खलिस्तान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खलिस्तान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ जुलै, २०२६

विचार, विमर्ष (नॅरेटिव्ह) आणि कृती

‘शीख हिंदू नाहीत’ हा विचार, त्यावर आधारलेला हिंदू द्वेषाचा विमर्ष आणि हिंदूंच्या कत्तली हा परिणाम; आणि केवळ खलिस्तानी दहशतवाद रुजवण्याचा प्रयत्न करत त्यांची एकांगी बाजू मांडणारा चित्रपट व त्याला मिळणारे समर्थन यांची ही साखळी आहे. घडलेली घटना किती तीव्र आहे व त्याची प्रतिक्रिया कशी उमटते, हे विमर्ष (नॅरेटिव्ह) आणि त्यामागचा विचार यांचा मागोवा घेत गेल्यावर समजते. हा मागोवा एक दोन दिवसांचा नसतो. विचार कृतीत यायला शतकानुशतके लागतात. विचार कृतीत येण्यापूर्वीच त्याविरुद्ध विमर्षाच्या पातळीवरच उपाययोजना केली नाही तर होणारी कृती आणि तिचे समर्थन अटळ असते. खलिस्तानी  दहशतवादाचे समर्थन करणार्‍या चित्रपटांवर बंदी आणली काय आणि नाही आणली काय, त्यामागचा हेतू सिद्ध होतोच.

‘सतलज(सतलूज)’ सिनेमाला प्रमाणपत्र न देणे, निर्मात्यांनी ओटीटीवर तो प्रदर्शित करणे, नंतर सरकारच्या दबावामुळे तो तिथूनही काढून टाकणे या सार्‍या प्रक्रियेच्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी उमटत आहेत. दोन्ही बाजू खर्‍या आहेत, त्यामुळे त्याला आपसूक झुंडशाहीचे स्वरूप आले आहे. यात एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारणे भाग आहे; दोन्ही बाजू खर्‍या आहेत, पण त्या योग्य आहेत का? आज ज्या उमटत आहेत, त्यामागची घटना १९९०-९५ या काळातील आहे; पण, त्यामागचा विमर्ष (नॅरेटिव्ह) व विमर्षामागचा विचार खूप आधीचा आहे. त्या विचाराचा विचार केल्याशिवाय आज प्रतिक्रिया व्यक्त करणे खूप घातक आहे.  

शीख हा वैदिक/हिंदू परंपरेतलाच आध्यात्मिक पंथ आहे. सिक्ख म्हणजे शिष्य किंवा गुरुकडून शिकणारा. निराकार ब्रह्म (शुद्ध ऊर्जा किंवा जाणीव) ज्याचा साक्षात्कार प्रथम गुरु व संस्थापक गुरु नानक देव जी यांना झाला, ज्याला ते ‘अकाल पुरख’ (पुरुषसूक्तातील पुरुष) असे संबोधतात. गुरु नानक देवजींपासून ते गुरु अर्जुन देवजींपर्यंतच्या काळात शिखांसाठी कोणतीही बाह्य आचारसंहिता शीखांसाठी अनिवार्य नव्हती. ‘कृपाण’चा गुरु ग्रंथसाहिबातला अर्थही बहुतांश वेळा कृपा + आण = दयेची मर्यादा किंवा ’ज्ञानाची तलवार’ या आध्यात्मिक अर्थाने अधिक वापरण्यात आला आहे. पहिल्या पाच गुरूंनी शस्त्र उचलले नाही. पाचवे गुरु , गुरु अर्जुन देव जी यांची जहांगीरने अमानुष छळ करून नृशंस हत्या केली. त्यानंतर सहावे गुरु, गुरु हरगोविंद जी यांनी ‘मिरी’ व ‘पिरी’ या दोन तलवारी धारण केल्या व ‘अकाल’ ही सशस्त्र सेना उभारली. दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी केस, कंगा, कडा, कच्छा या चार ‘क’कारांसह कृपाण हे शस्त्रही अनिवार्य केले. त्यांनी शीख पंथाअंतर्गत ‘खालसा’ हा लष्करी व सामाजिक पंथ स्थापन केला. 

केवळ हिंदू तत्त्वज्ञानाचेच नव्हे तर हिंदूंचेही रक्षण शीख गुरूंनी केले. त्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. 

तिलक जंजू राखा प्रभ ताका । 
कीना बडो कलू महि साका ॥

(त्यांनी हिंदूंचा ’तिलक’ (टिळा) आणि ’जंजू’ (जानवे) वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. त्यांनी कलियुगात हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हे अत्यंत मोठे कार्य केले.) 


अमृतसरमधील हरमंदिर साहिब किंवा श्री दरबार साहिब (आताचे सुवर्ण मंदिर) संकुलात प्रभू राम, माता सीता, आणि भगवान विष्णू यांच्या मूर्ती व चित्रे प्रस्थापित होती.

सामान्य शीख आणि हिंदू बांधव एकत्र येऊन तिथे दर्शन घेत असत. त्यांच्यात ’शीख आणि हिंदू वेगळे आहेत’ अशी कोणतीही भावना नव्हती. पंजाबमधील हिंदू कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राला शीख बनवण्याची प्रथा होती. 

१८६९साली ब्रिटिश सरकारने डॉ. अर्नेस्ट ट्रम्प नावाच्या एका ख्रिश्‍चन मिशनरिला (इतिहासाच्या पुस्तकांत याचा उल्लेख प्राच्यविद्या पंडित, भाषाशास्त्रज्ञ असा केला जातो), शीखांचे तत्त्वज्ञान हिंदूंच्या वेद आणि उपनिषदांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, हे ग्रंथ साहिबच्या आधारे सिद्ध करण्यासाठी पाठवले.  

परंतु, ट्रम्पची भाषा अत्यंत अपमानकारक होती आणि त्याचे भाषांतर चुकीचे ठरल्यामुळे शीख विद्वानांनी त्याला नाकारले. त्यानंतर ब्रिटिशांनी याच कामासाठी मॅक्स आर्थर मॅकॉलिफ या एका आयरीश-ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी  मॅकॉलिफची नेमणूक केली. त्याने ‘शीख हिंदू नाहीत’ हा विचार अत्यंत पद्धतशीरपणे आणि गोड भाषेत पेरला. मॅकॉलिफने १९०९साली ‘द शीख रिलिजन : इट्स गुरुज, सेक्रेड राइटिंग्ज अँड ऑथर्स’ नावाचा ग्रंथ सहा खंडांमध्ये प्रकाशित केला. या कामात त्याला मदत करणारा शीख विद्वान भाई काहन सिंग नाभा याने १८९८साली ’हम हिंदू नहीं’ हे पुस्तक लिहिले होते. मॅकॉलिफने जे वैचारिक विष पेरले त्याने पंजाबचे आणि हिंदू-शीख संबंधांचे कधीही भरून न येणारे नुकसान केले व अनेक विमर्षांना जन्म दिला.

१९०५साली ‘सिंह सभा’ चळवळीदरम्यान तत् खालसा हा  लाहोर सिंह सभेचा गट हरिमंदिरातील (सुवर्णमंदिर) मूर्ती हटवण्यासाठी आग्रही झाला. त्यांनी सुवर्ण मंदिर संकुलातून प्रभू रामाच्या आणि इतर हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बाहेर काढल्या. ‘सनातन शीख’ या गटाने विरोध केला. यात गुरु नानक देवजींचे थेट वंशज असलेले बाबा खेम सिंग बेदी, महाराज अवतार सिंग आणि अमृतसर सिंह सभेचे अनेक पारंपरिक विद्वान होते. त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की, शीख धर्म हा हिंदू सनातन परंपरेचाच एक भाग आहे. पण, असे असूनही मूर्ती हटवल्या गेल्या व शीख हिंदू नाहीत हा विचार कृतीत येऊ लागला. 

’तत् खालसा’च्या चळवळीतूनच १९२०च्या दशकात ’शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’ आणि ’शिरोमणी अकाली दल’ या संस्थांचा जन्म झाला. पुढे जाऊन १९७३साली अकाली दलाने ’आनंदपूर साहिब ठराव’ मंजूर केला, ज्यामध्ये पंजाबला अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करण्यात आली. ८०च्या दशकात याच आनंदपूर साहिब ठरावाचे रूपांतर जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत हिंसक आणि उग्र अशा ’खलिस्तान चळवळीत’ झाले. ’तत् खालसा’ हा पाया होता आणि ’खलिस्तान’ हा त्याचा अतिरेकी परिणाम आहे. 

पंजाबमध्ये १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदूंना केवळ ‘हिंदू आहेत’ या एकाच कारणासाठी खालिस्तानी शीख दहशतवादी मारू लागले. हिंदूंचा हा नरसंहार ९०च्या दशकापर्यंत सुरू राहिला. या काळात हजारो हिंदू कुटुंबांना आपली घरेदार सोडून दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात निर्वासित म्हणून आश्रय घ्यावा लागला. खलिस्तानी शीख दहशतवाद्यांनी केवळ हिंदूंनाच नाही, तर शीख हे हिंदू धर्माचाच एक अविभाज्य भाग आहे, असे म्हणणार्‍या हजारो निरपराध शीखांच्या कत्तली केल्या. याचे वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांना आणि दहशतवाद रोखणार्‍या पोलिसांनाही मारले होते. जोपर्यंत पाकिस्तानसारखा पंजाब हा वेगळा देश होण्याची पाळी आली नाही, तोपर्यंत (सुमारे वीस ते तीस वर्षे) भारत सरकार या नरसंहाराकडे  काणाडोळा करत राहिले. 

खालिस्तानची मागणी करणार्‍या भिंद्रनवालेंना ‘संत’ म्हणणारा, ती विचारधारा मानणार्‍या आणि ‘खालिस्तानी लिबरेशन मूव्हमेंट’ या नावाचे मासिक चालवणार्‍या जसवंत सिंह खालरा यांना ‘सतलज’ किंवा ‘सतलूज’ या चित्रपटात, केवळ ‘मानवी हक्क कार्यकर्ता’ दाखवण्यात आले आहे. खलिस्तानवादी दहशतवादाचा संपूर्ण बिमोड करणार्‍या गिल यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले आहे. खालरा यांनी केलेले संशोधन कुठल्या पद्धतीने केले हे कधीच जाहीर केले नाही. त्यामुळे, २५ हजार प्रेतांचा आकडा कसा काढला हे अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी यात दहशतवाद्यांसोबत अन्य सामान्य व्यक्तींना मारले नाही, असे म्हणता येत नाही. या चित्रपटावर बंदी आणण्याचा निर्णय चुकीचा होता.  सरकारने जरी या चित्रपटावर बंदी आणली असली तरी पंजाबमधील प्रत्येक शीखापर्यंत तो पोहोचवण्याची व्यवस्था आधीच झाली आहे. बंदी आणून अधिक प्रसिद्धी दिल्याने हा चित्रपट खलिस्तानवादी चळवळीस पुन्हा रुजवेल यात शंका नाही. हिंदूंचा द्वेष सहन करणारा शीख समाज हळूहळू ‘हालेलुयिआ’ करीत बाप्तिस्मा घेऊ लागला आहे. शीखांच्या होणार्‍या या ख्रिस्तीकरणाची चिंता आता अकाल तख्तचे जत्थेदार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती यांना वाटू लागली आहे. हे एक आवर्तन (रोटेशन) पूर्ण होत आहे. 

‘शीख हिंदू नाहीत’ हा विचार, त्यावर आधारलेला हिंदू द्वेषाचा विमर्ष आणि हिंदूंच्या कत्तली हा परिणाम; आणि केवळ खलिस्तानी दहशतवाद रुजवण्याचा प्रयत्न करत त्यांची एकांगी बाजू मांडणारा चित्रपट व त्याला मिळणारे समर्थन यांची ही साखळी आहे. घडलेली घटना किती तीव्र आहे व त्याची प्रतिक्रिया कशी उमटते, हे विमर्ष (नॅरेटिव्ह) आणि त्यामागचा विचार यांचा मागोवा घेत गेल्यावर समजते. हा मागोवा एक दोन दिवसांचा नसतो. विचार कृतीत यायला शतकानुशतके लागतात. विचार कृतीत येण्यापूर्वीच त्याविरुद्ध विमर्षाच्या पातळीवरच उपाययोजना केली नाही तर होणारी कृती आणि तिचे समर्थन अटळ असते. खलिस्तानी  दहशतवादाचे समर्थन करणार्‍या चित्रपटांवर बंदी आणली काय आणि नाही आणली काय, त्यामागचा हेतू सिद्ध होतोच. 

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

शेतकरी (?) आंदोलनाची पुढील पायरी; मोदींची हत्या की, वेगळा खलिस्तान?

------------------------
लोकशाहीचे चारही आधारस्तंभ जेव्हा आपल्या कर्तव्यापासून भटकतात किंवा डोळेझाक करतात, तेव्हा ती लोकशाहीच्या अस्थिरतेची नांदी असते. आंदोलन, गृहकलह आणि फाळणी या तीन पायर्‍यांपैकी खलिस्तानपुरस्कृत आंदोलन गृहकलहाच्या पायरीवर पाऊल टाकत आहे. त्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणे देशहिताला बाधा आणेल. तो लखबीर सिंग नाही, तो भविष्यातील भारत आहे. आमचे म्हणणे मान्य करा अन्यथा भारताचीही अवस्था आम्ही अशीच करू, हे सांगणारा तो एक संकेत आहे.

---------------------------------



खलिस्तान पुरस्कृत शेतकरी (?) आंदोलन, २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर आक्रमण, पायरी पायरीने वाढत जाणारा हिंसाचार, लखीमपूर खिरीची घटना, पंजाबनिवासी लखबीर सिंगची नृशंस हत्या, त्याचे समर्थन या एकामागोमाग एक घडणार्‍या घटना एका विशिष्ट संकेताकडे बोट दाखवत आहेत. आंदोलन ते फाळणी हा प्रवास स्पष्टपणे दिसत असतानाही लोकशाहीचे चारही आधारस्तंभ अगतिकतेने पाहत बसणार असतील तर आपण इतिहासापासून काहीच शिकत नाही, हेच पुन्हा एकदा शिकायला मिळेल. 

सिंघू  सीमेलगत निहंग शिखांनी लखबीर सिंगला मरेस्तोवर बेदम मारहाण केली, त्याचा हात कापून टाकला, तरी तो जिवंत असल्याचे पाहून त्याच्या पायावर तलवारीने वार केले आणि नंतर अर्धमेल्या अवस्थेत त्याला निदर्शनस्थळावरील मुख्य मंचाजवळील एका पोलीस बॅरिकेडला लटकावले. त्याच्या अंत्यसंस्काराला गावातील कुणीही आले नाही. 

एरव्ही मानवाधिकाराच्या नावाने ठणाणा करणारे समाज सुधारक व कार्यकर्ते, ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याची जात ठळकपणे मथळ्यात देणारे पत्रकार, स्वेच्छा दखल घेणारे न्यायालय, पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला सोयीनुसार आर्थिक मदत जाहीर करणारे सरकार, सामान्य माणसाकडून कायद्याचे काटेकोर पालन करण्याची अपेक्षा ठेवणारी पोलीस यंत्रणा व प्रशासन यापैकी कुणालाही त्या हातपाय तोडलेल्या आणि बॅरिकेडवर लटकणार्‍या व्यक्तीमध्ये भयानक संकेत दिसला नाही. तो लखबीर सिंग नाही, तो भविष्यातील भारत आहे. आमचे म्हणणे मान्य करा अन्यथा भारताचीही अवस्था आम्ही अशीच करू, हे सांगणारा तो एक संकेत आहे.

केवळ ‘सर्बलोह ग्रंथा’चा अवमान (निहंगांच्या सांगण्याव्यतिरिक्त त्याचा कुठलाही अन्य पुरावा समोर आला नाही) केला म्हणून अमानुष पद्धतीने हत्या करण्याएवढी निहंगांची शीख अस्मिता जागृत असती, तर अशा अनेक घटना आहेत, जिथे त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर नवज्योतसिंग सिद्धू नावाचे माकड जाहीर सभेत ‘हाले लुइया’च्या आरोळ्या ठोकत होते, तेव्हा निहंग काय आपल्या डेर्‍यात गांजा फुंकीत झोपले होते? पंजाबातील सत्तर टक्क्यांहून अधिक शीख क्रिप्टो ख्रिश्चन झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत, हे शीख पंथाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेल्या निहंगांना माहीत नाही? आपण शेती करत नाही, आपण लढवय्ये आहोत हे माहीत नाही? मग, शेतकर्‍यांच्या हिताचे प्रयोजनच नसलेल्या आंदोलनात ते कुणाच्या समर्थनार्थ बसले होते? निहंगांच्या डेर्‍यांवर छापे घालून अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रास्त्रे जप्त केल्याचा राग व्यक्त करण्यासाठी खलिस्तान पुरस्कृत आंदोलनात सहभागी होणे, ही बाब येऊ घातलेल्या अराजकतेकडे बोट दाखवते.

खलिस्तान्यांच्या या आंदोलनात प्रत्येकाने आपापले स्वार्थ साधून घेतले. भाजपविरोधी असणार्‍या पक्षांनी एकत्र येत या आंदोलनाला राष्ट्रीय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण,  मुळात हे आंदोलन शेतकर्‍यांच्या हिताचे नाही, हे लक्षात आल्याबरोबर त्याला पाठिंबा मिळाला नाही. अन्यथा हे शेतकरी आंदोलन देशव्यापी व्हायला अजिबात वेळ लागला नसता. या आंदोलनात होणार्‍या अडवणुकीची, हिंसाचाराची कधीही राजकीय पक्षांनी निंदा केली नाही.  प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी राजधानीत गोंधळ माजवत थेट लाल किल्ल्यावर धुडगूस घातला, पोलिसांना ढकलून दिले त्याची निंदा राजकीय पक्षांनी केली नाही. आपल्या सोयीप्रमाणेच भूमिका घेतल्या. 

काँग्रेससकट विरोधातील इतर राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी हे अर्थहीन आंदोलन पेटवत ठेवले. पण, सत्तेत असलेल्या भाजपने हे आंदोलन का सुरू ठेवले, हे पाहणेही तितकेच आवश्यक आहे. हे आंदोलन मोडून काढणे एवढे अशक्य होते का? शेतकरी मतदार दुखावला जाईल यासाठी भाजपने बोटचेपे धोरण स्वीकारले. जे शाहीनबागेबाबत केले, तेच या खलिस्तानी आंदोलनाबाबत सरकार करत आहे. ‘पॉलिटिकली करेक्ट’ होण्याच्या नादात आपण देशविघातक शक्तींना पोसत आहोत, याचे भान सत्तेत असलेला भाजप विसरला आहे. लखीमपुर खिरीमध्ये आठपैकी चारच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर झाली. का? लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करून मारलेले चौघे माणूस नव्हते? की, त्यांना कुटुंबे नव्हती? चिरडलेल्या चार शेतकर्‍यांना मदत जाहीर करणे ‘पोलिटिकली करेक्ट’ होतं आणि या शेतकर्‍यांनी मारलेल्या चार जणांना मदत जाहीर करणं, ‘इनकरेक्ट’ होतं.

राजकीय पक्षांनी ‘पॉलिटिकली करेक्ट’ राहणं एकवेळ समजून घेता येईल. पण, न्यायपालिकेनेही तसेच वागणे कितपत योग्य? शाहीनबागेचे आंदोलन घटनात्मक अधिकारांच्या नावाखाली, इतरांचे घटनात्मक अधिकार डावलणारे आहे, हे माहीत असूनही न्यायालय आंदोलनकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊ शकले नाही. उलट, आंदोलनकर्त्यांची ‘समजूत’ काढायला खुद्द न्यायाधीश शाहीनबागेत पोहोचले. अमानुष हत्या झाल्यावरही सिंघू सीमेवरील हे आंदोलन बंद पाडण्यासाठी न्यायालय स्वेच्छा दखल घेत नाही. तसेही, न्यायालय स्वेच्छा दखल कधी घेते आणि कधी घेत नाही याचीही ‘दखल’ घेणे आता आवश्यक झाले आहे. 

माध्यमे, पत्रकार यांनी वास्तविक या आंदोलनाचे खरे स्वरूप बाहेर आणायला हवे होते. पण, वर्गसंघर्षाला प्रोत्साहन देण्यातच धन्यता मानणारी माध्यमे यात आपला टीआरपी कसा वाढेल याची दक्षता घेण्यात मग्न होती. २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टरवरून स्वत:च पडून निधन पावलेल्याला शेतकर्‍याला पोलिसांनी गोळी 

घालून मारले असे राजदीप सरदेसाई नावाच्या पत्रकाराने (?) ताबडतोब जाहीर करून टाकले. पोलिसांनी गोळीबार करावा, ही जशी खलिस्तानवाद्यांची इच्छा होती, तशीच ती वर्गसंघर्ष पेटवत ठेवणार्‍या माध्यमांचीही होती. पण, पोलिसांनी अपेक्षित पाऊल न उचलल्यामुळे घाईघाईत आधीच ठरवलेली भूमिका राजदीप सरदेसाईने मांडली. या सर्व आंदोलनाचे माध्यमांनी ज्या पद्धतीने वार्तांकन केले, त्याला नको तेवढी प्रसिद्धी दिली, ते पाहता माध्यमे जबाबदारीने वागली असे अजिबात म्हणता येणार नाही. एरव्ही मथळ्यात आवर्जून ‘दलित’ शब्द लिहिणार्‍या वृत्तपत्रांनी लखबीर सिंगची अमानवीय हत्येची संभावना ‘एका व्यक्तीची हत्या...’ अशा मथळ्याने केली. खलिस्तान्यांना शेतकरी, पोषणकर्ते, अन्नदाता वगैरे लेबले लावून बातम्या भरताना हा विचार एकदाही आला नाही की, कुठले शेतकरी पोलिसांना मारहाण करतात? कुठले शेतकरी हिंसाचार करतात? कुठले शेतकरी हात, पाय कापून तडफडत लटकावून ठेवतात? मग, अशा फुटीरतावाद्यांना का प्रसिद्धी द्यायची?

या खलिस्तानी आंदोलनासाठी राज्य बंद ठेवण्याचा निर्णय खुद्द राज्य सरकारने घेण्यासारखा पूर्वी कधीही न पाहिलेला प्रकारही पाहायला मिळाला. एरव्ही विरोधक, शेतकरी यांनी महाराष्ट्र बंद पुकारला असता, तर एकवेळ चालले असते. पण, लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने स्वत:चेच राज्य बंद करण्याचा ‘अजब’ प्रकार केला.  त्याविषयी बोलताना शरद पवार काय म्हणाले, ते महत्त्वाचे आहे. ‘पंजाबातील शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. इंदिरा गांधींच्या रूपाने देशाने फार मोठी किंमत मोजली आहे.’ असे विधान पवारांनी केले. इंदिरा गांधीच्या हत्येस कारणीभूत ठरलेले भिंद्रनवाले शेतकरी नव्हते, हे खरे असले तरी आता आंदोलन करणारेही शेतकरी नाहीत, हा मुद्दा लक्षात घेतला तर पवार काय सूचित करू पाहतात, ते स्पष्ट होईल. 

आंदोलन, त्यातून ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’चा हिंसाचार आणि हिंसाचाराच्या माध्यमातून फाळणी याचा अनुभव आपण घेतला आहे. त्यानंतर मधल्या काळात भूभाग वेगळा करता आला नाही तरी हत्याकांडे करून लोकसंख्येचे विभाजन करण्यात आले. ‘लिटमस टेस्ट’ असलेले शाहीनबागचे आंदोलन दंगल, हिंसेत परिवर्तित झाले. हे खलिस्तानी आंदोलन त्याच दिशेने जात आहे. लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदींची हत्या होईल की, नाही हा भाग वेगळा. त्याहीपेक्षा मोठी हानी खलिस्तानच्या रूपाने फाळणी झाल्यास होईल. तालिबान, पाकिस्तान, खलिस्तान समर्थक शीख व चीन यांची अभद्र युती आणि भारतातून त्यांना कळत नकळत मिळणारा पाठिंबा पाहता, ही असली निरर्थक आंदोलने वेळीच न थांबवल्यास भारताची पुन्हा फाळणी होणे अटळ आहे.