या वर्षीचा गणपती आमच्या घरी जरा खास आहे. या वर्षी पहिल्यांदाच मुलीने स्वत: गणपतीची मूर्ती तयार केली आहे. तिला आनंदाने आभाळ ठेंगणे झाले आणि आम्हा आईवडिलांच्याही मनात आनंद मावेनासा झाला आहे. कालौघात पुढे आलेले असेच कलागुण, संकेत जतन करायचे असतात. तेवढे जरी केले तरी संस्कृती जपण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही.
ही कला मुलीकडे आमच्या काकूकडून आली आहे. काकू ही माहेरची जोशी. सदाशिवगडावरचे दिवाकर जोशी व काकू, दोघे सख्खे भावंडे. दोघांनाही परमेश्वराने गुण व कला मुक्तहस्ते दान दिलेली. गोव्यातील अनेक चारी किंवा च्यारी घराण्यास परमेश्वर असा मुक्तहस्ते खूप सारे कलागुण देत आला आहे. रिक्षातून जात असताना छोट्याशा अपघातात काकूची बोटे चिरडली, तेव्हापासून घरीच मूर्ती साकारणे होईना. पुढली अनेक वर्षे कुंभाराकडून मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा केला. या वर्षी मात्र मुलीच्या मनात इच्छा झाली, की स्वत:च स्वत:चा गणपती साकारावा! तिने तसा तो साकारलाही आणि स्वत:च पुजलाही.
एका पिढीकडून ही सेवा पुढे सुरू राहावी, हे जसे अभिमानास्पद आहे, तसेच गावातील लोकांचे एकमेकांकडे येणेजाणेही असेच कौतुकास्पद आहे. हे अनुबंध शेकडो पिढ्यांचे आहेत. सण, उत्सव हे एक करतो म्हणून दुसरा करतो, असे अजिबात नाही. प्रत्येक जण स्वत:च्या कुवतीनुसार, पद्धतीनुसार तो साजरा करतो. प्रत्येकाला आपल्या घरी त्यानिमित्ताने लोक यावेत, असेच वाटत असते. जी पावले सधन घरांकडे वळतात, तीच गरिबाघरीही अवश्य जातात. फुटकी कौले आणि गळक्या भिंती असलेले घरही, बंगल्यास जमणार नाही असे आगतस्वागत करते. ही समता नाही, समानताही नाही; ही संस्कृती आहे!
गावात आलेली नवी व्यक्तीही सहकुटुंब जुन्यांत मिसळून जाते. सहसा शहरांत हे घडत नाही. घरांचे फ्लॅट झाले आहेत, तिथेही असे चित्र विरळाच. एका वाड्यावरील जवळपासच्या घरांत संध्याकाळची धुपारती प्रत्येकाच्या घरी जाऊन करणे, यासारखे दुसरे सुख नाही. दारातल्या तुळशीचे लग्नही एकमेकांच्या घरी जाऊन लावायचे असते. जिथे जमेल तिथे लोकांनी तुळशीचे लग्न व गणेशोत्सवातील संध्याकाळची धुपारती एकमेकांच्या घरी जाऊन करावी.
गावागावांत, वाड्यावाड्यावर असणारी घुमटआरतीची मंडळे, हे घरे जोडण्याचे काम करतात ते पाहून खूप बरे वाटते. असलेले शत्रुत्व, कटुता तेवढ्यापुरती का होईना, कमी होते. आपले कुणाशी वैर, वाकडे असले तरी मुलांना त्या घरी घमट वाजवायला जाण्यास सहसा कुणी मनाई करत नाही. ते घर व कुटुंबही मुलांचे येणे स्वीकारते.
देवाघरी जाण्याआधी देव आपल्या घरी येतो, याचे हे अप्रूप शेवटपर्यंत टिकून राहते. त्याला पाहायला केवळ "नेवें" घेऊन येणारा गांवकारच नव्हे, तर प्रत्येक जण आपल्या घरी यावा, असे वाटत असते. त्यात श्रीमंती दाखवण्याचा अट्टहास नसतो; येणेजाणे जपायचे असते. आपली कला, आपली संस्कृती जपायची असते. ती पुढच्या पिढीत झिरपेल, असे पाहायचे असते. आपले वाकडेपण आपल्यापुरतेच ठेवायचे असते; ते पुढील पिढीकडे सोपवायचे नसते. गावागावांतला गणेशोत्सव हेच संकेत जपतो, जपत राहील. अशा अनेकानेक संकेतांनी बनलेल्या संस्कृतीचे धागे, त्यांची वीण जपणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव!

1 टिप्पणी:
Perfect! 👌👌
टिप्पणी पोस्ट करा