रविवार, २८ डिसेंबर, २०२५

सातेरीचे ‘ब्राह्मणीकरण’

देव म्हणजे काय, हे गेल्या लेखात मांडले होते. तत्त्वाला समजून घेण्यासाठी सगुण, साकार रूपात भजणे, मूर्तीची पूजा करणे हे सर्वत्र आहे. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्यात भिन्नता आढळत असली तरी त्यामागे हेतू, भावना, संस्कार आणि संस्कृती एकच आहे. 

माती, दगड, झाड, पशू, पक्षी अशा निसर्गातील अनेक घटकांमध्ये सगुण रूपात देव हे तत्त्व भजले, पुजले जाते. त्यातूनच तयार झालेले स्थान - वारूळ, देवराई, देवस्थान - पूजनीय ठरले. वनात, जंगलात राहणारे व त्यानुरूप जीवनशैली असलेल्या भारतीयांनी वारुळ, देवराई यांच्याठायी ते तत्त्व पाहिले. जंगलापाशी, निमशहरी, नागरी भागात राहणार्‍यांनी तेच तत्त्व कलश, दगडी मूर्ती करून देवस्थानात पाहिले, पुजले व भजले. त्यामागची संस्कृती एकच. त्या विचारात, मानण्यात भिन्नता नाही. 

जेव्हा ख्रिश्‍चन मिशनरि पंथ प्रसार करण्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांनी - जे जगभरच्या संस्कृती नष्ट करताना केले तेच - भेद असलेल्या जागा निवडल्या व त्या मोठ्या करण्यासाठी अनेक विचार प्रसवले. ‘आर्यांचे आक्रमण’ नावाचे थोतांड त्यातूनच जन्मले. आपल्याशिवाय जगात काहीच कुठेच चांगले नव्हते व आम्ही जग पवित्र, ‘सिव्हिलाइज्ड’ केले ही वसाहतवादी मानसिकताही त्यात होती. त्यामुळे, इथे जे जे काही चांगले म्हणून सापडले त्याचे मूळ त्यांनी भारताबाहेर शोधले. या भूमीत पूर्वी कुणीच राहत नव्हते, माणसे स्थलांतर करून आफ्रिकेतून इथे आली. पहिल्यांदा आले ते मूलनिवासी, आदिनिवासी व त्यांच्यावर आर्यांनी आक्रमण केले व त्यांची संस्कृती नष्ट केली अशी पाचरही मारून ठेवली. जी आजतागायत अनेक राजकीय, सामाजिक हेतू असलेली माणसे आणखी घट्ट करत आहेत. 

रा. चि. ढेरे यासारख्यांनी तर ‘भारतात वैदिक आर्यांच्या आगमनापूर्वीपासून स्थानिक समूहांची स्वतःची दैवते होती’ या गृहीतकावर विठ्ठलाच्या वैदिकीकरणाचा सिद्धांत मांडला. त्याचीच री पुढे ओढत गोव्यातील विचारवंतांनी विठ्ठलाला ‘बहुजनांचा देवू’ केला. त्याचेच पुढचे संस्करण म्हणजे ‘वारूळरूपी सातेरीचे ब्राह्मणीकरण’ झाले असा तर्क मांडला जात आहे. काही उपटसुंभ तर आदिवासींचे आधी हिंदूकरण झाले व नंतर ख्रिस्तीकरण झाले, असा समांतर धागा (पॅरलल ड्रॉ करणे) रंगवतात. देवळे मोडून त्याजागी चर्च उभारणारा ख्रिश्‍चिन पंथ व मशिदी उभारणारा इस्लाम पंथ यांच्याइतकाच हिंदू धर्मही अन्याय करणाराच आहे, असे त्यांचे म्हणणे असते. गंमत म्हणजे अगदी मागे जायचे तर इथे कुणीच आदिवासी, मूलनिवासी नव्हते व सगळे आफ्रिकेतून इथे आले हे म्हणणे खरे धरावे लागेल. 

‘सातेरीचे ब्राह्मणीकरण’ असेच शब्द का वापरले जातात? वारुळे होती ती मोडून सारस्वतांनी किंवा ब्राह्मणांनी त्याची मूर्ती केली का? मूर्तीरूप केलेले व भजणारे लोक हे त्या वारूळरूपी सातेरीचेच भक्त आहेत ना? वारूळ मोडून मूर्ती स्थापन केली आहे का? सध्या तसे थेट म्हटले जात नसले तरी याच विचारांची पुढची पिढी हेच गृहीतक मांडेल की, जशी हिंदूंची देवळे पाडून मुसलमानांनी मशिदी आणि ख्रिश्‍चनांनी चर्च उभारल्या तसेच त्यांच्या आधी आदिवासींची वारुळे (रोइणी) पाडून हिंदूंनी ब्राह्मणी देवतांच्या मूर्ती उभारल्या. 

देवतेची मूर्तीरूपात पूजा करणे म्हणजे ‘ब्राह्मणीकरण’ असेल तर मूर्तीपूजा इस्लाम जिथे जन्मास आला त्या मक्केतही होती. मग, ‘ब्राह्मणीकरण’ असा शब्दच इथे का योजला जातो? त्याचे मूळ आर्य, वैदिक, ब्राह्मण हे बाहेरून इथे आले या संकल्पनेत आहे. ही ‘फॉल्टलाइन’ काढली जात आहे. जी पुढे जाऊन अनेक संघर्षांना जन्म देईल. आज जे होत आहेत त्यापेक्षाही भयानक परिस्थिती याच ‘फॉल्टलाइन’ नंतर निर्माण करतील. पण या परिणामांची जबाबदारी हे लेखक, विचारवंत घेत नाहीत. त्यांना बहुजन समाजाचा कैवार घेत आपले पुरोगामीपण मिरवायचे आहे. पण, हे विचारवंत त्याच वसाहतवादी मानसिकतेची व ख्रिस्ती मिशनरि प्रचाराची सांस्कृतिक मार्क्सवादाच्या आकर्षक खोक्यात गुंडाळलेली कुजकी फळे आहेत. आज ते जे पेरत आहेत, त्याचे परिणाम भोगायला ही लाल माकडे असणार नाहीत. जातीभेद मिटवण्याच्या गप्पा हाणत तो अधिकच कसा रुजेल; समानतेच्या नावाखाली विषमताच कशी अधिक घट्ट होईल, याची काळजी घेतात.

ज्यांना देवाचे अस्तित्वच मान्य नसते, त्यांना देवतेच्या ‘ब्राह्मणीकरणा’ची चिंता लागते तेव्हा त्याचे कारण देव, संस्कृती नष्ट करणे हेच असते. अन्यथा वड पुजण्याला कर्मकांड, थोतांड म्हणणारे पर्यावरणवादी, हजारो वर्षे अनेक वटवृक्ष टिकून आहेत, देवराया टिकून आहेत त्याचे श्रेय त्या पुजण्याला व संस्कृतीला देत नाहीत. निसर्गचक्रावरच आधारित असलेल्या आपल्या संस्कृतीतल्या देवांच्या प्रत्येक सणाला प्रदूषणाची, प्राण्यांच्या हत्येची आठवण हमखास होते. 

जगभरातील प्रत्येक निसर्गपूजक संस्कृती संपलेली असताना, आपली संस्कृती अजून तग धरून आहे. त्याचे कारण या संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत अजून ही विचारवंतांची टोळधाड पोहोचली नाही. चैतन्याचे जिथे जिथे प्रकटीकरण होते; मग ते वारूळ असेल, दगड असेल, मूर्ती असेल, काहीही असेल त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. सातेरी, शांतादुर्गा, रवळनाथ, देवचार, कुळागरातला ब्रह्मा, विष्णू, शंकर सगळे आमचेच आहेत. त्यांमागे असलेले तत्त्व एकच आहे. त्याला हात जोडून नमस्कार करा. त्या तत्त्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरूच ठेवा!

1 टिप्पणी: