मंगळवार, १४ जुलै, २०२६

‘फर्स्ट’ आलेल्यांना ‘पोंदा’(खाली) घालण्याचे राजेशाही ‘फेलिसिटेशन’

गुणवत्तेचा सन्मान नाही करता आला तरी चालेल, पण निदान गुणवत्तेचा अपमान तरी करू नये एवढे भान राजपदी पोहोचण्याची इच्छा असलेल्या ईशांना (देवांना) उरले नाही. राजेशाही ते पारतंत्र्य ते लोकशाही हा प्रवास झालेल्या भारतात अजूनही कौशल्याची, गुणवत्तेची कमतरता अजिबात  नाही. फक्त, लोकशाहीत गुणवंतांचे मूल्यमापन करण्याची मोजमापे ‘मार्क्स’वंतांच्या हाती आहेत, हेच काय ते दुर्दैव!

‘भारत’ या शब्दाची व्याख्या अनेक अंगांनी करता येते. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेला व आध्यात्मिक परंपरेला, अनुसरून असलेली व्याख्या : ‘भा’ म्हणजे प्रकाश, तेज, ज्ञान किंवा बुद्धी आणि ’रत’ म्हणजे तल्लीन, मग्न किंवा समर्पित; त्यामुळे, ’भारत’ या शब्दाचा अर्थ ज्ञानाच्या, बुद्धीच्या प्रकाशात कार्यमग्न असलेल्या समर्पित लोकांची भूमी असा होतो.

‘दिव्याखाली अंधार’ या न्यायाने गुणवंतांच्याच भूमीत गुणवंतांची उपेक्षाही होत राहिली आहे. विशेषत: मदांध राजसत्तेकडून तशी झाल्याचे दाखले खूप आहेत. परंपरागत व्यावसायिक शिक्षण व कौशल्य एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असल्याने आणि त्याशिवाय गुरुकूल ही व्यवस्था असल्याने शिक्षणाची वानवा नव्हती. शिक्षणात कौशल्य आणि गुणवत्तेला सर्वोत्तम प्राधान्य होते. स्वतंत्र भारतात ‘सर्वांना सर्व शिक्षण’ या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि कौशल्य यांचे महत्त्व कमी झाले. पर्यायाने शिक्षणाचेच महत्त्व कमी झाले.

‘विद्येविना मती गेली’, हे माहीत असूनही सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी सर्वांपर्यंत ‘पोहोचवण्या’साठी प्रयत्न झाले. परिणामी, खाण्यासाठी शाळेत येणे, ‘कट-ऑफ’ कमी ठेवणे वगैरेंमुळे शिक्षणाच्या उद्देशाशीच तडजोडी सुरू झाल्या. शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेशी आणि कौशल्याशी तडजोड केली, की समाजमनातून शिक्षणाचे महत्त्वच कमी होते. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ‘विद्या मिळवणे’, असा न राहता ‘नोकरी मिळवणे’ आणि त्यातल्या त्यात ‘सरकारी नोकरी मिळवणे’ हा प्रमुख उद्देश बनला. आम्ही उद्योजक, उत्पादक होतो ते नोकरदार, याचक झालो. सुरक्षा वगळता पूर्णपणे आत्मनिर्भर असलेला गाव, सरकारच्या व प्रशासनाच्या दयेवर जगणारा आश्रित झाला!

गुणवंतांचे महत्त्व त्यांच्या गुणवत्तेवर न ठरता वर्ग-प्रवर्ग, शोषक-शोषित या अन्य गोष्टींवर ठरू लागले. इतकेच कशाला, गुणवंतांची विभागणी मतदारसंघावरून होऊ लागली. आपल्या मतदारसंघातील शिक्षण संस्थेतून एखाद्या शाखेत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सत्काराला बोलावून साधे नावही न पुकारणे केवळ यासाठी झाले की ते विद्यार्थी अन्य मतदारसंघातील आहेत. आता बोला!

गुणवत्तेचा सन्मान नाही करता आला तरी चालेल, पण निदान गुणवत्तेचा अपमान तरी करू नये एवढे भान राजपदी पोहोचण्याची इच्छा असलेल्या ईशांना (देवांना) उरले नाही. राजेशाही ते पारतंत्र्य ते लोकशाही हा प्रवास झालेल्या भारतात अजूनही कौशल्याची, गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही. फक्त, लोकशाहीत गुणवंतांचे मूल्यमापन करण्याची मोजमापे ‘मार्क्स’वंतांच्या हाती आहेत, हेच काय ते दुर्दैव!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा