कुठलाही सण आला की त्याविषयी शंका, प्रश्न उपस्थित करणारे उपटतात. ही वार्षिक साथ आहे. दरवर्षी तेच प्रश्न, त्याच शंका. तसे केले म्हणजे त्यांना आपण काही तरी मोठे, वेगळे केले असे वाटते. यातला पहिला हल्ला हा संकेतांवर असतो, नंतरचा सभ्यतेवर असतो आणि शेवटी संस्कृतीवर. या क्रमाने आपल्याही नकळत ते केले जाते.
‘हे केलेच पाहिजे का?’, ‘नाही केले तर काय होते?’ हे दोन प्रश्न त्यासाठी विचारले जातात. दोन चार पिढ्यांपूर्वी हे प्रश्न विचारले की कानाखाली आवाज यायचा. आता तो काढणे ‘कायदेशीर गुन्हा’ झाल्याने तो मार्गही बंद झाला आहे. ही दोन शस्त्रे संकेतांविरुद्ध वागायला व त्या बदल्यात आपल्याला हवे ते मान्य करून घ्यायला वापरण्याची सुरुवात लहानपणापासूनच होते. तरुणपणात त्याला ‘विद्रोहा’चे व ‘संघर्षा’चे बाळसे धरते. संकेतांपासून सभ्यतेपर्यंत पोहोचलेला हा प्रवास पुढे आयुष्यभर संस्कृती संपवण्यासाठी सुरूच राहतो.
याची अत्यंत विचारपूर्वक व पद्धतशीर मांडणी फ्रँकफर्ट स्कूल, ग्राम्सी, सांस्कृतिक अभ्यास, क्रिटिकल थिअरी, स्त्रीवाद, पोस्ट-स्ट्रक्चरलिझम या सांस्कृतिक मार्क्सवादाच्या निरनिराळ्या प्रवाहांनी केली आहे. मार्क्सवादाचा भर मुख्यतः वर्ग, उत्पादनसंबंध आणि आर्थिक रचना यावर होता. पण, त्या संकल्पनाच चुकीच्या असल्याचे सिद्ध झाले. ‘क्रिटिकल थिअरी’मध्येही त्याचे खापर त्या संकल्पनेवर न फोडता ते संस्कृती, कुटुंब, पंथ, शिक्षण, माध्यमे, मानसशास्त्र आणि सामाजिक मूल्ये यावर फोडण्यात आले. संस्कृतीसह हे सर्व संपवणे हेच एकमेव ध्येय बनले. त्यासाठी या प्रत्येक घटकाबद्दलची मते बदलणे सुरू झाले. ‘हे सर्व मुक्त होण्यातले अडथळे आहेत’ हा विचार मांडायला सुरुवात झाली. स्वत: एक ‘कल्ट’ असलेला मार्क्सवाद अन्य पंथांना ‘अफूची गोळी’ म्हणू लागला. संकेत, सभ्यत व संस्कृती यांच्यावर पायरीपायरीने हल्ले सुरू झाले.
फक्त एक विचार पेरायचा आणि तो सोडून द्यायचा. तो कुणीतरी उचलतो व पुढे जातो. त्याच्या पाठीमागे आपली सगळी शक्ती लावायची, हे धोरण सांस्कृतिक मार्क्सवाद्यांनी वापरले. त्यासाठी अनेक शिक्षणासारखी अनेक क्षेत्रे, मनोरंजनासारख्या अनेक संस्था यांवर ताबा मिळवला. यासाठी प्रचंड चिकाटी आणि वेळ द्यावा लागतो. तो त्यांनी दिला व त्याचे दृश्य परिणाम आज दिसत आहेत.
जाहिरातीत ‘कुत्र्याला राखी बांधणे’ हा त्यातलाच एक प्रकार. संकेत काय आहे? बहिणीने भावाला राखी बांधणे; ‘कुत्र्याला बांधले तर कुठे चुकले? तोही तिचे रक्षण करतोच ना!’ हा तर्क त्यासाठी देण्यात आला. ‘प्रसंगानुसार वेषभूषा असावी’ हा संकेत पायदळी तुडवत ब्रालेट घालून बहीण भावासमोर बसली. ‘तिने कोणते कपडे घालावे हे सांगणारे तुम्ही कोण?’, ‘कपडे निवडण्याचा तिला अधिकार आहे.’ अशी भूमिका स्त्रीवाद्यांनी मांडली. त्याला विरोध करणे हे अप्रतिष्ठेचे व स्त्रीवादासच विरोध करणारे आहे, अशी भीती आधीपासूनच पेरली गेली आहे. त्यामुळे विरोधही हळूहळू मावळत जातो.
संकेत एकदा भंगला, की पुढील पिढीसाठी तो नियम होतो. ‘काही नाही होत गं, नको लावूस तू कुंकू आणि टिकली’ हे वाक्य आई मुलीला ऐकवते तेव्हा त्यानंतरच्या पिढीसाठी तो नियम होतो. कुंकू, टिळा लावायचीच लाज वाटू लागते. कपड्यांबाबतही तेच सुरू झाले. साधारण ७०च्या दशकात भारतीय मध्यमवर्गातील बायकांनी रात्रीच्या वेळेस मॅक्सी, गाऊन घालायला सुरुवात केली. याची सुरुवात ५०च्या दशकातील अभिनेत्रींनी पडद्यावर केली होती. ती उच्चभ्रू, अतिश्रीमंतवर्गात पहिल्यांदा पाझरली व नंतर मध्यमवर्गात आली. भाऊबिजेला मोठा भाऊ येतोय हे दिसताच आत पळून साडी नेसणार्या बायका आधीच्या पिढीत होत्या. आता गावातल्या रस्त्यांवरही मॅक्सी, गाऊन घातलेल्या बायका हिंडताना सहज दिसतात. शहरी भागात तर जे झाकायला कपडा घालायचा ते दिसलेच पाहिजे हा ‘मॉडर्न’ असण्याचा दाखला आहे. कपड्यांवरून संस्कृती ठरवणेही आता चुकीचे व गुन्हा ठरले आहे. एक दोन पिढ्यांपूर्वी ‘ठेवलेली’ किंवा ‘ठेवलेला’ हे लाज वाटणारे नाते; आता ‘लिव्ह इन’ या गोंडस नावाने फारच अभिमानाचे झाले आहे.
अभिमानाच्या जागा बदलणे, पर्याय देणे, अन्य महत्त्वाची गोष्ट त्यासमोर उभी करून मूळ संकेत दुय्यम ठरवणे हे याच नीतीचे एक सफल उदाहरण आहे. ‘मेल्यावर श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणी आईवडिलांना सांभाळा’ हे वाक्यच उदाहरण म्हणून घेऊ. विचार अगदी पटण्यासारखाच असतो. पण, मूळ हेतू आईवडिलांना सांभाळा हे सांगण्याऐवजी श्राद्ध करू नका हे सांगणे असतो. जिवंतपणी आईवडिलांचा आदर करणे व मृत्यूनंतरही त्यांचे श्राद्ध करणे हे दोन्ही महत्त्वाचे आहे, हे सांगितले जात नाही. उंच पिकातून डोलणारा व बाळमुखातून हसणारा देव सांगण्यासाठी रामेश्वर व काशीतल्या मूर्तीत तो नाही, हे सांगण्याची आवश्यकता नसते. जसा तो तिथे आहे तसाच तो इथेही आहे; दोन्ही ठिकाणी त्याला पाहा हे सांगता येते. पण, सांगितले जात नाही. का?
एकदा संकेत हलले की, त्यामागचे असलेले सभ्यतेचे महत्त्व कमी होते व संस्कृती नष्ट होते. आता हिंदू संस्कृती संपवायला कुणा मुस्लीम आक्रमकाची किंवा ख्रिश्चन मिशनरींची आवश्यकताच उरली नाही. ते काम स्वत: हिंदूच पुढे सरसावून करत आहेत. देवळांनी इतका भ्रष्टाचार व भांडणे होत आहेत, की ख्रिश्चनांनी व मुसलमानांनी ती पाडून टाकली असती तर बरे झाले असते, असे वाटते. प्रत्येकास महाजन व्हायचे आहे; भक्त म्हणून राहणे पुरेसे उरले नाही. जबाबदारीपेक्षाही अधिकार महत्त्वाचे झाले आहेत. देऊळ हा संस्कृतीचा केंद्रबिंदू न राहता, बाजार झाला आहे. राममंदिर हे संस्कृतीचा मानबिंदू न राहता चोरीचे ठिकाण बनावे, याचसाठी इतका लढा दिला होता का?
संस्कृती टिकवायची असेल तर पहिल्यांदा जिथे संकेतांवर हल्ला होतो, तिथेच तो प्राणपणाने रोखायचा असतो. शिवलिंगावर कंडोम घातलेले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले त्याच वेळी त्याचे योग्य पारिपत्य झाले पाहिजे होते. हेच इस्लामबाबत झाले असते, तर ‘सर तन से जुदा’ झाले असते. कारण ते आपल्या संकेतांबाबत अत्यंत जागरूक आहेत. आपल्याला गळे कापत फिरण्याची आवश्यकता नाही. फक्त संकेतांवर हल्ला करणार्यांवर योग्य पद्धतीने कारवाई करण्यास काय हरकत आहे? भ्रष्टाचार हाच शिष्टाचार व असभ्य असणेच सभ्यतेचे लक्षण होते तेव्हा ती संकेत हलल्याची पुढील पायरी असते. असे होत होत आपली संस्कृती मरणासन्न अवस्थेस पोहोचली आहे. संकेतांबद्दल आग्रही होणे म्हणूनच आवश्यक आहे.

३ टिप्पण्या:
फार छान विश्लेषण.
वोक विचारधारेचं अत्यंत समर्पक आणि भेदक विश्लेषण केल्या बद्दल अभिनंदन.
छान, परखड विचार...तथाकथित बुद्धिप्रामाण्याच्या नावाखाली संकेतांना छेद देणे आणि वोकिझमच्या नावाखाली अराजकता माजविणे हे आजकाल सर्रास दिसू लागले आहे...पूर्वी अंग झाकण्यासाठी कपडे वापरीत आज अंगप्रदर्शनासाठी कपडे वापरतात.पूर्वी फाटके कपडे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाई आणि ते लपवण्यासाठी फाटलेले कपडे टाचून घातले जात आज मात्र फाटके कपडे घालणे हे आत्यंतिक श्रीमंतीचे लक्षण मानले जाते.काय म्हणावं या मानसिकतेला?कालाय तस्मै नमः 🙏🏻
टिप्पणी पोस्ट करा