रविवार, २८ डिसेंबर, २०२५

सातेरीचे ‘ब्राह्मणीकरण’

देव म्हणजे काय, हे गेल्या लेखात मांडले होते. तत्त्वाला समजून घेण्यासाठी सगुण, साकार रूपात भजणे, मूर्तीची पूजा करणे हे सर्वत्र आहे. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्यात भिन्नता आढळत असली तरी त्यामागे हेतू, भावना, संस्कार आणि संस्कृती एकच आहे. 

माती, दगड, झाड, पशू, पक्षी अशा निसर्गातील अनेक घटकांमध्ये सगुण रूपात देव हे तत्त्व भजले, पुजले जाते. त्यातूनच तयार झालेले स्थान - वारूळ, देवराई, देवस्थान - पूजनीय ठरले. वनात, जंगलात राहणारे व त्यानुरूप जीवनशैली असलेल्या भारतीयांनी वारुळ, देवराई यांच्याठायी ते तत्त्व पाहिले. जंगलापाशी, निमशहरी, नागरी भागात राहणार्‍यांनी तेच तत्त्व कलश, दगडी मूर्ती करून देवस्थानात पाहिले, पुजले व भजले. त्यामागची संस्कृती एकच. त्या विचारात, मानण्यात भिन्नता नाही. 

जेव्हा ख्रिश्‍चन मिशनरि पंथ प्रसार करण्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांनी - जे जगभरच्या संस्कृती नष्ट करताना केले तेच - भेद असलेल्या जागा निवडल्या व त्या मोठ्या करण्यासाठी अनेक विचार प्रसवले. ‘आर्यांचे आक्रमण’ नावाचे थोतांड त्यातूनच जन्मले. आपल्याशिवाय जगात काहीच कुठेच चांगले नव्हते व आम्ही जग पवित्र, ‘सिव्हिलाइज्ड’ केले ही वसाहतवादी मानसिकताही त्यात होती. त्यामुळे, इथे जे जे काही चांगले म्हणून सापडले त्याचे मूळ त्यांनी भारताबाहेर शोधले. या भूमीत पूर्वी कुणीच राहत नव्हते, माणसे स्थलांतर करून आफ्रिकेतून इथे आली. पहिल्यांदा आले ते मूलनिवासी, आदिनिवासी व त्यांच्यावर आर्यांनी आक्रमण केले व त्यांची संस्कृती नष्ट केली अशी पाचरही मारून ठेवली. जी आजतागायत अनेक राजकीय, सामाजिक हेतू असलेली माणसे आणखी घट्ट करत आहेत. 

रा. चि. ढेरे यासारख्यांनी तर ‘भारतात वैदिक आर्यांच्या आगमनापूर्वीपासून स्थानिक समूहांची स्वतःची दैवते होती’ या गृहीतकावर विठ्ठलाच्या वैदिकीकरणाचा सिद्धांत मांडला. त्याचीच री पुढे ओढत गोव्यातील विचारवंतांनी विठ्ठलाला ‘बहुजनांचा देवू’ केला. त्याचेच पुढचे संस्करण म्हणजे ‘वारूळरूपी सातेरीचे ब्राह्मणीकरण’ झाले असा तर्क मांडला जात आहे. काही उपटसुंभ तर आदिवासींचे आधी हिंदूकरण झाले व नंतर ख्रिस्तीकरण झाले, असा समांतर धागा (पॅरलल ड्रॉ करणे) रंगवतात. देवळे मोडून त्याजागी चर्च उभारणारा ख्रिश्‍चिन पंथ व मशिदी उभारणारा इस्लाम पंथ यांच्याइतकाच हिंदू धर्मही अन्याय करणाराच आहे, असे त्यांचे म्हणणे असते. गंमत म्हणजे अगदी मागे जायचे तर इथे कुणीच आदिवासी, मूलनिवासी नव्हते व सगळे आफ्रिकेतून इथे आले हे म्हणणे खरे धरावे लागेल. 

‘सातेरीचे ब्राह्मणीकरण’ असेच शब्द का वापरले जातात? वारुळे होती ती मोडून सारस्वतांनी किंवा ब्राह्मणांनी त्याची मूर्ती केली का? मूर्तीरूप केलेले व भजणारे लोक हे त्या वारूळरूपी सातेरीचेच भक्त आहेत ना? वारूळ मोडून मूर्ती स्थापन केली आहे का? सध्या तसे थेट म्हटले जात नसले तरी याच विचारांची पुढची पिढी हेच गृहीतक मांडेल की, जशी हिंदूंची देवळे पाडून मुसलमानांनी मशिदी आणि ख्रिश्‍चनांनी चर्च उभारल्या तसेच त्यांच्या आधी आदिवासींची वारुळे (रोइणी) पाडून हिंदूंनी ब्राह्मणी देवतांच्या मूर्ती उभारल्या. 

देवतेची मूर्तीरूपात पूजा करणे म्हणजे ‘ब्राह्मणीकरण’ असेल तर मूर्तीपूजा इस्लाम जिथे जन्मास आला त्या मक्केतही होती. मग, ‘ब्राह्मणीकरण’ असा शब्दच इथे का योजला जातो? त्याचे मूळ आर्य, वैदिक, ब्राह्मण हे बाहेरून इथे आले या संकल्पनेत आहे. ही ‘फॉल्टलाइन’ काढली जात आहे. जी पुढे जाऊन अनेक संघर्षांना जन्म देईल. आज जे होत आहेत त्यापेक्षाही भयानक परिस्थिती याच ‘फॉल्टलाइन’ नंतर निर्माण करतील. पण या परिणामांची जबाबदारी हे लेखक, विचारवंत घेत नाहीत. त्यांना बहुजन समाजाचा कैवार घेत आपले पुरोगामीपण मिरवायचे आहे. पण, हे विचारवंत त्याच वसाहतवादी मानसिकतेची व ख्रिस्ती मिशनरि प्रचाराची सांस्कृतिक मार्क्सवादाच्या आकर्षक खोक्यात गुंडाळलेली कुजकी फळे आहेत. आज ते जे पेरत आहेत, त्याचे परिणाम भोगायला ही लाल माकडे असणार नाहीत. जातीभेद मिटवण्याच्या गप्पा हाणत तो अधिकच कसा रुजेल; समानतेच्या नावाखाली विषमताच कशी अधिक घट्ट होईल, याची काळजी घेतात.

ज्यांना देवाचे अस्तित्वच मान्य नसते, त्यांना देवतेच्या ‘ब्राह्मणीकरणा’ची चिंता लागते तेव्हा त्याचे कारण देव, संस्कृती नष्ट करणे हेच असते. अन्यथा वड पुजण्याला कर्मकांड, थोतांड म्हणणारे पर्यावरणवादी, हजारो वर्षे अनेक वटवृक्ष टिकून आहेत, देवराया टिकून आहेत त्याचे श्रेय त्या पुजण्याला व संस्कृतीला देत नाहीत. निसर्गचक्रावरच आधारित असलेल्या आपल्या संस्कृतीतल्या देवांच्या प्रत्येक सणाला प्रदूषणाची, प्राण्यांच्या हत्येची आठवण हमखास होते. 

जगभरातील प्रत्येक निसर्गपूजक संस्कृती संपलेली असताना, आपली संस्कृती अजून तग धरून आहे. त्याचे कारण या संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत अजून ही विचारवंतांची टोळधाड पोहोचली नाही. चैतन्याचे जिथे जिथे प्रकटीकरण होते; मग ते वारूळ असेल, दगड असेल, मूर्ती असेल, काहीही असेल त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. सातेरी, शांतादुर्गा, रवळनाथ, देवचार, कुळागरातला ब्रह्मा, विष्णू, शंकर सगळे आमचेच आहेत. त्यांमागे असलेले तत्त्व एकच आहे. त्याला हात जोडून नमस्कार करा. त्या तत्त्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरूच ठेवा!

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

देव म्हणजे काय? देव आहे का?

‘देव आहे की नाही’, ‘देवच सगळे करतो, तर अत्याचारही तोच करतो का?’ वगैरे हे प्रश्‍न विसरून जा. आपल्या क्षमतेबाहेरही जगात काही तरी आहे, जे आपण केल्यामुळे झाले नाही, असे आपल्याला मिळाले आहे व मिळत आहे, यासाठी ते देणाऱ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जेवत असाल, तर हे अन्न शिजवणाऱ्या गृहिणीसाठी, त्यासाठी लागवडीपासून ते कापणीपर्यंत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि त्याही पुढे जात ज्यामुळे त्याची निर्मिती होते त्या तत्त्वासाठी कृतज्ञता व्यक्त करा. छानपैकी डोळे मिटा, नमस्कार करा. त्याला धन्यवाद द्या! झालेच शक्य कधी, तर या माहितीवरून त्या तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न करा.
‘देव म्हणजे काय?’ आणि ‘देव आहे का?’ या दोन प्रश्‍नांचा खल गेली हजारो वर्षे सुरू आहे. हे समजून घेण्याचा सर्वांत जास्त चांगला प्रयत्न भारतात झाला, याचा मला अभिमान आहे. 

देव हे तत्त्व आहे. ऊर्जा किंवा चैतन्य आणि जड या दोन्हीतही असलेले तत्त्व म्हणजे देव. तत्त्व समजून घेण्यासाठी तत्त्वच उपयुक्त आहे, तर्क नाही. तत्त्व हे ज्ञान झाल्यावर आपोआप समजते. तर्क हा माहितीवर आधारित असतो. ‘साखर गोड आहे’ यातील ‘साखर’ म्हणजे काय, असे विचारल्यास ती दाखवता येते, ‘गोड’ म्हणजे काय यासाठी ती साखर चाखूनच पाहावी लागते. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळे. माहिती करून घ्यावी लागते, तर ज्ञान होते. त्यामुळे, देव मानण्यावर नाही. आपण मानो किंवा न मानो, देव आहेच. 

संस्कृतमध्ये दिव (द्यु-द्यतते) या धातूपासून बनलेल्या क्रियापदाचा अर्थ चमकणे किंवा प्रकाशणे असा आहे.  ’दिवु क्रीडाविजिगीषाव्यवहारद्युतिस्तुतिमोदमदस्वप्नकान्तिगतिषु’ या सूत्रानुसार ’दिव’ धातूचे अनेक अर्थ होतात. त्यात ’द्युति’ (प्रकाशणे/चमकणे) हा मुख्य अर्थ आहे. जो स्वतः प्रकाशमान आहे आणि प्रकाश देतो, तो ’देव’. या धातूपासून दिवा, देव असे शब्द तयार झाले. दिव या एका धातूपासून झालेले शब्द असले तरीही, जे कळतं तो ’दिवा’ आणि ज्याच्यामुळे कळतं तो ’देव’. 

ज्याच्यामुळे चैतन्य(ऊर्जा) आणि जड कळतं, ते तत्त्व म्हणजे देव. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी झाला. देव तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न सगुण साकार माध्यमातून झाला, तसाच तो निर्गुण निराकार माध्यमातूनही झाला. तत्त्वाला तर्काने समजून घेण्याच्या प्रयत्नात अनेक वाद निर्माण झाले. ‘सगळे काही देवामुळेच होते’ किंवा ‘सगळे देवच करतो’, इथपासून ते ‘देव वगैरे असे काही नसतेच, भटांची पोटे भरायची मनुवादी सोय’ किं़वा ‘देवाला रिटायर करा’ किंवा ‘देव असेल तर दाखवा’, वगैरे प्रकार सुरू झाले. ‘एकच देव आहे’ किंवा ‘देव एकच आहे’ इथपासून ते ‘माझा देव हाच पुजण्यायोग्य बाकीचे सगळे खोटे देव’ इथपर्यंत मते मांडणे, खोडणे सुरू झाले. या सगळ्यांत देव हे तत्त्व समजून घेण्याचा प्रवास भरकटला. 

भारतामध्ये देव या तत्त्वाचे तेहेतीस प्रकार सांगितले आहेत. अष्ट वसू हे ’जड’ सृष्टीतून (पृथ्वी, पाणी, अग्नी), अकरा रुद्र हे जिवात असलेल्या जैविक ऊर्जेतून आणि बारा आदित्य हे खगोलीय ऊर्जेतून शुद्ध चैतन्य ज्ञात होण्याची तत्त्वे आहेत. यांचे संचालन, व्यवस्थापन करणारी उर्वरित दोन तत्त्वे म्हणजे इंद्र आणि प्रजापती. मग, इथे एक प्रश्‍न पडतो; बाकीचे हे जे देव आहेत, त्यांचे काय? 

एक तर ते या तेहेतीस प्रकारांपैकी कुठल्या तरी एका प्रकारात येतात, त्याचे रूप असतात किंवा काम्य, उपास्य देवता असतात. आपण ज्यांना गोव्यात ‘देवचार’, ‘खेत्री’ वगैरे म्हणतो ते वसू, रुद्र या प्रकारांत मोडतात. आपण मेल्यानंतर आपल्या सूक्ष्म देहाचा प्रवासही वसू, रुद्र आणि आदित्य या तत्त्वांतून होत असतो. आपल्या कर्मानुसार गती प्राप्त होते. कर्म नाहीसे होईपर्यंत पुन्हा पुन्हा जीवस्थितीत येणे क्रमप्राप्त आहे. ते नाहीसे झाले की आपण जे जड आहोत, ते शुद्ध चैतन्यात विलीन होतो. यालाच ‘मोक्ष’ म्हणतात. 

आपण आज जे सुख, दु:ख भोगत असतो, ते आपल्याच कर्माचे फळ, क्रियेची प्रतिक्रिया असते. ते ‘जशास तसे’ या न्यायाने मिळत नाही, तर ‘जेवढ्यास तेवढे’ या न्यायाने मिळते. इथे एक प्रश्‍न उभा राहतो; ‘कर्माचे फळ याखाली बलात्कार येतो का?’ असेलही किंवा ते नवीन कर्मही असेल. काहीही असले तरी ते बलात्कार करणाऱ्याच्या बचावाचे कारण, सबब ठरत नाही. एका मर्यादित अर्थाने, हे कर्मफळ पोहोचवण्याची, उजेडात आणण्याची व्यवस्था म्हणजे देव!

फारच जड झाले का? सोडून द्या सगळे जे वाचलेत. ‘देव आहे की नाही’, ‘देवच सगळे करतो, तर अत्याचारही तोच करतो का?’ वगैरे हे प्रश्‍न विसरून जा. आपल्या क्षमतेबाहेरही जगात काही तरी आहे, जे आपण केल्यामुळे झाले नाही, असे आपल्याला मिळाले आहे व मिळत आहे, यासाठी ते देणाऱ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जेवत असाल, तर हे अन्न शिजवणाऱ्या गृहिणीसाठी, त्यासाठी लागवडीपासून ते कापणीपर्यंत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि त्याही पुढे जात ज्यामुळे त्याची निर्मिती होते त्या तत्त्वासाठी कृतज्ञता व्यक्त करा. छानपैकी डोळे मिटा, नमस्कार करा. त्याला धन्यवाद द्या! झालेच शक्य कधी, तर या माहितीवरून त्या तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न करा. 

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

आम्हांला काय त्याचे?

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो?

रविवार आहे. झाले जेवण? बघितलात टीव्ही, केली चर्चा निवडणुकीवर, बांधलेत अंदाज कोण निवडून येतील याचे? हरकत नाही. आता वामकुक्षी घ्या. स्वस्थ झोपा. एक साधी कुठे तरी दूर घडलेली घटना  सांगायची होती. हळहळही व्यक्त करू नका. काहीच करू नका. कॉंग्रेसचे असाल तर भाजपचे सरकार का जाब विचारत नाही, म्हणून भक्तांची ठासा आणि भाजपचे असाल तर गेल्या सत्तर वर्षांचा हिशेब काढत मुस्लीम लांगुलचालनावर भाष्य करत गुलामांची ठासा. वाटल्यास एआयने केलेले मीम शेअर करा.  पुन्हा झोपी जा. काहीच घडले नाही.

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो? 

१९२१साली मोपलात झाले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. तेच १९२४साली कोहाटमध्ये झाले;बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२५साली कलकत्त्यात घडले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२९साली बॉम्बेमध्ये घडले; बाकीच्या देशातले....(कंटाळा आला कॉपी पेस्टचा). १९४६साली कलकत्ता; बाकीच्या..... १९४६साली नौखालीत(इथे तर कुणालाच ते ‘दंगे’, ’दंगल’ असे शब्दही लावता येणार नाही. कारण गांधी चार महिने तळ ठोकून होते व चार महिने त्यांच्यासमोर केवळ हिंदू कापले गेले.); बाकीच्या..... १९४७साली फाळणी; बाकीच्या...... १९६१साली जबलपूरमध्ये; बाकी.... १९६९साली अहमदाबादमध्ये; बाकी.... १९७०साली जळगावमध्ये; बाकी.... १९८३साली आसाममध्ये; बाकी.... १९८९साली बिहारमध्ये; बाकी...... १९९०साली काश्मीर(हिंदूंना काही पडलेलेच नाही, सर्वोच्च न्यायालयासही काही पडून गेलेले नाही. हिंदू मानवाधिकार असलेला माणूस थोडाच आहे? तो तर सेक्युलर नसलेला कम्युनल आहे); बा...... (इथून आजवर जे लहानसहान घडतेय, ते आणि ‘बा’च्या पुढे ‘की’ व नंतरचे लिहिण्याचाही कंटाळा आलाय.) 

जाऊ द्या हो! काय आणि किती मनावर घ्यायचे? 

आम्ही हिंदूं कुत्र्याच्या मौतीनेच मरण्याच्या लायकीचे आहोत! हे एकदा मान्य केले, की आपल्या घरातल्या कुणाला तरी जमावाने ओढून फरफटत बाहेर नेऊन जाळले, तरी काही वाटणार नाही. चितेच्या लाकडाचा खर्च तरी वाचला, म्हणून समाधान मानू आम्ही हिंदू. नौखालीत मरेपर्यंत बलात्कार केला किंवा १४जणांनी बलात्कार करूनही वाचली म्हणून जिवंत असताना करवतीने तुकडे केले; तर आमच्या कुटुंबातील कुणा स्त्रीचे नाही ना केले, असे म्हणून गप्प बसणारे आम्ही स्वत:च्या कुटुंबातील मुलीच्या बाबतीत असे घडले तर आम्ही हिंदू ‘चला लग्नाचा खर्च वाचला’, यावर समाधान मानू. सेक्युलरिजम जिवंत राहिला पाहिजे यावर गप्पा हाणू, चर्चासत्र करू. 

आम्हांला काय त्याचे? 

मराठी क्वॉरावरील पोस्ट : https://qr.ae/pCU5Ik

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

भद्र, अभद्र आणि रामभद्र

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत.
आपल्या सभोवताली काय चांगले, काय वाईट हे आपण झुंडशाहीच्या नियमाने ठरवू लागलो आहोत. जे जिथे वाईट आहे, ते तिथे नेमकेपणाने सांगणे, आपण कधीच सोडून दिले आहे. आपण कुठल्या झुंडीचा भाग आहोत, त्यावरून आपले व्यक्त होणे ठरू लागले आहे. आपल्या धडावर झुंडशाहीचे ‘सहस्रशीर्ष’ आहेत. व्यक्ती कोण, काय आहे यापेक्षाही ती कुठल्या झुंडशाहीत आहे, कशाशी जोडलेली आहे, कुठल्या व्यक्तींची समर्थक आहे, यावर त्याचे महत्त्व ठरते. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कारटा’ ही उक्ती अतिशय क्षुल्लक ठरावी, अशा पद्धतीने टोकाची स्तुती व पातळी सोडून निंदानालस्ती केली जाते. परिणामी, आपण दृष्टी असूनही दृष्टिहीन होत चालले आहोत. ‘नराचा नारायण’ होण्याचे ध्येय असलेली माणसे स्वत:लाच किती हीन बनवत आहेत, हे पाहवत नाही. जे पाहिले होते, ते दिसत नाही आणि जे दिसते ते पाहवत नाही!

गिरिधर राजदेव मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. ते दोन महिन्यांचे असताना त्यांना खुपरीचा (ट्रॅकोमा) आजार झाला व त्यांचे डोळे गेले. १९५०साली त्यावर उपचार नव्हते किंवा योग्य उपलब्ध नव्हते म्हणून असेल, पण दृष्टी गेली. त्यानंतरचे त्यांचे सर्व  शिक्षण ऐकून व पाठांतर करण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाले. पाठांतर केले म्हणजे ते कायमस्वरूपी लक्षात राहण्याची व हवे तेव्हा ते आठवण्याची निसर्गदत्त क्षमता आहे. १९६७साली  त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजातून संस्कृतमधील उत्तरा माध्यमा (हायर सेकंडरी) ही परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९७१ मध्ये गिरिधरांनी वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठा त प्रवेश घेतला. तेथून त्यांनी शास्त्री (बी.ए.) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. १९७६मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून आचार्य (एम्.ए.) ही पदवी परीक्षेत सर्वप्रथम येऊन मिळविली. १९८१मध्ये त्यांनी विद्यावर्धिनी (पीएच्.डी.) ही पदवी प्राप्त केली. १९९७मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती (डी.लिट्.) ही पदवी मिळविली. ही पदवी त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ३ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांनी चित्रकूट (उत्तर प्रदेश) येथे ‘तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड’ या शाळेची स्थापना केली. तसेच २७ सप्टेंबर २००१ रोजी चित्रकूट येथे त्यांनी केवळ दिव्यांगांसाठी असलेले जगातले पहिले विद्यापीठ स्थापन केले. त्यापूर्वी, बरीच वर्षे आधी ते रामानंद संप्रदायाचे अनुयायी झाले. ‘तुलसीपीठ’ ही संस्था स्थापन केली. गिरिधर मिश्र हे ‘रामभद्राचार्य’ झाले!

मस्जिद-ए-जन्मभूमी विरुद्ध राममंदिर या न्यायालयीन खटल्यात त्यांनी दिलेली साक्ष व एकूणच रामचंद्रांविषयीचे संदर्भ फार महत्त्वाचे ठरले. तेव्हापासून ते टीकेचे धनी झाले. मोदींनी त्यांची व त्यांनी मोदींची प्रशंसा केल्याने त्याला राजकीय वळणही प्राप्त झाले. तेव्हापासून त्यांच्या शारीरिक व्यंगावर अतिशय अभद्र पद्धतीने टीका होऊ लागली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात असलेल्यांवर टीका होणे ही काही नवीन बाब नाही. पण, पूर्वी सार्वजनिक संडासाच्या फुटक्या दाराच्या आतल्या बाजूवर कोळशाने जे बसल्या बसल्या साहित्य पाडत, तेच आता सार्वजनिक माध्यमांवर पाडले जात आहे. या वैचारिक कुंथण्याला किंवा अतिसाराला मर्यादाच उरल्या नाहीत. यात हात धुऊन घेण्यात कुणीही मागे नाही. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही, याला काहीच महत्त्व नाही. आपल्या झुंडशाहीत ती नाही म्हणजे ती चूकच आहे, किंवा जशी ती दाखवली जाते तशीच आहे, अशी खात्री असते. ती तशी असणे हेच बहुधा झुंडशाहीचे ओळखपत्र असावे. नेहरू, गांधी, सावरकर हे तर या झुंडशाहीचे नेहमीचे ‘बळी’. 

या झुंडशाहीत जे केले जाते, त्याला वैचारिक विरोध म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. वैचारिक विरोध हा विचारांपुरताच मर्यादित असतो. विचारांवर, निर्णयांवर टीका करणे चुकीचे नाही. ती झालीच पाहिजे. नेहरूंच्या निर्णयांचे परिणाम आज जाणवत आहेत, त्यावर टीका होते. पण, म्हणून त्यांच्या नसलेल्या दहा बायका काढून अभद्रतेची हीन पातळी गाठणे चुकीचेच आहे. मोदींनी आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसू लागल्यानंतर त्यावरही टीका होणे स्वाभाविकच आहे. पण, म्हणून त्यांच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यावर अत्यंत हीन पातळी गाठून टीका करणे, याला वैचारिक विरोध कसे बरे म्हणता येईल?

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत. ती पातळी गाठता येत नाही म्हणून उत्तर देणे थांबते. दु:ख याचे नाही, की रामभद्राचार्यांवर अभद्र बोलले, लिहिले गेले; दु:ख याचे आहे की चांगल्या, सुशिक्षित, कविमनाच्या माणसांनी ते केले. त्याचे समर्थनही, कुठले तरी कुठे तरी ’सेटल’ करून ‘जितं मया’, म्हटल्यासारखे केले याचे वाईट वाटले. भद्र माणसांनी अभद्रतेची सर्वांत खालची पातळी गाठली याचे दु:ख झाले. ‘नरेचि केला हीन किती नर..’ हे पाहून प्रचंड त्रास झाला.  

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

काय फायदा?

 
काय फायदा?

एकोणीस वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय फायदा? असा प्रश्न विचारणाऱ्यांंनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला तरी अचंबित व्हायला होईल. पाठांतर, घोकंपट्टी, रेटून काही फायदा नाही; आधी अर्थ समजून घ्यायला हवा, हा विचार फार घातक आहे. ज्या वयात पाठांतर करण्याची शक्ती असते त्याच वयात ते करावे लागते. अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्यही पुरत नाही. ख्रिश्चन मिशनरि आणि ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या द्वेषपूर्ण व चुकीच्या लिखाणास प्रमाण मानून आपल्या संस्कृतीला हीन समजणारे स्वाभिमानशून्य विचारवंत हाच प्रश्न विचारतात, "काय फायदा?"

वेदपठणाच्या एकूण अकरा पद्धती आहेत, ज्या दोन भागांत विभागलेल्या आहेत; प्रकृती आणि विकृती. मूलभूत, नैसर्गिक असलेल्या प्रकृती पाठांतर्गत  संहिता (सर्वांत मूळ आणि सामान्य क्रम पाठ करणे), पद पाठ (संहितेतील प्रत्येक शब्द किंवा पद वेगळे करून, विराम देऊन  पाठ करणे) आणि क्रम पाठ (शब्द जोड्यांमध्ये पाठ करणे). याशिवाय, आठ विकृती पाठ आहेत. विकृती म्हणजे बदल(चुकीचे किंवा नकारात्मक नव्हेत) करून पाठ करणे. विकृती पाठांतर्गत जटा (शब्दांची उलट-सुलट मांडणी करून पाठ करणे, माला (शब्दांना एका विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा माळेसारखे जोडून पाठ करणे), शिखा ( शिखेसारखी रचना असलेली व  शब्दांचा क्रम वर-खाली करत पाठकरणे), रेखा ( शब्दांची विशिष्ट पद्धतीने रेषेसारखी मांडणी करून पाठ करणे), ध्वज (ध्वजाच्या आकाराप्रमाणे शब्दांची मांडणी करत पाठ करणे), दंड ( दंड किंवा काठीच्या सरळ रेषेप्रमाणे एक विशिष्ट क्रमात पाठ करणे, रथ (रथाच्या चाकाप्रमाणे शब्दांचा क्रम चक्राकार ठेवत पाठ करणे) आणि घन (शब्दांची अत्यंत गुंतागुंतीची रचना आणि अनेक दिशांनी ती पाठ करणे) या आठ आहेत. या सर्व अकरा पद्धतींनी हजारो वर्षांपासून वेदांचे मूळ स्वरूप आणि अचूक उच्चारण जतन केले आहे. या पद्धती केवळ पाठांतरासाठीच नव्हे, तर मंत्रांचे व्याकरण, स्वर आणि अर्थ न बदलता ते जसेच्या तसे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केल्या गेल्या होत्या. 

याचा फायदाच हवा असेल तर सांगतो, 

सती अपवादात्मक असताना तिला प्रथा म्हणून सिद्ध करण्याचा आणि वेदकाळापासून ती प्रचलित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हेन्री थॉमस कोलब्रूक यांनी १७९५ साली केला. त्यांनी 


इ॒मा नारी॑रविध॒वाः सु॒पत्नी॒राञ्ज॑नेन स॒र्पिषा॒ सं वि॑शन्तु । 
अ॒न॒श्रवो॑ऽनमी॒वाः सु॒रत्ना॒ आ रो॑हन्त॒ं जन॑यो॒ योनि॒मग्रे॑ ॥

(प्रेतासोबत जाणार्‍या स्त्रिया, ज्यांचे पती जिवंत आहेत किंवा युवा आहेत, त्यांनी आणि विधवा झालेल्या स्त्रीने जलाशयासमीप जाऊन डोळे, तोंड धुवावे आणि पुन्हा स्वस्थ होऊन घरी जावे.)

हा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अठराव्या सूक्तातील सातवा मंत्र जो बहुधा अंत्येष्टी (अंत्यसंस्कार) विधीत वापरला जातो, तो चक्क बदलला. अग्रे (पुढे जा) हा शब्द बदलून तिथे अग्ने (अग्नीत जा) हा शब्द घातला.  हे विधवे तू अग्निप्रवेश कर असा अर्थ करून सती जाण्याची आज्ञा वेदात आहे, असे भासवले. या सर्व पाठांतर पद्धतीतून वेदाध्ययन केलेल्या विद्वानांनी ही बदमाशी उघड केली. त्यामुळे, विलियम जोन्स यांनी मंत्राचे भाषांतर चुकल्याचे सांगितले. संस्कृतचे विद्वान एच. एच. विल्सन यांनी सायणाचार्यांप्रमाणे त्याचा खोटारडेपणा जगासमोर आणला. हे केवळ त्या पाठपद्धतीमुळे शक्य झाले. अन्यथा लिहिलेले असते, तर त्यात बदल करून तेच आमच्या माथी मारले गेले असते. 

याच्याच पुढील मंत्रात

उदी॑र्ष्व नार्य॒भि जी॑वलो॒कं ग॒तासु॑मे॒तमुप॑ शेष॒ एहि॑ । 
ह॒स्त॒ग्रा॒भस्य॑ दिधि॒षोस्तवे॒दं पत्यु॑र्जनि॒त्वम॒भि सं ब॑भूथ ॥

(हे स्त्री, तू उठ, जिवंत लोकांच्या जगात परत ये. ज्याच्या शेजारी तू झोपली होतीस, तो मृत झाला आहे. (तुझे) पत्नीपण आता संपले आहे, तरी तू इथेच राहून संसार कर)  असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतानाही सती ही प्रथा होती, असे सांगत जो भंपकपणा केला जातो, तो किळस आणणारा आहे. 

आता तर "विधवा प्रथा" नामक बिनडोक प्रकार सुरू झाला आहे. विधवा होणे ही अवस्था आहे, ती प्रथा कशी होऊ शकते, हा साधा विचारही या विचारवंतांना सुचत नाही. प्रथा म्हणून संस्कृतीस एकदा हीन ठरवायचेच असे ठरवले की मग अपवादासही नियम करणे ओघाने आलेच. याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. ही आपली संस्कृती आहे. ना ती ब्राह्मणी आहे, ना बाहेरून आलेल्या युरेशिअन आर्यांची आहे, ना ती बहुजनविरोधी आहे. उलट यातील अनेक सूक्ते आज ज्यांना बहुजन म्हटले जाते, अशा ऋषींनीच रचलेली आहेत. ती परंपरा, ती संस्कृती जशास तशी जतन करण्याचा फायदा काय, असे विचारणार्‍या स्वाभिमानशून्यांना काय म्हणावे, तेच कळत नाही. 


मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

पूजा नाईकच्या बातमीतला ‘लिंगबदल’

‘ऑटो ट्रान्स्लेट’ ही सुविधा सुरू असल्यामुळे अंतूच्या मोबाइलवर मूळ मराठी मजकूर इंग्रजीत दिसत होता. त्यात ‘.... या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले’, असे होते त्याचे इंग्रजी भाषांतर करताना मराठीतीले ‘हिने’ इंग्रजीत कसे घ्यावे हे न कळल्याने मराठीतली ‘ही’, इंग्रजीतही तशीच राहिली. इंग्रजी बातमीत पूजा नाईकचा झालेला ‘लिंगबदल’ हा ‘ऑटो ट्रान्सलेट’चा घोळ होता.
पुलंच्या ‘असा मी असामी’मध्ये धोंडो जोशी कुमार गिरीशच्या शाळेतील मुख्याध्यापिका सरोज खरे यांना भेटायला जातात तो प्रसंग आठवला :  

‘सरोज खरे म्हणतात,  ‘कुमार गिरीशमध्ये आम्हाला काही चमत्कारिक ट्रेट्स दिसतात. असे थोडे आउट ऑफ द वे वागणार्‍या मुलांमध्ये हे विवक्षित गुण कुठून आले याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या पालकांच्यातल्या ट्रेट्स पाहाव्या लागतात. प्रॉफेसर ऑस्ट्रोजेमची थिअरी आहे. पॅरेन्ट सायकॉलॉजीवर ऑथोरिटी आहे ती’ त्यावर जोशी म्हणतात, ‘हो हो प्रश्‍नच नाही. ऑस्ट्रोजेम म्हणजे काय, ही इज अ जेम’ त्यावर सरोज खरे म्हणतात,‘ही नाही शी आहे ती’. त्यावर चतुरपणे स्वत:ची बाजू सांभाळत, ‘मी मराठी ‘ही’ म्हटली’, असे  जोशी उद्गारतात.’

हा प्रसंग आठवायला कारण ठरला तो अनंत गोब्रे या पुलंना न भेटलेल्या वल्लीने पाठवलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज. रत्नांग्रीच्या त्या मधल्या आळीतले सगळे घेऊन वेळगे ग्रामीची ही ‘अंतू गोब्रे’ नामक व्यक्ती पुलंना भेटायला हवी होती, असे प्रत्येक अनुभवागणिक वाटते. असो!  ‘गोमन्तक टीव्ही’च्या एका फेसबुक पोस्टचा स्क्रीन शॉट अंतूने पाठवला होता. त्यात पूजा नाईकने आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले होते. तो मजकूर इंग्रजीत होता आणि त्यात पूजा नाईक विषयी ‘He didn't receive the legal notice sent by IAS officer Nikhil Desai in the 'Cash for Job' case, says he will also drag Desai's chief engineer Uttam Parsekar along with Desai, the main accused Pooja Naik said while speaking to 'Gomantak' on Saturday. ’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत होते. त्या स्क्रीनशॉटखाली अंतूचा मला प्रश्‍न, ‘हा लिंगबदल कधी झाला?’ 


अर्थात माझ्याही लक्षात येईना ही चूक कशी झाली. मी फेसबुक धुंडाळले. पण, ती बातमी काही सापडली नाही. मग मी तीच मेसेज सुशांत मांगलेकरला फॉरवर्ड केली. तो बिचारा त्याच्या नवजात मुलीला आंघोळ घालण्यात व्यग्र होता. मूल जन्माला घातले म्हणजे वडील होत नाही, वडील होण्याचा हा प्रवास फार मोठा असतो, याचा अनुभव तो आताशा घेऊ लागलाय.  थोड्या वेळाने त्याचा फोन आला. तो म्हणला, ‘ती मूळ पोस्ट मराठीत आहे. तुम्हांला मूळ बातमीचा स्क्रीनशॉट पाठवलाय. तुमच्या मित्राच्या मोबाइलवर ऑटो ट्रान्स्लेट ऑन असल्याने हे झाले असावे.’ 

सुशांतची व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहिली तेव्हा घोळ लक्षांत आला. ‘ऑटो ट्रान्स्लेट’ ही सुविधा सुरू असल्यामुळे अंतूच्या मोबाइलवर मूळ मराठी मजकूर इंग्रजीत दिसत होता. त्यात ‘.... या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले’, असे होते त्याचे इंग्रजी भाषांतर करताना मराठीतीले ‘हिने’ इंग्रजीत कसे घ्यावे हे न कळल्याने मराठीतली ‘ही’, इंग्रजीतही तशीच राहिली. इंग्रजी बातमीत पूजा नाईकचा झालेला ‘लिंगबदल’ हा ‘ऑटो ट्रान्सलेट’चा घोळ होता.

असे अनेक घोळ प्रत्येक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया खाती यांवर होत असतात. काही चुका खरोखरच ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ व ‘मुद्राराक्षसाचे विनोद’ असतात, यात दुमत नाही. पण प्रत्येक खेपेस तसेच असते, असे नाही. चूक कुणाकडूनही होऊ शकते, हे जाणून कोणताही पूर्वग्रह न बाळगता टीका करण्यास काहीच हरकत नाही. ‘सुधारणा व्हावी’ हा निखळ हेतू असावा. जसा आमच्या अंतूचा होता!