मंगळवार, ५ जुलै, २०२२

कन्हय्यालाल, कोल्हे, सामाजिक शांतता आणि भीती

एका टीव्ही डिबेटमध्ये यावर बोलताना, ‘आपके भगवान के विरुद्ध कोई अपशब्द बोले तो आप एफआयआर तक नही करते, आप गला क्या काटोगे?‘ असा एका मुस्लीम विचारवंताने विचारलेला प्रश्न बिघडत्या सामाजिक सौहार्दाबद्दल, शांततेबद्दल व त्याविषयी असलेल्या भीतीबद्दल खूप काही सांगून जातो.

महाराष्ट्रातील अमरावतीचे उमेश कोल्हे यांचे हत्या प्रकरण कन्हय्यालाल यांच्या हत्येआधी घडले आहे. पण, ४८ तासांत दोन आरोपींना पकडूनही कोल्हे यांच्या हत्येचा तपासाची दिशा व गती राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)कडे प्रकरण सोपवण्यात आल्यानंतर प्राप्त झाली. मध्यंतरी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनही झाले. कोल्हे हत्या प्रकरणाचा गवगवा कन्हय्यालाल हत्येप्रमाणे न होणे, तपासाला गती न मिळणे या मागची नेमकी कारणे शोधणे आवश्यक आहे. 

राणा यांच्या मागणीवरून तपास एनआयएकडे जाणे व महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन ही दोन कारणे तपासाला गती मिळण्यासाठी देणे हे राजकारण्यांसाठी सोयीचे असले तरीही त्यातून एक वेगळाच संदेश जातो. पोलिसांची तपासाची पद्धत राजकीय पाठबळावर अवलंबून आहे आणि राजकीय दबावाने ती प्रभावित होते, असे त्यातून ध्वनित होते. प्रशासकीय व्यवस्थेसाठी ही बाब फार चिंताजनक आहे. व्यवस्था आपल्या पद्धतीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. ती राजकीय दबावानुसार वागते हा समज केवळ व्यवस्थेसाठीच नव्हे तर समाजासाठीही घातक आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकमेकांवर आरोप करताना ‘तपास यंत्रणांचा गैरवापर’ हा मुद्दा उपस्थित करणे वेगळे आणि समाजात तसा संदेश जाणे वेगळे. लोकांच्या मनात पोलिसांविषयीच्या विश्वासाची जागा संशय व भीतीने घेणे योग्य नव्हे. 

हा संशय, ही भीती प्रशासकीय व्यवस्थेतून, न्यायपालिकेतून, विचारवंतांकडून आणि माध्यमांकडूनही समाजात पसरवली जात आहे. न्यायाधीशांनी नूपुर शर्माच्या याचिकेवर सुनावणी करताना जी टिप्पणी केली, ती निकालपत्रात नोंदविण्याचे धाडस दाखवले नाही. एरव्ही याचिकेशी दूरचा संबंध असलेली कोणतीही गोष्ट न्यायालय स्वीकारत नाही. निकाल लागलेला नसताना नूपुर शर्माला उदयपूरच्या घटनेसाठी जबाबदार धरणे हे होत असलेल्या घटनांचे समर्थन ठरते. आपल्या वक्तव्यामुळे समाजात नेमका कोणता विचार पुढे रेटला जात आहे किंवा आपण नेमके कशाचे समर्थन करत आहोत, हे न्यायाधीशांना माहीत नसेल का? न्यायिक प्रक्रियेतील भाष्य असते तर ते निकालपत्रात येणे आवश्यक होते, अन्यथा ते वैयक्तिक मत ठरते. त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया म्हणजे न्यायाधीशांना व्यक्तिगत हल्ला वाटणे व समाजमाध्यमांवर बंधने आणली पाहिजेत असे म्हणणे हे त्यांनी व्यक्त केलेल्या मतांहून जास्त हास्यास्पद आहे. न्यायाधीशांच्या वैयक्तिक मतावर व्यक्त होणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल हीसुद्धा एक भीतीच आहे.

यापेक्षाही आणखी एक भीती सर्वांत जास्त प्रभावी ठरत आहे, ती म्हणजे ‘सामाजिक शांतता’ बिघडण्याची. नूपुर शर्माने केलेले वक्तव्य ही ईशनिंदा कशी, या प्रश्नाचे उत्तर कुणीही देत नाही. ‘तिच्या वक्तव्याने सामाजिक शांतता व सौहार्द बिघडले’, असा आरोप करणारे त्याआधी कितीतरी दिवस शिवलिंगावर अभद्र, बीभत्स आणि हीन दर्जाची वक्तव्ये, चित्रे, व्यंगचित्रे प्रसिद्ध होताना सामाजिक सौहार्द बिघडत होते की, नव्हते या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. आताही एका हातात सिगारेट व दुसर्‍या हातात एलजीबीटीचा झेंडा घेतलेल्या कालीमातेच्या पोस्टरने सामाजिक सौहार्द, शांतता बिघडत नाही का? 

सातत्याने केवळ हिंदू देवदेवतांचा अपमान होण्याने सामाजिक शांतता बिघडत नाही. एवढेच नव्हे, तर त्याची भीतीही कुणी व्यक्त करत नाही. त्यापुढे जाऊन त्यावर उमटलेली हिंदूंची प्रतिक्रिया मात्र सामाजिक शांतता बिघडवते. हे अजब तर्कट लढवले जात आहे. ‘सामाजिक शांतता बिघडू नये याची जबाबदारी दोन्ही समाजांची आहे’, अशी हास्यास्पद विधाने तर शिळ्या कढीवरची फोडणी आहे. यावरून एक किस्सा आठवला. काही मुले वर्गात दंगा करत होती. शिक्षक वर्गात आल्यावर सर्व मुलांना उद्देशून म्हणाले, ‘मुलांनो वर्गात दंगा करू नका, सर्वांनी शांत बसा. वर्गात शांतता राखणे ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे.’ त्यावर शांत बसणार्‍या मुलांपैकी एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, ‘गुरुजी, आम्ही शांतच आहोत. शाळा सुरू झाल्यापासून ती मुलेच दंगा करत आहेत. त्यांना शांत राहायला सांगा.’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘गप्प बैस. तुझ्यामुळेच वर्गातली शांतता बिघडत आहे.’

उदयपूरचा घटनाक्रम आपण पाहिला तर, कन्हय्यालालने धमकी मिळाल्याची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी दोन्ही समाजातील संबंधित व्यक्तींना बोलावून सामाजिक शांतता राखण्याचे आवाहन केले. अमरावतीतही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जेव्हा ‘माफी मागण्याचे’ किंवा ‘गळा चिरण्याचे’ धमकीचे संदेश फिरत होते तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. आता हाच प्रकार नागपुरातही सुरू आहे. ज्यांना धमकी मिळते त्यांच्यावरच सामाजिक शांतता बिघडवण्याचा आरोप होतोय. उलट त्यांचे अशा प्रकारे धमकी देणे नूपुर शर्माच्या वक्तव्यामुळे आणि तिच्या वक्तव्याला समर्थन दिल्यामुळे घडत असल्याचे बिंबवले जात आहे. इस्लामबद्दल बोलू नका, चिकित्सा करू नका, करणार्‍यांचे समर्थनही करू नका. साधे समर्थनही कराल तर गळा कापला जाईल, सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप माथ्यावर लागेल, याची भीती बिंबवली जात आहे. 

ही भीती बिंबवण्याचे काम आजकालचे नाही. जेव्हा अरबी टोळ्यांनी इस्लाम स्वीकारला तेव्हापासूनची आहे. अल्लाह किंवा पैगंबर यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीशी त्यांना काहीच देणंघेणं नव्हतं. एकमेकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इस्लामची, कुराणची चिकित्साच वर्ज्य ठरवली. जे कुणी मुस्लीम किंवा मुस्लिमेतर अशी चिकित्सा करतील, टीका करतील त्यांचे गळे कापणे सुरू केले. यामुळे, इस्लामची जशी भीती, दहशत मुस्लिमांमध्ये निर्माण झाली तशीच ती मुस्लिमेतरांमध्येही निर्माण झाली. कुराणची, इस्लामची जी मूळ आध्यात्मिक शिकवण होती, ती बाजूला पडली आणि राजकीय इस्लामचे वर्चस्व स्थापन झाले. निर्गुण-निराकार अल्लाहच्या प्राप्तीसाठी कलमा, रोजा, नमाज, जकात व हज यांच्या माध्यमातून व्रतस्थ आयुष्यात आध्यात्मिक उंची गाठणे याऐवजी अल्लाहसाठी गळे कापणे, मूर्ती फोडणे महत्त्वाचे ठरले. इस्लाम पंथाचा उदय झाला नव्हता तेव्हापासून आपल्याकडे निर्गुण-निराकार परमात्म्याची संकल्पना आहे. पण, म्हणून सगुण-साकार परमेश्वराच्या मूर्ती कुणी नष्ट केल्या नाहीत किंवा सगुण भक्ती करणार्‍यांचे गळे कुणी नाही कापले. पूर्वीपासून आपल्याकडे कुणी वाईट केले तर, ‘देव बघून घेईल’ असे म्हणण्याची पद्धत आहे. आपण त्याचा न्याय करायला शस्त्र हाती घेण्याची प्रवृत्ती नाही. शिवलिंगावर किंवा कुठल्याही हिंदू देवदेवतांवर टीका होते, त्याची अशा प्रकारे प्रतिक्रिया का उमटत नाही, गळे का कापले जात नाहीत, यामागचे हे कारण आहे. एका टीव्ही डिबेटमध्ये यावर बोलताना, ‘आपके भगवान के विरुद्ध कोई अपशब्द बोले तो आप एफआयआर तक नही करते, आप गला क्या काटोगे?‘ असा एका मुस्लीम विचारवंताने विचारलेला प्रश्न बिघडत्या सामाजिक सौहार्दाबद्दल, शांततेबद्दल व त्याविषयी असलेल्या भीतीबद्दल खूप काही सांगून जातो. 

अमरावतीतील व उदयपूरमधील गळे कापण्याच्या घटनांनंतर माध्यमांनीही वक्त्यांच्या मुस्लीम पंथावरील टिप्पणीवर ‘बीप’ वाजवणे सुरू केले आहे. एवढी जबरदस्त भीती निर्भीड असल्याचा दावा करणार्‍या माध्यमांवर बसली आहे. न्यायाधीशांच्या वक्तव्यामागे व अमरावतीत झालेल्या गतिहीन पोलीस तपासामागेही हीच भीती कार्यरत आहे. हिंदू म्हणून अभिमान असणे बहुतांश विचारवंतांनी कधीच सोडून दिले आहे. अभिमान, विश्वास यांची जागा आता सामाजिक शांतता बिघडण्याच्या भीतीने घेतली आहे. प्रत्यक्ष घटना, त्याचा अन्वयार्थ आणि त्याचे पडसाद यापेक्षाही त्याची भीती सर्वांत जास्त प्रभावी ठरते, तेव्हा समजावे की आपण अराजकतेकडे जात आहोत. सामाजिक सौहार्द, शांतता आणि भीती यात भीती वरचढ ठरणे चिंतनीय व चिंताजनक आहे.


२ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख. सर्व मुद्दे पटले. आध्यात्मिक इस्लाम आणि राजकीय इस्लाम असा जो फरक केला आहेस ते खरे नाही. सगळे आतंकवादी मुस्लिमच कसे?

    उत्तर द्याहटवा
  2. पूर्वी ईश्वर ही जी काही संकल्पना होती तीच मुळात नष्ट झाली आहे पूर्वी देवाचे असे म्हटले की .लोकघाबरत परंतु आता देव हा राजकीय चोकटीचया देव्हारयात बसविला गेला आहे त्यासाठी आपल्याला हवे तसे नियम व कायदे बनवून बंडाळी माजवण्यातच रस आहे गिरीजा

    उत्तर द्याहटवा