्षरओळख घरीच झाल्यानंतर सावित्रीबाईंना थेट शाळा चालवण्याचे आणि व्यवस्थापनाचे आधुनिक धडे देण्यासाठी दोन मोठ्या प्रशिक्षण संस्थांमध्ये जोतिरावांनी पाठवले; अहमदनगरची सिंथिया फॅरारबाईंची संस्था आणि मिशेलबाईंचे पुण्यातील ’नॉर्मल स्कूल’. याशिवाय, जोतिबांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे, केशव शिवराम भवाळकर (जोशी), सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सगुणाबाई क्षीरसागर यांनीही सावित्रीबाईंच्या शिक्षणास हातभार लावला. 

पुढील काळात सर्व जातीच्या स्त्रियांसाठी आधुनिक पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या तेव्हा याचा त्यांना फार उपयोग झाला. स्वत:च्या समाजाकडून व सनातनी ब्राह्मणांकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. शेणाचे, मातीचे गोळे व दगडही सहन करावे लागले. सासर्‍यांनी घराबाहेर काढले तेव्हा सावित्रीबाई फुलेंच्या अंगभूत गुणांची व मानसिक कणखरतेची कसोटी लागली. फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा वाहतानाही हेच कौशल्य दिसले. 

स्वत: जोतिबा फुले यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत व नंतर स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये झाले होते. त्या काळी स्त्री व पुरुष यांचे शिक्षण घरीच होत असे. गुरुकुल किंवा पंतोजीच्या शाळेत (इंडिजिनिअन स्कूल) शिकणार्‍या मुलामुलींपेक्षा घरीच व्यावसायिक कौशल्य व शिक्षण घेणार्‍या मुलामुलींची संख्या पाचपट होती, हे त्या काळातील ब्रिटिश सर्वेक्षणावरून लक्षांत येते. 

केवळ संस्थात्मक शालेय शिक्षण घेणे यालाच ‘शिक्षण’ म्हणण्याच्या वसाहतवादी दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी भारतीयांना अशिक्षित, अडाणी व निरक्षर ठरवले. जातींच्या माध्यमातून हजारो वर्षे जतन केलेले परंपरागत कौशल्य व व्यावसायिक शिक्षण ब्रिटिशांनी सक्तीने बंद पाडले. त्यामुळे कापड, धातू, रसायन, वैद्यकशास्त्र, शस्त्रक्रिया, शेती यांसारख्या क्षेत्रातील परंपरागत ज्ञान व कौशल्य नाहीसे झाले. ब्रिटिश गिरणीतले कापड व अन्य व्यवसायांची भरभराट झाली. आधुनिक व संस्थागत शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या. पण, यातही भारतीय आपल्या मुलांना, मुलींना पाठवत नव्हते कारण या शाळा स्थापन करण्यात चर्च व मिशनरिंनी प्रचंड प्रमाणात पुढाकार घेतला होता. स्वत:ची सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी अनेक समाजांतून त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. 

अशा काळात फुले दांपत्याने हे पाश्‍चात्त्य पद्धतीचे आधुनिक शिक्षण देणार्‍या शाळा सुरू केल्या. ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारताची जुनी जात(व्यावसायिक गट) आधारित  अर्थव्यवस्था नष्ट होत चालली होती. नवीन जगात टिकण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कायदे-प्रशासकीय व्यवस्थेशी लढण्यासाठी ’पुस्तकी आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ शिक्षण’ अनिवार्य झाले होते.  अशा वेळी केवळ पारंपरिक ज्ञान व कौशल्यांवर कुठलाच समाज टिकू शकणार नाही, हे ओळखून व्यवसायबाह्य आणि पाश्‍चात्त्य पद्धतीच्या आधुनिक शिक्षणाची दारे सर्व जातींतील स्त्री-पुरुषांसाठी खुली केली, यात फुलेंचे आणि त्यांना साथ देणार्‍या सावित्रीबाईंचे थोरपण आहे.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन होत नाही; सावित्रीचे होते. ते सात जन्म ‘नवर्‍याचे बुकिंग’ नाही; तर ते शिक्षणाची थोर परंपरा असलेल्या सावित्रीचे पूजन आहे. जिचे पूजन करायचे ती सावित्री आहे आणि जिथे पूजन करायचे ती जागा वड आहे. यमाशी वाद घालून जिंकणारी सत्यवानाची सावित्रीही अशिक्षित नव्हती आणि जोतिबा फुलेंची सावित्रीही अशिक्षित नव्हती. शिक्षणापासून वंचित ठेवून ‘चूल आणि मूल’ या भारतीय स्त्रीला पुरुषसत्ताक पद्धतीने जखडून टाकले होते, असे सांगितले जाते ते अत्यंत चुकीचे आहे. वडाच्या झाडाला फेर्‍या घालणे ही ‘अंधश्रद्धा’ नाही, ते भारतीय शिक्षण परंपरेचे प्रतीक आहे. ‘सात जन्म हाच पती मिळो’ म्हणून वडाला सूत गुंडाळले जाते हे जेवढे चुकीचे आहे, तेवढेच सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाची दारे खुली करण्याआधी स्त्रिया अशिक्षित होत्या, हेही चुकीचे आहे. 

दोन्ही सावित्री वंदनीयच आहेत! एका सावित्रीला दुसर्‍या सावित्रीच्या विरुद्ध उभे करून आपण सुशिक्षित, विज्ञाननिष्ठ वगैरे अजिबात होत नाही. उलट, स्वत:च्याच ज्ञानपरंपरेला नाकारणारे, हीन लेखणारे कपाळकरंटे ठरत आहोत. सत्यवानाची सावित्री आणि जोतिबांची सावित्री हे भारतीय शिक्षण परंपरेतले दोन महत्त्वाचे बिंदू आहेत, ती स्थित्यंतरे आहेत. त्यांचा यथार्थ आदर करणे हीच आपली संस्कृती आहे.