मंगळवार, १४ जून, २०२२

नुपूर शर्माने दिलेली प्रतिक्रिया ईशनिंदा आहे का?

इतक्या दिवसांच्या गदारोळानंतरही एका प्रश्नाचे उत्तर ना भाजपवाल्यांकडे, ना इस्लामच्या विचारवंतांकडे, ना मीडियाकडे ना कुणाकडे उपलब्ध आहे, तो प्रश्न म्हणजे ‘नुपूर शर्माने दिलेली प्रतिक्रिया ईशनिंदा आहे का?’
नुपूर शर्माने त्या डिबेटमध्ये उच्चारलेले नेमके प्रश्न काय होते, या कडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. प्रश्न विचारणे चुकीचे होते की, ज्या पद्धतीने ते विचारले गेले पाहिजे होते ती पद्धत चुकीची होती याविषयी एकही विचारवंत पुढे येऊन स्पष्टीकरण द्यायला तयार होत नाही. तसे पाहू जाता या विषयावर चर्चा, मतप्रदर्शन झालेच नाही, अशातला भाग अजिबात नाही. मुळात कुराण, मुहम्मद पैगंबर यांची बाजू तार्किक पद्धतीने मांडायला कुणी धजावत नाही, ही खरी समस्या आहे.

मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात १३ विवाह केले. काही इस्लामी विचारवंत ११ विवाह मान्य करतात. तो महत्त्वाचा मुद्दा नाही. त्या काळी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या एका विधवा महिलेशी विवाह केला होता. विधवाविवाहाचा विचारही करणे समाजमान्य नव्हते अशा काळी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल होते. अनेक विवाह करणे हे ज्या काळात सर्वमान्य होते, त्या काळातील व्यक्तींना आताच्या सामाजिक संकेतांप्रमाणे दोषी ठरवणे गैर आहे. विशेषत: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे विवाह हे राजकीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून उचलण्यात येणारे सर्वमान्य पाऊल होते. आपल्याकडे हल्ली हल्लीपर्यंतसुद्धा बालविवाह होत असत. आताही, कायदेशीर बंदी असूनही काही हिंदू जमातींमध्ये बालविवाह होतात. त्या काळी मुलीला न्हाणं आलं की, आपल्याकडे गावात साखर वाटली जायची. मुलीची त्यानंतर सासरी पाठवणी केली जायची. त्याआधी अगदी पाळण्यातही विवाह झालेले असायचे. आज आपण आधुनिक सामाजिक संकेत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे मुलीचे व मुलाचे लग्नाचे किमान वय सोळा ते एकवीस हे ग्राह्य धरतो. कदाचित आणखी हजारो वर्षांनंतर आज ज्याला आपण बरोबर म्हणतोय ते चुकीचे ठरवले जाऊ शकते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, सभ्य-असभ्य हे कालसापेक्ष संकेत आहेत. त्यामुळे, आपल्या आधीच्या पिढ्या तसे करत होत्या यासाठी त्यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही. ते त्यांच्या काळी त्यांना योग्य वाटत होते म्हणून ते चूक, असे आज म्हणणे पूर्णत: योग्य ठरणार नाही. 

आपण आजच्या फूटपट्या घेऊन पूर्वीच्या लोकांची मोजमापे काढतो. स्वत:ला पुढारलेले ठरवण्याच्या नादात प्रत्येक जुनी गोष्ट चुकीची ठरवतो, नाकारतो. त्याचे योग्य मूल्यमापन करीत नाही. जिज्ञासू वृत्तीने तौलनिक चिकित्सा, अभ्यास करून संकल्पना स्वच्छ व स्पष्ट करीत नाही. 

जिज्ञासू वृत्तीने चिकित्सक दृष्टिकोनातून इस्लामची मांडणी करण्याचे साहस सहसा कुणी दाखवत नाही. पृथ्वी सपाट आहे, असे एके ठिकाणी म्हटले आहे. पण, त्याचबरोबर दुसर्‍या ठिकाणी दिवस आणि रात्र पृथ्वीभोवती गुंडाळलेले आहेत, असेही म्हटले आहे. पृथ्वी सपाट आहे, असे म्हणण्याचा संदर्भ पडताळून समोर ठेवणे, त्याची तार्किक चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे. कुराणमध्ये म्हटले आहे, म्हणजे ते जसेच्या तसे, त्याचा साकल्याने विचार न करता इस्लाम पंथ मानणार्‍यांनी व संपूर्ण जगाने स्वीकारावे हा हट्टाग्रह का? त्याचे संदर्भ, त्याचे शास्त्रीय विवेचन करण्यास एवढी आडकाठी का केली जाते? कुराणचा शास्त्रीय अभ्यास केवळ मुस्लिमांनीच नव्हे तर प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक आहे. त्यामुळे, जे पंथग्रंथांबद्दल विनाकारण व केवळ अज्ञानापोटी पसरलेले गैरसमज आहेत, ते निश्चितच दूर होतील.

आपल्या भारतीयांमध्ये असा अभ्यास करण्याची शास्त्रीय बैठक आहे. पूर्वपक्ष, खंडन, मंडन इथपासून ते उत्तरमिमांसेपर्यंत पोहोचल्यानंतर एखाद्या ग्रंथाविषयी मत बनवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. वास्तविक ‘टीका’ या शब्दाचा अर्थ निंदा असा नसून अभ्यासपूर्ण विवेचन असा आहे. 

आजकाल आपण टीका आणि निंदा यातला फरकच विसरून गेलो आहोत. त्यामुळे, नुपूर शर्मा नेमके काय म्हणाली, त्यात निंदा होती की, टीका होती की आणखी काही होते याचा आपण विचारच करत नाही. अगदी निर्भीड, निर्भीड असण्याचा ढोल पिटणारे पत्रकारही त्याचे विश्लेषण करू इच्छित नाहीत. शिवलिंगावर टिप्पणी करणार्‍याला उत्तर देताना ती म्हणाली, ‘तुम्हारे कुराणमे लिख्खे हुए उडते घोडे और अर्थ इज फ्लॅट इसका मजाक उडाना शुरू कर दूं?’ त्यानंतर मुहम्मद पैगंबर यांच्या विवाहाचा उल्लेख करत तिने आपणही त्यावर बोलू का?’, असा प्रश्न विचारला. तिच्या उल्लेखातील ‘सेक्स’ हा शब्द मला व्यक्तिश: खटकला. सुनन अन-नसाई (३३७८) - (संदर्भ १) व सहीह अल-बुखारी (५१३४)  - (संदर्भ २) यात असलेल्या मूळ वाक्याचं भाषांतर करताना इंग्रजीत ‘कॉन्स्युमेटेड’ असा शब्द आहे. त्याचा अर्थ विवाह करून शारीरिक संबंध ठेवणे, सेक्स करणे, स्त्रीला पूर्णत्व आणणे असा होतो. तरीही जाहीर मंचावर बोलताना ‘सहाव्या वर्षी विवाह केला आणि नवव्या वर्षी तिची पाठवणी झाली.’, असा शब्दप्रयोग करणे योग्य ठरले असते. दुसरा मुद्दा असा की, प्रश्नार्थक वाक्यात पैगंबरांचे नाव आल्याने ईशनिंदा झाली असे म्हणत त्याची प्रतिक्रिया म्हणून आंदोलने झाली, तशीच आंदोलने पैगंबरांचे नाव ‘जैश-ए-मुहम्मद’ या दहशतवादी संघटनेने वापरल्यावरून भारतात झाली नाहीत.

‘समोरच्याने निंदा केली तर आपणही तुमच्यातील या या गोष्टीवर निंदा करू का, बोलू का, असे विचारणे योग्य आहे का?’, ‘तिने आपला संयम सोडायला नको होता’, ‘त्याने उचकटावले तरी तिने अशी प्रतिक्रिया देणे किंवा विचारणे समर्थनीय ठरत नाही’, अशी मते अनेक विचारवंतांनी मांडली आहेत. पण, हेच विचारवंत नुपूर शर्माच्या बोलण्यावर उमटलेल्या इस्लामपंथीयांच्या हिंसक किंवा अहिंसक प्रतिक्रियेविषयी चकार शब्दही बोलत नाहीत. जर उचकटवल्यामुळे नुपूरचे प्रतिक्रिया देणे समर्थनीय ठरत नाही, तर नुपूरच्या प्रतिक्रियेवर उमटलेली कुठलीही प्रतिक्रिया समर्थनीय ठरत नाही. पण, त्याचा निषेध सोडा, तसा साधा उल्लेखही करण्याचे धाडस दिसले नाही. उलट अहिंसक मार्गाने अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून विरोध प्रकट करणे हा घटनात्मक अधिकारच आहे, असे विचार मात्र न चुकता मांडले गेले. या ऐवजी नुपूर शर्माचे बोलणे कसे चुकले, कुठे चुकले याविषयी सविस्तर विश्लेषण इस्लामच्य अभ्यासकांनी करणे आवश्यक होते. रस्त्यावर उतरणे हा त्यावरचा योग्य मार्ग नव्हे.

‘विचारू, बोलू?’ असे म्हणत तिने उच्चारलेल्या वाक्यांना ईशनिंदा म्हणणार्‍यांनी ईशनिंदा काय असते, याचे नमुने पाहणे आवश्यक आहे. ‘कंगना राणावत आल्यामुळे शिवलिंगाचा आकार वाढला.’ यासारखी टिप्पणी किंवा काही हिंदूंनी शिवलिंगावर कंडोम चढवलेली चित्रे प्रसारित करणे, अगदीच सौम्य म्हणजे शिवलिंगाची तुलना भाभा अणुभट्टीशी करून त्याचे ‘मेमे’ छापणे ही इश्वराची निंदा नाही का? त्याविरुद्ध कुठल्या शिवभक्तांनी, हिंदूंंनी रस्त्यावर उतरून हिंसक व अहिंसक प्रतिक्रिया दिली? वास्तविक ‘लिंग’ या शब्दाचा अर्थ खूण असा आहे. त्याचा मानवीय प्रजोत्पादक अवयवाशी काहीही संबंध नाही. एवढेच नव्हे तर जसे ते शिवशक्ती मीलन किंवा प्रजोत्पादक अवयवांचे मीलन असे सांगितले जाते तेही चुकीचेच आहे. ‘मीलन’ असेल तर ते असे कसे आहे, एवढा मोघम प्रश्न विचारून त्याचे निराकरण करतो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.

हिंदू-मुस्लिमांनी अशा प्रतिक्रिया रस्त्यावर उतरून देत राहणे व त्याचा शेवट महाभयानक गृहयुद्धात होणे, आपल्याला परवडणार आहे का? युरोपमध्ये निग्रो-गोरे यांचा संघर्ष, फ्रान्स-आल्जेरिया संघर्ष, क्यूबा यांसह अनेक देशांमध्ये घडून गेलेला पॅटर्न व आपल्याकडे होत असलेल्या घटनांचा पॅटर्न यातला पद्धतशीर सारखेपणा, त्यावेळी तिथल्या व आता इथल्या विचारवंतांच्या, पत्रकारांच्या भूमिका यात असलेले विलक्षण ‘साम्य’, खूप घातक भविष्याकडे भारत चालल्याचा संकेत आहे, यात ‘वाद’ नाही!

या संकेताकडे लक्ष देणे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजांना अत्यंत आवश्यक आहे. या सुरू असलेल्या गदारोळात अनेक गोष्टींकडे आपले लक्ष गेलेच नाही. ही डीबेट घडली २६ मे रोजी आणि प्रतिक्रिया उमटली ६ जून रोजी. या दरम्यान व त्या आधी घडलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांकडे आपले लक्ष गेले नाही. भारताने गव्हाची निर्यातबंदी केल्यामुळे, एप्रिल महिन्यात पाकिस्तानने केलेली उर्वरित बेलआउट देण्याची मागणी आयएमएफने लटकवणे, युरोपच्या मदतीशिवाय दूतावास उघडण्यासाठी तालिबानने भारताला मान्यता देणे, एका सत्यशोधक(?) चॅनलने नुपूरच्या वक्तव्याचे वारंवार प्रसारण करणे, त्यासाठी अनेक पाकिस्तानी ट्विटर हँडल सक्रिय होणे, कानपुरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये तेच मेसेज फिरवणे, या सर्वांचा विचार होणे आवश्यक आहे. त्या आधी काही काळ सातत्याने जयशंकर यांचे अमेरिकेला रोखठोक उत्तरे देणे, रशियाकडून भारताने अधिक इंधन खरेदी करणे, इंधनाच्या अन्य पर्यायांवर भारताचे भर देणे या सर्व घडामोडी घडल्या. कतार  अमेरिकेच्या मर्जीतील देश आहे व इस्लामचे राजकीय सर्वेसर्वा बनण्याची स्पर्धा इस्लामी देशांमध्ये आहे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ‘ओआयसी’ दरवर्षी अहवाल सादर करून भारतातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाचा जगभर उदोउदो करते. पण, चीनमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तेवढे बोलत नाही. त्यामुळे, या देशांनी भारताविरुद्ध प्रतिक्रिया देणे स्वाभाविक आहे. मुळात भारतीय राजदूताने किंवा प्रवक्त्याने नुपूरसारखे प्रश्न विचारले असते, तर कदाचित ‘ओआयसी’ देशांनी प्रतिक्रिया देणे संयुक्तिक ठरले असते. वास्तविक एका देशाच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य हे त्या देशाचे अधिकृत वक्तव्य धरता येत नाही. पण, तरीही तसे करून भारतीय राजदूतांना बोलावले गेले आणि ‘भारताची जगभरात(?) मान खाली गेली’, असे म्हणत माध्यमांनी भारताची शान वाढवली. 

२०१०साली पाकिस्तानात आशिया नोरीन या ख्रिश्चन शिक्षिकेवर ईशनिंदेचा आरोप झाला होता आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांचे याप्रसंगी स्मरण होते. पाकिस्तानात मदरशांमध्ये शिकवणार्‍या अनेक मुस्लीम शिक्षकांनाही ईशनिंदेच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली आहे. त्यांना कुराण कळत नव्हते, परमेश्वरावर, मुहम्मद पैगंबर आणि कुराणवर त्यांची श्रद्धा नव्हती व त्यांना त्यांची निंदाच करायची होती, हे पचवणे थोडे जड जाते. कुराणची, मुहम्मद पैगंबर यांच्या जीवनमूल्यांची चिकित्सा, अभ्यासच करू नये असा त्यामागचा हट्टाग्रह स्पष्ट दिसतो. इतरांनी तो केल्यास, मत किंवा प्रतिक्रिया व्यक्त केल्यास सामाजिक शांतता बिघडेल, दंगे होतील, अशी भीती मुद्दाम विचारवंतांकडून पसरवली जाते. आपल्यावर दंगल भडकवल्याचे पाप येईल किंवा ईशनिंदेचे पाप घडेल या भीतीपोटी तो विषयच टाळला जातो. नुपुरच्या प्रतिक्रियेला चिकित्सा न करता सपशेल चूक ठरवण्यात आले, त्यामागेही माध्यमातील विचारवंतांची हीच अगतिकता होती. इस्लामचा चिकित्स अभ्यास मुस्लिमांनी करू नयेच, त्याशिवाय इतरांनीही त्याविषयी बोलू नये याचा हट्टाग्रह धरणे हा कट्टरपणा आहे, असे आपल्याकडच्या विचारवंतांना मुळीच वाटत नाही. 

कुराण किंवा इस्लामशी संबंधित या मूळ अरबी भाषेतील ग्रंथांचे ससंदर्भ यथार्थ विवरण, विश्लेषण सामान्य मुस्लीम, ख्रिश्चन व हिंदूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या अभ्यासाला ईशनिंदेचे लेबल लावणे चुकीचे ठरेल. अभ्यास करताना जिज्ञासू वृत्ती आहे की, केवळ ज्याचा अभ्यास करतोय त्या ग्रंथाला, संस्कृतीला हीन दाखवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, याचा विचार होणेही आवश्यक आहे. केवळ प्रश्न, शंका उपस्थित करून दिलेल्या उत्तरांचा स्वीकार न करता नवीन प्रश्न उपस्थित करत राहणेही योग्य नव्हे.

जे जे चांगले आहे त्याचा स्वीकार करत आणि जे जे अयोग्य आहे, त्याला बाजूला सारत आपण हजारो वर्षांपासून मार्गक्रमण करत आहोत. हीच आपली संस्कृती आहे!


संदर्भ १ : https://sunnah.com/nasai:3378

संदर्भ २ : https://sunnah.com/bukhari:5134

चित्रस्रोत : आंतरजाल (इंटरनेट)


५ टिप्पण्या:

  1. सगळे मुद्दे पटले. मुस्लिम समाज कट्टर श्रद्धावान आहे. हिंदू नाहीत. हे आणखी एक कारण आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रसन्न, खूप छान लेख. दोन्ही बाजू मांडताना समतोल राखला आहेस. काही मुद्दे नाही पटले. तरीही या विषयाला हात घालण्याच्या तुझ्या धाडसाचे कौतुक.

    उत्तर द्याहटवा