सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

भद्र, अभद्र आणि रामभद्र

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत.
आपल्या सभोवताली काय चांगले, काय वाईट हे आपण झुंडशाहीच्या नियमाने ठरवू लागलो आहोत. जे जिथे वाईट आहे, ते तिथे नेमकेपणाने सांगणे, आपण कधीच सोडून दिले आहे. आपण कुठल्या झुंडीचा भाग आहोत, त्यावरून आपले व्यक्त होणे ठरू लागले आहे. आपल्या धडावर झुंडशाहीचे ‘सहस्रशीर्ष’ आहेत. व्यक्ती कोण, काय आहे यापेक्षाही ती कुठल्या झुंडशाहीत आहे, कशाशी जोडलेली आहे, कुठल्या व्यक्तींची समर्थक आहे, यावर त्याचे महत्त्व ठरते. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कारटा’ ही उक्ती अतिशय क्षुल्लक ठरावी, अशा पद्धतीने टोकाची स्तुती व पातळी सोडून निंदानालस्ती केली जाते. परिणामी, आपण दृष्टी असूनही दृष्टिहीन होत चालले आहोत. ‘नराचा नारायण’ होण्याचे ध्येय असलेली माणसे स्वत:लाच किती हीन बनवत आहेत, हे पाहवत नाही. जे पाहिले होते, ते दिसत नाही आणि जे दिसते ते पाहवत नाही!

गिरिधर राजदेव मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. ते दोन महिन्यांचे असताना त्यांना खुपरीचा (ट्रॅकोमा) आजार झाला व त्यांचे डोळे गेले. १९५०साली त्यावर उपचार नव्हते किंवा योग्य उपलब्ध नव्हते म्हणून असेल, पण दृष्टी गेली. त्यानंतरचे त्यांचे सर्व  शिक्षण ऐकून व पाठांतर करण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाले. पाठांतर केले म्हणजे ते कायमस्वरूपी लक्षात राहण्याची व हवे तेव्हा ते आठवण्याची निसर्गदत्त क्षमता आहे. १९६७साली  त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजातून संस्कृतमधील उत्तरा माध्यमा (हायर सेकंडरी) ही परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९७१ मध्ये गिरिधरांनी वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठा त प्रवेश घेतला. तेथून त्यांनी शास्त्री (बी.ए.) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. १९७६मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून आचार्य (एम्.ए.) ही पदवी परीक्षेत सर्वप्रथम येऊन मिळविली. १९८१मध्ये त्यांनी विद्यावर्धिनी (पीएच्.डी.) ही पदवी प्राप्त केली. १९९७मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती (डी.लिट्.) ही पदवी मिळविली. ही पदवी त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ३ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांनी चित्रकूट (उत्तर प्रदेश) येथे ‘तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड’ या शाळेची स्थापना केली. तसेच २७ सप्टेंबर २००१ रोजी चित्रकूट येथे त्यांनी केवळ दिव्यांगांसाठी असलेले जगातले पहिले विद्यापीठ स्थापन केले. त्यापूर्वी, बरीच वर्षे आधी ते रामानंद संप्रदायाचे अनुयायी झाले. ‘तुलसीपीठ’ ही संस्था स्थापन केली. गिरिधर मिश्र हे ‘रामभद्राचार्य’ झाले!

मस्जिद-ए-जन्मभूमी विरुद्ध राममंदिर या न्यायालयीन खटल्यात त्यांनी दिलेली साक्ष व एकूणच रामचंद्रांविषयीचे संदर्भ फार महत्त्वाचे ठरले. तेव्हापासून ते टीकेचे धनी झाले. मोदींनी त्यांची व त्यांनी मोदींची प्रशंसा केल्याने त्याला राजकीय वळणही प्राप्त झाले. तेव्हापासून त्यांच्या शारीरिक व्यंगावर अतिशय अभद्र पद्धतीने टीका होऊ लागली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात असलेल्यांवर टीका होणे ही काही नवीन बाब नाही. पण, पूर्वी सार्वजनिक संडासाच्या फुटक्या दाराच्या आतल्या बाजूवर कोळशाने जे बसल्या बसल्या साहित्य पाडत, तेच आता सार्वजनिक माध्यमांवर पाडले जात आहे. या वैचारिक कुंथण्याला किंवा अतिसाराला मर्यादाच उरल्या नाहीत. यात हात धुऊन घेण्यात कुणीही मागे नाही. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही, याला काहीच महत्त्व नाही. आपल्या झुंडशाहीत ती नाही म्हणजे ती चूकच आहे, किंवा जशी ती दाखवली जाते तशीच आहे, अशी खात्री असते. ती तशी असणे हेच बहुधा झुंडशाहीचे ओळखपत्र असावे. नेहरू, गांधी, सावरकर हे तर या झुंडशाहीचे नेहमीचे ‘बळी’. 

या झुंडशाहीत जे केले जाते, त्याला वैचारिक विरोध म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. वैचारिक विरोध हा विचारांपुरताच मर्यादित असतो. विचारांवर, निर्णयांवर टीका करणे चुकीचे नाही. ती झालीच पाहिजे. नेहरूंच्या निर्णयांचे परिणाम आज जाणवत आहेत, त्यावर टीका होते. पण, म्हणून त्यांच्या नसलेल्या दहा बायका काढून अभद्रतेची हीन पातळी गाठणे चुकीचेच आहे. मोदींनी आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसू लागल्यानंतर त्यावरही टीका होणे स्वाभाविकच आहे. पण, म्हणून त्यांच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यावर अत्यंत हीन पातळी गाठून टीका करणे, याला वैचारिक विरोध कसे बरे म्हणता येईल?

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत. ती पातळी गाठता येत नाही म्हणून उत्तर देणे थांबते. दु:ख याचे नाही, की रामभद्राचार्यांवर अभद्र बोलले, लिहिले गेले; दु:ख याचे आहे की चांगल्या, सुशिक्षित, कविमनाच्या माणसांनी ते केले. त्याचे समर्थनही, कुठले तरी कुठे तरी ’सेटल’ करून ‘जितं मया’, म्हटल्यासारखे केले याचे वाईट वाटले. भद्र माणसांनी अभद्रतेची सर्वांत खालची पातळी गाठली याचे दु:ख झाले. ‘नरेचि केला हीन किती नर..’ हे पाहून प्रचंड त्रास झाला.  

३ टिप्पण्या:

  1. social mediaवरील टिप्पणी न वाचण्यासारख्या असतात. खरोखरच जुन्या काळचे bus standवरील संडास आठवले. correct आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अशी चिखलफेक ही स्वाभाविक असेलही परंतु ते करूनही त्याच किंवा तत्सम चिखलात लोळणारे बघितले की चिड संताप येतो त्याचे काय करायचे?

    उत्तर द्याहटवा