गुरुवार, २ जून, २०२२

आपल्याला ‘पुरोगामी’ व्हायचे आहे का?

सामान्यत: माणूस म्हणून माणुसकीने जगण्यासाठी जी मूल्ये आवश्यक आहेत ती स्वीकारून कालानुरूप अनावश्यक व मूल्यांना बाधक असलेल्या गोष्टींना विरोध करणे आणि मूल्यवर्धक नव्या गोष्टी स्वीकारत पुढे जाणे म्हणजे पुरोगामी असणे ही व्याख्या आहे. पण, ही पुरोगामित्वाची प्रतिगामी व्याख्या आहे, हे ध्यानात ठेवावे. ‘जिथून आपल्याला हानी होण्याची शक्यता नाही, अशा कुठल्याही जुन्या गोष्टीला विरोध करत राहणे म्हणजे पुरोगामी होणे’, ही पुरोगामित्वाची आधुनिक व्याख्या आहे.

करिअर करण्यासाठी तशी अनेक रूढीवादी क्षेत्रे आहेत. पण, कुठल्याही क्षेत्रात भरपूर वाव असलेले क्षेत्र म्हणजे ‘पुरोगामित्व’. ‘पुरोगामी’ असणे किंवा ‘पुरोगामित्व’ म्हणजे नेमके काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ‘पुर:’ म्हणजे पुढे आणि ‘गामी’ म्हणजे जाणारा. सामान्यत: माणूस म्हणून माणुसकीने जगण्यासाठी जी मूल्ये आवश्यक आहेत ती स्वीकारून कालानुरूप अनावश्यक व मूल्यांना बाधक असलेल्या गोष्टींना विरोध करणे आणि मूल्यवर्धक नव्या गोष्टी स्वीकारत पुढे जाणे म्हणजे पुरोगामी असणे ही व्याख्या आहे. पण, ही पुरोगामित्वाची प्रतिगामी व्याख्या आहे, हे ध्यानात ठेवावे. ‘जिथून आपल्याला हानी होण्याची शक्यता नाही, अशा कुठल्याही जुन्या गोष्टीला विरोध करत राहणे म्हणजे पुरोगामी होणे’, ही पुरोगामित्वाची आधुनिक व्याख्या आहे. 

आता नुसते पुरोगामी असणे हे असून नसण्यासारखे आहे. खरे जातिवंत पुरोगामी होण्यासाठी कुठून ना कुठून तरी ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांच्या पुरोगामित्वाशी नाते आपल्याला सिद्ध करता आले पाहिजे. त्यासाठी त्यांचे विचार वाचलेच पाहिजेत, असे बंधन अजिबात नाही. या त्रयीशिवाय इतर सर्व त्रयस्थ, हे प्रतिगामी व रूढी परंपरा मानणारे आहेत, हे कायम लक्षात ठेवावे. पुरोगामित्व हे कालसापेक्ष असते. कालचा पुरोगामी हा आजचा प्रतिगामी आणि आजचा पुरोगामी उद्याचा प्रतिगामी असतो. त्यामुळे, कायम वर्तमानात असणारा पुरोगामी असतो. फार जड झाले का? नका, फार विचार, अभ्यास करू नका.

सखोल अभ्यास करणे व चांगले मार्क पडलेले असणे याला खूप महत्त्व असते, ते इतर क्षेत्रांत. पण, अभ्यास करण्याची तयारी, तौलनिक विचार करण्याची क्षमता वगैरे कसलीही अपेक्षा  नसलेले सर्वव्यापी क्षेत्र म्हणजे पुरोगामित्व. इथे कसलाही अभ्यास नसणे यालाच जास्त महत्त्व आहे. कोडगेपणा व कशाचा तरी प्रचंड, आत्यंतिक द्वेष हे दोन गुण असणे अत्यावश्यक आहे. बाकी, अभ्यास अभ्यास म्हणून जे काही लागते, ते सर्व व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक यावर सहज उपलब्ध होते व असते. 

पुरोगामी होण्यासाठीचे ज्ञान सहज उपलब्ध असले, तरीही ते इतके सोपे नाही. पुरोगामी होण्यासाठी सतत टीका करून व्यक्त होत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण कुठल्या क्षेत्रात आहोत, आपली योग्यता काय आहे, याचे बंधन नाही. अगदी पान खाऊन पिचकार्‍या मारणार्‍यापासून ते कॉलेजमध्ये शिकवणार्‍या  प्राध्यापकापर्यंत आणि कष्टकरी अशिक्षितापासून ते नाक्यावर गुटखा खात टवाळक्या करणार्‍या सुशिक्षितापर्यंत कुणीही म्हणजे अगदी कुणीही पुरोगामी होऊ शकतो. त्यासाठी कुठलाही न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. 

‘कसलाच न्यूनगंड नसणे’ हे बेसिक कॉलिफिकेशन आहे. विज्ञानाचा आणि आपला छत्तिसाचा आकडा असला, तरीही ‘वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे’ या विषयावर अतिशय श्रद्धापूर्वक बोलावे. आपण घरासमोर आणि गळ्यात क्रॉस घालत असलो तरीही इतर सर्वांना नास्तिक बनवता आले पाहिजे. आपण स्वत: कायदा विषयाचे प्राध्यापक असलो तरीही ‘मंगळसूत्र म्हणजे नवर्‍याने बायकोच्या गळ्यात घातलेला कुत्र्याचा पट्टा आहे’, असे विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता आले पाहिजे. वकील झाल्यानंतरही हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा संबंध अकबराच्या आंघोळीशी स्वच्छपणे जोडता आला पाहिजे. पर्यावरणवादी असाल तर प्रत्येक हिंदू सण पर्यावरणाचा नाश करणारा आहे, हे ठसवता आले पाहिजे. प्राणिमित्र असाल तर रक्षाबंधनाला ‘गायीच्या चामड्याची राखी बांधू नका’ असे वात्सल्यपूर्ण आवाहन करता आले पाहिजे. जाहिरात क्षेत्रात असाल तर दिवाळीत दागिन्यांची जाहिरात करणार्‍या स्त्रिया उघड्या कपाळाच्या व सुतकी चेहर्‍याच्याच असतील अशी खात्री करून घ्या. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी क्षेत्रात असाल तर संध्याकाळी, ‘ज्योतिष हे कसे थोतांड आहे’ यावर चर्चा घडवून आणतानाच सकाळच्या वेळी आजचे भविष्य सांगणारा एखादा दाढी वाढवलेला, टिळा लावलेला इसम वृत्तवाहिनीवर दाखवता आला पाहिजे आणि वृत्तपत्रात आठवड्याचे भविष्य न चुकता छापता आले पाहिजे. 

विज्ञानवादी असाल तर भिंत चालवणार्‍या ज्ञानेश्वर माउलीवर टीका करताना, चमत्काराने कॅन्सर बरा करणार्‍या मदर तेरेसांचे संतपद मान्य करता आले पाहिजे. इतिहास या क्षेत्रात असाल तर शिवाजी महाराज, संत अफजलखान, संत औरंगजेब यांना सेक्युलर ठरवता आले पाहिजे. ब्राह्मण इतिहासकारांनी हिंदू-मुस्लीम करत सामाजिक तेढ कसे पसरवले, हे ठामपणे सांगता आले पाहिजे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कोणत्या इतिहासकार नसलेल्या लेखकाने केलेला चालेल व इतिहासतज्ज्ञाने केलेला चालणार नाही, हे निश्चित करता आले पाहिजे. त्यानुसार भावना व अस्मिता दुखावण्याची सोय करता आली पाहिजे. 

राजकीय क्षेत्रात असाल तर श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला जाण्याआधी मटण खाल्ले पाहिजे व ते मंदिरात जाण्यापूर्वीच आठवलेही पाहिजे. त्याचवेळी इफ्तारमध्ये मात्र सामाजिक सौहार्द जपण्यासाठी न विसरता गेले पाहिजे. केवळ हिंदूंच्याच देवाचे बाप होता आले पाहिजे. गोव्यात आक्रमकांनी पाडलेली देवळे उभारू असे म्हणत, ओडिशातील जगन्नाथ मंदिर परिसरातील चारशे ते बाराशे वर्षांपूर्वीचे जुने मठ उद्ध्वस्त करून, तिथे पर्यटकांसाठी टॉयलेट व लाउंज बांधता आले पाहिजे. 

सामाजिक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता, समता वगैरे चळवळीत कार्यरत असणार्‍यांना शबरीमला येथील अय्यप्पाच्या देवळात मासिक स्रावाने भिजलेले सॅनिटरी पॅड नाचवत घेऊन जाणे जमले पाहिजे. स्त्रियांना असलेला पूजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी शनिशिंगणापूरला चौथर्‍यावर चढताना, मशिदीत घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे न जाता भूमाता होणे जमले पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन करताना केवळ हिंदूंच्याच श्रद्धांचे निर्मूलन कसे करता येईल याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. हिंदूंच्या काही मंदिरात आणि ईदच्या दिवशी दरवर्षी बकरी किंवा इतर प्राणी बळी देण्याच्या प्रथा जरी समान असल्या, तरी केवळ हिंदूंच्याच प्रथा कोर्टात जाऊन बंद पाडता आल्या पाहिजेत. अपवाद म्हणून असलेल्या सतीसारख्या चालीरीतींना प्रथा म्हणता आले पाहिजे. ‘विधवा होणे’ ही अवस्था, परिस्थिती असली तरीही तिला ‘विधवा प्रथा’ म्हणता आले पाहिजे. बालविवाहाचा विरोध करताना, कोवळ्या मातीचे घडे फोडणे कसे मानवताविरोधी आहे, याचे प्रबोधन फक्त हिंदूंनाच करणे व इतरांच्याबाबतीत बालविवाह हा घटनेने दिलेला पांथिक अधिकार असल्याचा उद्घोष करणे गरजेचे आहे. 

हिंदूंच्या आस्थेशी, श्रद्धेशी संबंधित असलेले जे जे मागचे आहे, ते ते सगळे कसलाही विचार न करता,  टाकाऊ आहे असा दृढ विश्वास मनात बाळगला पाहिजे. असे असले तरीही ‘टाकाऊतून टिकाऊ’ बनवण्याच्या फंदात अजिबात पडू नये. ‘किती पैसे मिळतील?’, या विचाराच्या फंदातही पडू नये.  पुरोगामी होऊन पैसा प्राप्त करण्यासाठी तिस्ता सेटलवाडसारखे वेगळेच धाडस लागते किंवा न्यायालयाने ‘दहा बारा कोटींचा घोटाळा हा काही मोठा घोटाळा नाही’, अशी टिप्पणी करून परदेशी जाण्याचा परवाना देण्यासाठी राणा अय्यूबइतकी योग्यता लागते. पैसा प्रचंड आहे, पण तो पुरोगामित्वाच्या नावावर इतर मार्गांनी मिळवावा लागतो. पुरोगामित्व हे तसे परजिवी क्षेत्र आहे. त्यामुळे, या क्षेत्राकडे पोटापाण्याची सोय म्हणून पाहण्याचा क्षुद्रपणा करू नये. वास्तविक पोटापाण्याचा प्रश्न पडूच देत नाही, असे हे क्षेत्र आहे. आपण प्रश्न पडूच द्यायचे नाहीत. उलट, कायम फक्त प्रश्न उपस्थित करणे हे आपले काम आहे, उत्तरे शोधणे किंवा इतरांनी शोधून दिलेली उत्तरे स्वीकारणे हे आपले कार्यक्षेत्र नाही, हे ध्यानात ठेवावे. 

या काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी असल्या तरीही अजिबात म्हणजे अजिबात विसरू नयेत अशी काही पथ्येही पुरोगामी होण्यासाठी पाळावी लागतात. टीका, विरोध करताना कुठलीही मागची गोष्ट, प्रथा, रूढी, परंपरा, श्रद्धा, देव वगैरे मुस्लीम  आणि ख्रिश्चन यांचे आराध्य असणार नाहीत याची आत्यंतिक काळजी घेणे प्रचंड आवश्यक आहे. हे पथ्य पाळलेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. हिंदूंवर टीका करतानाही ‘बहुसंख्य’ आणि ‘बहुजन’ यातला सूक्ष्म फरक ओळखण्याचे कसबही होतकरू पुरोगाम्यांनी आत्मसात करावे. म्हणजे बहुसंख्य असलेले हिंदू कायम अन्याय करतात आणि हिंदूंमधील बहुजनांवर कायम अन्याय होतो, अशी त्याची विभागणी करणे सोयीचे व सोपे होते. स्त्री-पुरुष समानता, समता, जातीयवाद याविषयी हिंदूंवर आसूड उगारताना मुस्लीम आणि ख्रिश्चन पंथांना वगळावे. आपले पुरोगामी ज्ञान पाजळताना ते कुठे पाजळू नये हे ओळखून गळा काढावा. गळा तिथेच काढावा, जिथे तो कापला जाणार नाही याची खात्री असेल!

यशस्वी पुरोगामी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग अतिशय बाळबोध पद्धतीने व ढोबळमानाने अस्मादिकांनी मांडला असला तरी पुरोगामित्वाच्या स्कोपविषयी अजिबात शंका बाळगू नये. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरोगामी व्यक्तींना प्रचंड मागणी व वाव आहे. त्यामुळे, पुरोगामी होण्याची संधी अजिबात दवडू नये. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यावर पोस्ट टाकाव्यात. त्या टाकताना संदर्भ अजिबात देऊ नयेत. संदर्भ न देण्यामुळे आपण किती अभ्यासू आहोत हे वाचकांवर ठसते. वर्तमानपत्रात संदर्भ न देता लेख लिहावेत. दहशतवाद्यांविषयी ममत्व बाळगावे. त्यांच्या गरिबीविषयी, वडिलांच्या नोकरीविषयी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी अभ्यास करून लेख लिहावेत. त्यांची कायम सकारात्मक बाजूच मांडावी. असे केल्याने आपण पुरोगामी होण्यातल्या प्रथमा, द्वितीया पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी तयार व्हाल. 

आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात लेख छापून येण्यासाठी कट्टर पुरोगामी, हिंदूविरोधी, संघविरोधी असणे बंधनकारक आहे. पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी यांच्या कार्याचा अभ्यास करावा. त्यांनी अडवलेल्या प्रकल्पांवर अवश्य लिहावे. भारतात अल्पसंख्याकांवर कायम होणार्‍या अन्यायाविषयी भरभरून लिहावे. असे केल्याने आपण लगेच विश्वप्रसिद्ध पुरोगामी होऊन जाल यात शंका नाही!

तरीही भविष्यात कुठेही,काहीही विपरीत घडल्यास त्याची जबाबदारी लेखकावर ढकलता येणार नाही. ती स्वत:ची स्वत:च उचलावी लागेल. आम्ही फक्त मार्ग दाखवतो, चालायचे होतकरूंनाच आहे, हे लक्षात ठेवावे. असो! होतकरू पुरोगाम्यांना त्यांच्या भविष्यातील यशासाठी आताच शुभेच्छा...


५ टिप्पण्या:

  1. प्रसन्न, विनोदी अंगाने उपहास केलेला असला तरी, तीच खरी परिस्थिती आहे. खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  2. लेख फारच छान टोमणयाचे फटकारे योग्य लोकानी संबधितानी वाचावीत

    उत्तर द्याहटवा
  3. सगळे शालजोडीतले बरोबर बसले आहेत. हिंदू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मण यांना नावे ठेवल्याशिवाय या देशात पुरोगामी होताच येत नाही हे खरे आहे. असेच सेक्युलर या विषयावर लिहावे.

    उत्तर द्याहटवा
  4. In short हिंदू विरोधात योग्य पद्धतीने गळा काढणेची कला ज्याला साधली त्यांना पुरोगामी म्हणून ओळखतात.

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय मुद्देसुद आणि छान असा लेख.

    उत्तर द्याहटवा